नवीन लेखन...

नोटांची छपाई ते वितरण

नोटा छापणे, नाणी तयार करणे याव्यतिरिक्त देशाचे चलन अधिक सुरक्षित करणे आणि त्याद्वारे बनावट चलनाला दूर ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी असते. आपली रिझर्व्ह बँक, नोटांची प्रेस आणि नाण्यांची टांकसाळ इथून आवश्यक चलन निर्माण करून त्याची वितरण व्यवस्था करते जी सक्षम आहे.


काही दिवसांपूर्वी काही राज्यांमध्ये नोटांची टंचाई निर्माण झाली होती. अनेक ठिकाणच्या एटीएम मशिनमध्ये खडखडाट निर्माण झाला होता. या चलनटंचाईच्या पार्श्वभूमीवर एकूण नवीन नोटा, नाणी यांची निर्मिती आणि वितरण व्यवस्थेचा घेतलेला आढावा….

आपल्या महाकाय देशात चलन म्हणजे कागदी नोटा आणि धातूरूपातील नाणी उत्पादन व पुरवठा करण्याची म्हणजेच एकूण अधिकृत चलनाची-निर्मिती व वितरणाची संपूर्ण जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेकडे असते. अर्थात हे काम केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार केले जाते. देशातील अर्थ-व्यवहार सुकर होण्यासाठी नोटा आणि नाणी ह्यांचा सुयोग्य साठा आणि नित्य पुरवठा होण्याची जरुरी असते. कारण आज जरी डिजीटल व्यवहार होत असले आणि रोकडविरहित व्यवहार करण्यास प्रोत्साहन मिळत असले तरीही अनेक व्यवहार रोखीने होत असतात.

आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी चलन-सुट्टे पैसे हाताशी असावे लागतात. नव्या नोटा आणि नाण्यांची निर्मिती जितकी महत्त्वाची तितकेच महत्त्व व्यवहारातील बाद नोटा (ज्या वापराकरिता अयोग्य आहेत अशा खराब झालेल्या) रद्द करणे हेही सातत्याने करावे लागते. आणि योग्यवेळी नवीन नोटा व नाणी व्यवहारात आणून देशाला होणाऱ्या चलन पुरवठ्यामध्ये सातत्य राखणे हेदेखील रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येते. अनेकदा आपण वाचतो कीअमूक मूल्यांच्या नोटांची चणचण जाणवते किंवा काही नाणी पुरेशी मिळत नाहीत. ही परिस्थिती का निर्माण होते?अमूक नोटा न मिळणे किंवा नाणेटंचाईने त्रस्त होणे आपण अधून मधून अनुभवत असतो. म्हणून आपण आपल्याकडील नोटा आणि नाणी ह्यांची निर्मिती यंत्रणा ते वितरण व्यवस्था, कशी असते ते पाहणार आहोत.

जेव्हा चलनाची-नोटांची कमतरता जाणवायला लागते तेव्हा लागलीच काही नोटानिर्मिती केली जात नाही. कारण नोटा कधी आणि किती प्रमाणात व्यवहारात आणायच्या ह्याबाबत सरकारचे धोरण असते, त्यानुसार नवीन चलनाबाबत सरकार निर्णय घेत असते. चलनातून बाद होणाऱ्या खराब नोटांच्या बदल्यात नवीन नोटांची निर्मिती केली जाते. केवळ अमूक रुपयाच्या नोटा कमी झालेल्या आहेत किंवा तमुक रुपयाची नोट अधिक प्रमाणात वापरली जाते म्हणून काही छपाई केली जात नाही. नोटा आणि नाणी ह्यांच्याबाबतीत पद्धतशीरपणे माहिती आणि आकडेवारी घेऊन मगच तसा निर्णय घेतला जातो. अर्थव्यवस्थेच्या विकासदराच्या अनुषंगाने बँक नोटांची अंदाजे किती मागणी अपेक्षित आहे अशी आकडेवारी रिझर्व्ह बँकेतर्फे पाहिली जाते. तसेच जुन्या-फाटलेल्या-खराब नोटांना चलनातून काढून टाकण्याबाबत अंदाज घेतला जातो. शिवाय चलनाचा राखीव कोटा किती असावा, याचा आढावा घेतला जातो आणि मग नोटा छपाई-नाणी उत्पादन करण्यासाठी शिफारस केली जाते.

रिझर्व्ह बँकेला नवीन नाणी किंवा नोटा काढण्याआधी खालील निकष पडताळून पहावे लागतात ः-

  1. आजवर किती नोटा, चेक्स आणि क्रेडीट किती प्रमाणात वापरले गेले आहे, त्याची आकडेवारी -ह्यातून अमुक कालावधीत नेमक्या किती नोटा-नाणी वापरात राहिल्या.चेक्स वापरले जात आहेत? कार्ड सिस्टीम वा डिजीटल पद्धतीने किती व्यवहार केले जातात? या माहितीतून व्यवहार करण्याची प्रवृत्ती आणि कल प्रतिबिंबित होतो. नोटा हा प्रकार घेतला तर किती मूल्यांच्या नोटा अधिक वापरल्या जातात हे समजले तर त्यानुसार निर्णय घेता येतो.वापर ,सोय आणि परिणाम असा तुलनात्मक विचार करता येतो.
  2. सर्व बँक्स आणि सरकार ह्यांच्याकडे किती पैसा जमा आहे, हे पाहणे महत्त्वाचे कारण एकूण किती चलन वापरात असावे आणि किती बँका आणि सरकारच्या तिजोरीत आहे हे पडताळून पाहिल्यावर एकूण किती चलन व्यवहारात असायला हवे हे कळते.
  3. आजवर किती पैसा नष्ट केला गेला आहे? हा घटक तितकाच महत्त्वाचा आहे, कारण जितक्या नोटा बाद केल्या त्याच प्रमाणात नवीन नोटा व्यवहारात आणणे, हे व्यवहार्य असते कारण नाहीतर अपुरेपणाने अमूक नोटा उपलब्ध नाहीत, त्यांची कमतरता जाणवून गोंधळ होऊ शकतो.
  4. देशातील भांडवली बाजार स्थितीबाबतचा अहवाल समजून घ्यावा लागतो. भांडवली बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण आणि त्यात होणाऱ्या व्यवहार-उलाढाली यांचा संदर्भ तपासला जातो.

