नवीन लेखन...

मराठी आडनावांचे मानसशास्त्र

Psychology of Marathi Surnames

आडनावाची खरोखर गरज आहे का? आडनावे काय सांगतात? आडनाव सोडले तर काय बिघडते?

विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे? सासरचे? की माहेरचे आडनाव सोडूच नये? की सासर-माहेरचे जोड आडनाव धारण करावे?

कुलनाम, आडनाव, सरनेम, फॅमिली नेम, लास्ट नेम वगैरे शब्दांनी परिचित असलेले कुटुंबाचे नाव हे जगभर आवश्यक समजले जाते आणि बव्हंशी प्रत्येक कुटुंबाला असतेच असते. व्यक्तीची आणि कुटुंबाची ओळख म्हणून कायदेशीर दस्तअैवजात किंवा कागदपत्रात नोंदी करण्यासाठी आडनाव ही अेक आवश्यक बाब आहे. आडनावांच्या बाबतीत बरीच क्रियापदे वापरली जातात. आडनाव पिढीजात चालत आले, पडले, रूढ झाले, घडले, घेतले, सोडले, धारण केले, पुसले, आडनावाचा त्याग केला वगैरे.

अेक गोष्ट मात्र सर्वांनी लक्षात असू द्यावी. या लेखात, ज्या आडनावांचा मी अुल्लेख केला आहे, संदर्भ दिला आहे ती आडनावे प्रत्यक्षात आहेत, अस्तित्वात आहेत. त्या आडनावांच्या व्यक्तिंचा किवा त्या आडनावांचा अुपहास, अुपमर्द, हेटाळणी, निदा किवा स्तुती करण्याचा मुळीच अुद्देश नाही. तरी त्या आडनावांच्या व्यक्तींनी कृपया कोणताही गैरसमज करून घेअू नये.

आडनाव प्रचलीत होण्यासाठी प्रथम ते, त्या कुटुंबाने स्वीकारले पाहिजे. काहीतरी कारणामुळे ते स्वीकारले जाते, मग ते पिढ्यान् पिढ्या चालू राहते. अशारितीने प्रत्येक आडनावाला अितिहास असतो. बव्हंशी व्यक्तींना तो माहित नसतो. काहींना तो दंतकथा किंवा आख्यायिकांच्या स्वरूपात माहित असतो. तर काही व्यक्तींनी तो घडविला असतो. अेखाद्या कुटुंबातील व्यक्तिला विचारले की तुमचे आडनाव कसे रूढ झाले? किवा केव्हापासून रूढ झाले? तर ते त्याला नक्की सांगता येणार नाही किवा ती व्यक्ती तिच्या आडनावाबद्दल कांही आख्यायिका सांगेल. ती अैकून तुम्हाला अचंबा वाटेल की अितक्या लहानशा व क्षुल्लक घटनेमुळे, प्रसंगामुळे किंवा बाबीवरून हे आडनाव कसे पडले? म्हणजे रूढ झाले आणि ते पिढ्यानपिढ्या कसे चालू राहिले?

त्या त्या कुळातील सर्व व्यक्तींचे कुलनाम सामाअीक असते म्हणून त्या कुलनामाला श्रेष्ठनाम असे म्हणण्याचा प्रघात पडला. कानडी भाषेत श्रेष्ठ ह्या अर्थी ‘अड्ड‘ हा शब्द आहे म्हणून कुळनामाअैवजी ‘अड्डनाम‘ हा शब्दप्रयोग रूढ झाला आणि पुढे त्याचे ‘आडनाव‘ असे रूपांतर झाले. कुलनाम हा शब्दप्रयोगही चांगला आहे पण तो क्वचितच वापरला जातो. अर्धनाम या संस्कृत शब्दाचे अडनाम किंवा आडनाव हे अपभ्रष्ट रूप आहे असे काहीजण प्रतिपादतात. परंतू ही व्युत्पत्ती अर्थाला अनुकूल नाही असे डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांचे मत आहे.

कुणाला वडिलोपार्जित अिस्टेट भरपूर मिळते तर कुणाला अजिबात मिळत नाही पण आडनावाचा वारसा मात्र, अगदी नको असला तरी, मिळतो. आडनाव कसेही असले तरी आपण ते आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने लावतो. पिढ्यानपिढ्या आडनावाचा वारसा चालू राहतो.
जगभरची कुलनामे म्हणजेच आडनावे रूढ होण्याच्या पध्दती आणि कारणे जवळजवळ सारखीच आहेत. निवास, व्यवसाय, जात, कर्तृत्व, पद, हुद्दा, स्वभाव, सवयी, गुणावगुण, व्यंग वगैरेंमुळे आडनाव पडते किंवा बर्‍याच वेळी ते समाजाकडून किंवा प्रतिष्ठित व्यक्तीकडून त्या कुटुंबावर लादले जाते. कारण अुघड आहे…विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाणे आडनाव, ते कुटुंब आपणहून स्वीकारणार नाही. काही आडनावे तर अितकी अश्लील आहेत की त्यांचा अुल्लेख करणे देखील असभ्यपणाचे ठरेल. पण ही आडनावे पिढ्यान् पिढ्या वापरली जाताहेत. प्राणी, भाज्या, घरगुती वापरावयाच्या वस्तू आणि पदार्थ, शरीराचे अवयव वगैरेमुळे ही मराठी आडनावे रूढ झाली आहेत. काही आडनावे तर, त्यांच्या मूळ स्वरूपाचा अपभ्रंश झाल्यामुळे, निरर्थकच वाटतात. मराठी आडनावांचे, त्यांच्या स्वरूपावरून, ज्ञातीवरून किंवा अशाच काही वैशिष्ठ्यावरून काही गट तयार करता येतात.

मराठी आडनावात, संस्कृती, शिक्षण, संस्कार, चालीरिती, रितीरिवाज, नीतीमत्ता, गरीबीश्रीमंती, विद्वत्ता वगैरेंचा प्रभाव पडला आहे. अितकी विविध, वैचित्र्यपूर्ण आणि काही विक्षिप्तही आडनावे कशी प्रचारात आली, स्वीकारली गेली, रूढ झाली, अितकेच नव्हे तर त्या आडनावांचा वारसा पिढ्यान् पिढ्या कसा चालू राहिला हे अेक फार गहन असे गूढ आहे. या मागे कोणतेतरी प्रबळ कारण असले पाहिजे. समाजाने लादलेली आडनावे काही पिढ्यानंतर पचविली जातात. आडनाव कसेही असले तरी त्या कुटुंबांना त्याचा अभिमानच वाटतो आणि ते आडनाव त्यांना बदलावेसेही वाटत नाही कारण तसे केले तर सगेसोयरे आणि परिचितांमधली त्या कुटुंबाची ओळख पुसली जाते. बव्हंशी स्त्रियांना, लग्नानंतर, सासरच्या आवडीचे आणखी अेक नाव ठेवले जाते. लग्नानंतर आडनाव आणि नावही बदलल्यामुळे तिची, लग्नापूर्वीची ओळख म्हणजे आयडेंटिटी पूर्णतया पुसली जाते. पण हे दिव्य करायला ती राजी असते. स्वतंत्रवृत्तीच्या किंवा स्वतंत्रबाण्याच्या, स्वाभिमानी कर्तृत्ववान महिलांना ही बाब खूपच खटकते. म्हणूनच त्या आपले नाव आणि आडनाव विवाहानंतर बदलीत नाहीत किंवा थोडी तडजोड करून माहेर-सासरचे आडनाव मिळून तयार झालेले जोड-आडनाव लावतात. पाश्चिमात्य देशातही काही महिलांनी विवाहानंतर जोड-आडनावे स्वीकारल्याचे संदर्भ आढळतात.

