नवीन लेखन...

शब्द जिथे गोठतात…

भिंतीलगतच्या एका बाकड्यावर , तो केव्हापासून बसला होता .
पोलीस स्टेशनमध्ये खूप धावपळ सुरू होती .
फोन सारखे घणघणत होते .
ऑर्डर्स सुटत होत्या .
टेबलावरच्या फाईल्स संबंधितांकडे जात होत्या .
वरिष्ठांना सॅल्युट ठोकले जात होते .
बेडीबंद आरोपींना कोर्टात वेळेवर नेण्यासाठी लगबग सुरू होती .

धावपळच धावपळ सुरू होती .
कुणालाही उसंत नव्हती .
शिफ्ट ड्युट्या बदलत होत्या .
बिझी रुटीन सुरू होतं .

तो केव्हाच आला होता.

त्याची ही पोलीस स्टेशनची नेहमीची ड्युटी असल्यानं ओळख होती. त्यानं इनचार्जला सांगितलं ;

“आज नेहमीपेक्षा वेगळं काम आहे. संपादकांनी, पोलिसांवर विशेष फिचर करायला सांगितलं आहे. कारण आज २१ ऑक्टोबर आहे. साठ वर्षांपूर्वी लडाख मधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित आणि निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी गस्त घालणाऱ्या १० पोलीस जवानांवर दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी अचानक हल्ला केला, पोलिसांनी कडवी झुंज दिली. पण दुर्दैवाने हे सगळे पोलीस शहीद झाले. या घटनेमुळे देशभर शोककळा पसरली. वीर जवान पोलिसांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून सर्वाना स्फूर्ती मिळावी आणि कर्तव्य, राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २१ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. आज तुमच्याबरोबर राहून मी आर्टिकल तयार करणार आहे, अर्थात तुम्हाला डिस्टर्ब न करता.

इन्स्पेक्टरनी न बोलता त्याला बसायला सांगितले .
तो बसून होता , पाहत होता . कितीतरी वेळ …

” –क्काssssय ?”
इनचार्ज च्या ओरडण्याच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली .
” कुठे ? कधी ? ” इनचार्ज ने विचारले .
आणि जसजशी माहिती मिळत गेली तसतसा इनचार्जचा चेहरा विदीर्ण होत गेला .
तो उठला .
“काय झालं ? ”
आणि इनचार्ज ने जे सांगितलं ते ऐकून तो हादरला .

शहराच्या मध्यवर्ती चौकात , ऐन गर्दीच्या वेळी , ट्रॅफिक हवालदारावर गुंडांनी गाडी घातली होती , गुंड पळून गेले होते . पण तडफडणाऱ्या हवालदाराला वाचवण्यासाठी गर्दी पुढं आली नव्हती . पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे गर्दीतले अनेक जण आपापल्या मोबाईलवर शूटिंग करीत होते .

त्याला काय करावं सुचेना .
बातमी सगळीकडे पसरली होती आणि संपूर्ण स्टेशनवर शोककळा पसरली होती …
पुन्हा एकदा फोन वाजला .
इनचार्ज ने फोन घेतला आणि टेबलावर मूठ आदळली .
” तीनशे दोन , अरे जा बाबा रेस्ट हाऊसवर, तिथे आपल्या पोलिसाला लोकप्रतिनिधीने थोबाडलय , त्याला रिलिव्ह कर , इकडे पाठव त्याला .”
” का मारलंय ?”
जाऊ दे , तुम्ही विचारू नका . कुणाकुणाचे कसले इगो असतात , ते आमच्यावर बाहेर पडतात .”

तो सुन्न झाला .
हे भलतंच काहीतरी घडत होतं.
आज पोलीस हुतात्मा दिन आणि त्याच दिवशी हे असं घडावं ?

–बाकड्यावर बसताबसता त्याच्या लक्षात आलं …
हे काय आजचं आहे असं नाही .
अनेक वेळेला आपणच बातम्या लावल्या आहेत पोलिसांबद्दलच्या …

–कधी पोलिसांनी तपास योग्य तऱ्हेने केला नाही …
–कधी दंगल योग्य तऱ्हेने हाताळली नाही …
–कधी नियमभंगाच्या केसीस मध्ये जास्त तत्परता दाखवली …
–कधी अनावर गर्दीला, मोर्चाला आवरण्यासाठी लाठीचार्ज केला, अश्रूधुर सोडला…
–आंदोलने चिरडून काढली…
या आणि अशाच बातम्या आपण वार्ताहर म्हणून देत राहिलो .
पण आपण असा का नाही कधी विचार केला …

–पोलीस सुद्धा एक माणूसच आहे .
–त्यालाही मनभावना आहेत .
–त्यालासुद्धा चांगल्या घरात , चांगल्या वातावरणात राहावं असं वाटत असेल .
–ऑन ड्युटी चोवीस तास राहताना , त्याला सुद्धा सण समारंभ आणि करमणूक हवीशी वाटत असेल .
–अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेपायी उन्हातान्हात , थंडीवाऱ्यात , पावसापाण्यात उभं राहताना तो थकत असेल .
–सदरक्षणाय हे ब्रीदवाक्य जपण्यासाठी त्याला आपले प्राणसुद्धा पणाला लावायला लागत असतील .
–समाजाचे रक्षण करण्यासाठी दगड धोंड्यांची , डोंगरदऱ्यांची पायवाट तुडवताना त्यालाही आधुनिक साधनांची गरज हवीशी वाटत असेल .
–आजारपणात पुरेशी विश्रांती आणि योग्य ते उपचार हवेसे वाटत असतील .
–मुलांना चांगलं उच्च शिक्षण द्यावस वाटत असेल.

पण आपण अशा पद्धतीने विचारच केला नाही . संवेदनशील राहून पोलिसांच्या बाजूला न्याय दिला नाही .
कथा , कादंबरी , नाटक , सिनेमा , मालिका मध्ये झालेले पोलिसांचे चित्रण हेच खरे चित्रण हे जनमानस आपण बदलून टाकू शकलो नाही .

त्याला खंत वाटली .
तो उठला .
लेखासाठी त्याला नवीन दिशा मिळाली होती .
आजच्या पोलीस हुतात्मा दिनी , हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहायची ती, त्यांची ,आजवर समाजाला न दिसणारी बाजू मांडून . असा निश्चय करून , मनोमन त्याना सॅल्युट करून तो निघाला .
त्याला लेखाचे शीर्षक सुचले ;

शब्द जिथे गोठतात …!

— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
दि.२१ ऑक्टोबर २०१९

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..