नवीन लेखन...

सुधारणेचा लटका प्रयत्न (नशायात्रा – भाग ४०)

मी पोलीस स्टेशन वरून पळून आल्यानंतर घरात जो हलकल्लोळ माजला होता त्याचे फलित हे झाले की त्या दिवशी रात्री मी सर्वांची माफी मागितली. ( अर्थात तेव्हा ब्राऊन शुगर पिऊन झाली होती , टर्की नव्हती म्हणून ही पश्चात बुद्धी होती , अनेक व्यसनी असे नेहमी करतात , काही मोठी भानगड , भांडण , किवा मोठी चूक केली की ते तात्पुरते माफी मागतात , काही दिवस शांततेने जगतात अर्थात व्यसन बंदच असते असे नाही पण ते घरी त्रास देणे बंद करतात काही काळ ) व या पुढे चांगला वागेन असे वचन दिले . मनाशी देखील मी हे ठरवले होते की आता एखादी नोकरी शोधली पाहिजे जेणेकरून आपला खर्च आपल्याला स्वतःला करता येईल .

माझा ऐक जिवलग मित्र होता भीमा डावरे म्हणून तो विष्णुनगर च्या पलीकडे असलेल्या दलित वस्तीत राहत असे , आठवी पासून तो माझा मित्र होता . भीमाचे वडील लहानपणीच गेले होते , मोठा भाऊ व त्याच्या पत्नी मुलांसोबत भीमा व त्याची आई राहत असे . मोठा भाऊ प्रेस मध्ये नोकरीला होता मात्र त्याच्या भावाला एकंदरीत ५ मुली होत्या व तुटपुंज्या पगारात सर्व कारभार चालला होता . भीमा जरी माझ्यासोबत नेहमी राहत असला तरी त्याचे ऐक वैशिष्ट्य असे की त्याने आमच्या कोणत्याही मवाली पणात अथवा व्यसनात भाग घेतला नव्हता , उलट तो आम्हाला समजावून सांगे व्यसन करू नका म्हणून , आम्ही त्याला अनेकवेळा अनेक प्रकारे व्यसनाचा आग्रह करूनही तो सोवळा राहिला होता .कित्येक वेळा तो कुतूहल म्हणून आमची चिलीम साफ करून देत असे , किवा एखादे वेळी सिगरेट मध्ये गांजा भरून देत असे पण कधी त्याने व्यसन केले नाही हे कौतुकास्पद होते

म्हणजे आम्ही सगळे मित्र व्यसनी आणि सतत आमच्यात राहूनही स्वतःला कोणतेही व्यसन न लावून घेतलेला भीमा म्हणजे ऐक आश्चर्य होते . भीमा नेहमी माझ्या घरी आभ्यास वगैरे निमित्ताने असायचा , आईने मला सांगितलेली अनेक कामे मी भिमावर ढकलत असे , उदा . सिलेंडर साठी नंबर लावणे , दुकानातून किराणा समान घेऊन येणे वगैरे . आई नेहमी म्हणत असे की तुझ्याऐवजी भीमा माझा मुलगा हवा होता इतका प्रेमळ आणि नम्र व गुणी होता तो .( गेल्या अनेक वर्षात भीमा भेटलेला नाही , तो मुंबई ला कोणत्यातरी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे असे समजले आहे ).

तर या भीमा सारखे आता वागायचे असे मी ठरवले होते व तसे वचन देखील दिले होते सर्वाना . दुसऱ्या दिवशी पासून मी भिमासोबत नोकरी शोधू लागलो , अर्थात नोकरी शोधण्याच्या निमित्ताने व आता चांगला वागतो असे म्हणून आईकडून थोडेफार पैसे उकळतच होतो व त्यात नशा भागवत होतो कसातरी .त्या पोलीस स्टेशनच्या प्रकरणानंतर मोठा भाऊ मला जरा टरकूनच होता , त्याला जरी नंतर मी काही बोललो नव्हतो तरी त्याच्या मित्रांनी बहुधा त्याला शहाणपणाचा सल्ला दिला असावा की तू तुषार च्या भानगडीत पडू नकोस , तो उगाच तुला काहीतरी इजा करेल ,त्यामूळे असावे कदाचित तो आता माझ्या बाबतीत फारसे बोलत नसे अर्थात त्याची माझ्यावर नजर होतीच फक्त त्याने बोलणे कमी केले होते इतकेच .

