नवीन लेखन...

स्वदेशी आत्मनिर्भरता

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला राजेंद्र देवणीकर यांचा लेख 


लॉकडाऊनच्या काळातील एका भाषणात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत लोकल म्हणजेच ‘स्वदेशी’ व आत्मनिर्भरता म्हणजे ‘स्वावलंबन’ याविषयी मार्गदर्शन केले ते अत्यंत योग्य होते. भारतीय समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी उचललेले ते योग्य पाऊल आहे असे मी समजतो.

या संदर्भात खालील मुद्यांवर काम करणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे भारताची कृषी आधारित उद्योग प्रधान अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था सुदृढ, सक्षम व स्वावलंबी होईल. या संदर्भात गावपातळीवर किंवा प्रखंड, मंडल (अंदाजे पाच ते दहा गावे) या ठिकाणी हे काम सुरू करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

स्वावलंबी खतनिर्मिती प्रकल्प

कृत्रिम रसायन विरहित, गावातील उपलब्ध संसाधनांच्या माध्यमातून, सामूहिक तत्त्वावर उत्कृष्ट प्रतीचे, जमिनीचा प्राकृतिक पोत वाढविण्यासाठी उपयोगी असलेले, गुरांच्या शेणापासून व गोमूत्रापासून आणि उपलब्ध काडीकचरा व सुपीक माती यांचा वापर करून खत तयार करणे. गोमूत्र व ताकाच्या माध्यमातून विविध प्रकारचे कीट नियंत्रक ( पेस्टिसाइड) व बुरशी नियंत्रक (फंगीसाइड) तयार करणे.

धान्य प्रक्रिया उद्योग

प्रामुख्याने आपल्याकडे तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला, फळे, फुले व मसाला यांचे उत्पादन आपण घेत आलो आहोत. पण ऊस व सोयाबीनच्या वाढत्या औद्योगिक प्रभावामुळे या मुख्य धान्यांच्या बाबतीत आपण मागे राहिलो. पण आता त्यावर प्रक्रिया उद्योग उभारून हे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे.

तृणधान्य मिलेट्स

ज्वारी, बाजरी, नाचणी, नवनी, भगर, कोडो, कुटकी, सामा, राजगिरा ही तृणधान्ये मानवी शरीरासाठी अत्यंत पोषक, सर्व प्रकारची पोषक द्रव्ये उपलब्ध असलेली धान्ये आहेत. यांचे उत्पादन भरपूर येते व कमी पाण्यावर ही पिके येतात, यामुळे पशूंना मुबलक प्रमाणात पौष्टिक चारा मिळतो. या सर्व धान्याला जगभरात मागणी असून त्यांचे विविध प्रक्रिया उद्योग करता येतात. यावर आधारित उद्योग बिस्किट, पापड, लाह्या, चुरमुरे, रवा, पोहे, पीठ इत्यादी बनवणे हे करता येतात.

कडधान्य, डाळी

तूर, चणा, मूग, उडीद, मसूर, चवळी, मटकी,कुळीथ या उत्कृष्ट दर्जाचे प्रोटीन असलेल्या आपल्याकडील डाळी. यांना प्रचंड मागणी व उपयोगिता आहे. यांच्या काष्टापासून उत्कृष्ट खत निर्मिती होते. वाढत्या रोगराईमुळे सालयुक्त डाळींची प्रचंड मागणी आहे. या डाळींपासून पीठ, चटण्या, मेतकूट, पापड, पशू आहार इत्यादी प्रक्रिया उद्योग करता येतात.

तेलबिया

तीळ, शेंगदाणा, करडी, जवस, मोहरी, कारळ, खोबरा, एरंड यांचे उत्पादन भारतात हजारो वर्षापासून सुरू असून तेल निर्मितीच्या बाबतीत स्वावलंबी होतो. त्यामुळे मानवाला आरोग्य व पशूला सकस आहार मिळत असे. औद्योगिक क्रांतीमुळे ही व्यवस्था मोडली गेली. पूर्वी गावागावात तेलघाणे होते. पण आज खूप दुरवस्था आहे. आपण लाखो लिटर तेल विदेशातून आयात करतो. ही व्यवस्था पुन्हा उभी होण्यासाठी गावोगावी छोटे-छोटे तेल प्रक्रिया उद्योग सुरू करावे लागतील. त्यामुळे शुद्ध तेल व उच्च प्रतीचा पशु आहार मिळेल. यावरील प्रक्रिया उद्योग म्हणजे लाकडी घाण्याचे विविध प्रकारचे शुद्धतेल उपलब्ध करणे, पशु आहार, केशतेल, मालिशतेल, वेगवेगळी औषधी तेलं इत्यादी बनवणे.

