नवीन लेखन...

ज्येष्ठ समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर उर्फ वि.वि.करमरकर

क्रीडा क्षेत्रातील दिग्गज पत्रकार व मराठीतील ज्येष्ठ समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर उर्फ वि.वि.करमरकर यांचा जन्म ११ ऑगस्ट १९३८ रोजी नाशिक येथे झाला.

वि. वि.करमरकर यांना मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक मानले जाते. खेळासाठी झोकून काम करणाऱ्या पत्रकार करमरकरांनी क्रीडा कार्यकर्त्यांची भूमिकाही बजावली. जे मनात घेतले तसे व्हायलाच हवे, हा हट्ट त्यांनी कायम धरला. वागण्यात कोणतीही लवचीकता न ठेवता ते सतत सत्याचा ध्यास धरत राहिले.

‘वि.वि.क.’ या नावाने प्रचलित असलेले विष्णू विश्वनाथ करमरकर मुळचे नाशिकचे. वि. वि.करमरकर यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण नाशिकच्या न्यू हायस्कूलमध्ये झाले. पदवी परीक्षेपर्यंत ते नाशिकच्याच हंसराड प्रागजी ठाकरशी महाविद्यालयात शिकले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए. झाले. वि. वि. करमरकरांचे वडील डॉ. वि. अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर होते.

मुलानेही आपल्याच क्षेत्रात कार्यरत व्हावे अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते. मात्र त्यांच्या वडिलांनी ‘विष्णू’चा बाळहट्ट पुरविला. वि. वि. करमरकरांनी निवडलेल्या क्षेत्रात त्यांना आडकाठी येऊ दिली नाही. शालेय जीवनात प्रा. ग. वि. अकोलकर, रि.पु. वैशंपायन व भट तर महाविद्यालयात प्रा. वसंत कानिटकर, प्रा. आचार्य, प्रा. सोहोनी, प्रा. राम बापट, मुंबई विद्यापीठात प्रा. दांतवाला, प्रा. कांता रणदिवे व प्रा. अप्पू नायर यांनी करमरकरांच्या आचार-विचारांना दिशा दिली. लोकशाही समाजवादी विचाराने क्रियाशील असलेल्या करमरकर यांनी डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, मधू लिमये यांना आपले आदर्श मानले.

पत्रकारिता करताना द्वा. भ. कर्णिक, गोविंद तळवलकर, दि. वि. गोखले, साखळकर, पुरुषोत्तम महाले, चंद्रकांत ताम्हाणे, दिनू रणदिवे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक आणि मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते एस. एम. जोशी यांनी सहकारी तत्त्वावर चालवलेल्या दैनिक ‘लोकमित्र’मधून केली.

जून १९६२पासून ‘टाइम्स’ समूहाचे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या क्रीडा विभागाचे प्रमुख व सहसंपादक या नात्याने खेळाच्या पानाचे यशस्वी संपादन केले. खेळाच्या बातम्या, समीक्षण व स्तंभलेखन याविषयी मराठी माणसाची अतृप्त, तहान-भूक भागवण्यास करमरकरांची क्रीडा पत्रकारिता पूरक ठरली आणि सर्व मराठी वृत्तपत्रांत क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.

क्रिकेट कसोटी मालिका, क्रिकेट विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांची दैनंदिन क्रीडा समीक्षा करणारे वि. वि. करमरकर यांचे स्तंभलेखन वाचकांनी उचलून धरले. आजही वाचकांना त्यांच्या लेखणीची ओढ कायम आहे. खेळाचे हौशी स्वरूप झपाटय़ाने बदलत गेले.

पाश्चात्त्य दुनियेइतके अफाट प्रमाणात नसले तरीही भारतीय क्रीडा क्षेत्रात साधारणत: मध्यम स्वरूपाच्या उद्योग समूहाचे (इंडस्ट्री) रूप येत आहे. त्याचा वेध करमरकरांनी सर्वप्रथम घेतला. औद्योगिक समूहात अटळ असलेली स्टेडियम्स, क्रीडा संकुले यांची उभारणी-त्यावरील बेफाम खर्च, त्यातील भ्रष्टाचार यावर त्यांनी १९९३पासून झगझगीत प्रकाश टाकला.

१९८२च्या दिल्लीमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेच्या बांधकामात सुमारे १००पर्यंत अनामिक मजूर मृत्युमुखी पडले, त्याची कैफियत त्यांनी ‘रक्तरंजित’मधून मांडली. दक्षिण कोरिआ, क्युबा, केनिया आदी छोटय़ा देशांच्या तुलनेतील भारतीय खेळाडूंचे मागासलेपण या गोष्टी ते नेहमी मांडत राहिले. खेळ हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, ही व्यथा ते व्यक्त करतात.

खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या सहभागाशिवाय खेळाचे पान कसदार होणार नाही. याची जाणीव करमरकरांना पहिल्यापासून होती. कितीतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवाचे त्यांनी शब्दांकन स्वत: केले.

देशी व ऑलिंपिक खेळाच्या प्रचार-प्रसार आणि विकासासाठी त्यांनी पदरमोड करून कोकणात खेड्यापाड्यांत भटकंती केली. खेळांच्या स्पर्धाचे आयोजन एवढाच उद्देश न ठेवता खेळाडूंची बौद्धिक, मानसिक व शारीरिक जडणघडण व्हावी, त्यागी-निष्ठावान खेळाडू घडावेत, याचा अखंड ध्यास घेऊन ‘महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थे’ची त्यांनी निर्मिती केली. त्या संस्थेमार्फत ते सतत दहा वर्षे रत्ना गिरी, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत देशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करीत राहिले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी हा वसा अविरत चालू ठेवला.

बडय़ा क्रीडा स्पर्धांदरम्यान, विशेष पुरवण्यांनी क्रीडा पान सतत सजवले. आकाशवाणी, दूरदर्शन, विविध टी. व्ही. चॅनल्सवरील करमरकर यांनी केलेली सामन्यांची धावती समालोचने व समीक्षणे खूप गाजली. क्रिकेटप्रमाणे कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस आदी खेळांच्या मराठीतील धावत्या समालोचनाने मराठी समीक्षेतील उणीव समर्थपणे दूर केली. निवृत्तीनंतर अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखमाला लिहिल्या आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..