मराठी आडनावांचा शोध, संशोधन आणि विचार विवेचन : 

फार पूर्वीपासून अनेक विद्वानांनी कुटुंबांच्या आडनावांची आणि मराठी आडनावांचीही दखल घेतली आहे. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांनी, अ. स. १९२४ च्या सुमारास प्रसिध्द केलेल्या त्यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशात, मराठी आडनावांवर अेक प्रकरण लिहीले आहे. ते लिहीतात…..

…मराठ्यांची आडनावे बरीच जुनी असावीत. शिलाहारापासून शेलारे, प्रमारांपासून पवार, मौर्यांपासून मोरे, चालुक्यांपासून चाळके, पल्लवांपासून पालव, कदंबांपासून कदम अशी मांडणी करण्यात आली आहे. महारांची काही आडनावे पौराणिक कालापासून असणे शक्य आहे. ती नागकुलांच्या नावांवरून निघाली आहेत असे दाखविण्याचा प्रयत्न राजवाडे यांनी अितिहासग्रंथातील कोंकण व नागलोक या लेखात केला आहे. राजांची कुलनामे जशी जुनी तशी ब्राम्हणांचीही जुनी असावीत. राजवाडे यांनी ज्यास गोत्रे असे म्हटले आहे आणि ज्यांपासून आजची आडनावे व्युत्पादिली आहेत, असे शब्द अनेक आहेत.

श्री. वि. का. राजवाडे यांनी अनेक आडनावांच्या पौराणिक व श्रौतसूत्री गोत्रांवरून व्युत्पत्ती लाविल्या आहेत. पण आडनावे व पौराण शब्द यास संयोजक मध्यकालीन प्रामाण्ये सापडत नसल्याने त्या काल्पनिक वाटतात. फाण्टाः पासून फाटक, कौरव्यापासून कर्वे, आकशायेयाः पासून आगाशे, श्वानेयाः पासून साने, आश्मरथ्याः पासून मराठे, गौधिलीपासून गोंधळे, कनिष्ठि पासून कानेटकर, पिंडिकाक्षाः पासून पेंडसे, गाधरायणाः पासून गद्रे वगैरे. परंतू वर्तमानकाळाची आडनावे आणि गोत्रे यांचा मेळ बसत नाही. …

डॉ. केतकरांनी, मराठी आडनावांचे वर्गीकरणही केले आहे ते आजही लागू पडते.

भारतीय संस्कृती कोशात पं. महादेवशास्त्री जोशी लिहीतात….आडनाव म्हणजे कुलनाव. कोकणस्थ ब्राम्हणांची आडनावे धंदा किंवा हुद्द्यावरून पडलेली नाहीत. ती कशावरून पडली हा अेक संशोधनाचा विषय आहे असे ना. गो. चापेकरांचे मत आहे. …. प्रा. अ. का. प्रियोळकरांनीही प्रिय अप्रिय हा मराठी आडनावांवर लेख लिहीला आहे.

मराठी आडनावे संग्रहित करण्याचा आणि त्यावर लेख लिहिण्याचा छंद बर्‍याच व्यक्तींना आहे याची जाणीव, वृत्तपत्रातून आणि मासिकातून येणार्‍या लेखावरून होते. नागपूरचे रामगोपाल सोनी यांनी मराठी आडनावावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यांनी १० हजार मराठी आडनावांचा अभ्यास करून, त्यांची व्युत्पत्ती, महत्व, जात, गोत्र, प्रदेश, मूळ ठावठिकाणा आणि नंतरचे स्थलांतर वगैरे माहिती दिली आहे. त्यांचा प्रबंध मला मिळू शकला नाही परंतू त्यांच्या प्रबंधावर नियतकालिकात आलेल्या भाष्यांची कात्रणे माझ्या संग्रही आहेत. युरोप अमेरिकेतही आडनावांसंबंधी बरेच कुतूहल आहे आणि त्यासंबंधी भरपूर साहित्यही अुपलब्ध आहे. वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून, आडनावांसंबंधीचा मजकूर असलेली शेकडो कात्रणे माझ्या संग्रही आहेत. त्यात अनेक विद्वानांचे लेख तर आहेतच परंतू सामान्य वाचकांच्या, आडनावांसंबंधी बोलक्या प्रतिक्रियाही आहेत.

आडनावाची गरज : व्यक्तीची अचूक ओळख

समाजात अेखादे कुटुंब आणि त्या कुटुंबातील व्यक्ती ओळखल्या जाव्यात म्हणून आडनावांचा वापर केला जातो. म्हणूनच आडनावांना सामाजिकदृष्टया महत्त्व आहे. कोणत्याही समाजात अेकाच नावाच्या अनेक व्यक्ती आढळतात. नावासमोर वडिलांचे नाव लावले की सारखेपणा कमी होतो, आडनावामुळे तो आणखी कमी होतो. ही तीनही नामे सारखीच असणार्‍या व्यक्तीही असू शकतात. अशावेळी मुळ गाव, व्यवसाय वगैरे कसोट्या लावाव्या लागतात. आडनावांच्या अुत्क्रांतीत या बाबींचा हातभार लागला आहे. व्यक्तीचे नाव वडीलधार्‍या माणसांनी ठरविलेले असते आणि ते व्यक्तीच्या जन्मानंतर ठेवले जाते परंतू आडनाव पिढ्यान् पिढ्या चालत आलेले असते आणि ते समाजाने किंवा कुण्या अज्ञात अिसमाने ठरविलेले असते किंवा त्या कुटुंबावर लादलेले असते आणि ते त्या कुटुंबाने नाअीलाजाने स्वीकारलेले असते.

