नवीन लेखन...

दारूगोळा सुरक्षा यंत्रणेत लाल फितीमुळे अडथळे

Red Tapeism in Security Modernization

विदर्भातल्या पुलगावमधल्या सेंट्रल ॲम्युनिशन डेपो (केंद्रीय दारूगोळा भांडार, सीएडी) मध्ये ३१ मेला मोठा स्फोट होऊन आगीचा डोंब उसळला. हा भारतातला सगळ्यात मोठा आणि आशियातला दुसऱ्या क्रमांकाचा डेपो होय. बंदुकीच्या गोळ्या, ८१ मिलिमीटर बाँब, १५५ मिलिमीटर गन शेल्स, टॅंक शेल्स, हॅंड ग्रेनेड्‌स, भूसुरुंग, ब्रह्मोस व इतर विद्‌ध्वंसक क्षेपणास्त्रं आणि इतर अमाप दारूगोळा या डेपोमध्ये असतो.

या स्फोटाच्या निमित्ताने एकूणच दारुगोळा सुरक्षा यंत्रणेबाबत घेतलेला एक आढावा…

दारूगोळा साठा वाढवणे महत्त्वाचे

देशाच्या संरक्षणाचा विचार करताना युद्धसज्जता ही युद्धाइतकीच; महत्त्वाची बाब असते, याचा कधीही विसर पडू नय़ॆ. आपण स्वबळावर विमानवाहू नौका, हलकी लढावू विमाने, तोफ़ा, रडार यंत्रणा, अंतराळात उपग्रह, क्षेपणास्त्रे तयार करण्यात यश संपादन केले आहे. पण, आपल्याजवळ लष्करासाठी लागणारा दारूगोळा आवश्यक प्रमाणापेक्षा कमी आहे. त्यात वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

‘‘आमच्याकडे आण्विक क्षेपणास्त्रे आहेत,’’ असा दम पाकिस्तान अधूनमधून भरत असतो.चीन आपले सामरिक सामर्थ्य वाढविण्यासाठी पाकिस्तानची मदत घेत आहे. एखादी आकस्मिक स्थिती उद्भवल्यास या दोन्ही देशांशी मुकाबला करण्याची वेळ आल्यास भारतालाही त्याच तोडीचे उत्तर द्यावे लागणार आहे.

२०१२ मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी ‘संरक्षण दलांपाशी केवळ आठ दिवसांचंच ‘वॉर वेस्टेज रिझर्व्ह ॲम्युनिशन’ उरलेलं आहे,’ याची जाणीव करून दिली होती.ही कमतरता प्रत्येक वर्षी सैन्य प्रमुख सरकार समोर मांडत असतात.मे २०१५ मध्ये सिएजीने(Controller & Auditor General) देशाकडे फ़क्त २० दिवस पुरेल इतकाच दारुगोळा आहे असा शोध लावला.आपल्या पैकी कितींना माहित आहे की या आधी तेच संरक्षण सचिव होते.दारु गोळा कमी होण्यात सर्वात जास्त जबाबदारी त्यांचीच होती.त्यांच्या निष्क्रिय कामगिरी नंतर त्यांना प्रमोशन देण्यात आले.ह्याच नोकरशहांचे ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी भ्रष्टाचारात पण नाव आहे.

प्रसारमाध्यमांची भूमिका स्पृहणीय नव्हती.

विदर्भातल्या पुलगावमधल्या सेंट्रल ॲम्युनिशन डेपो (केंद्रीय दारूगोळा भांडार, सीएडी) मध्ये ३१ मेला मोठा स्फोट होऊन आगीचा डोंब उसळला. हा भारतातला सगळ्यात मोठा आणि आशियातला दुसऱ्या क्रमांकाचा डेपो होय. बंदुकीच्या गोळ्या, ८१ मिलिमीटर बाँब, १५५ मिलिमीटर गन शेल्स, टॅंक शेल्स, हॅंड ग्रेनेड्‌स, भूसुरुंग, ब्रह्मोस व इतर विद्‌ध्वंसक क्षेपणास्त्रं आणि इतर अमाप दारूगोळा या डेपोमध्ये असतो. या भीषण आगीची कारणमीमांसा करण्यासाठी ‘कोर्ट ऑफ एन्क्वायरी’चे आदेश देण्यात आले आहेत. अथक्‌मेहनत करून पुलगाव, वर्धा व नागपूरच्या १६ अग्निशामक यंत्रणांनी ही भीषण आग आटोक्‍यात आणली. या स्फोटांत १६ जवान मृत्युमुखी पडले आणि १९ जवान आणि ५०० हून अधिक नागरिक जखमी झाले.