एकदा अशीच ऐक जाहिरात आली होती स्थानिक दैनिकात ‘ प्रचारक हवेत ‘ या आशयाची . नाशिक मध्ये उंट छाप बिडीचे उत्पादन होते त्याचे मालक बस्तीराम नारायणदास सारडा हे होते , त्या समूहाची ही जाहिरात होती ‘ उंट ‘ छाप बिडी चा गावोगावी प्रसार आणि प्रचार व विक्री वाढवण्यासाठी हे ‘ प्रचारक पद ‘ होते , त्यात उमेदवाराला गायन , अभिनय , ई बाबतीत प्राविण्य असावे असा उल्लेख होता म्हणून मी भीमा सोबत तेथे मुलाखतीला गेलो श्री . पाडेकर साहेब म्हणून होते मुलाखत घ्यायला ( हे पाडेकर नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारे होते ) मुलाखतीच्या वेळी त्यांनी मला कविता म्हणून दाखव , गाणे म्हणून दाखव , कविता कर , असे प्रश्न विचारले तसेच एखादा अभिनय करून दाखवण्यास सांगितले मी त्यावेळी त्यांना नट सम्राट मधील ‘ घर देता का कुणी घर ‘ हा भाग करून दाखवला होता . त्यांनी लगेच माझी निवड केली प्रचारक पदासाठी . भीमा त्या वेळी एका ठिकाणी पार्टटाईम नोकरी करतच होता त्यामूळे त्याने काही मुलाखत दिली नाही . तर आता मी नोकरी करणार होतो , चांगला वागणार होतो भीमा सारखा म्हणून घरची मंडळी खुश होती . कामावर हजर व्हायला अजून ऐक आठवडा बाकी होता तो पर्यंत मग आईकडून निर्विघ्न पैसे मिळत गेले मला .

मी व्यसन बंद केले नव्हते तर फक्त आता जरा सांभाळून व्यसन करत होतो इतकेच , आईने देखील घडल्या प्रकारचा धसका घेतला होता म्हणून ती मला बिनदिक्कत पैसे देत असे . माझ्या नोकरीचा दिवस उजाडला आणि मी सकाळी सकाळी मी माझा ब्राऊन शुगर चा डोस घेऊन कामावर हजर झालो पहिल्या दिवशी मला फक्त कामाचे स्वरूप समजावून सांगण्यात आले , नंतर सातपूर येथे असलेल्या उंट बिडीचे उत्पादन जेथे चालते तेथील कारखान्यात नेण्यात आले , बिडीची पाने वळून त्यात तंबाखू कशी भरली जाते , तंबाखूवर कशी प्रक्रिया होते ते सारे मी पहिले . मग उद्या पासून तुला मलकापूर येथे प्रशिक्षणासाठी जावे लागेल असे सांगितले गेले . प्रशिक्षण म्हणजे उंट विडीचा प्रचार करणारी ऐक व्हँन होती त्या व्हँन सोबत मला जायचे होते त्या गाडीवर वर भोंगे लावलेले होते , ऐक मँनेजर , ऐक प्रचारक , ऐक सहायक , चालक आणि त्याचा सहायक अशी टीम सुमारे १ आठवडा ते १५ दिवस अश्या दौऱ्यावर जात असे , त्या दोऱ्यात गावोगावी जाऊन उंट बिडीचा प्रचार करणे , तेथील व्यापाऱ्यांना बिडी सप्लाय करणे , विक्री वाढण्यास मदत करणे असे काम असे , सगळी टीम एखाद्या स्थानिक लॉज वर मुक्काम करत असे , आम्हाला जेवणाचा भत्ता मिळत असे . मी ज्या गाडीबरोबर प्रशीक्षणासाठी जाणार होतो त्या गाडीचे व्यवस्थापक आणि प्रचारक यांच्याशी माझी ओळख करून देण्यात आली , त्यांनी मला त्यांचे काही अनुभव सांगितले . व दुसऱ्या दिवशी मी प्रशिक्षणासाठी जाण्यास सज्ज झालो . रात्रीच माझा ब्राऊन शुगर चा दोन दिवसांचा स्टॉक मी घेऊन ठेवला होता .

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..