नवीन लेखन...

पंढरिये माझे माहेर साजणी

पंढरीच्या वारीत एकाचवेळी संतपरंपरा आणि लोकपरंपरा गुण्या-गोविंदाने नांदताना दिसतात. संतांना लोकोद्धाराची तळमळ असल्यामुळे त्यांनी लोकजीवनाच्या सर्व स्तरांचे बारकाईने निरीक्षण केले होते.

लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांचा हा लेख.. 


मराठी लोकसंस्कृतीवर वारकरी संप्रदायातील संतांच्या उपदेशाचा फार मोठा प्रभाव जाणवतो. लोकसंस्कृतीच्या मुशीतूनच, भावगर्भतेतूनच संतांनी लौकिकाला परतत्त्वाचा स्पर्श दिला. वारकरी संप्रदायाने समाजाला सामूहिक शहाणपण दिले. विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. मराठी माणसाची नैतिक घडण ही संत साहित्याच्या प्रभावातून झालेली आहे. एकाचवेळी संत साहित्याची परंपरा आणि लोकसाहित्याची परंपरा मराठी लोकधर्मात गुण्या-गोविंदाने नांदत असलेली आपणास पाहावयास मिळत आहे. भागवतधर्मीय श्रद्धांबरोबरच लोकधर्मीय श्रद्धाही समाजात तेवढ्याच प्रभावीपणे नांदत राहिलेल्या आहेत.

पंढरीच्या वाटेवर जेजुरी मुक्कामो वारकऱ्यांचा टाळ-मृदंगाचा गजर एका बाजूला सुरू असतो, तर दुसऱ्या बाजुला वाघ्या-मुरळ्यांचा दिमडी, घाटी, तुणतुण्याचा निनाद सुरू असतो. कानडा मल्हारी, तसाच कानडा विठ्ठल. संत ज्ञानेश्वरांची पालखी जेजुरी मुक्कामी येते तेव्हा, संतांच्या अभंगांबरोबरच तंतांची म्हणजे शाहिरांची कवनेही आठवतात. गुरू दगडूबाबा साळी यांचे कानडा मल्हारी आणि कानडा विठ्ठल म्हणजे लोकदैवत संप्रदाय आणि भक्ति संप्रदाय यांचे वर्णन करणारे हे कवन निश्चित आठवते-

‘भू-वैकुंठ पंढरी।
तशीच जेजुरी असे सांगती
तेथे राही रखमाबाई।
येथे बाणाई म्हाळसा सती।
तेथे बुक्याचे भूषण।
येथे उधळण भंडार किती

संत साहित्याच्या संदर्भात अभिजनांची संस्कृती आणि लोकसंस्कृती यांचे अनुबंध शोधताना संत साहित्य आणि लोकसाहित्याचे गाढे संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी नोंदवलेले निरीक्षण असे-‘संतांनी लोकांपासून दुरावलेल्या अभिजनांच्या संस्कृतीचे सर्व वैभव शुद्धीकृत रूपात वारसदारांच्या हक्काने प्राप्त केले आणि त्या वैभवाचा लाभ लोकसंस्कृतीला करून दिला. याउलट लोकसंस्कृतीतील सर्व सत्त्वगर्भ आशयाचा, तिच्या सहजसौंदयांचा त्यांनी नितांत जिव्हाळ्याने शोधपूर्वक स्वीकार केला आणि अभिजनांच्या संस्कृतीला लोकसंस्कृतीचे केवढे लक्षणीय योगदान असू शकते, याचा अनुभव आपल्या साहित्यातून दिला.’

संतांना लोकोद्धाची अत्यंत तळमळ असल्यामुळे त्यांनी लोकजीवनाच्या सर्व स्तरांचे बारकाईने निरीक्षण केले होते. संतांची दृष्टी प्राधान्याने पारमार्थिक असली, हो तरी लोकांची आधिभौतिक दुःखेही त्यांनी सहानुभूतीने ग न्याहाळण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. खंडोबाची उपासना संत नामदेवांच्या ‘नंदचंपाषष्टीनेम’ या विट्ट अभंग रचनेत आहे. संत एकनाथ यांच्या भारूड रचनेत ‘मी निःसंग मुरळी झाले या मालुचे घर रिघाले’ असे एक भारूड आहे. ‘अनंतयुगाचा देव्हारा निज बंधाचा घुमारा’, ‘अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगारा वारी’, ‘खंडेराया तुज करिते नवसु’ अशा भारूडांमधून संतसाहित्य आणि लोकसाहित्य यांची प्रचिती येते. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी सादर होणाऱ्या भारुडांमध्ये असे पारमार्थिकृत लोकसाहित्य सादरीकरणातून प्रगट होते, पिंगा, बहिरा, मुका, जोशी, जोहार, भालदार, चोपदार, वासुदेव, बाळसंतोष, गोंधळी, भुत्या, वाघ्या, सौरी, मुंडा अशी अनेक भारुडे वारकरी सादर करतात.