भाजीपाला

पालक, मिरची, टोमॅटो, दोडके, गाजर, मुळा, बीट, रताळे, बटाटा, कांदे, लसूण, वांगी, चवळी, मटकी, भेंडी, कारले, तोंडले, काकडी, वाळुक, कडीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, अंबाडा, चमकुरा, कोबी, भोपळा, कद्दू, शेवगा, हादगा, तांदुळगा, चंदन बटवा, घोळ इत्यादी शेकडो प्रकारचा उत्कृष्ट पोषकद्रव्ये असलेला भाजीपाला आपल्याकडे उपलब्ध असतो. एवढी विविधता जगात कुठेही मिळणार नाही. याची सुयोग्य वितरण व्यवस्था व टिकाऊ प्रक्रिया करून विक्री व्यवस्था उभी झाल्यास याचे जगभरात खूप मोठे मार्केट आहे. उदाहरणार्थ, ताजी भाजी विक्री व्यवस्था, वाळलेल्या भाज्या, चिप्स, पापड, भाजी पावडर, औषधी रस, अर्क इत्यादी प्रक्रिया उद्योग यामध्ये करता येतील.

फळे

आंबा, जांब, जांभूळ, बोर, द्राक्षे, फणस, अननस, नारळ, पपई, बेल, कवठ, चिंच, सीताफळ, चिकू, लिंबू, संत्री, मोसंबी, डाळिंब, आवळा, कोहळा, करवंद, भोकर, सफरचंद, काजू, बदाम, आक्रोड, खजूर, बिब्बा अशी ही आपल्याकडे गावागावात, शेतात, जंगलात मुबलक प्रमाणात पूर्वी फळझाडे होती. ती आता कमी होत आहेत. विविध ऋतूंमध्ये येणारी ही फळे म्हणजे सजीवांसाठी मेजवानीच. तिचे संगोपन व संवर्धन होणे सजीवांसाठी अत्यंत उपयोगी आहे. या सर्वांचे प्राकृतिक पद्धतीने प्रक्रिया उद्योग आपल्याला करता येतील. उदाहरणार्थ, ताजी फळे विक्री करणे, वाळवून पावडर करणे, सुका मेवा, सरबत, औषधी रस, लोणचे करणे, बर्फी इत्यादी विविध पदार्थ करणे.

फुले

कमळ, मोगरा, पारिजातक, केवडा, जाई, जुई, शेवंती, झेंडू, काकडा, चाफा, चंपा, चमेली, कण्हेरी, कर्दळी, पलाश, गुलाब, कुमुदिनी, बकुळ, निशिगंध, सदाबहार, कृष्णकमळ, ब्रह्मकमळ, अबोली, मधुमालती, जास्वंद, गोकर्ण, नर्गिस, नागकेशर इत्यादी आपल्या देशाला निसर्गाने भरपूर दिले आहे. ही फुले दिसायला खूप सुंदर, औषधी रसांनी युक्त आणि सुगंधित गुणांनी आपल्याला नेहमी उत्साहित करतात. ती वर्षभर वेगवेगळ्या ऋतूत येतात. यामुळेच की काय भारत देश हा वर्षभर उत्सव आणि समारंभांनी परिपूर्णmआहे. विविध पंथ आणि संप्रदायांमध्ये उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यामध्ये त्या त्या ऋतूंमध्ये  येणारी ही फुले अनिवार्य आहेत. म्हणून त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. देशी फुलांमध्ये मकरंद मोठ्या प्रमाणात असतो, मधमाशा मोठ्या प्रमाणात परागीभवन करतात त्यामुळे फळांची संख्या वाढते, शेतीचे उत्पादन वाढते. ही नैसर्गिक रचना आहे. सध्या आपल्यावर जी विदेशी फुले लादली जात आहेत ती गंधहीन व रसहीन असतात. त्यांचा आपल्या आरोग्याशी आणि उत्साहाशी काही संबंध नाही. ही परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल. सुगंधित देशी फुले विकणे, रंग बनवणे, अत्तर, गुलकंद, स्नानचूर्ण, मध व मेण संकलन करणे हे उद्योग होऊ शकतात.

