नवीन लेखन...

७० रुपयांचं पुस्तक आणि मी..

परवाच दादरच्या ‘आयडीयल बुक स्टाॅला’त जाऊन ‘अजब प्रकाशना’ने ७० रुपयांत कोणतंही पुस्तक’ घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे, तिचा लाभ घेतला. ह्या ‘सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा’ अशा जवळपास पन्नासएक पोस्ट माझ्याकडे आल्या. वास्तविक मी अशा कोणत्याही पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतोच, त्या मुळे अशा पोस्ट आल्या काय अन् न आल्या काय, मी तिकडे गेलोच असतो. तसंही आयडीयलवरुन जाणं-येणं हा माझ्या नित्याचा क्रम आहे आणि अधनं मधनं मी आयडीयलच्या बोळात कधीतरी जात असतो. आता मला अशा पोस्ट पाठवणाऱ्यांपैकी किती जण तिकडे गेले असावेत, हा प्रश्न माझ्या मनात उगवत होता, पण मी तिकडेच दाबून टाकला.असे प्रश्न विचारायचे नसतात. काही लोक समाजाला शहाणं करण्यासाठी धडपडत असतात.

कोणतंही पुस्तक खरेदी करणं ही माझ्यासाठी महत्वाचं असतं. ‘सुवर्णसंधी’ असते ती खिशात पैसे असतात तेंव्हा; मग मी ते ७० रुपयांत मिळतंय की ७०० रुपयात याचा विचार कधीच करत नाही. ‘पुस्तक खरेदी’ हिच माझ्यासाठी सुवर्णसंधी. ‘७० रुपयात पुस्तक’ मिळतंय ही सुवर्णसंधी आहे की हवं ते पुस्तक मिळतंय ही सुवर्णसंधी आहे, हे समजणं ज्याच्या त्याच्या माईंडसेटचा प्रश्न आहे. माझ्यासाठी मात्र आवडलेलं कोणतंही पुस्तक कोणत्याही किंमतीला खरेदी करण्यासाठी खिशात पुरेसे पैसे असणे, हिच सुवर्णसंधी..!

स्वस्त्यात पुस्तक ही काय मला सुवर्णसंधी वाटत नाही आणि उगाच माफक किॅमतीत पुस्तक मिळतंय म्हणून पुस्तकं घेणं आणि शोपीस म्हणून घरात ठेवणं हे ही मला पटत नाही. तरीही मी अशा पुस्तक प्रदर्शनात जात असतो. न जाणो एखादं उत्तम जुनं पुस्तक सापडूनही जाईल म्हणून. परवा आयडीयललाही गेलो. तासभर होतो. ७० रुपयेवाली विविध विषयांवरची भरपूर पुस्तक आहेत तिकडे. गर्दी होती. गंम्मत म्हणजे बहुतेक गर्दी विविध पदार्थांच्या रेसिपी सांगणाऱ्या पुस्तकांच्या समोर होती. त्या खालोखाल ज्योतिष, धार्मिक, आरोग्य, यश मिळवण्याच्या क्लृप्ती इत्यादी विषयांवरच्या पुस्तकांसमोर होती. ह्या प्रकारच्या पुस्तकांना लोक चाळुन पाहात होते, खरेदीही करत होते. बाकी विषयावरचीही पुस्तकं होती, पण त्या पुस्तकांचं मात्र बहुतकरुन विंडो शाॅपिंग सुरु होतं..

मी ही तीन पुस्तकं घेतली. ‘द इव्हनिंग क्लब’ आणि ‘ट्रेन टू पाकिस्तान’ ही खुशवंत सिंहांची दोन आणि एक मलाला युसुफजाईवर लिहिलेलं. तिन्ही भाषांतरीत. मला खुशवंत सिंहांचं कोणताही आडपडदा न ठेवता केलेलं प्रामाणिक लेखन मला खुप आवडतं आणि त्यांची मराठीत भाषांतर केलेली बहुतेक सर्व पुस्तकं माझ्या संग्रहात आहेत. मी कोणतंही पुस्तक खरेदी केलं, की कधी एकदा घरी जाऊन वाचतो असं मला वाटतं..हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणांची आपण आतुरतेनं वाट पाहात असतो ना, अगदी तसं.