संतांच्या या भारुडांसोबत मायमाऊल्यांच्या ओव्यांच्या रूपाने जानपद संस्कृतीचे दर्शन वारीत होते. ‘पंढरिये माझे माहेर साजणी । ओविया कांडणी गऊ गिती । असे पंढरीच्या पायवाटेवर गात जाणाऱ्या महिला वारकरी पंढरपूरला आपले माहेर समजतात. मग विठ्ठल त्यांचा पिता आणि रुक्मिणी त्यांची माता असते, माहेराची ओढ स्त्रीला किती असते हे सांगायलाच नको, सासरी गेल्यावर माहेरची आठवण काढताना पहाटे जात्यावर दळण दळताना ओवी स्त्रीच्या मुखातून आपोआप बाहेर पडते. याला ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ असे म्हणता येईल. बहिणाबाईंच्या भाषेत हे हिरीताचं देणं-घेणं असतं, तर संत ज्ञानोबांच्या भाषेत यास ‘तुझिये जीविचे माझिये जीवि पडो’ असे म्हणता येईल, विठ्ठल-रूक्मिणी-जनाबाई यांच्या नातेसंबंधासह आपल्या व्यक्तिगत जीवनातील नातेसंबंधांची घट्ट वीण तिच्या तोंडून सहज बाहेर पडते. भक्तीच्या आचरणातून आलेला अनुभव ती ओवी रुपाने मांडते. स्त्री ही भौतिक जीवनात सर्जनाची शक्ती असते. प्रतिभेच्या विश्वातही तिचे सर्जनत्व ठायी ठायी दिसते. स्त्रीचे हे प्रतिभासर्जन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अगदी सहजतेने एखाद्या खळाळत्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे प्रवाहीत झालेले दिसते. वारीला जाणारी स्त्री आपल्या मनात विठुमाऊलीला ठेवून या माऊलीच्या ओव्यांमध्ये आपले सर्वस्व विसरलेली दिसते, दिंड्या-पालख्यांमधील मायमाऊल्यांना ओव्या कशा सुचतात, असे विचारता त्या सांगतात ‘पोटातले ओठात येते,’ सावता माळ्याच्या पोटात विठ्ठल दडल्याची आख्यायिका सहज आठवली.

‘साठविला हरी जीवि हृदयमंदिरी, त्याची सरली येरझार झाला सुफळ व्यापार।’ संसाराचा व्यापार सुफळ व्हायचा असेल, तर त्याला नामसंकीर्तनाची जोड हवी, हे या वारीतल्या स्त्रियांनी ध्यानी घेतलेले असते. ‘धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर या अभंगात पुढे जनाबाई म्हणतात ‘हृदयी बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला।’ वारीतल्या स्त्रियांनी विठ्ठलाला असा हृदयाच्या बंदीखान्यात डांबून ठेवला. जसे त्याला यशोदेने उखळाला बांधले. ‘मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊनिया छंद माझे माझे।’ अशा या मुक्त विठ्ठलाला वारीतील स्त्रियांनी ओव्यांमधून बद्ध केले. वारीत मुक्कामाच्या ठिकाणी सर्वांचे जेवण करताना या स्त्रिया ओव्या म्हणत काम करतात. ‘कामामध्ये काम काही म्हणा राम राम । जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे’ हे संतांचे अभंगरुपी संस्कार तिच्यावर असतात.

मायमाऊल्यांच्या ओठी ओव्या येताना पवित्र मानलेली तुळस, चंद्रभागा नदी, मुक्कामाचे ठिकाण, रस्त्यावरील झाडे, नद्या, बंधू, आई-वडील, नणंद भावजय, सासू-सासरे हे सर्व विषय जणू त्यांच्याभोवती पिंगा घालतात. संत नामदेव महाराज म्हणतात –

‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल।
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल।
माता विठ्ठल पिता विठ्ठल ।
बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल।

माझे सर्व गोत्रच विठ्ठल आहे. सर्व नाती विठ्ठलात विलीन झालेली आहेत.

वारी म्हणजे विठ्ठल भक्तीचे लोकविद्यापीठच आहे. वारकऱ्यांचे सामूहिक विश्वबंधुत्व आणि सामूहिक शहाणपण हे वारीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. वारीतील मायमाऊल्या गळ्यात टाळ, डोक्यावर तुळस घेऊन चालतात. मुखी देवाचे नामस्मरण करतात. माउलीच्या भेटीच्या ओढीने, पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता संतांनी दिलेल्या उर्जेतून प्रपंच आणि परमार्थ यांचा सुंदर समन्वय स्त्रीशक्तीला गाठतात. ज्ञानेश्वरमाउली म्हणतात –

‘पंढरीच्या वाटे अनंत घडती योग ।
वैकुंठीच्या मार्ग तेणे संगे॥

तर संताघरी सावली असणारी तुळस स्त्रियांच्या ओव्यातून दिसते अशी-

‘तुळस वंदावी वंदावी माउली।
संता घरी सावली तुळस वंदावी।।
तुळशी घालीत असे वटा।
विघ्न पळती बारा वाटा।।
तुळशी लावीत असे दिवा।
उजेड पडला साऱ्या गावा।।

महाराष्ट्राचा लोकदैवत संप्रदाय आणि संतसंप्रदाय यांचा भिमा-भामा संगम पंढरीच्या वारीतून घडतो त्यामुळेच-

‘अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।
माझिया सकळा हरीच्या दासा।।
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी। ही
संत मंडळी सुखी असो॥
अहंकारांचा वारा न लागो राजसा।
माझिया सकळा हरीच्या दासा।।

असे आर्जव संतांनी केले आहे!

— डॉ. प्रकाश खांडगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..