आडनाव रूढ झाले ते अेखाद्या व्यक्तिचा कुलनिर्देश करण्यासाठी. कुलनामाचा अनेक प्रकारांनी सामाजिक अुपयोग होअू शकतो हे आपल्या पूर्वजांनी नेमके ओळखले होते. माणसाचे गुणावगुण हे आनुवंशिक असतात हे आपल्या पूर्वजांना अनुभवाने कळून चुकले होते. मुलामुलींचे विवाह जुळवितांना आनुवंशिक गुणावगुणांचा विचार करणे योग्यच होते. विवाहानंतर त्या जोडप्याला होणारी संतती दिसायला कशी असेल? स्वभावाने कशी असेल? बुद्धीने कशी असेल? अपत्यांची शारीरिक ठेवण कशी असेल? हाच विचार, विवाह जुळवितांना मुलाच्या आणि मुलीच्या याच बाबींचा विचार नक्की केलाच जातो. विवाह जुळवितांना आनुवंशिक असाध्य रोग त्या अपत्यांना होअू न देण्याची काळजी घेतली जाते. या सर्व बाबी मुलामुलींच्या वंशावळीवर अवलंबून असतात हे अनेक पिढ्यांच्या अभ्यासावरून त्या काळच्या समाजातील विचारवंतांच्या लक्षात आले होते. म्हणूनच वंश किंवा कुळ ओळखण्यासाठी रूढ केलेला अुपाय म्हणजे ‘कुलनाम’ रूढ झाले हे अुघड आहे.

तुमचा वंश, तुमचे कुळ यालाच पूर्वी आणि आजही ‘जात’ असे संबोधिले जाते. कारण जातीसंस्था ही पुरातन कालापासून अस्तित्त्वात आली होती. चार वर्ण आणि जाती ह्या संकल्पना वास्तविक चांगल्या सामाजिक अुद्देशाने रूढ झाल्या. जन्मतःच तुम्ही आपल्या बरोबर जे जे गुणावगुण घेअून येता ते ‘जात’. आजच्या विज्ञानयुगात ‘जात’ ह्या शब्दाचा अर्थ ‘जन्मतःच’ असा आहे. पण त्या शब्दाला आता विकृत अर्थ प्राप्त झाला आहे त्या शब्दाचे राजकारण केले जात आहे. अेव्हढे मात्र खरे की जातीच्या संकल्पनेने आपल्या भारतीय संस्कृतीवर फार खोलवर परिणाम केले आहेत. त्याचे दुष्परिणाम काही नागरीकांनी पिढ्यान् पिढ्या भोगले आहेत. म्हणूनच जातिवाचक आडनावे धारण करणार्‍या कुटुंबांना अजूनही निंदा आणि हेटाळणी सहन करावी लागते आहे.

‘जात’ ह्या शब्दाची अुकल आता विज्ञानाने केली आहे. आआीकडून येणारी २३ गुणसुत्रे आणि पित्याकडून येणारी २३ गुणसुत्रे हीच तुमचा पिंड घडवितात. जन्मतःच ही ४६ गुणसुत्रे आणि त्यांना सामावून घेणार्‍या पेशी घेअूनच तुम्ही जन्माला येता. जन्मतःच जे जे काही तुम्ही घेअून येता ते तुमचे ‘जात’ असा हा आजच्या युगातला ‘जात’ या शब्दाचा अर्थ आहे. आअी वडिलांकडून आलेली गुणसूत्रे दोन्ही कुलांच्या अनेक पूर्वजांकडून आलेली असतात.

व्यवसायावरून आलेली आडनावे महाराष्ट्रात, भारतातील अितर प्रांतात, अितकेच नव्हे तर अितर देशांतही रूढ झालेली आहेत. पुढे हीच आडनावे जाती निर्देशक झाली. कारण, कुटुंबाचा व्यवसाय पिढ्यान् पिढ्या चालत असे. सोनार, सुतार, कुंभार, धनगर हे व्यवसाय त्या घराण्यातच असल्यामुळे ती अेक जातच समजली गेली. वास्तविक हे अतिशय चुकीचे आहे. सर्व व्यवसाय समान दर्जाचे असतांना देखील त्यानुसार रूढ झालेली आडनावे जातीवाचक झाल्यामुळे समाजात वेगवेगळे अुच्च आणि नीच स्तर निर्माण झाले. घराण्याचा व्यवसाय बदलू शकतो. आता तर आअी, वडील आणि मुले या सर्वांचे व्यवसाय भिन्न असू शकतात. व्यवसायानुसार आडनाव असण्याच्या प्रघाताला काहीच अर्थ अुरला नाही. जातीवरून आडनावे रूढ होण्याची प्रथा बरीच जुनी आहे. सुतार, लोहार, सोनार, कुंभार, तेली, माळी, शिंपी, गवळी वगैरे आडनावे बर्‍याच काळापासून रूढ झालेली आहेत. परंतू आता ही व्यवसायनिदेशक आणि जातीवाचक नावे बदलवून स्थळसंकेती आडनावे धारण करण्याची पद्धत रूढ होत आहे. ‘आडनावात बदल’ अशा नोटिसा वृत्तपत्रात बरेच वेळा वाचनात येतात. काही विशिष्ट परीस्थितीत नाव किंवा आडनाव बदलण्यासंबंधीच्या नोटीसा आपण वर्तमानपत्रात नेहमीच वाचतो. अशा बर्‍याच नोटिसांची कात्रणे जमवून अेप्रिल १९९२ च्या ‘स्त्री’ मासिकात मी स्वतंत्र लेखच लिहीला आहे. व्यवसायावरून आडनावे घडण्याची प्रथा चालू राहिल्यास संगणके, टीव्हीवाले, भंगारवाले, क्लासवाले, पेपरवाले, पापडकर, लोणचे, केटरर, वेषभूषे वगैरे आडनावे रूढ व्हावयास काही हरकत नसावी.

समाजात, आडनावामुळे तो विशिष्ट कुटुंबगट ओळखला जातो. आडनावामुळे त्या कुटुंबातील व्यक्तीच्या आनुवंशिक स्वभाववैशिष्ठ्यांची आणि गुणावगुणांचीही ओळख पटते. विवाह जुळवितांना या माहितीचा फार अुपयोग होतो.

आडनावाचा वारसा

कुटुंबाला आणि पर्यायाने व्यक्तीला आडनाव असतेच असते. ही प्रथा जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते. मराठी समाजही अपवाद नाही. आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी, कुटुंबांच्या आडनावांची प्रथा, मुळात रूढ झाली असावी. परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होअून विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाणी, भयानक आणि हास्यास्पद आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यानपिढ्या चालूही राहिली.