घरी गेलो. माझी आवडती सिरियल ‘तारक मेहता’ पाहिली आणि जेवता जेवता रात्री ९ च्या हिन्दी बातम्या पाह्यल्या. मी हिन्दी बातम्याच पाहातो, मराठी बातम्यांमधे, बातम्यांपेक्षा मनोरंजनच जास्त असतं. हिन्दीचीही अवस्था तशीच, पण काहिशी बरी. किमान हिन्दी तरी सुधारतं व मराठी बातम्यांत (आणि इतर कार्यक्रमांतही) हिन्दी शब्द किती आणि कसे आले हे चटकन कळतं..बातम्या पाहून झाल्यावर मी एकूण २१० रुपये खर्चून विकत घेतलेल्या तीन पुस्तकांपैकी श्री. खुशवंत सिंहांचं ‘ट्रेन टू पाकिस्तान’ वाचायला घेतलं..

मला आवडणाऱ्या कोणत्याही विषयावरचं पुस्तक मी वाचायला घेतलं, तर पहिल्या दहा-पांच पानांतच त्या पुस्तकाचं गारुड मनावर पसरतं. आणि मग ते पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय मी खाली ठेवत नाही, मग रात्रीचे कितीही का वाजेनात. डाॅ. मीना प्रभुंची सर्व प्रवास वर्णणं मी अशीच वाचून संपवली आहेत. कविता महाजनांची, विजय तेंडुलकरांची, जयवंत दळवींची, राजन खानांची, अनील अवचटांची व इतर काहींची पुस्तकं मी अशीच वाचली आहेत. हे वाचन म्हणजे फक्त डोळ्यासमोर शब्द सरकण्याची प्रक्रिया नसते, तर डोळे, मन, मेटू आणि कल्पना यांचा एक भन्नाट चित्रपट मन:चक्षुंसमोर साजरा होत असतो आणि तो काळ-वेळ आणि आजुबाजुचं जग विसरायला लावणारा असतो..खुशवंत सिंहांचीही काही पुस्तकं मी अशीच एका बैठकीत वाचून संपवली आहेत.

कोणतंही पुस्तक पहिल्या काही पानातच -आपल्या आवडत्या लेखकाचं किंवा विषयाचं असलं तरी- आपल्याला भावणार की नाही ते कळतं. श्री. भलचंद्र नेमाडेंचं ‘हिन्दू’ असंच वाचायला घेतलं व पहिल्या काही पानांतच मला कंटाळा आला आणि ते बाजुला ठेवलं, ते आजतागायत. तसंच काहीसं मला ७० रुपयांत घेतलेलं खुशवंत सिंहाचं पुस्तक वाचताना वाटलं. इथे प्रश्न कथावस्तूचा नव्हता, खुशवंतांचे लेखन मला आवडतंच. इथे अडचण येऊ लागली, ती पुस्तकाच्या स्वरुपाची..

पुस्तकाचं स्वरुप कसं असावं, ह्याची प्रत्येकाची कल्पना वेगळी असू शकते. मला पुस्तक त्याच्या मुळ स्वरुपातच वाचायला आवडते. ७० रुपयांमधे मिळणारं पुस्तक, स्वस्त्यात पुस्तक मिळाल्याचा आनंद देते हे खरंय, पण मला तरी तो आनंद तेवढाच वाटतो. कारण ही पुस्तकं नवी कोरी असली तरी, अशा पुस्तकात पुस्तकाचं मुळ स्वरुप मात्र कुठेतरी हरवलेलं असतं.

पुस्तकाचं मुळ स्वरुप म्हणजे काय, तर मुळच्या प्रकाशकाने छापलेलं मुळचं पुस्तक. पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठावर असलेला बार कोड यामधला सर्व ऐवज. नामवंत किंवा कोणत्याही प्रकाकाने छापलेलं मुळ पुस्तक, त्याचं मुखपृष्ठ, मुखपृष्ठावरील चित्र, पुस्तकाच्या कागदाचा पोत, रंग, त्याची छपाई, त्याच्या रंगांचा दर्जा, आतील पहिल्याच पानावर असलेलं पुस्तकाचं व लेखकाचं नांव, त्याच पानावर सर्वात खाली असलेलं प्रकाशकाचं नांव, नंतरच्या पानावर डाव्या बाजुला लेफ्ट अलाईनमेंन्ट करुन असलेलं लेखक व काॅपीराईट धारकाचं नांव, त्या खाली असलेली प्रकाशक, मुद्रक, मुद्रित शोधक यांची श्रेय नामावली, आयएसबीएन नंबर व सर्वात शेवटी लिहिलेली किंमत इथपासून ते सर्वात शेवटच्या पानावर छापलेली त्याच लेखकाच्या इतर पुस्तकांची यादी किंवा संदर्भ ग्रंथ इतकं मिळून कोणतही पुस्तक सिद्ध होत असतं. ह्यात प्रत्यक्ष कथावस्तू, त्या कथावस्तूच्या ओळींची छपाई, त्या छपाईचा फाॅन्ट, फॅान्टचा पाॅईंट, दोन ओळींमधलं अंतर याचा परिणामही पुस्तकाच्या वाचनावर होत असतो. पुस्तकातं भौतिक वजन हा ही एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो. हे असं मुळ स्वरुपातलं पुस्तक अंतर्बाह्य देखणं असतं, मग ते किती का जुनं असेना..!