मसाले

मिरची, हळद, धणे, जिरे, आले, हिंग, दालचिनी, जायफळ, तेजपत्ता, कढीपत् सुपारी, मेथीदाणे, लवंग, इलायची, बडीसोप, केसर इत्यादी पदार्थांचा आपल्याकडे दैनंदिन जेवणात व विशिष्ट आजारात वापर करण्यात येतो. सबंध जगात औषधी वापरासाठी यांची प्रचंड मागणी आहे. ज्या ठिकाणी शेकडो वर्षापासून यांचे उत्पादन होत आले आहे त्या ठिकाणी यांचे संवर्धन करून प्रक्रिया उद्योग सुरू करावे लागतील. यापासून मिरची, हळद व मसाला पावडर, विविध औषधी चूर्ण बनवणे या छोट्या प्रक्रिया उद्योगांमुळे शुद्धता ठेवता येईल व रोजगार वाढेल.

औषधी वनस्पतींची लागवड संगोपन

भारतात विविध प्रकारचे हवामान व पर्यावरणीय जीवनोपयोगी उत्पादने बनवणे, चर्मोद्योगासाठी मृत व्यवस्था असल्यामुळे जैवविविधता प्रचंड आहे. हजारो पशूंच्या चामड्याची उपलब्धता, गोबर गॅसद्वारे ऊर्जा औषधी वनस्पती इथे विविध ठिकाणी आपोआप उत्पादित स्वावलंबन इत्यादी उद्योग उभारता येतील व तसेच होतात. यामुळेच इथे ऋषी, मुनींच्याद्वारे आयुर्वेदाची यापुढे मोठ्या प्रमाणात गावात ऊर्जा निर्मिती प्रकल्प रचना झाली. उदाहरणार्थ तुळस, गुळवेल, कोरफड, अनंतमूळ, पुनर्नवा, गोखरू, आघाडा, केना, दुर्वा, अश्वगंधा, दर्भ, जटामासी, शतावरी, चंदन, पाषाणभेद, सर्पगंधा, सप्तरंगी, गुंज, ज्येष्ठमध, मोह, कुई, वाळा, नागरमोथा, रिठा, शिकेकाई, आवळा,बेहडा, हिरडा, बेल, अर्जुन, बिब्बा, करंज, बाभूळ, वड, पिंपळ, उंबर, पळस, शमी, आपटा, कडुलिंब या सर्वांपासून विविध औषधी बनवता येतील. यांची उपयोगिता सिद्ध केल्यास प्रचंड मागणी येईल. हे मोठ्या प्रमाणात आता सुरू झाले आहे. यापासून काढे, अर्क, घनवटी, आसव, दंतमंजन, मलम, स्प्रे, सिद्ध तेल, साबण, शाम्पू, फेसपॅक, धूपबत्ती, अत्तर, उबटन, हवन सामग्री बनवणे इत्यादी उद्योग यापासून करता येतील.

गोसंगोपन पशुपालन

हजारो वर्षापासून गोसंवर्धन व पशुपालनातून भारत निरोगी, सशक्त, समृद्ध व सुसंस्कृत बनत आला आहे. गोवंशाच्या शेण व गोमूत्रापासून शेतीसाठी पोषक खत उपलब्ध होते. त्यांच्या दूध, दही, ताक, लोणी आणि तूप यापासून मानवी शरीराचे पोषण होते. गोपालन व पशुपालनाशिवाय शेती व शेती आधारित प्रक्रिया उद्योग होऊच शकत नाहीत. बैलांच्या शारीरिक श्रमाने जमीन सुपीक बनते व वस्तूंच्या वाहतुकीसाठी यापेक्षा सुलभ आणि उत्तम साधन दुसरे नाही. ही स्वावलंबी व्यवस्था आहे. खत, पेट्रोल, डिझेल, ट्रॅक्टर आयात करणे म्हणजे परावलंबन आहे. कीट नियंत्रणामध्ये पशू व पक्षी यांचे खूप मोठे योगदान आहे. बैल शक्तीच्या वापरामुळे संपत जाणाऱ्या ऊर्जा संसाधनाची बचत होते.