या दुर्घटनेमुळे परत एकदा संरक्षणसाहित्य आणि साठवणव्यवस्थेच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण झालं आहे. एवढ्या मोठ्या घटनेची परखड मीमांसा व्हावी, .मात्र या स्फोटाचं वार्तांकन करताना वृत्तपत्रांची व प्रसारमाध्यमांची भूमिका स्पृहणीय नव्हती. स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचं (एसओपी) नीट पालन झालं नाही, असा दावा माध्यमांनी सुरवातीला केला. नंतर स्फोटाच्या ठिकाणी तीन गाड्या हवेत उडून उद्‌ध्वस्त झाल्याची बातमी त्यांच्या हाती लागल्यावर ‘गाड्यांखाली बाँबस्फोट झाल्यामुळं हा घातपातच होता,’ असं सांगण्यात आलं. दुर्दैवानं ॲम्युनिशन डम्पचा स्फोट कसा असतो आणि त्यामधल्या साखळी-स्फोटांमुळे निर्माण होणाऱ्या भारी दाबाच्या लहरींचा काय परिणाम होऊ शकतो, याची कल्पना मिडीयाला नव्हती. प्रसारमाध्यमांतल्या अशा बेजबाबदारपणा ’मुळं नागरिक, मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे कुटुंबीय आणि सेवारत जवानांवर पडणारा मनोवैज्ञानिक दबाव या सगळ्या बाबी ‘दुर्लक्षित केल्या गेल्या.

डेपोच्या भोवताली किमान ९०० मीटरचा बफर झोन

पुलगावमधला सीएडी डेपो हा सेना मुख्यालयांतर्गत असून, ऑर्डनन्स फॅक्‍टरींमधून येणारा आणि बाह्य देशांमधून आयात केलेला दारूगोळा इथून देशांतल्या इतर डेपोंमध्ये पाठविण्यात येतो. अशा प्रकारच्या ॲम्युनिशन डेपोच्या भोवताली किमान ९०० मीटरचा बफर झोन असणं सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यावश्‍यक असतं. मात्र पुलगावचा डेपोच काय, भारतातल्या बहुतांश संरक्षण संस्थांच्या भोवताली अतिक्रमण झाल्यामुळं, हा बफर झोन एकतर संकुचित झाला आहे किंवा अस्तित्वातच राहिला नाही.

बफर झोननंतर सुरक्षाभिंत किंवा काटेरी कुंपण अथवा दोन्हींचा मिळून उभारलेला सुरक्षा-अडथळा असतो. सुरक्षाभिंतीच्या आतमध्ये सुरक्षारक्षकांची मचाणं असतात. .संरक्षणदलांतली स्फोटकं कॅटॅगरी एक्‍स, कॅटॅगरी वाय, कॅटॅगरी झेड ,कॅटॅगरी झेडझेड चार प्रकारची असतात. प्रत्येक प्रकारच्या स्फोटकाची साठवणक्षमता वेगवेगळी असते.डेपोमधला दारूगोळा जमिनीखाली सिमेंटेड बंकर्समध्ये किंवा जमिनीवरच्या इग्लूंमध्ये (प्रीफॅब्रिकेटेड हट्‌स) ठेवला जातो.दारूगोळा ठेवलेल्या प्रत्येक स्थानापाशी सुरक्षारक्षक तैनात असतात. छोट्या स्फोटांना त्या परिघातच अडवून ठेवण्यासाठी अशा स्थानांभोवती १०-१५ फूट उंचीचे मातीचे भरीव बंधारे असतात. प्रत्येक स्टोअरेज साइटमध्ये किमान २०० मीटरचं सापेक्ष अंतर असतं. प्रत्येक स्टोअरेज साइटसाठी फ्लडिंग सिस्टिमची व्यवस्था केलेली असते. याशिवाय प्रत्येक डेपोमध्ये स्फोटकांच्या उतरविण्या/चढविण्याची जागा, दुरुस्तीचं क्षेत्र, नष्ट करण्याचं क्षेत्र आणि मिसाईल शॉप एरिया असतात