अुंदरे, कुत्रे, झुरळे, डुकरे, पिसाट, बहिरट, आळशी, शौचे, हगवणे, हगरे, अुकिडवे, अुताणे, अुपडे, रडके, रेडे, टणक, बेरड, प्राणजाळे, ढोरे, ढोरमारे, माणूसमारे, बापमारे, हडळ, भूत, ब्रम्हराक्षस, कुंभकर्ण, आगलावे, आडनटवे, आळशी, अुकिर्डे, अुपाशी, भुकेले, अेकशिंगे, बारलिंगे, कचरे, कंगाल, कानकाटे, कानतुटे, कानतोडे, कानपिळे, कानफाडे, पोटफाडे, पोटदुखे, डोआीफोडे, कावळे, किडे, किरकिरे, कोडगे, कोंबडे, खेकडे, गधडे, गधे, गालफाडे, गालफुगे, गांडोळे, गीध, गुपचुप, गेंडे, गोतमारे, घमंडे, घरबुडवे, घरमोडे, घरलुटे, भामटे, भिकारी, घाणे, घोटाळे, घोडमुखे, चकणे, चणेचोर, चिकटे, चुळभरे, चोर, चोरटे, चोरपगार, चोरमुले, चोरे, रगतचाटे, दशपुत्रे, वीसपुते वगैरे. माझ्या आडनावकोशातून अशी सर्व आडनावे घेतल्यास ती यादी ४-५ पानांची तरी होआील.

अशासारखी विचित्र, भयंकर आणि लाजिरवाणी आडनावे धारण करून समाजात वावरणार्‍या मुलां-मुलींना, लेकी-सुनांना टीका, निंदा, हेटाळणी आणि टिंगल यांना सतत तोंड द्यावे लागते, मनःस्ताप सहन करावा लागतो. विवाह जुळवितांना असल्या प्रकारच्या आडनावामुळे समस्या निर्माण होतात त्यामुळे अशी आडनावे बदलण्याची आवश्यकता आहे. आजच्या आपल्या पुरूषप्रधान समाजव्यवस्थेत, व्यक्तीनावासमोर वडिलांचेच नाव लावण्याची परंपरा आहे. आता काही बंडखोर व्यक्ती, आपल्या नावासमोर आआीचे नाव लावतात. विवाह जुळवितांना, शाळाकॉलेजात प्रवेश घेतांना, समाजकार्य करतांना, नवीन व्यक्तीची ओळख करून देतांना अशी आडनावे नाही म्हटली तरी अडचणीचीच होतात. समाजासाठी आडनाव धारण करून समाजात वावरावयाचे असल्याने विक्षिप्त, विचित्र, लांछनास्पद आणि हास्यास्पद आडनावे, हा सामाजिक कलंक आहे आणि तो पुसण्यासाठी, धुवून काढण्यासाठी पुरोगामी बदलत्या दृष्टीकोनातून अुपाय योजायला हवेत, प्रयत्न करायला हवेत. कायदेशीररित्या नावात/आडनावात बदल करून घेणे हा प्रमुख आणि प्रभावी अुपाय आहे. आडनावात बदल अशा नोटिसा वृत्तपत्रात नेहमी झळकतात. भूतकडेचे… वाडेकर, खर्जुलचे… पाटील, धोबीचे… माने असे बदल झालेल्या नोटिसा मी संग्रहीत केल्या आहेत.

भारतीय आडनावे :

भारतात, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत वेगवेगळ्या भाषिकांचे, संस्कृतींचे, चालीरिती आणि परंपरा जपणारे प्रदेश आहेत. पंजाब, अुत्तर प्रदेश, बंगाल, राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र, कोंकण-कारवार, कर्नाटक, आंध्र, तामीळनाड, केरळ वगैरे प्रदेशात, कुळ ओळखण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. म्हणजेच कुलनामे वापरण्याच्या, पुरातन काळापासून रूढ झालेल्या परंपरा आहेत.

दक्षिण भारतात, व्यक्तीचे नाव, वडिलांचे नांव, आणि कुलनामाबरोबरच गावाच्या नावाचाही निर्देश करतात.

मराठी साम्राज्याच्या अुत्तरेकडील विस्तारामुळे बडोदा, ग्वाल्हेर, अिंदूर, देवास वगैरे ठिकाणी हजारो मराठी कुटुंबे स्थायिक झाली आहेत. घरात त्यांचे मराठीपण टिकून आहे. पानिपतच्या दारूण पराभवाला १४ जानेवारी २०१० रोजी २५० वर्षे पूर्ण झाली. अेखाद्या घटनेला भयंकर अपयश आले तर त्या घटनेचे पानिपत झाले असा वाक् प्रचार रूढ झाला आहे. सदाशिवरावांबरोबर लढाआीत सहभागी झालेले पण जिवंत राहिलेले सुमारे ३०० योध्दे तेथेच स्थायिक झाले. या २५० वर्षात त्यांच्या वारसांची संख्या १० लाखावर पोचली आहे. आता ही सर्व कुटुंबे हरयानवी झाली आहेत. त्यांची आडनावेही बदलली आहेत. पवारांचे पनवार, महालेंचे महालान, जोगदंडांचे जागलान असे परिवर्तन झाले आहे. तंजावरकडेही बरीच मराठी कुटुंबे स्थायिक झाली आहेत.

आडनाव घडण्याची किंवा आडनावात बदल होण्याची प्रक्रिया :

सुप्रसिध्द नट, चरित्र अभिनेते आणि सिने दिग्दर्शक गजानन जागीरदार याचे मूळ आडनाव जहागिरदार असे होते. कॉलेजात शिकत असतांना समाजवादी विचारांनी त्यांना प्रभावित केले. त्यामुळे सरंजामशाहीचे द्योतक असलेले जहागिरदार हे आडनाव सोडून, त्यांनी आपल्या मूळ गावाच्या नावाला कर जोडून काथर्देकर हे आडनाव धारण केले. परंतू हे आडनाव अुच्चारण्यास आणि लिहीण्यास कठीण असल्यामुळे बरेच घोटाळे होअू लागले. काही व्यक्तींना तर ते अुच्चारणेच जमेना. शेवटी त्यांनी जागीरदार हे आडनाव स्वीकारले. कारण जहागीर हा शब्द मूळ फारशी जागीर या शब्दाचा अपभ्रंश आहे. जागीरीमुळे, जहागिरीची बाधाही टळली आणि काथर्देकरामुळे होणारी जिभेची सर्कसही टळली. पुढे जागीरदार हेच त्यांचे आडनाव कायमचे रूढ झाले.

भोसले हे मराठा समाजातले सुप्रसिध्द आडनाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे पूर्वज राजस्थानातील शिसोदिया रजपूत कुळाचे होते. त्यापैकी काही कुटुंबे, महाराष्ट्रात, सातारा जिल्ह्यातील भोसा या गावी स्थायिक झाली आणि त्यांनी भोसले हे आडनाव स्वीकारले. दुसरीही व्युत्पत्ती आढळते. शिवाजी महाराजांच्या शिसोदे वंशात, चौदाव्या शतकात भैरवजी अुर्फ भोसाजी हा थोर व शूर पुरूष झाला. (अ. स. १३३० ते १४०७) त्यांच्यावरूनच भोसले हे आडनाव पडले आणि ते प्रतिष्ठितही झाले.