जातिवंत देशी गोवंश सुधार व संवर्धन, खत निर्मिती प्रकल्प, दुग्धव्यवसाय, पंचगव्य औषधी उत्पादने व सुरू करण्यासाठी याचा उपयोग होईल.

चर्मोद्योग

विविध चर्म वस्तू वापरण्याची प्रथा आपल्याकडे होती, यासाठी फक्त मृत पशूंच्या चामडीचा वापर आपल्याकडे केला जायचा. उदाहरणार्थ जोडे, चपला, आसन, गोण्या, दोर, बॅग, पट्टा, संगीत वाद्य इत्यादी वस्तू बनत. त्यासाठी पशुहत्या केली जात नसे. पण औद्योगिक क्रांतीने मोठमोठे कारखाने निर्माण झाले. गावातील चर्म उद्योग नष्ट झाले. मोठ्या प्रमाणात पशू हत्या झाली. आज फक्त १०% पशुधन शिल्लक आहे. यासाठी पशुधन वाढणे व हत्या न करता मृत पशूंच्याच चामड्यापासून वस्तू बनवणारे छोटे चर्मोद्योग निर्माण झाले पाहिजेत. ही समाजाची गरज आहे.

माती उद्योग

भारतात वेगवेगळे पर्यावरण असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची माती उपलब्ध आहे. मातीचा उपयोगअन्नधान्य उत्पादनाबरोबरच घर बांधणी व विविध प्रकारच्या उपयोगाची भांडी बनवण्यासाठी आपण करत आलो आहोत. उदाहरणार्थ अन्न शिजवण्यासाठी व पाण्यासाठी हजारो वर्षांपासून आपण मातीच्या भांड्यांचा उपयोग करत आलो आहोत. मातीच्या घरात राहिल्यामुळे पर्यावरण सुसंगत आरोग्य मिळते, मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास सर्व पोषक द्रव्ये मिळतात, मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्यास पाणी शुद्ध होते. हे आरोग्यासाठी श्रेष्ठ आहे. फ्रीज, कुकरच्या वापरामुळे शरीराची प्रतिकारशक्ती संपत चालली आहे व रोग वाढत आहेत. या उद्योगात खूप करण्यासारखे आहे.  उदाहरणार्थ घर बांधण्यासाठी माती तयार करणे, पाण्याची विविध भांडी, अन्न  शिजवण्यासाठी भांडी, मातीचा कुकर, मातीचा फ्रीज, मातीचा तवा, पाणी साठवणुकीसाठी रांजण, मातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती बनवणे, अशा व इतर अनेक जीवनोपयोगी वस्तू मातीपासून बनवता येतात.

साखर गूळ प्रक्रिया उद्योग

आपल्याकडे साधारण आठ प्रकारची साखर व गूळ पूर्वी होत असे. जे शरीरासाठी अत्यंत उपयोगी असे व विविध पदार्थांमध्ये त्याचा वापर होत असे. औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यात फक्त उसापासून मोठ्या प्रमाणात साखर (चिनी) बनू लागली, त्यामुळे गावागावातील गुऱ्हाळ व साखर उद्योग बंद पडले. मोठ्या प्रमाणात चहा, औषध आणि दारुसाठी, आधुनिक पदार्थांसाठी फक्त उसाची साखर वापरणे सुरू झाले. परिणामी यामुळे ३५% लोक रोगी आहेत. याला पर्याय म्हणून उसापासून गावातच प्रक्रिया उद्योग सुरू करून गूळ, गूळ पावडर, खांड, बुरा साखर, खडीसाखर गावातच तयार झाली पाहिजे. तरच नैसर्गिक व शुद्ध ऊर्जा आपल्याला  मिळेल.

