नवीन लेखन...

ज्ञानपीठ पुरस्कार (नोबेल पुरस्कार इतकाच सर्वश्रेष्ठ)

 

|| हरी ॐ ||

माहितीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञातील प्रगतीच्या जोरावर देश-विदेशात नवनवीन शोध लागताहेत आणि तरुणपिढीबरोबर इतरही मंडळी वाचन संस्कृती पासून दुरावत चालली आहेत असे काही विश्लेषकांच्या माहितीच्या आधारे कळते. परंतु त्यांना इ-पुस्तके वाचण्यात गोडी आहे हे वाचून आनंद झाला. पण मराठी व इतर भाषांतील जेष्ठ व श्रेष्ठ कवी व लेखकांची पुस्तके व लेखांवरील परीक्षणे वाचण्याचा कंटाळा आहे. त्यामुळे अस्सल मराठी मातीतील कवी आणि लेखकांचे मनोगत कळणे कठीण झाले आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा यापासून आपण दुरावत जाणार आहोत की काय अशी भीती वाटते आहे. असो.

आज जगभर कुठल्याना कुठल्या पुरस्कार वितरण समारंभाचे सोहळे पार पडतांच्या बातम्या व दृश्य विविध माध्यमांतून ऐकण्यास व बघण्यास मिळत आहेत. बऱ्याच देशबांधवांना नोबेल, ऑस्कर किंवा इतर पारितोषिकांची माहिती असते पण दुर्दैवाने भारतात दिल्या जाणाऱ्या साहित्यजगतातील नोबेल पुरस्कारा इतकाच सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल म्हणावी तशी माहिती असेलच असे नाही.

ख्यातनाम साहित्यिक आणि कुसुमाग्रजांचे मित्र वि. स. खांडेकर यांना १९७४साली पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार मिळविणारे पहिले मराठी साहित्यिक. कवी कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ कविता संग्रह १९४१ साली प्रसिद्ध झाला आणि १९८७साली ‘विशाखा’ या कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठीतील नावाजलेले लेखक वि. स. खांडेकर यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहलेली आहे. १९९८मध्ये गिरीश कर्नाड यांना कन्नड साहित्यातील योगदानासाठी हा पुरस्कार मिळाला. आणि २००३मध्ये विं.दा.करंदीकर यांना “अष्टदर्शने” या साहित्य निर्मितीसाठी मिळाला.

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारात ‘पुरस्कार-पत्र’, ‘वाग्देवीची प्रतिमा’ आणि ‘सातलाख रुपयांचा धनादेशाचा समावेश असतो. ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने इ.स. १३०५ मध्ये केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्यालंडन येथील ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे.

हा पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले. २२ मे, इ.स. १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वत:च्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती रमा जैन यांनी १६ सप्टेंबर, इ.स. १९६१ यादिवशी संस्थेच्या बैठकीत ज्ञानपीठ पुरस्काराबाबतचा ठराव मांडला. या पुरस्काराचे स्वरूप ठरविण्यासाठी २ एप्रिल, इ.स. १९६२ या दिवशी दिल्लीत देशभरातून ३०० विद्वानांना आमंत्रित करण्यात आले होते. या विद्वानांचे दोन सत्रांत संमेलन झाले. सत्रांचे अध्य्क्षपद डॉ. वी. राघवन आणि डॉ. भगवतीचरण वर्मा यांच्याकडे होते. सूत्रसंचालन डॉ. धर्मवीर भारती यांनी केले. या संमेलनाला काका कालेलकर, हरेकृष्ण मेहताब, निसीम इझिकेल, डॉ. सुनीति कुमार चॅटर्जी, डॉ. मुल्कराज आनंद, सुरेंद्र मोहंती, देवेश दास, उदयशंकर भट्ट, जगदीशचंद्र माथुर, डॉ. नगेन्द्र, डॉ. बी.आर. बेंद्रे, लक्ष्मीचंद्र जैन यांसारखे बरेच विद्वान हजर होते. या संमेलनातून तयार झालेली पुरस्काराची संपूर्ण योजना डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सादर करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली व निवडसमितीचे प्रमुखपदही स्वीकारले पण इ.स. १९६३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर ही जबाबदारी काकासाहेब कालेलकर व डॉ. संपूर्णानंद यांच्याकडे आली. २९ डिसेंबर १९६५मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला.

भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणार्‍या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो. ज्या भाषेसाठी हा पुरस्कार दिला गेला असेल, त्याच्या पुढील तीन वर्षे त्या भाषेचा पुरस्कारासाठी विचार केला जात नाही. सुरुवातीला एक लाख, नंतर दीड लाख, नंतर पाच लाख त्यानंतर आता सात लाख रुपये एवढी रक्कम पुरस्कार विजेत्याला दिली जाते. काहीवेळा एका ऐवजी दोन साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड होते त्यावेळी हे रक्कम विभागून दिली जाते. इ.स.१९६७ मध्ये गुजराती व कानडी, इ.स.१९७३ मध्ये उडिया व कानडी तसेच इ.स.२००८ मध्ये कोकणी आणि संस्कृत अशा दोन भाषांना हे पारितोषिक विभागून देण्यात आले होते.

भारतातील विद्यापीठे, त्यांचे भाषाप्रमुख, अन्य शिक्षणसंस्थांचे प्रमुख, विख्यात साहित्यिक, समीक्षक, भाषाशास्त्रज्ञ अशा सर्वांना आपापल्या मातृभाषेतील साहित्यकृतीची शिफारस करण्याची विनंती करण्यात येते. ज्ञानपीठ पुरस्काराच्या पहिल्या निवड समितीवर सातपेक्षा कमी व अकरापेक्षा जास्त मान्यवर असू नयेत असे धोरण ठरविण्यात आलेले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नावाची छाननी करण्यासाठी प्रत्येक भाषेची तीन सदस्यांची एक समिती असते. तिला एल.ए.सी. म्हणजेच (लोकल अ‍ॅडव्हायझरी कमिटी) म्हणतात. ही समिती आपल्या भाषेतील एका समर्थ साहित्यिकाच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ व्यवस्थापनाला करते. नंतर मध्यवर्ती निवड समितीत एकाच साहित्यिकाच्या ग्रंथाची निवड केली जाते.

जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..