महाराष्ट्रातील मराठ्यांच्या ९६ कुळापैकी ३३ कुळे रजपूतांची आहेत. परमारांचे पवार, राणाचे राणे, आणि चौहानांचे चव्हाण झाले आहेत. शिवाजी महाराजांच्या दरबारात, त्यांनी अेखाद्या व्यक्तीच्या गुणावगुणाबद्दल किवा स्वभावाबद्दल अुल्लेख केला की ती व्यक्ती त्याच नावाने ओळखली जाआी आणि तेच त्या व्यक्तीचे आडनाव रूढ होआी. अेकदा दलितवर्णाची काही पराक्रमी मंडळी शिवाजी महाराजांना भेटावयास आली आणि म्हणाली…राजे…आम्हाला आडनावे नसल्यामुळे, समाजात आम्हाला सन्मानाने वावरता येत नाही. तेव्हा महाराज म्हणाले…अेव्हढीच तुमची तक्रार असेल तर आजपासून तुम्ही आमचीच, म्हणजे मराठ्यांची आडनावे लावा. तेव्हापासून काही दलीत कुटुंबांनी भोसले, पवार, निंबाळकर अशी आडनावे स्वीकारली. आता तर काहींनी ब्राम्हणांची आडनावेही स्वीकारली आहेत. आठवले, सावरकर, साठे, तांबे, गरूड, कांबळे अशी आडनावेही स्वीकारली गेली. ही प्रथा अजूनही चालूच आहे.

भुरचंडी या आडनावाचा प्रवास फारच मनोरंजक आहे. हे आडनाव मूळचे भृशूंडी असे होते. त्या कुटुंबातील कर्त्या पुरूषाला, दोन भुवयामध्ये अेक मोठा, सोंडेसारखा दिसणारा मस होता. भृ म्हणजे भुवअी आणि शूंडी म्हणजे सोंड. अशारितीने त्या कुटुंबाचे आडनाव भृशूंडी पडले. अुच्चारावयास किंवा लिहावयास कठीण आणि कानाला कठोर वाटणार्‍या शब्दांचा अपभ्रंश, सोप्या आणि कानाला गोड वाटणार्‍या शब्दांकडे होतो. म्हणून भृशूंडी या आडनावाचा प्रवास…भुरशूंडी..भुरशंडी..भुरचंडी..असा झाला असावा.

१९७० च्या दशकात, जयप्रकाश नारायण यांनी जातीवाचक आडनावे बदलण्याची किंवा सोडण्याची मोहीम सुरू केली होती. त्यावेळी सबंध भारतात सुमारे ५० हजार व्यक्तींनी आपल्या आडनावात बदल केला.

आडनावातही अुत्क्रांती झालेली किंवा होत असलेली दिसते. मराठी कुटुंबे केवळ महाराष्ट्रातच आहेत असे नाही. भारतभरच्या प्रांतात मराठी कुटुंबे, अनेक दशकांपूर्वी किंवा शतकांपूर्वी गेलेली आहेत. मूळचे मराठी आडनाव, प्रादेशिक प्रभावामुळे बदलते.

ग्वाल्हेरला स्थायिक झालेल्या राजाभैय्या पूँछवाले यांच्या आडनावाची कथा… १८८१ ते १९५६ हा राजाभैय्यांचा जीवनकाल. मूळचे ते सांगली जिल्ह्यातील वष्ट या गावचे. गाण्याच्या निमित्ताने अेकोणिसाव्या शतकात जी मंडळी अुत्तरेकडे झुकली, त्यातलेच राजाभैय्या हे अेक. ग्वाल्हेरला स्थायिक झाल्यावर त्यांचे आडनाव पूँछवाले कसे पडले याचा संदर्भ मात्र मिळत नाही.

ग्वाल्हेरलाच स्थायिक झालेल्या, ग्वाल्हेर घराण्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीत तज्ज्ञ श्री. कृष्णराव पंडित यांच्या आडनावाची कथा…. कृष्णराव पंडितांचे आजोबा, श्री. विष्णूपंत हे महाराष्ट्रातील चिंचवड येथे रहात होते त्यावेळी त्यांचे आडनाव चिंचवडकर असे होते. ग्वाल्हेरचे त्यावेळचे महाराज श्रीमंत जियाजीराव शिंदे यांनी विष्णूपंतांना ग्वाल्हेर दरबारात निमंत्रित केले. त्यांनीच विष्णूपंतांना पंडित ही पदवी दिली. नंतर तेच आडनाव या कुटुंबास चिकटले.

विदर्भ-मराठवाडा या भागात अनेक तेलगू भाषिक कुटुंबे आंध्रप्रदेशातून, अनेक पिढ्यापूर्वी महाराष्ट्रात आली आणि स्थायिक झाली. महाराष्ट्रीय संस्कृतीशी समरस झाली. आता त्यांची मातृभाषा मराठीच झाली आहे. वार हा कर किंवा वाले या प्रत्ययार्थाने जोडलेली आडनावे नागपूर विदर्भाकडे भरपूर आहेत. हेडगेवार, कन्नमवार हे त्यातलेच. लोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले. महाराष्ट्रातून आंध्रप्रदेशात स्थायिक झालेली मराठी मंडळी तेलगूभाषिक झालीत. तेथे सामावलेल्या केतकर आडनावाच्या काही कुटुंबांनी केतवार हे आडनाव धारण केले आहे.

महात्मा ज्योतीराव फुले म्हणजे ज्योतीराव गोविंदराव गोर्‍हे. गावात कुलकर्ण्याच्या वादामुळे गोर्‍हे कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कटगूण गाव सोडून पुण्यात धनकवडीला स्थायिक झाली. ते पुण्यात फुलांचा व्यवसाय करू लागले. त्यावरून त्यांचे आडनाव फुले असे रूढ झाले असावे.

कदम हे महाराष्ट्रातील प्रख्यात अैतिहासिक घराणे आहे. अ. स. ३४५ च्या सुमारास दक्षिण कोंकण आणि कर्नाटकाचा काही भाग यावर कदंब वंशाचे राज्य होते. याच कदंब वंशाने गोमंतक आणि असपासच्या प्रदेशावर सुमारे ८०० वर्षे राज्य केले. आता या घराण्याचे वंशज कदम या आडनावाने ओळखले जातात.