कापसापासून कपडे बनवणे

भारतामध्ये फार पूर्वीपासून सर्वत्र कापूस लागवड केली जाते. यातून आपली कपड्यांची गरज भागते. या पिकाला पूर्वीपासूनच जास्त मागणी आहे. पूर्वी विविध दर्जाचा कापूस आपल्याकडे उपलब्ध होता. जगात सगळीकडे या तलम, टिकाऊ व आरोग्यदायी कापडाचा व्यापार होत असे. या गुणवत्तेमुळे सर्वत्र भारतीय कापडाची मागणी होत असे. आता औद्योगिक क्रांतीमुळे कृत्रिम धागे जे पर्यावरणपूरक नाहीत, पण आरोग्यदायी नसूनही स्वस्त असल्यामुळे सर्वत्र विक्री होतात. त्या धाग्यांपासून बनवलेले कपडे पण सर्वत्र मोठ्या प्रमाणात विक्री होतात. मागणी कमी असल्यामुळे कापसाच्या धाग्यांपासून तयार झालेल्या सुती कापडाला योग्य भाव मिळत नाही व पर्यायाने शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही. यात आता बीटी बियाणे उपलब्ध झाल्यामुळे कापसाची जुनी बियाणे नष्ट होत आहेत.

त्यासाठी आता आपली जुनी सर्व कापसाची वाण शोधून पुनर्जीवित व प्रतिष्ठित केली पाहिजेत. हे कापसाचे धागे हातमागासाठी पूरक असत, हातमागामुळे जास्त हातांना काम मिळते. म्हणून आता बंद पडलेला चरखा व हातमाग उद्योग पुन्हा प्रतिष्ठित केल्यास याद्वारे शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव आणि हजारो हातांना काम मिळेल. थसर्वांना यामुळे आरोग्यही मिळेल. सुती कपडे उन्हाळ्यात थंड व हिवाळ्यात गरम असतात. शिवाय जिनिंग, प्रेसिंग, सूत कताई, वीणाई, धुलाई, रंगाई, शिलाई असे कितीतरी उद्योग यावर स्थिरस्थावर होतात.

लाकूड उद्योग

पूर्वी आपल्याकडे जंगलं मोठ्या प्रमाणात होती. शेतामध्ये व गावात मोठ्या प्रमाणात महावृक्ष आणि फळझाडे होती. या महावृक्षावर पक्षी मोठ्या प्रमाणात रहात व हे पक्षी सर्व फळझाडांच्या बीज संक्रमणाचे कार्य प्रामुख्याने करीत. वाढती लोकसंख्या व व्यावसायिक वृक्षतोड वाढल्यामुळे लाकूडफाटा संपत चालला आहे. हजारो वर्षापासून आपण लाकडापासून उपयोगी वस्तू, वेगवेगळी अवजारे बनवत आलो आहोत आणि फाट्यापासून ऊर्जा मिळवत आलो आहोत. विविध ऊर्जा संसाधनांच्या संशोधन व वापरामुळे ही नैसर्गिक व्यवस्था तुटली आहे. कालांतराने आधुनिक ऊर्जा संसाधने संपुष्टात आल्यावर आपल्याला पुन्हा हीच व्यवस्था स्वीकारावी लागेल. पूर्वी आपले पूर्वज वृक्ष संगोपन व संवर्धन मोठ्या प्रमाणात करत, तो जीवनाचा एक भाग होता. त्यापासून गावोगावी लाकूड उद्योग मोठ्या प्रमाणात चाले. घरबांधणीसाठी लाकूड उपलब्ध करणे, शेतीसाठी उपयोगी अवजारे निर्माण करणे, घरगुती वापरासाठी उपयोगी वस्तू बनवणे. यामध्ये श्रम, बुद्धी व कौशल्याचा वापर होत असे. गावोगावी हे शिक्षण परंपरागत आपापतः मिळत असे. संपत चाललेली ऊर्जा संसाधने, वाढते प्रदूषण, प्राणवायूचा अभाव हे लक्षात घेता देशी महावृक्ष, फळझाडे पुनर्जीवित करण्याची व लाकूड उद्योग प्रस्थापित करण्याची गरज आहे. त्यामुळे विस्मृतीत गेलेली कलाकौशल्ये पुन्हा निर्माण होतील. यासाठी देशी महावृक्षांच्या आणि फळझाडांच्या वृक्षवाटिका निर्माण करणे, लाकडावर आधारित कला व कौशल्यांचा विकास करणे. यासाठी रिकाम्या जमिनी वृक्षलागवडीसाठी खुल्या करणे इत्यादी गोष्टी कराव्या लागतील.