तिन प्रकारची ॲम्युनिशन

पुलगावच्या सीएडीमध्ये वापराच्या द्रुष्टीने फायर करण्याजोगे (Serviceable ); ज्यांची वापरक्षमता संपलेली आहे (Life Expired) आणि खराब/फायर करण्यास अयोग्य (Segregated Being Defective Awaiting Final Sentence) अशी तीन प्रकारची स्फोटकं ठेवलेली आहेत.
कुठल्याही प्रकारच्या स्फोटकांचा, फायर न करताच स्फोट होण्यामागं अनेकानेक कारणं असू शकतात. विज पड्ण्यामुळे), बेपर्वाई व चुकीची हाताळणी व कार्यपद्धती, सदोष विद्युतप्रवाह, स्वयंज्वलन किंवा स्वयंस्फूर्त प्रज्वलन(Auto Combustion), सदोष ठेवणपद्धत, तुटक तपासणीमुळं होणारी हेळसांड , बाह्य वातावरणीय प्रभाव, डेपोच्या रखरखावासाठी निधीची कमतरता, स्टॅंडर्ड आपॅरेटिंग प्रोसिजर्सचं शब्दश: पालन न होणं आणि घातपात अशी एक किंवा अनेक कारणं स्फोटामागं असू शकतात.

त्या रात्री विजांचा कडकडाट नव्हता किंवा वीज पडल्याची कुठंही नोंद नाही. ही घटना रात्री एकनंतर, म्हणजेच कोणताही कामगार काम करत नसताना, घडल्यामुळं बेपर्वाई किंवा चुकीची हाताळणी व कार्यपद्धत हे कारण असण्याचीदेखील शक्‍यता नाही. सदोष विद्युतप्रवाहामुळं ही दुर्घटना झाली नाही कारण बंकर्स किंवा इग्लूंच्या आतमध्ये वीजपुरवठा नसतो. सुरक्षा लाइट्‌स फक्त स्टोअरेज साइटच्या बाहेरच लागलेले असतात आणि बंकर्स/इग्लूंच्या आत सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचा वापर होतो २०१५-१६ मध्ये पुलगावच्या सीएडीला उत्तम संचालन व आंतरिक सुरक्षेचं प्रशस्तिपत्र आणि सौरऊर्जेच्या आधारावर वाफेद्वारे कालबाह्य स्फोटकं नष्ट करण्याच्या प्रणालीला ‘बेस्ट इनोव्हेशन’चं बक्षीसही मिळालं आहे.

वाढत्या तापमानामुळं दारूगोळ्याच्या आतील बारूदाची स्वयंज्वलन

ज्या ठिकाणच्या बंकरमधल्या दारूगोळ्याला आग लागली होती, त्याच्या जवळच्याच बंकर्समध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रं ठेवलेली होती. वाढलेल्या तापमानामुळं त्या क्षेपणास्त्रांचा होऊ शकणारा स्फोट टळावा म्हणून, काही जवानांनी-अधिकाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता, तिथली आग विझविण्यासाठी धाव घेतल्यामुळं ते स्फोटांच्या तडाख्यात सापडले.

तीच कर्तव्यपरायणता अग्निशमन दलांच्या कर्मचाऱ्यांनीदेखील दाखवली. प्रत्येकी सात कर्मचारी असलेली दोन अग्निशमन वाहनं आग लागलेल्या बंकरपाशी गेली असता, त्या बंकरमधल्या स्फोटांमुळं हवेत उडाली आणि त्यातले सर्व कर्मचारी मृत्युमुखी पडले. ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’च्या (डीआरडीओ) सुरक्षा नियमावलीनुसार केल्या गेलेल्या सेफ्टी ऑडिटमध्ये पुलगावच्या सीएडीला घवघवीत यश मिळालं होतं व त्यांची अग्निशमन यंत्रणादेखील अत्याधुनिक, उच्च प्रतीची आणि प्रशिक्षित होती.

वाढत्या तापमानामुळं दारूगोळ्याच्या आतील बारूदाची स्वयंज्वलन किंवा स्वयंस्फूर्त प्रज्वलनाची प्रक्रिया सुरू होऊन स्फोट होण्याचा धोका वाढतो. पुलगावध्ये उसळलेल्या आगडोंबाचं कारण बाह्य वातावरणीय प्रभाव हे असण्याची शक्‍यता सर्वाधिक आहे.

दारूगोळा सुरक्षा यंत्रणा अद्ययावत करण्याचे प्रयत्न लाल फितीमुळे अडथळ्याची शर्यत

पुलगावच्या डेपोत वा देशभरातल्या अशा अन्य डेपोंमध्ये काही पहिल्यांदाच आग लागलेली नाही. पुलगावच्याच डेपोत २००५ च्या मार्चमध्येही आग लागली होती; पण ती लवकरच आटोक्‍यातही आणण्यात आली होती. मे १९८९ मध्ये डेपोतल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर बाँबच्या पेट्या उतरवताना स्फोट झाला होता. त्यात काही कामगार ठारही झाले; पण डेपोंमधल्या आगींच्या इतिहासातली सगळ्यात भीषण आग जम्मू-काश्‍मीरमधल्या खुंदरू सबडेपोतली होती. १२ ऑगस्ट २००७ रोजीच्या या दुर्घटनेत ४० लोक ठार झाले; तर १ हजार ३१३ कोटींची स्फोटकं नष्ट झाली होती.