पहिल्या बाजीरावाचे आडनाव बर्वे असे होते. पेशवाअीची वस्त्रे मिळाल्यानंतर त्यांचे पेशवे हे आडनाव रूढ झाले. आजही पेशवे आडनावांची कुटुंबे आढळतात. संतमहंतांची आडनावे झाकलीच जातात. ज्ञानेश्वर महाराजांचे आडनाव कुळकर्णी, तुकोबारायाचे आडनाव मोरे, रामदासस्वामींचे आडनाव ठोंबरे असे होते.

नागपुरात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अेका शामने आपले आडनाव सोडून १९व्या वर्षी मानव हे आडनाव धारण केले. जाती, धर्म, वंश किंवा आनुवंशिकता न दाखविणारे हे आडनाव आहे. त्यांच्या पत्नीने आपले माहेरचे आडनाव बदलले नाही तर त्यांचा मुलगा आपल्या नावासमोर आअीचे आणि वडिलांचे फक्त नावच लावतो, आडनाव लावीत नाही.

आडनाव कोणत्या कारणामुळे बदलले जाअील याला काही नियम लावता येणार नाहीत. अॅडमिरल विष्णू भागवत यांचे मूळ नाव विष्णूकुमार शर्मा असे होते. कानपूरच्या यज्ञदत्त शर्मा यांचे ते सुपुत्र. सर्व गुण समान असले तर वरचा नंबर किंवा पदोन्नती, आडनावातील अंग्रजी वर्णाक्षराच्या आधारे देतात. शर्मामधला अेस् बराच खाली आहे. सहाध्यायी तर दास वगैरे आडनावाचे आहेत. म्हणून शर्मा जाअून तेथे बी पासून सुरू होणारा भागवत आला. वामनाचार्य आडनाव बदलून ते आचार्य असे घ्यावे असा आग्रह माझ्या मुली करीत असत कारण डब्ल्यूमुळे त्यांना नेहमी शेवटी बसावे लागे. पण आम्ही आडनाव बदलले नाही. आनुवंशिकता जपणारी आडनावे वगळली जाण्याची ही अुदाहरणे आहेत. ज्या कारणासाठी आपल्या पूर्वजांनी आडनावांची प्रथा रूढ केली ते कारणच नाहीसे होते आहे असे वाटते.

मराठी आडनाव कोशाची सुरूवात

मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याची, मला आवड निर्माण झाली. या छंदाला, माझ्या आडनावावरूनच, १९६३ च्या मे महिन्यापासून सुरूवात झाली. वामनाचार्य हे नांव मराठी वाटत नाही. तुम्ही मद्रासी वाटता, तुम्ही बंगाली वाटता, तुम्ही कानडी वाटता अशी मते प्रदर्शित व्हायला लागली. अितरही विविध मराठी आडनावे आढळली ती मी लिहून ठेअू लागलो आणि तेव्हापासून आडनावांचा संग्रह जो वाढतो आहे तो अजूनही वाढतोच आहे. आतापर्यंत ६० हजारांपेक्षा जास्तच आडनावे माझ्या संग्रही आहेत. मराठी आडनावकोश प्रसिध्द करण्याची तीव्र अच्छा आहे. या कोशामुळे मराठी आडनावांचे अनेक पैलू माझ्या लक्षात आले, त्यानुसार नियतकालिकांत मी अनेक लेख लिहीले आहेत. मराठी आडनावांवर कुणी संशोधन करीत असेल तर त्या व्यक्तीला हा कोश आणि माझ्या संग्रही असलेली कात्रणे फारच अुपयोगी पडतील असे वाटते.

अमेरिकेत अेक संकेतस्थळ आहे. त्यावर १५० वर्षांच्या ५५ कोटी नोंदी आहेत. त्यावरून अमेरिकन आणि युरोपियन जनतेला आपली वंशावळ जाणून घेणे सोपे जाते. भारतातही असे अेखादे संकेतस्थळ निर्माण करून त्यावर भारतीयांच्या आडनावांची आणि वंशावळींची माहिती मिळू शकेल. जनगणनेतील आडनावविषयक माहिती संगणकात साठविल्यास प्रचंड माहिती (डेटा) मिळू शकेल.

ही मराठीच आडनावे

अेखादे आडनाव मराठी आहे याची खात्री करून घेण्यासाठी निरनिराळया कसोट्या लावाव्या लागतात. व्यक्तीचे व तिच्या वडिलांचे नाव अुपलब्ध झाल्यास फार अुपयोग होतो. अुदा. ‘रजपूत’ हे आडनाव मराठी नाही अशी प्रथमदर्शनी समजूत होते, पण ‘देवराव बळीराम रजपूत’ आणि ‘नामदेव कृष्णराव रजपूत’ अशी नावे आढळल्यावरून ‘रजपूत’ हे आडनाव मराठी म्हणून ग्राह्य धरले. तसेच गजानन लक्ष्मण गुजराथी, चिंतामण रामचंद्र क्षत्रिय, माधव रामचंद्र अिंजिनियर वगैरे. कित्येक पिढ्यांपूर्वी परप्रांतातून महाराष्ट्रात आलेली मंडळी येथेच स्थायिक झाल्याचा हा पुरावा आहे. आदनवाले, वाडिया, मुश्रीफ, तबीब, मुनशी, व्यास, डुबे ही चक्क मराठी मंडळी आहेत.

आडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा

आपले आडनाव कसेही असले तरी आपण ते जन्मभर मोठ्या अभिमानाने आपल्या नावासमोर लावतो. आपला समाज पुरूषसत्ताक आहे म्हणून मुलाच्या किवा मुलीच्या नावासमोर वडिलांचे किवा पतीचे नांव आणि वडिलांचे किवा पतीचेच आडनाव लावण्याची प्रथा आहे. हा वास्तविक स्त्रीजातीवर अन्याय आहे. विवाहानंतर अेखादी स्त्री ही कुणाची तरी मुलगी किंवा बहीण किंवा कुणाची आअी असे तिचे अस्तित्व न राहता ती अेका पुरूषाची पत्नी अेवढेच तिचे अस्तित्व शिल्लक अुरते. काही कर्तबगार स्त्रियांना हे पटत नाही, मानवत नाही म्हणून त्या लग्नानंतर माहेरचे आणि सासरचे अशी दोन्ही आडनावे लावतात. पण अशारितीने त्यांचा प्रश्न सुटला तरी त्यांच्या मुलांना मात्र वडिलांचीच आडनावे मिळतात.

समाजात जागृती होते आहे. काही व्यक्ती तर असे सुचवितात की आडनावाचा त्याग करून स्वतःचे नांव, आअीचे नांव आणि नंतर वडिलांचे नांव लिहूनच ती व्यक्ती ओळखली जावी. मुलगा झाला की आपला वंश चालू राहिला असे आपण मानतो. अेखाद्या जोडप्याला दोन किवा तीन मुलीच असल्या तरी ते जोडपे दुःखी असते. कारण काय? तर त्यांना वंशाचा दिवा म्हणजे मुलगा नाही. मुलगा नसला तर वंश खुंटला असे मानतात पण, मुलीला मात्र वंशाची पणती मानायला कुणी तयार नसतात. हे कितपत रास्त आहे?