धातू उद्योग

एकदा एखादा धातू खाणीतून गावात आल्यावर त्याच्यावर विविध प्रक्रिया उद्योग गावात चालत. यापासून नवीन वस्तू बनवत व जुन्या वस्तूंपासून पुन्हा नवीन वस्तू बनत. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि लोखंड यापासून अनेक प्रकारचे अलंकार – आभूषणे, जीवनोपयोगी भांडी व शेतीसाठी अवजारे या विविध धातूपासून बनत.

यासाठी गावात उपलब्ध असलेल्या शक्ती, बुद्धी आणि कलाकुसरीचा उपयोग होत असे, ही कलाकुसर परंपरेने गावातच आपल्याला मिळत असे. उत्कृष्ट दर्जाचे भांडे अन्न शिजविण्यासाठी व पाणी साठवण्यासाठी वापर केल्यामुळे सर्वांना आपोआप आरोग्य मिळत असे. औद्योगिक क्रांतीनंतर यावर देशभरात असंख्य प्रक्रिया करणारे कारखाने सुरू झाले आणि गाव पातळीवरचे हे उद्योग जवळपास संपुष्टात आलेले आहेत. जमिनीत धातू बनण्यास लाखो वर्षे लागतात, म्हणून जमिनीच्या वर काढलेले जे धातू आहेत त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग गाव परिसरात पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे.

विविध कुटीर उद्योग

पूर्वीचे गाव, नगर, वस्ती ही स्वावलंबी व स्वयंपूर्ण होती. म्हणजे ती गावाची आदर्श स्थिती होती. हेच आपल्या विविध संत, महापुरुष व सुधारकांनी सांगितलेले आहे. गावात सर्व बाहेरून येत असेल तर त्यास आदर्श गाव कसे म्हणावे? कुणी सांगितले? ?

जशी वैयक्तिक परस्परावलंबनामुळे कुटुंबव्यवस्था निर्माण होते व टिकते. तसेच शेती, पशुपालन व शेतीपूरक उद्योगांचा परस्परावलंबनामुळे ग्रामकुटुंबव्यवस्था निर्माण होते. ही ग्रामकुटुंब व्यवस्था टिकण्यासाठी पशुपालनाप्रमाणे समृद्ध शेती व शेती आधारित सशक्त उद्योग असणे गरजेचे आहे. जमिनीचा पोत व पर्यावरण यावर आधारित कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग गाव परिसरात सुरू झाले पाहिजेत. नाहीतर कच्चा माल मातीच्या भावात शहरात विकावा लागेल व शहरातून चौपटीने पक्का माल तोही अधिकांश स्वरूपात भेसळ असलेला घ्यावा लागेल.

त्यामुळे आता तरी शहरावर अवलंबून न राहता चांगले बुद्धी, कौशल्य, ज्ञान, शक्ती व सामर्थ्य गावी लावून स्वावलंबन वाढवावे लागेल. यासाठी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथात दिलेल्या मंत्राचा स्वीकार आपल्याला करावा लागेल.

हाती उद्योगाचे साधन, मुखी रामनामाचे चिंतन

हाच धर्म आहे महान, गावकरी लोकांचा

(बीकॉम, व्यवसाय: स्वानंद स्वदेशी भांडार आवड नैसर्गिक शेती, ग्राम उद्योग व ग्रामगीतेचा प्रचार करणे… यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे.)

-राजेंद्र देवणीकर

(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी  २०२० च्या अंका मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..