इतरांचं माहित नाही, पण माझ्यासाठी पुस्तक वाचन हा एक सोहळा असतो. पहिलं ते पुस्तक पुन्हा पुन्हा निरखून पाहाणं, त्याच्या स्पर्शाचा आनंद घेणं, त्याला चोबाळणं, त्याचा हवाहवासा वाटणारा वास घेणं, मधुनच चाळून पाहाणं, त्यातून आतल्या लेखनाचा अंदाज घेणं वैगेरे आरोह-अवरोह झाले की मग एखाद्या गायकाने प्रत्यक्ष गाण्यासाठी बैठक मारावी, तसं मग माझं पुस्तक वाचन सुरु होतं. पहिल्या काही तानांतच गवयाने आपल्या तना-मनाचा ताबा घ्यावा आणि भवताल विसरून आपण त्या सुरांच्या स्वर्गिय मैफिलित रंगून जावं, तस पहिल्या काही पानांतच पुस्तक आपला ताबा घेतं आणि मग सुरू होते एक उत्तरोत्तर रंगत जाणारी यादगार मैफील. मूळ स्वरुपातल्या कितीही जुन्या असलेल्या पुस्तकात हे मला अनुभवता येतं. अगदी नव्या कोऱ्या स्वस्त पुस्तकात मला ही जादू आजतागायत अनुभवता आलेली नाही. महागडं तिकिट काढून पहिल्या रांगेत बसून पाहिलेली जानदार मैफिल आणि मैफिलीतली तिच गाणी सिडीवर ऐकणं यात फरक हा राहाणारच.

आयडीयल मधून प्रत्येकी अवघ्या ७० रुपयात मिळालं म्हणून घेतलेल्या खुशवंत सिंहांच्या ‘ट्रेन टू पाकिस्तान’ या पुस्तकाचं वाचन करताना माझं असंच झालं पहिल्या पंधरा-विस पानांतच कंटाळा आला. विषय उत्तम होता, तरीही ते पुस्तक माझ्या मनाची पकड घेईना. म्हणून ‘द इव्हनिंग क्लब’ उघडलं, तर तिथेही तिच परिस्थिती. मी सरळ पुस्तकं बाजूला ठेवून दिली. असं का होतं याचा विचार केला असता, त्या मागे मला वर उल्लेख केलेली कारणं त्या मागे आहेत असं लक्षात आलं. वरील महत्वाच्या गोष्टी ७० रुपयांच्या पुस्तकांत नाहीत. अर्थात मुळ स्वरुपातलं पुस्तक २००-३०० रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त आणि ७० रुपयात मिळणारं पुस्तक यात फरक हा राहाणारच याची मला कल्पना आहे.

स्वस्त्यात पुस्तक मिळणं ही ज्यांना पर्वणी वाटते, त्यांनी मग मुंबईच्या फोर्टातील फुटपाथ धुंडाळावेत. अत्यंत कमी किमतीत एखादं सुरेख पुस्तक जुन्या, परंतु त्याच्या मुळ स्वरुपात मिळून जातं. असं पुस्तक कितीही जुनं असलं, तरी त्या पुस्तकाचं गारुड तना-मनावर भरून राहातं.