पुरूषसत्ताक समाजाची लक्षणे

आपला समाज पुरूषसत्ताक आहे. गेल्या कित्येक शतकापासून प्रत्येक घराण्याच्या अनेक पिढ्यात पुरूषांचीच मक्तेदारी चालू आहे. अपत्याच्या नावासमोर वडिलांचेच नांव लावले पाहिजे आणि वडिलांचेच आडनाव लावले पाहिजे असा दंडक आहे. पित्याचेच गोत्र मुलाला प्राप्त होते. मुलीला विवाहापर्यंत वडिलांचे गोत्र लावतात तर विवाहानंतर पतीचे गोत्र लावतात याचा अनुभव श्राद्धकर्म करतांना सर्वांना येतो. याला शास्त्रीय आधार नाही किंवा असलाच तर तो कुठेही लिहून ठेवलेला नाही असे मला वाटते. विवाहानंतर मुलगी, सासरी म्हणजे नवर्‍याच्या घरी नांदायला जाते. ही प्रथा आपल्याच देशात नव्हे तर सार्‍या जगातील देशात आणि धर्मात आहे. तिला नवर्‍याचेच आडनाव आपल्या नावासमोर लावावे लागते. विवाहानंतर जर वधूचे नावही बदलले तर त्या मुलीची माहेरची संपूर्ण ओळख म्हणजे आयडेंटिटी पूर्णतया पुसली जाते. महिलांवरील अन्यायांची आणि अत्याचारांची सुरूवात येथूनच होते. नवरा जर बायकोच्या घरी नांदायला गेला आणि त्याने बायकोचे आडनाव आपल्या नावासमोर लावले तर कदाचित फरक पडेल असे वाटते. हुंडाबळींची आणि छळीत सुनांची संख्या बरीच घटेल.

अपत्यपिढी आणि आनुवंशिकता

कोणत्याही व्यक्तीत येणारे शारीरिक आणि मानसिक गुणावगुण हे मातापित्यांच्या अनेक पिढ्यांकडून येतात हे आपल्या पूर्वजांच्या बरोबर लक्षात आले होते. हा निष्कर्ष त्यांनी अनुभव आणि निरीक्षणावरून काढला. विज्ञानीयदृष्ट्या आता अगदी निर्विवादपणे सिद्ध झाले आहे की, आनुवंशिक गुणधर्म हे अपत्यपिढ्यांमध्ये, गुणसूत्रांमुळे म्हणजे क्रोमोसोम्समुळे येतात. सर्वच सजीव प्रजातींच्या बाबतीत हे खरे आहे. ते अपत्य मुलगा असो की मुलगी असो, अर्धी गुणसूत्रे, म्हणजे २३ गुणसूत्रे (गुणसूत्रांना रंगसूत्रे असेही म्हणतात पण ते चुकीचे आहे) वडिलांकडून व अर्धी गुणसूत्रे, म्हणजे २३ गुणसूत्रे आअीकडून आलेली असतात. म्हणजेच अपत्यावर पितृवंशाचा जेव्हढा अधिकार असतो तेव्हढाच मातृवंशाचाही असतो हे ओघाने आलेच. पुरूषाच्या म्हणजे मानवी नराच्या शुक्राणूत २२ सामान्य गुणसूत्रे आणि १ लिंगदर्शक गुणसूत्र असते. काही शुक्राणूत लिंगगुणसूत्र य (वाय) प्रकारचे तर काही शुक्राणूत ते क्ष (अेक्स) प्रकारचे असते. स्त्रीच्या म्हणजेच मानवी मादीच्या बीजांडातही २२ सामान्य गुणसूत्रे आणि १ लिंगगुणसूत्र असते. मात्र हे गुणसूत्र क्ष प्रकारचेच असते.

पित्याच्या म्हणजे मानवी नराच्या अेका स्खलनात कोट्यवधी शुक्राणू असतात, त्यापैकी सुमारे निम्मे य प्रकारचे तर अुरलेले निम्मे क्ष प्रकारचे असतात. त्यामुळे बीजांडात शिरणारा शुक्राणू नेमका कोणत्या प्रकारचा असेल हे कुणीही ठरवू शकत नाही. अेक शुक्राणू जेव्हा बीजांडात प्रवेश करतो त्यावेळी, तेव्हा त्यातील ४४ सामान्य गुणसूत्रांच्या २२ जोड्या तयार होतात आणि शुक्राणूतील लिंगगुणसूत्र आणि बीजांडातील लिंगगुणसूत्र यांचा संयोग होअून गर्भाची, ४६ गुणसूत्रे असलेली, अेक पेशी निर्माण होते. हाच मानवी गर्भपिंड. गर्भपेशी निर्माण झाली म्हणजे तिच्यात २२ सामान्य गुणसूत्रे पित्याकडून आणि २२ सामान्य गुणसूत्रे मातेकडून अशी ४४ गुणसूत्रे २२ जोड्यांच्या स्वरूपात माातापित्याकडून आलेली असतात.

शुक्राणूतील १ लिंगगुणसूत्र आणि बीजांडातील १ लिंगगुणसूत्र मिळून २३ वी जोडी निर्माण होते. या २३ व्या जोडीत, पित्याकडचे य प्रकारचे आणि मातेकडचे क्ष प्रकारचे गुणसूत्र असेल तर निर्माण झालेला गर्भ मुलाचा असतो. पित्याकडचे क्ष प्रकारचे गुणसूत्र आणि मातेकडचेही क्ष प्रकारचे गुणसूत्र असेल तर निर्माण झालेला गर्भ मुलीचा असतो. यावरून लक्षात येअील की, पित्याच्या शुक्राणूतील लिंगगुणसूत्रच, निर्माण झालेल्या गर्भाचे लिंग निश्चित करते. य प्रकारचे गुणसूत्र ही नरांचीच मक्तेदारी आहे, माद्यांच्या बीजांडात य प्रकारचे गुणसूत्र कधीच नसते. अेखाद्या जोडप्याला मुलीच झाल्या, मुलगा झालाच नाही तर त्याला जाबाबदार नवराच असतो.

