नवीन लेखन...

स्मरणगाथा : २

— सकाळचे साडेसहा वाजले होते .

नुकताच मी मॉर्निंग वॉकला जाऊन आलो होतो . आणि भल्या सकाळी दारावरची घंटा वाजली .
दार उघडलं तर समोर आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातील ओळखीचा शिपाई उभा होता .
त्याच्या हातात एक कागद आणि गुलाबाचं फूल होतं .
“गोविंद मोकाशी साहेबांनी तुम्हाला द्यायला सांगितलं आहे . ”
त्यानं सांगितलं .
मी त्याला आत बोलावलं . चहा दिला .
आणि मोकाशीनी दिलेल्या कागदावरचा मजकूर वाचला .

” सर , आकाशवाणी रत्नागिरी केंद्राने सादर केलेल्या डेथ ऑफ कॉमनसेन्स या तुमच्या नभोनाट्याला राष्ट्रीय स्तरावरचे लेखनाचे पहिले पारितोषिक मिळाले आहे . अभिनंदन ! आत्ताच सकाळच्या सहाच्या राष्ट्रीय बातमीपत्रात ही बातमी सांगितली गेली . तातडीने तुम्हाला कळवावी म्हणून शिपायाला पाठवलं आहे , ड्युटी संपली की घरी येतो .”

मला क्षणभर काय करावे सुचेना .
सौभाग्यवतीला आणि मुलांना ही बातमी सांगितली .
आणि घरातलं वातावरण एकदम बदलून गेलं .
चहा घेऊन शिपाई निघून गेला .

मी तेव्हा थिबा रोडवर टिव्ही रिले सेंटर समोर रहात होतो .
माझ्याकडे फोन नव्हता .
कारण तेव्हा ती चैन परवडण्यासारखी नव्हती .
पण आमच्या बिल्डिंगमध्ये बेळगावच्या तरुण भारतचे ऑफिस होते . त्यांचा फोन मी वापरत असे . कारण तरुण भारतचा मी लेखक होतो . आणि फोन केव्हाही वापरा असं किरण ठाकूर यांनी सांगितलं होतं .
त्या फोनवरून घरी हरचिरीला आई अण्णांना ही बातमी सांगितली .

हळूहळू ही बातमी सगळ्यांना कळली असावी . कारण तरुण भारतच्या फोनवरून मला अभिनंदनासाठी कॉल येऊ लागले होते .

राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारा महाराष्ट्रातील मी पहिलाच होतो .
१९९६ – ९७ याकाळात दहा हजार रुपयांचे पारितोषिक , दिल्ली येथे विशेष समारंभ , दिल्ली दर्शन असं त्या पारितोषिकाचं स्वरूप होतं .

कै . गोविंद मोकाशी आज आपल्यात नाहीत . पण त्यावेळी आमची मैत्री चांगली होती . त्यांनीच मला या राष्ट्रीय स्तरावरच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत भाग घेण्यासाठी उद्युक्त केलं होतं .
तसं पाहिलं तर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची स्थापना झाल्यापासून मी सातत्याने लेखन करत होतो . श्रुतिका , कथा , कविता , तेरा भागांच्या दोन मालिका , दीपावलीसाठी संगीत नाटके , चर्चासत्र , मुलाखती , विविध सणांसाठी खास लेखन असं विविधांगी लेखन करत होतो . पण स्पर्धात्मक स्वरूपात हे पहिलेच लेखन होते आणि त्यात घवघवीत यश लाभले होते .

डेथ ऑफ कॉमनसेन्स ही एक फँटसी होती .
२०६० साली कौटुंबिक विश्वात , भारतात काय घडू शकेल आणि वृद्धांच्या बाबतीत नेमकी कोणती गोष्ट घडेल असा विचार करून ती फॅन्टसी मी लिहिली होती . लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी वयाच्या साठाव्या वर्षी सक्तीचा मृत्यू असा कायदा झाला आणि ती वेळ एखाद्या कुटुंबात आली तर भावनिक दृष्ट्या संस्कारक्षम कुटुंबात काय हलकल्लोळ होईल . कायद्याला चकवून मृत्यू टाळायचा असं ठरवलं तर नियतीपुढे सगळे कसे हतबल होतील , असा विषय मी मांडला होता .
गोविंद मोकाशी आणि त्यांच्या टीमने या नभोनाट्याचे अतिशय सुंदर असे सादरीकरण केले होते . कलाकारांचा आवाज , पार्श्वसंगीत आणि एकूणच दर्जा उच्च स्वरूपाचा होता .
या नभोनाट्याचे चौदा भारतीय भाषांत भाषांतर झाले . त्या त्या भाषेत त्या राज्यातील आकाशवाणीने त्याचे सादरीकरण केले .
रत्नागिरीकरानी, वृत्तपत्रांनी खूपच कौतुक केले .
त्यावर अनेक ठिकाणी चर्चासत्रे , सत्कार समारंभ झाले .
नगर वाचनालयात झालेल्या त्यावेळच्या कार्यक्रमात लोकांना बसायला जागा नव्हती इतकी गर्दी झाली होती , तरीही जिन्यावर , मिळेल तेथे जागा शोधून लोक उभे राहून कार्यक्रम ऐकत होते .
हे ही विलक्षण होते .

सगळे दिवस आनंदाने निथळणारे होते .

दिल्लीतील कार्यक्रम मावळंगकर सभागृहात झाला . त्याची रंगीत तालीम झाली , दुसऱ्या दिवशी नभोवाणी मंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले . मी आणि सौभाग्यवती ऋचा , दोघंही त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो .

आयुष्यातील हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा होता .

आणि लेकाचे हे कौतुक बघताना आई अण्णाना आनंदाश्रू आवरत नव्हते .
तो त्यांचा आनंद माझ्यासाठी तो फार मोठा सन्मान होता .
आजही तो काळ जसाच्या तसा आठवतो आणि कृतकृत्य झाल्यासारखे वाटते .

🌹 बुकमार्क 🌹

त्या दिवशी अभिनंदनाचे फोन येत होते , त्यातला एक फोन चांगलाच लक्षात राहिला आहे .
अभिनंदन करून झाल्यावर त्या व्यक्तीने सांगितले ,
“ज्याला बक्षीस मिळाले आहे , तो श्रीकृष्ण जोशी तूच आहेस ना याची अगोदर खात्री करून घे .”
क्षणभर मीच गोंधळात पडलो .
कारण श्रीकृष्ण जोशी या नावाचे पाच जण रत्नागिरीत रहात होते .
त्यामुळे थोडावेळ संभ्रमावस्था आली . पण पुढच्या क्षणी सावरलो .
हे लेखन माझेच होते आणि बाकीचे श्रीकृष्ण जोशी लेखक नव्हते , हे माझ्या लक्षात आले .
पण काही सेकंद का होईना बावरलो होतो , हे नक्की .
माझे हवेत उडू पाहणारे विमान त्या फोनने जमिनीवर आणले , म्हणून त्या व्यक्तीला मी मुद्दाम फोन करून धन्यवाद दिले .

डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
दिनांक : २३ जुलै २०२५
८९५१९०६७०१
—————-
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 150 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..