हल्लीच मी सवयीप्रमाणे फुटपाथ शोधत असताना मला श्री. नारायण महाडीक यांनी लिहिलेलं ‘कैदी नं.३१४६७’ हे पुस्तक अवघ्या शंभर रुपयात सापडलं. श्री. महाडीक हे काही लेखक नव्हेत. अत्यंत सुखवस्तू घरातला हा हरहुन्नरी मुलगा मोठेपणी दैववशात एका गुन्ह्यात सापडतो व त्याला तुरुंगवास होतो. त्याच्या तुरुंगातल्या आठवणी, त्याच्या अंगातल्या कला-कोशल्यामुळे त्याला जेल प्रशासनाकडून मिळालेली सन्मानाची वागणूक व बढती, कैद्यांची मानसिकता, कैद्यांमधे असलेलं माणूसपण इत्यादींचं अत्यंत सुंदर वर्णन अत्यंत ओघवत्या भाषेत श्री. महाडीक यांनी केलेलं आहेत. या अधेमधे त्यांचं वैयक्तिक आयुष्य, पत्नी, मुलं, नंतर आयुष्यात आलेल्या स्त्रिया यांचीही माहिती आहे. महाडीक रत्नागिरीच्या तुरंगात बंदी असताना त्यांना स्वातंत्र्वीर सावरकरांची सेवा करण्याची तीन महिन्यांसाठी मिळालेली संधीवरचं प्रकरण मुळातून वाचण्यासारखं आहे. लेखक नसलेल्या या लेखकाचं सन १९७४ साली प्रसिद्ध झालेलं (दुसरी आवृत्ती १९८६) हे आत्मचरित्रात्मक पुस्तक मनाचा ठाव घेतं. हे पुस्तक जवळपास ३२ वर्ष जुनं असुनही मूळ स्वरुपात असल्याने, मला वरच्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या गाण्याच्या मैफिलीचा आनंद देऊन गेलं. अशी अनेक पुस्तकं मी फुटपाथवर वेचली आहेत. रुपये ७० मध्ये मिळालेल्या नव्या कोऱ्या पुस्तकात मला हा आनंद घेता येत नाही. ही कदाचित माझी मानसिकता असावी.

तरीही ७० रुपयांत मिळणाऱ्या पुस्तकांचेही काही फायदे आहेत. मुख्य म्हणजे एखाद जुनं दुर्मिळ पुस्तक इथे अवचित मिळून जातं. माझा मित्र श्री. अजित दुखंडे यांने असंच श्री. गोविंद नारायण मडगांवकरांचं ‘मुंबईचं वर्णन’ हे सन १८६२ सालातलं पुस्तक इथेच विकत घेतलं (तेंव्हा ५० रुपयांत कोणतंही पुस्तक मिळायचं) आणि मला भेट दिलं. या पुस्तकामुळेच माझी ‘मुंबईतील ऐतिहासिक पाऊल खुणांचा मागोवा’ ही दीर्घ लेखमाला आकाराला आली. ज्यांना पुस्तक वाचनाची आवड आहे, परंतु आर्थिक कारणांनी त्यांना ती विकत घेणं जमत नाही, त्यांच्यासाठी ही एक पर्वणी असते हे खरं..प्रत्येक गोष्टीत फायदा-तोटा हा असायचाच. पुन्हा फायदा कशाला म्हणावा आणि तोटा कशाला म्हणावा, हा ज्याचा त्याच्या मानसिकतेचा प्रश्न असतो, हा ही भाग आहे.

आज ‘दै. लोकसत्ता’ने ‘अप्रकाशित पु.ल.’ प्रकाशित केलं. सकाळीच उठलो. भक्तीभावाने पेपरवाल्यापाशी पोचलो. त्या एकत्र बांधलेल्या पन्नासेक कागदांची पेपरवाल्याच्या दृष्टीने असलेली किंमत मात्र रुपये ६० पेपरवाल्या भैयाच्या हाती ठेवली व मोट्या भाविकतेनं तो अमुल्य ठेवा घरी घेऊन आलो. आज रात्री पुन्हा तो सोहळा रंगणार आणि उत्तररात्रीपर्यंत उत्तरोत्तर रंगत जाणार..मूळ स्वरूपातल्या नव्या कोऱ्या पुस्तकांबद्दल माझी भावना काहीशी अशी असते..!

-@नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

1 Comment on ७० रुपयांचं पुस्तक आणि मी..

  1. स्वस्त पुस्तकांच्या बाबतीत माझाही असाच विचार आहे. पुस्तक वाचण्याचा आनंदच खूप वेगळा असतो. आपला लेख वाचून छान वाटले.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..