नवीन लेखन...

पुष्पा, आय ‘लव्ह’ टिअर्स !

अशारीर प्रेमाची ओळख, महती सांगणारा ” अमर प्रेम ” हा चित्रपट ९वीत असताना (पौगंडावस्थेची सुरुवात) मी भुसावळला “वसंत “टॉकीज मध्ये वडिलांबरोबर पाहिला. त्याआधीचा “आराधना ” मात्र योग्य वयात (अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना मिरजेच्या “मंगल ” चित्रपटगृहात (त्यामधील “कोरा कागज ” च्या “तेरा ” शब्दानंतर ” चौदा, पंधरा — ” अशी कोटी करीत आसपास हंशा पिकविल्याचेही आठवते.) पाहिला होता.

खन्ना, शर्मिला किंचित उतरणीला लागलेले, त्यामुळे नुसत्या दिसण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाशी काही प्रयोग करण्याच्या मूडमधले ! विनोद मेहेरा सारख्या देखण्या नव्या पिढीला शिरकाव करून देणारा हा चित्रपट.

प्रमुख कलावंतांच्या अभिनयाइतकीची या चित्रपटाची ओळख म्हणजे ” आरडी , किशोर, लता !” या तिघांच्या कर्तृत्वाने आमच्या मनाचा पडदा आजही व्यापला आहे. ” आंधी ” मधील प्रत्येक गाण्यावर जसा एकेक प्रदीर्घ लेख होऊ शकेल, तसेच इथे संभवते. आरडी /किशोर/लता यांच्या ( त्यांतही किशोर जास्त ) कलाप्रवासाचा आढावा अशक्य आहे पण तशा प्रयत्नात असताना कोणालाही हा चित्रपट ओलांडून जाणे केवळ अशक्य. आणि हो, सुरुवातीचे ” डोली में बिठाईके ” हे सिनिअर बर्मनदांचे (मंदिरातील पुजाऱ्याचे स्वर) शब्द विसरून चालणारच नाही. संपूर्ण चित्रपटाचा मूड सेट करून खुर्चीतच सरसावून बसायला लावणारे.

ज्योतीने तेजाची आरती ” हे सुरांच्या प्रांगणात नंतर श्रीधर फडके यांनी करून दाखविले – पिताश्री सुधीर फडकेंना ” फिटे अंधाराचे जाळे ” गायला लावून, स्वतःच्या संगीत दिग्दर्शनात ! अशावेळी या पिता-पुत्रांच्या पोतडीत काय दडलेले असेल , आजही कळायला मार्ग नाही. पुत्राच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्षासारख्या पित्याने आपली कला सादर करायची- दोघांवरही प्रचंड दडपण नक्कीच येत असेल.

घरच्यांनी त्यजलेला खन्ना, एका योग्य क्षणी चुकीच्या ठिकाणी आणून सोडलेला. त्याचेच काय सगळ्यांचेच पाय ” रैना बिती जाय ” पाशी कायमचे थबकतात. आणि तो सूर-सौंदर्याचा पाश त्याला सोडवत नाही. क्षणिक अभिसारिका, क्षणात नंदूची नसलेली आई आणि उत्तरायणात “टाकून घातलेल्या नवऱ्याची ” सेवा करणारी मोलकरीण ! काय आवाका मिळाला शर्मिलाला- आणि त्या प्रत्येक टप्प्याचे तिने सोने केले. ( हाच परिस तिने “आराधना ” मधल्या भूमिकेलाही लावला होता.)
आजच्या काळात असे पात्र लिहिणारे आणि निभावणारे पटकन डोळ्यापुढेही कोणी येत नाही.

” कुछ तो लोग कहेंगे ” हे पुष्पाला समजावणारा खन्ना स्वतःला हे आधी सांगतो आणि व्यक्तिगत आयुष्यात अधिक कडवट होतो. ” चिंगारी कोई ” ही पाण्यावरची तरल कविता – गंगेलाही धन्य करणारी, हावडा ब्रिज ला थबकवणारी आणि शर्मिलाला गुह्य सांगणारी. खन्ना ते गाणं चेहेऱ्यावर जगतो. हे अद्भुत त्याने आणि किशोरनेही “खामोशी ” मधील ” वो श्याम ” मध्ये याआधीच करून दाखविले होते. गाणं ओठांवर आणि चेहेऱ्यावर जगणे याचे हे आदर्श वस्तुपाठ आहेत.

गीतकाराच्या शब्दांना ओठ आणि चेहेरा असे कॉम्बो मिळणं म्हणजे अगदी ” हे सुरांनो चंद्र व्हा ” सारखा क्षण !

आतून पोखरलेला पण बाह्यतः कणखर खन्ना वेळोवेळी पुष्पाला मात्र आय “हेट” टिअर्स म्हणत सावरत असतो. देखण्या, तरुण नंदूला त्याच्या बालपणीच्या आठवणीतल्या झाडापाशी खन्ना आणून सोडतो आणि माय -लेकरांना भेटवतो. आता त्याला कळतं – अश्रू कायम खारट नसतात. एका भेटीच्या कुशीत दुसरा निरोप दडलेला असतो. आणि निरोप म्हटलं की अश्रू मस्ट !

भेट जशी स्मितहास्या शिवाय साजरी होत नाही, तसे निरोपाच्या क्षणी अश्रू असायलाच हवेत मि. खन्ना ! त्यांचा तिरस्कार करू नकोस. जे गेलेत, जाणार आहेत हे माहीत असते, तेव्हा तेव्हा डोळे ओले व्हायला हवेतच. आमच्या डोळ्यांमध्ये तर पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत. वेळी-अवेळी, सकारण -अकारण ते पाणी बांध फोडून बाहेर येते. बरं झालं “अमर प्रेम ” ने तुला हा धडा दिला – ” आय लव्ह टिअर्स ! ”

अश्रुंसारखे सांत्वन करण्याचे सामर्थ्य तर स्पर्शातही नसते.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..