नवीन लेखन...

आभाळाचे खांब : २

जीवन गौरव पुरस्कार घेण्यासाठी दादासाहेब रंगमंचावर आले आणि टाळ्यांचा कडकडाट करीत संपूर्ण सभागृह, त्यांना मानवंदना देण्यासाठी उभं राहिलं. त्यांनी हात जोडले. टाळ्यांचा कडकडाट चालूच होता. दादासाहेबांनी सर्वांना थांबवण्याचा यत्न केला, पण उत्स्फूर्तता असल्यानं कुणीच थांबत नव्हतं.

दादासाहेब सर्वांच्या आदराचं स्थान होते. रंगभूमीवरील अनभिषिक्त राजे होते. गेली पन्नास वर्षे अथकपणे त्यांनी रंगभूमीची सेवा केली होती. असंख्य कलाकारांना घडविण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. संपूर्ण कारकीर्द यशस्वी, हाऊसफुल गर्दीनं भरलेली आणि निष्कलंक अशी होती. त्यामुळं त्यांना जीवनगौरव जाहीर झाला आणि समाजाच्या सर्वच क्षेत्रातून आदरयुक्त कौतुकाचा वर्षांव झाला होता. त्याचं प्रतिबिंब आजच्या समारंभात उमटलं होतं.

गर्दी इतकी झाली होती की आयोजकांना थिएटर बाहेर, आवारात स्क्रीनची सोय करावी लागली.

– टाळ्यांचा कडकडाट थांबत नव्हता. निवेदकाच्या वाणीला बहर आला होता आणि अनपेक्षितपणे दादासाहेब विंगेकडे वळले. त्याच क्षणी एकदम शांतता पसरली.काय झालं कुणाला कळेना. सगळं सभागृह अवाक झालं. सगळ्यांचं लक्ष विंगेकडे गेलं. तिथे रामुदा होता. काय होतंय हे कळायच्या आत दादासाहेब खाली वाकले आणि त्यांनी रामुदाच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला. म्हातारपणाकडे झुकलेला रामुदा लाजला. खजील झाला. ओशाळला आणि त्याच्या डोळ्यातून आसवं ओघळली.

दुसऱ्याच क्षणी दादासाहेब रंगमंचावर आले आणि त्यांनी निवेदकाकडून माईक हाती घेतला. ” तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी विंगेत का गेलो. कारण मला रामुदाला नमस्कार करायचा होता. त्याचं वय मला माहीत नाही. मी विचारलंच नाही कधी. माझ्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत, प्रत्येक क्षणी तो माझ्या बरोबर होता म्हणून मी मोठा झालो. नामवंत वगैरे झालो. नाटकवाल्या सगळ्या ग्रुप्सना, तो काय आहे हे माहीत आहे. तो मेकअपमन आहे. तो लाईट्स सांभाळतो. तो नेपथ्य लावायला मदत करतो. तो कपडेपट सांभाळतो. तो इस्त्री करतो. गरज असेल तर तोंडाला रंग लावून वेळ सांभाळतो. प्रयोग सुरू होण्याआधीच्या धावपळीत त्याचे पाय थकत नाहीत, दुखत नाहीत. नाटक संपल्यानंतर सगळी आवराआवर झाली, सामान ट्रकमध्ये भरलं आणि सगळे जेवले की मग हा कसातरी घाईगडबडीत दोन घास खाऊन गाडीत येऊन बसतो. जेवण संपलं असलं तर याची तक्रार नसते, तो नुसत्या वडापावावर राहतो. आम्हाला झोप मिळावी, प्रवासात त्रास होऊ नये म्हणून रात्रभर हा गाडीत जागा असतो. रंगमंचावर आमच्या पायाला खिळे टोचू नयेत म्हणून हा स्वतः सगळा रंगमंच झाडून काढतो. विंगेत उभा राहून प्रत्येक प्रयोग पाहतो आणि कोण कुठे चुकलं ते स्पष्टपणे सांगतो. आम्हा सगळ्यांचं पाठांतर करवून घेण्याचा कठीण काम हा लीलया करतो. माझ्या स्वगताच्या वेळी मी जेव्हा विंगेकडे तोंड करून अभिनय करीत असतो, तेव्हा रामुदा आतून इतका चांगला प्रतिसाद देतो की पूछो मत. त्यामुळं तुम्हाला माझा अभिनय दिसतो पण विंगेतून माझ्याइतका किंबहुना माझ्याहून दर्जेदार अभिनय करणारा रामुदा दिसत नाही. त्याच्या तुटपुंज्या पगारात त्याचं कसं भागतं हे आम्ही कधी त्याला विचारलंच नाही. त्याच्या मुलीच्या लग्नात, त्याचं बापाचं काळीज आम्ही अनेकांनी पाहिलं आहे. माझ्या दुःखाच्या क्षणी मी अनेकदा त्याचे खांदे भिजवले आहेत. कुणी सांगितलं तर तो तिकिटाच्या खिडकीतही बसतो आणि गरज लागली तर बॅटरी हाती घेऊन डोअर किपरसुद्धा बनतो. ग्रामीण भागातल्या दौऱ्याच्या वेळी नाटकाचे समान वाहण्यासाठी हमाल होताना त्याला कमीपणा वाटत नाही आणि स्त्री कलाकारांना कुणी त्रास दिला तर तो कुणाची खैर करीत नाही.आमची घरं उभी करताना त्याला चांगला निवारा आम्ही बांधून देऊ शकलो नाही ही आमची खंत आहे. आमची तब्येत सांभाळण्यासाठी त्याचं आरोग्य त्यानं अनेकदा पणाला लावलं आहे. नावलौकिक असल्यानं आम्हाला कर्ज मिळणं जेवढं सोयीचं झालं तेवढं, त्याला कर्जासाठी जामीन राहण्यात आम्ही कमी पडलो, ही खंत आहे. आमची मुलंबाळं शिकून गडगंज कमवायला लागली पण त्याच्या मुलांना संसार सांभाळण्यासाठी शिक्षण सोडून लहान वयात मोलमजुरी करावी लागली, याचे क्लेश सतत मनाला बोचत आहेत. अशावेळी आम्ही प्रतिष्ठा नामक भुलभुलैयात अडकल्याने आमच्या पायाखालची जमीन आम्हाला कधी दिसलीच नाही. तिची सुखदुःख कळलीच नाहीत. आम्ही स्वतःला आभाळाएवढे उंच समजत असताना आम्हाला पेलणाऱ्या या उत्तुंग खांबांना जाणून घेणं कधी गरजेचं वाटलंच नाही. म्हणून ज्याच्यामुळं आज मी मोठा झालो त्याला आजचा हा जीवन गौरव, ही शाल, तुम्ही दिलेले पाच लाख रुपये आणि हे स्मृतिचिन्ह मी रामुदाला अर्पण करतो. शिवाय माझे स्वतःचे पाच लाख त्याच्या पायावर अर्पण करतो. रामुदाच्या कर्तृत्वापुढं हे नगण्य आहे, हे मला कळतंय पण हे फूल नाही, फुलांची पाकळी आहे, हे नम्रपणे कबुल करतो .”

दादासाहेबांनी रामुदाला विंगेतून पुढं आणलं आणि पुन्हा एकदा त्याच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला.

आभाळाच्या खांबाचा तो सत्कार बघून सगळं सभागृह पुन्हा एकदा रामुदाला मानवंदना देण्यासाठी उभं राहिलं आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला …

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.

९४२३८७५८०६

ही कथा काल्पनिक असली तरी आशय खरा आहे .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..