आनुवंशिकेची जाणीव : कुटुंबांची गोत्रे

गोत्र हे देखील कुटुंब आणि व्यक्ती ओळखण्याचे साधन आहे. आणि त्याबद्दल विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे. निरीक्षणे आणि अनुभवावरून मानवाने ज्ञान मिळविले आहे. कदाचित निरीक्षणे आणि अनुभवावरून त्याच्या लक्षात आले असावे की, पितृवंशाकडून जास्त प्रभावी गुणसुत्रे, अपत्यात प्रवाहित होत असावीत. म्हणूनच नर अपत्यांना, पित्याचे आडनाव आणि गोत्र दिले जाते. हाच नियम मादी अपत्यांच्या बाबतीत का पाळला जात नाही? मुलीचा विवाह झाला की तिला नवर्‍याचे आडनाव आणि गोत्र दिले जाते म्हणजे तिचे आडनाव आणि गोत्रही बदलते. वास्तविक आडनाव, मानवनिर्मित आहे तर गोत्र आनुवंशिक आहे. आनुवंशिक गुणधर्म कुणालाही बदलता येत नाहीत. गोत्र हे आनुवंशिकतेचे प्रतीक असल्यामुळे, नवीन गोत्र धारण करणे, विज्ञानीय दृष्ट्या, अगदी चुकीचे आहे.

आपल्या पूर्वजांनी, अनेक मातापित्याचे स्वभाव, सवयी, रंगरूप, डोळ्यांचा-केसांचा रंग, चेहर्‍याची ठेवण, आवाज, बुद्धी, संगीताचे ज्ञान, कला, मधुमेहासारखे रोग वगैरे आणि त्यांच्या अपत्यांच्या ह्याच गुणावगुणांचा अभ्यास करून नोंदी ठेवल्या असाव्यात. ह्या निरीक्षणांवरून कदाचित त्यांना असे आढळले असावे की पित्याकडून आलेली आनुवंशिकता जास्त प्रमाणात असते म्हणून पित्याचे आडनाव लावण्याची प्रथा पडली असावी. गोत्रांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला असावा. बर्‍याच प्रमाणात सारखे आनुवंशिक गुणावगुण असलेल्या कुटुंबांचे त्यांनी काही गट निर्माण केले आणि त्यांना ऋषिची नावे देअून गोत्रांची संकल्पना रूढ केली असावी. आता जनुक नकाशामुळे ह्या संकल्पनांवर प्रकाश पडण्यासारखा आहे.

स्वतः पुरूष व्यक्ती, त्याचे आअी-वडील, आजी-आजोबा आणि त्यांच्या पूर्वपिढ्या, तसेच त्या पुरूष व्यक्तीची पुरूष अपत्ये, नातू-पणतू वगैरे पुढील पिढ्या, या सर्वांचा अेक कुटुंब गट, आनुवंशिक दृष्ट्या ओळखण्यासाठी गोत्र या संकल्पनेचा अुदय आणि विकास झाला. या गटातील सर्व संबंधित स्त्रियांनाही सरसकट तेच गोत्र देण्यात आले. वास्तविक या स्त्रिया वेगवेगळ्या गोत्राच्या कुटुंबात जन्मल्या होत्या. खरे पाहिले असता गोत्रालाही शास्त्रीय आधार नाही. समान आनुवंशिक गुणधर्म असलेल्या व्यक्तींच्या गटाला ‘गोत्र‘ असे नाव दिले गेले असावे आणि ते गट ओळखण्यासाठी त्यांना ऋषिची नावे दिली गेली असावीत.

जनुके, गुणसूत्रे आणि डीअेनअे यांच्या संचानुसार केलेल्या गटांना मात्र शास्त्रीय आधार असेल. ते गट म्हणजे शास्त्रीय गोत्रे असतील. अेकाच गोत्राची, भिन्न स्थानी वास्तव्य करणारी कुटुंबे अलग अलग ओळखण्यासाठी आडनावांची संकल्पना रुजली असावी. ‘जात‘ म्हणजेच आनुवंशिकता असे समीकरण असल्यामुळे, आडनाव म्हणजेही जात असे समीकरण झाले. अनेक जातीमध्ये देखील, समान आनुवंशिक गुणधर्म आढळले असावेत. म्हणूनच तीच ती गोत्रे अनेक जातींमध्येही आढळतात. आता आपल्या लक्षात येअील की, आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी आडनावांची प्रथा मुळात रूढ झाली, परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होअून विचित्र आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यानपिढ्या चालू राहिली. कुलनाम वापरावयाची प्रथा जरी जुनी असली तरी तिचा वापर फारसा होत नसे. अिंग्रजांच्या राजवटीपासून मात्र आडनाव वापरावयाची प्रथा रूढ झाली आणि आता आडनांव बदलण्याची किंवा आडनाव नकोच अशी चळवळ सुरू झाली आहे.

सध्या प्रचलित असलेल्या मराठी आडनावांची निर्दोष स्वरूपात जंत्री म्हणजे मराठी मातृभाषिकांच्या आडनावांचा कोश करण्याचे काम फार मोठे आहे. प्रत्येक आडनावाचा खरा अितिहास किंवा अुपपत्ती जाणून घेणे तर त्याहूनही कठीण आहे. मराठी आडनावांची संख्या लाखाच्या आसपास असावी असा माझा अंदाज आहे.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

5 Comments on मराठी आडनावांचे मानसशास्त्र

  1. मी सातारा जिल्हा वाई तालुक्यातील बावधन गावात राहतो माझे आडनाव तांबे आहे .पण मला माझे कुलदेव कुलदेवी माहीत नाही गोत्र माहीत नाही … लग्नात उंबर,आंबा देवक आहे अस वडील सांगतात… मी खूप ठिकाणी चौकशी केली पण काही माहिती मिळाली नाही…आपण काही माहिती दिली तर खूप बरं होईल 9284626255

  2. सर माझे आडनाव हापन हापण आहे . मला माझ्या
    आडनावाबद्दल कुतुहल आहे . आपल्याकडे माहिती असल्यास कळवावे ही विनंती .
    मो ‌‌‌नं .9960192812

  3. खुप छान माहिती आहे. आमचे आडनाव झिने आहे .१७व्या शतकात गालव्हेर हुन महाराष्ट्रात आलो असे सांगण्यात येते पुर्वीचे आडनाव गायकवाड होते असे म्हटले जाते नक्की काय माहीती नाही

  4. सर नमस्कार, “मांजरे पाटील ” या अडनावाचा इतिहास आम्ही भाऊबंद बरेच वर्ष शोधत आहोत. तरि मार्गदर्शन व्हावे हि विनंती. ( आपणास भेटावयाकरिता आम्हांस कळविता येईल का ? कृपया संपर्क ९९२२४४२२०३ )

    • सर नांदगुडे आडनावाचा इतिहास आम्ही भाऊबंद बरेच वषँ शाेधत आहाेत. तरी कृपया आम्हांस मदत करावी हि नम्र विनंती (संपर्क -८०८०६९१००७/९७६३७१२१९९

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..