नवीन लेखन...

संवाद……. कधीही महत्वाचा !

“संवाद” म्हणजे काय ? संवाद आयुष्यात महत्वाचा का असतो ? संवाद केल्याने नक्की काय साध्य होतं ? किंवा “संवाद” नसला तर जीवनात काही फरक पडतो का?  तर याचं उत्तर आहे, ” हो !” कारण ज्या प्राण्याला निसर्गाने मेंदू दिला आहे, बुद्धी दिली आहे  किंवा तोंड, कान व डोळे दिले आहेत त्या प्रत्येकाने आपल्या जीवनात संवाद ठेवणे साहजिक आहे. संवाद म्हणजे नुसतं बोलणं नव्हे. अथवा “संवाद” म्हणजे “ओरडणे” असेही नव्हे ! तर संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण!
परंतु सध्याच्या युगात “व्यक्तिगत संवाद” खूपच कमी झालेला आहे. दुसऱ्याजवळ आपला विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी आवश्यकता असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीमुळेच आपल्या विचारांना नवी दिशा व नवा आयाम मिळतो. आपल्या सृजनशीलतेला नवे पैलू पडतात. आपल्या ज्ञानात भर पडते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचं, आपल्या उणिवांचं आपल्याला मूल्यांकन करता येतं. आपलं मानसिक आरोग्य सुद्धा सुदृढ रहातं.  प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वासाठी निरोगी मन आवश्यक असते आणि निरोगी मनासाठी संवादाची गरज असते.
संवादाचा अभाव हे माणसांमाणसांत दुरावा निर्माण होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. एकाच घरात रहाणारे भाऊ-बहीण, पती-पत्नी, पिता-पुत्र यांच्यात संवाद नसतो. आपली सुखदु:ख, भावना, विचार यांची देवाणघेवाण करायला वाव नसतो. काही काही घरात तर प्रत्येकजण फक्त पैसा कमविण्याच्या नादात गुंतला असल्याने व आयुष्यभर त्यातच व्यस्त झाल्याने आपुलकी, भावना व्यक्त करणारा संवाद विसरून गेलेला आहे.
या डिजिटल दुनियेत काय गंमत आहे बघा, अस्सल संवादाच्या खिडक्या बंद करुन जिवंत माणसं  मृत ‘सहजीवन’ जगत आहेत. त्यामुळे आपलं नक्की काय नुकसान होते आहे हे त्यांच्या लक्षात यायला आख्खं आयुष्य खर्ची पडतंय. आणि मग अशामुळे मनाच्या बंद तळघरात गैरसमजाचा राक्षस जन्माला येतो आणि बघता बघता तो अक्राळ विक्राळ रुप धारण करून आख्खं आयुष्यच उध्वस्त करून टाकतो. संवादच संपला की उरतो तो फक्त वाद…!
म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकासोबत संवाद हा व्हायलाच हवा. अन्यथा एखाद्या कुकर सारखी अवस्था होऊ शकते. समजा कुकरमध्ये खूप वाफ कोंडली आहे. तिला बाहेर पडायला वाव मिळाला नाही. तर काय होतं ? आपसूकच कुकरचा स्फोट होतो. तसेच समजा एखाद्या डबक्यात पाणी साठलं आणि आत येणाऱ्या झऱ्याला मार्ग मिळत नाही तेव्हा काय होतं ? अर्थातच आतलं पाणी आतल्या आत कुजून जातं. दुर्गंधी येऊ लागते. अगदी मनाचंही तसंच असतं. विचारांची देवाणघेवाण झाली नाही, भावनांना वाट मिळाली नाही की मनात वितुष्ट निर्माण होते आणि मग ते विकृतीकडे धाव घेते. त्यामुळेच त्यासाठी गरज असते ती संवादाची! अन्न, वस्त्र आणि निवारा या जशा शरीराच्या मूलभूत गरजा आहेत तशीच “संवाद” ही मनाची मूलभूत गरज आहे.
— डॉ. शांताराम कारंडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..