वरील निकष आणि त्याबाबतची आकडेवारी तपासल्यावर नवीन नाणी-नोटा छपाईबाबत निर्णय घेतला जातो. नेमक्या किती चलनाच्या आणि संख्येच्या काढायच्या हे ठरवले जाते. त्यानंतर छपाई-उत्पादन केले जाते.

आपल्याला लागणाऱ्या नोटा व नाणी यांची निर्मिती आणि पुरवठा यासाठी देशभरात एकूण चार केंद्रे मुंबई, कोलकाता, हैद्राबाद आणि नोएडा इथे कार्यरत आहेत. तसेच नाशिक व देवास इथे नोटा छपाई प्रेस आहेत. नाणी निर्मिती प्रक्रिया सरकारच्या अधिकारात मात्र त्यांचे वितरण हे रिझर्व्ह बँकेतर्फे केले जाते.त्याकरिता अनेकस्तरीय यंत्रणा कार्यरत असते. टांकसाळीतून तयार झालेली नाणी आणि प्रेसमधून छापलेल्या नोटा थेट रिझर्व्ह बँकेच्या विभागीय ऑफिसातून देशभरातील 31 विविध लोकेशन्सवरील करन्सी चेस्ट आणि कॉइन डेपोमध्ये पाठवल्या जातात. आणि तिथून त्या-त्या भागातील बँक शाखांना मिळू शकतात. या चेस्ट आणि डेपो ह्यांची देखभाल आणि व्यवस्थापन बँक्स आणि सरकारी ट्रेझरीमार्फत केले जाते. एकूण करन्सी चेस्टची संख्या 4422 आणि कॉइन डेपोज हे 3784 इतके आहेत. इथून बँक्स, त्यांचे एटीएम्स, ट्रेझरी अशा माध्यमातून थेट ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतात. ही वितरण व्यवस्था संपूर्ण देशातील नोटा आणि नाणी ह्यांचा ओघ प्रवाहित ठेवते. कधी कधी मात्र एखाद्या राज्यात, भागात पैसे काढण्याचे प्रमाण अचानक वाढते किंवा एटीएम यंत्रणा ठप्प होते किंवा पुरवठा व्यवस्था अडकून पडते. मग मात्र अमूक भागात नोटा – पैसे यांची चणचण निर्माण होते. परंतु अशी परिस्थिती सर्वच ठिकाणी नसते. कारण मागणी आणि पुरवठा यांचा समन्वय उत्पादन-चक्र कार्यरत ठेवून सांभाळला जातो. काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली तर लागलीच पुरवठा करण्याची व्यवस्था केली जाते.

नोटा छापणे, नाणी तयार करणे याव्यतिरिक्त देशाचे चलन अधिक सुरक्षित करणे आणि त्याद्वारे बनावट चलनाला दूर ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी असते. आपली रिझर्व्ह बँक, नोटांची प्रेस आणि नाण्यांची टांकसाळ इथून आवश्यक चलन निर्माण करून त्याची वितरण व्यवस्था करते जी सक्षम आहे. मात्र कधी कधी मागणी-पुरवठा यातील चढ-उतारांतील होणारे बदल कसोटी निर्माण करणारे असतात. वितरण अधिक सोयीचे व्हावे म्हणून सिंगल विंडो, मोबाइल काऊंटर व कॉइन डीस्पेन्सिंग मशीन्सचा वापर केला जातो. आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून नोटा खराब न करता वापर करावा आणि जुन्या नोटा बदलून घ्याव्यात. एखाद्या ठिकाणी होणारी नाणे-नोटा टंचाई ही तात्कालिक असू शकते कारण चलनाची दळणवळण यंत्रणा सक्षम आहे. एखाद्या ठिकाणची नित्य गरज आणि आकस्मिक मागणी ह्या कारणाने किंवा संपर्क-समन्वयाचा अभाव अशी काही कारणे असू शकतात. कृत्रिम टंचाई, साठेबाजी करून तुटवडा करण्याची विघातक प्रवृत्ती मात्र रोखली पाहिजे. चलनाची छपाई आणि वितरण यंत्रणा अव्याहतपणे चालू कशी राहील हे रिझर्व्ह बँकेमार्फत पाहिले जाते. देशाची वाढती लोकसंख्या, बँकिंग परिघाचा होणारा विस्तार हे गृहीत धरून अधिकाधिक करन्सी चेस्ट आणि प्रभावी वितरण होणे ही काळाची गरज आहे, अन्यथा सुट्टे पैसे वेळीच न मिळाल्याने टंचाईत्रस्त नागरिकांचा रोष निर्माण होऊ शकतो. या समस्येकडे दुर्लक्ष होऊ नये.

(नाटककार, नाट्य समीक्षक आणि बँकिंग अभ्यासक)

-–राजीव जोशी

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे  दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..