राजस्थानात भरतपूरपासून सात किलोमीटरवरच्या कंजोली गावाजवळ असणारा डेपो सर्वात जुना आहे. इथं २८ एप्रिल २००० रोजी आग लागली व ३९३ कोटींची स्फोटकं जळून खाक झाली. मे २००१ मध्ये राजस्थानातल्याच बिरदावल युनिटमधल्या आगीत ३७८ कोटींची स्फोटकं नष्ट झाली. महाराष्ट्रातही पुण्याच्या दारूगोळा भांडारात (एप्रिल १९९२, ऑक्‍टोबर १९९४), पुण्याच्याच ‘आयुध निर्माणी’त (मे १९९५), देहू रोडच्या भांडारात (मे २०००) आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. विदर्भातल्या ‘भंडारा आयुध निर्माणी’त एप्रिल १९९०, मे २००५, २००८, ऑगस्ट २०१० अशा चार वेळा, तर ‘भद्रावती आयुध निर्माणी’त २००५ या एकाच वर्षात जानेवारी व एप्रिल या दोन महिन्यांत आगी लागल्या.

नकळतपणे झालेल्या मानवी चुका, दुर्लक्ष आणि कधी अपघातानं या अशा आगी लागतात; पण, दारूगोळा भांडारातली आग ही केवळ आग राहत नाही; तिला स्फोटांचीही जोड असते.दारूगोळा साठविण्याची व्यवस्था जास्तीत जास्त सुरक्षित बनविणारे, शिवाय “स्फोटरोधक‘ असे तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि ते आपल्याकडे आणण्यात यावे, असे काही लष्करी अधिकाऱ्यांनी सुचविलेही होते. पण त्याची कार्यवाही झाली नाही. असे प्रस्ताव नोकरशहांच्या टेबलावरच का गोलगोल फिरत राहतात, याचा खरे म्हणजे छडा लावायला हवा.

आपल्याकडे दारूगोळा सुरक्षित ठेवण्यासाठीची यंत्रणा अद्ययावत करण्याच्या प्रयत्नांची लाल फितीमुळे अडथळ्याची शर्यत झाली आहे. शासकीय यंत्रणेतील लालफितीशाहीची चर्चा आपल्या देशात नवी नाही. तथापि, लष्कराकडून होत असलेल्या मागण्यांचा चेंडू करून संरक्षण आणि अर्थ मंत्रालयातील बाबूशाही टोलवाटोलवी करीत असेल, तर अशा दुर्घटनांमधून आपण काहीच बोध घेतलेला नाही, असा त्याचा अर्थ होईल.

सुरक्षाव्यवस्थेबाबत सजगता हवीच

पुलगाव स्फोटांमागच्या कारणांमध्ये घातपाताचा धोका दुर्लक्षित करता येणार नाही. डेपोमध्ये अंदाजे तीन हजार ५०० मजूर दारूगोळा उतरवणं-चढवणं हे काम करतात. आधी त्यासाठी स्थानिकांमधूनच भरती व्हायची. गेल्या काही दिवसांपासून ही भरती अखिल भारतीय पातळीवर जाहिरात देऊन होऊ लागली. मध्यंतरी सरकारनं नव्या नोकऱ्यांवर बंदी घातल्यामुळं सध्या हे खासगी ठेकेदारांद्वारा केलं जातं. कायमस्वरूपी आणि बिगार मजुरांचं प्रमाण अंदाजे २०:८० असं असल्यामुळं मजूर लवकर वा रोज बदलले जाणं, त्यांची नीट ओळखपरेड न होणं, त्यांची पोलिसांकरवी सुरक्षातपासणी न होणं आणि त्यासाठी ठेकेदाराच्या शब्दावर विसंबून राहाव लागणं, ट्रकचालकांची सतत होणारी बदली यामुळं निर्माण होणाऱ्या सदोष सुरक्षाव्यवस्थेची शक्‍यताही नाकारता येत नाही.
गरिबी, बेरोजगारी आणि दुष्काळी परिस्थिती यांच्या अभद्र युतीमुळं या भागात जिहादी,माओवादी प्रव्रुत्ति वाढत आहे.

