नवीन लेखन...

विस्मयो आनंदवनभुवनी

अयोध्या नगरीचा अवघा आसमंत रंगीत दीप आणि दीपमालांनी प्रकाशमान झाला होता. आकाशातील द्वितीयेचा चंद्र आज जरा जास्तच तेजस्वी जाणवत होता. शरयूच्या तीरावरून येणाऱ्या सुखद गारव्यामुळं वातावरण प्रसन्न वाटत होतं.

सर्वत्र उभारलेल्या राहुट्यातून , मंदिरांच्या प्रांगणातून , शरयू नदीच्या किनाऱ्यावरून केवळ आणि केवळ राम धून ऐकू येत होती.

राम धून. रामकथा गायन. रामनामसंकीर्तन. टाळ , मृदंग , चिपळ्या , पखवाज , शंख , वीणा आणि अशाच स्वरूपाच्या वाद्यांचा स्वरमेळ सर्वत्र भरून राहिलेला होता. आल्हाददायक , मनमोहक आणि स्वर्गाहून रम्य वाटावं असं सगळं वातावरण.

सौधावरून ते विलक्षण वाटत होतं. अपूर्वाईचं. देवदुर्लभ. मोक्षदायक. दोन्ही हात छातीवर घेऊन प्रभुरामचंद्र सौधावर उभे होते. रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या नेत्रदीपक आसमंताकडे एकटक नजरेनं पाहत होते. अंगावरील उत्तरीय खाली गळून पडल्याचं भान त्यांना नव्हतं .

शेजारती झाली होती. शयनमंदिराकडे न येता सौधावर जाणाऱ्या श्रीरामांकडे जानकीदेवींचं लक्ष होतं. हे रोजचंच होतं .
गेली कित्येक संवत्सरं हे असंच चाललं होतं. शेजारती झाली की त्या लहानश्या झोपडीतून सूक्ष्मरूपानं बाहेर यायचं.
हनुमान गढीतील सौधावर यायचं आणि अवघ्या नगरजनांचं मंगल चिंतीत राहायचं. पुन्हा काकडआरतीला त्या लहान झोपडीत.गेली अनेक संवत्सरं.

परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरातून बाहेर आणून कुणीतरी प्रतिष्ठापना केली. जन्मस्थान मंदिराची मशीद झाली. पाचशे संवत्सरांचा संघर्ष झाला आणि भक्तांच्या संयमाचा बांध तुटल्यानंतर मशीदसुद्धा जमीनदोस्त झाली आणि मग नशिबी आले पुन्हा एकदा वनवासाचे भोग. असंख्य अडथळे. असंख्य सुरक्षारक्षक. सर्वत्र शस्त्रधारी. पुन्हा नव्याने लंकेतील विजनवास वाट्याला आला.तेव्हा आपण एकटीच होतो . आत्ता किमान , नाथ …

– जानकीदेवी भानावर आल्या.लगबगीनं प्रभुरामचंद्रांच्या जवळ गेल्या. सौधावर पडलेलं उत्तरीय , त्यांच्या अंगावर पांघरलं. त्यांच्या हातावर उष्ण अश्रू पडले. त्यांनी चमकून श्रीरामांकडे पाहिलं. ” नाथ , आपल्या डोळ्यात अश्रू ? आज खरं तर आनंदाचा दिवस . भव्य मंदिराच्या शुभारंभाचा दिवस . केवढा भव्यदिव्य आणि श्रद्धापूर्वक सोहळा झाला . आपण वनवास संपवून अयोध्येत आलो , तेव्हाची आठवण झाली मला . नगरजन किती आनंदले होते . सर्वत्र उत्साह होता . आजच्यासारखा दीपोत्सव त्यावेळी साजरा झाला होता . तसंच होमहवन , तसंच गायन , तसंच नर्तन , तसाच पुष्पवर्षाव . नगरजनांच्या उत्साहाला पारावार राहिला नव्हता . एकमेकांना मिष्टान्न देण्यात कुणीही मागं राहत नव्हतं . आणि आपणही सुखावलो होतो सर्व आप्तेष्ट बघून . आज तसंच वातावरण होतं , आहे मग आपल्या डोळ्यात अश्रू का ? ”
श्रीरामांनी डोळे टिपले आणि म्लान हसले.
” सीते , आनंद मलासुद्धा झाला . पुन्हा एकदा जन्मगृही यायला मिळणार , रामलल्ला म्हणून पुन्हा एकदा कोडकौतुक पुरवलं जाणार , शरयुतीरावर पुन्हा एकदा क्रीडा रंगणार . पूर्वीच्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होणार याचा आनंद आहेच , पण …”

ते क्षणभर थांबले. दीर्घ श्वास घेतला. काही काळ शांतता पसरली. जानकीदेवींना ती शांतता असह्य झाली. अशी शांतता म्हणजे श्रीरामांच्या मनातला कल्लोळ असतो हे त्यांना अनुभवानं माहीत झालं होतं.
अशावेळी आपण शांत राहायचं असतं , हेही ठाऊक होतं. तसंच झालं.अंगावरचं उत्तरीय अधिक लपेटून घेत प्रभुनी मौन सोडलं .

” सीते , मला माहीत आहे , आज प्रत्येक हिंदू कृतार्थ झाला असेल . कारण शतकानुशतकं प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार माझं जन्मगृह परकीयांच्या हातून मुक्त करण्यासाठी प्रयत्नरत होता . रामजन्मभूमीच्या संकल्पाचं उदक जुनी पिढी नव्या पिढीच्या हाती सोडत होती . त्यासाठी नव्यानं संघर्ष करीत होती . माझं अस्तित्व पुसण्यासाठी प्रचंड कारस्थानं करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर लढा उभारत होती . जनजागरण करीत होती . यात संघर्ष उभा राहिला होता . अनेकांवर अत्याचार झाले होते . रक्त सांडलं होतं .माझ्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्कारलं होतं . निर्दयी शासकांनी निर्घृणपणे अत्याचार करून वध करून , मृतदेहांची विटंबना करून, शरयूच्या पाण्यात कलेवरं फेकली होती . त्यावेळचं शरयूचं मूक दुःख मी पाहिलं होतं . कारसेवकांची उपासमार , फरपट , त्यांच्यावर रक्षकांनी केलेले अत्याचार , जाळलेले देह सगळं सगळं माझ्या डोळ्यासमोर येत होतं आज . तरीही जिद्द , निष्ठा , दुर्दम्य आशावाद , संस्कृती जपण्यासाठी चाललेला अव्याहत प्रयास यामुळं मी भारावून गेलो आहे . त्यामुळं डोळ्यात आनंदाश्रू आहेत आणि माझ्यासाठी कराव्या लागलेल्या पाचशे वर्षांच्या संघर्षाबद्दलचा सल सुद्धा मनात आहे . या सर्वांचा उतराई कसा होऊ तेच कळत नाही .”

पुन्हा एकदा शांतता .

” हा श्रद्धेचा अमूल्य ठेवा मी जपणार आहे , जानकी . त्यांना अपेक्षित असणाऱ्या रामराज्यासाठी मनोवांच्छित बळ देणार आहे . त्यांचे श्वास माझ्यासाठी फुलं असतील आणि त्यांचा उत्कर्ष माझं कर्तव्य असेल . बरोबर आहे ना ? यात मला तुझी , लक्ष्मणाची ,भरत , शत्रुघ्नची आणि हनुमंताची सुद्धा साथ लागणार आहे .”

जानकीदेवींनी मंद स्मित करीत होकार दिला .
सगळं वातावरण पुन्हा एकदा भारावल्यासारखं झालं .
सभोवतालची राम धून अधिक गोड वाटू लागली .

– मंदिरातील घंटानाद कानावर आला आणि श्रीराम जानकी लगबगीनं मंदिराकडे निघाले .

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .

९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..