गेल्या १६ वर्षांमध्ये भारतातल्या अनेक दारूगोळा भांडारांमध्ये अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक स्फोटानंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते बदल केले जातात. आग कोणत्या कारणांमुळं लागली असावी, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. यापुढच्या काळात ‘कोर्ट ऑफ एन्क्वायरी’मधल्या चौकशीनंतर ही दुर्घटना आहे की घातपात, याबाबतचं सत्य समोर येईलच. मात्र आपण सुरक्षेसंदर्भात अधिक सजगता दाखवणं आणि सुधारणा करणं किती आवश्‍यक आहे, हे यानिमित्तानं स्पष्ट झालं आहे. एखादी छोटी चूकही किती महाभयंकर ठरू शकतं, हे या दुर्घटनेतून समोर आलेलं आहे. या दुर्घटनेतून धडा घेऊन देशातल्या इतर दारूगोळा भांडारांच्या सुरक्षेची फेरतपासणी करणं आणि तिथली सुरक्षा अधिक भक्कम करणं आवश्‍यक आहे, हाच या दुर्घटनेचा धडा आहे!

दारूगोळा साठा वाढवणे महत्त्वाचे

उद्या युद्ध झालेच तर सलग २० दिवस पुरेल इतकाही दारूगोळा लष्कराकडे नाही.पूर्ण क्षमतेचे युद्ध होण्याची शक्यता गृहीत धरून किमान ४० दिवस पुरेल इतके डब्ल्यूडब्ल्यूआर{WAR WASTAGE RESERVE(WWR)} राखले जावे, असा संकेत आहे. जवळपास ७० टक्के दारूगोळा आपल्या देशातच तयार होतो आणि केवळ तीस टक्के बाहेरच्या देशातून आयात केला जातो. दारूगोळ्याचा हा साठा पूर्ण करायचा असल्यास सध्याच्या किंमती नुसार आपल्याला ९७ हजार कोटींहून जास्त पैसे खर्च करावे लागतील. दारूगोळ्याच्या साठवणीला (STOCKING OF AMMUNITION) सैनिकी भाषेत वॉर वेस्टेज रिझर्व्ह हे नाव आहे. हे वॉर वेस्टेज रिझर्व्ह दोन प्रकारचे असते. एकतर सामान्य लढाईसाठी लागणारा दारूगोळा आणि दुसरे म्हणजे, लढाई तीव्र झाल्यास तीव्र लढाईसाठी लागणारा दारूगोळा. तीव्र प्रकारच्या लढाईसाठी सामान्य लढाईच्या तुलनेत तिप्पट दारूगोळा जास्त लागतो. सध्या कमी झालेला हा दारूगोळ्याचा साठा लवकरतात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. देशात सध्या ३९ दारूगोळा बनवण्याचे कारखाने आहेत. त्यांची क्षमता व वेग वाढविला पाहिजे.
तातडीची अंमलबजावणी महत्त्वाची

चांगली गोष्ट म्हणजे मोदी सरकारने तातडीचे दारूगोळ्याच्या साठवणीचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आपण ५० टक्के दारूगोळ्याची कमतरता दूर करु . उरलेली ५० टक्के कमतरता जी बाहेरच्या देशातून आणावी लागते ती २०१९ पर्यंत पूर्ण होईल. जो दारूगोळा बाहेरच्या देशातून आणावा लागतो, त्यासाठी इस्त्राईल, अमेरिका आणि इतर देशांशी बोलणी सुरू आहेत. आशा आहे की याच वर्षी यासंबंधिच्या करारांवर स्वाक्षर्‍या होतील. बाहेरच्या देशातून आयात करण्याच्या दारूगोळ्या संदर्भात लवकरात लवकर करार करून ही कमतरता दूर केली पाहिजे.कारण युद्धात अतिशय महत्त्वाचा दारूगोळा म्हणजे, रनगाड्यांसाठी किंवा क्षेपणास्त्रासाठी लागणारा दूरगोळा हा बाहेरच्या देशातून येतो. कारगिलच्या लढाई दरम्यान बोफोर्स तोफांसाठी दारूगोळा कमी पडू लागला, त्यामुळे दहापट जास्त किंमत देऊन तो वेगवेगळ्या देशातून आयात करावा लागला. नियोजन आणि त्यासाठीची अंमलबजावणी चांगली केली तर साठा लवकर पूर्ण होऊ शकतो. सध्याचे सरकार हे महत्त्वाचे काम नक्कीच चांगले करेल अशी खात्री वाटते.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..