आषाढातील पावसाचे थैमान तिला जाणवत नव्हते .
रात्रीचा कितवा प्रहर हेही तिच्या लक्षात येत नव्हते .
आजूबाजूचा सगळा अंधार गच्च तरीही ओलेता .
मधूनच लख्ख चमकणारी आणि क्षणार्धात भाजून काढील अशी भीती वाटायला लावणारी वीज .
मेघांचा भयप्रद कडकडाट .
रक्त गोठवू शकेल अशी विलक्षण थंडी .
पायाखाली गुडघाभर चिखल .
उजव्या बाजूला घनदाट जंगल आणि डाव्या बाजूला दुथडी भरून वाहणारी कालिंदी .
राधेला कशाचंही भान नव्हतं .
दूरवरून येणाऱ्या मुरलीधराच्या वंशीची धून तेवढी तिला ऐकू येत होती .
त्याच अनुरोधानं ती वेड्यासारखी पळत होती . त्या बेभान अवस्थेत सुरांची दिशा तेवढी तिला समजत होती .
कानाशी रुंजणारा वंशीनाद तिला खुणवत होता .
ती जीवाच्या आकांतानं धावत होती .
रात्रीच्या भोजनानंतरची आवराआवर करून राधा झोपडीतल्या आतल्या भागात आली तेव्हा , दिवसभराच्या कामामुळं थकून झोपलेल्या अनय कडे तिनं पाहिलं .
तो झोपला होता पण कण्हत होता .
तिनं दिव्याची ज्योत मोठी करून त्याच्याकडे पाहिलं . आणि तिला धक्का बसला .
त्याचं उजवं पाऊल फुगलं होतं आणि त्याच्या वेदना त्याला झोपेतही सहन होत नव्हत्या .
तिला स्वतःची लाज वाटली .
संध्याकाळी गोधने घेऊन आल्यावर त्यानं तिला सांगितलं होतं.
” माझ्या पायात काटा घुसला आहे , तेवढा काढ . खूप वेदना होत आहेत .”
ती त्यावेळी हो म्हणाली , पण कामाच्या धबडग्यात ती विसरून गेली होती .
ती खंतावली .
खाली बसून तिनं त्याचा पाय हातात घेतला .
आणि तिला चटका बसला .
एखाद्या निखाऱ्यासारखा पाय गरम झाला होता .
तिला काय करावं कळेना . काटा रुतलेल्या जागी पाय काळानिळा पडला होता . काटा काढायला जावं तर तो जागा होईल या भीतीनं तिनं पाय खाली ठेवला आणि त्यावर गोधडी पांघरली .
त्याच्या वेदना कमी होण्यासाठी काय करता येईल याचा विचार ती करू लागली .
आणि इतक्यात सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यानं तिच्या झोपडीच मोडकळीस आलेलं दार भुईसपाट केलं . वाऱ्याच्या झोतामुळं दिवा खाली पडला आणि विझाला .
त्याक्षणी दूरवरून येणारा वंशीनाद तिच्या कानी पडला .
आणि क्षणार्धात ती सगळं काही विसरली .
अनय , त्याच्या वेदना , वादळी पावसाची अंधारी रात्र …
ती मंत्रमुग्ध झाल्यासारखी आवेगानं बाहेर पडली .
आणि सुरांच्या अनुरोधानं धावू लागली .
भान हरपून .
— वंशीनादाचा उगम राधेला जाणवला .
ती थबकली .
राधारमण तिथेच उभा होता .
एक पाय मुडपून .
कदंब वृक्षाला रेलून .
सभोवती वाऱ्या वादळाला , मुसळधार पडणाऱ्या पावसाला आणि कालिंदीच्या वाढणाऱ्या पाण्याच्या आवाजाला घाबरून , भेदरून गेलेली गोधने थरथर कापत मनमोहनाला बिलगून उभी होती .
” कन्हैयाsss ”
तिनं जीवाच्या आकांतानं साद घातली .
” ये . तू येणार हे माहित होतं राधे मला . किंबहुना तू यायला हवं असंच मला वाटत होतं . या आषाढघनांच्या रौद्रसंगीतात , माझ्या बासरीच्या सुरांची ताकद मला पहायची होती . तू माझी चांगली सखी आहेस , पण माझ्या सुरांसाठी अवेळी का होईना पण घराचा, अडचणींचा , संकटांचा आणि हो अनयचा विचार न करता तू येतेस का हे पहायचं होतं . ”
कृष्ण बोलताना थांबला .
मिश्किल नजरेनं तिच्याकडे पाहू लागला .
राधा त्याच्या बोलण्याने गोंधळली .
” तुला काय म्हणायचं आहे कन्हैया ? माझ्या प्रेमाची परीक्षा घेतो आहेस की तुझ्या बासरीच्या स्वरांची परीक्षा घेतो आहेस ? ”
” परीक्षा घेणारा मी कोण ? ”
तो पुन्हा थांबला .
ती त्याच्याकडे पाहू लागली .
ही त्याची सवय तिला खूप वर्षापासून माहीत होती .
काहीतरी जगावेगळं सांगायचं असेल तेव्हा तो याच पद्धतीने बोलायचा . बोलताना थांबायचा .
” बोल ना . का थांबलास ? ”
ती त्याच्याकडे बघत राहिली .
तो दूरवर कुठेतरी पहात होता .
” काय पाहतो आहेस ? कुणी येणार आहे का ? ”
” हो . मी अनयची वाट बघतोय . पण त्याला वेळ लागणार आहे . त्याच्या पायात काटा घुसला आहे आणि त्याला प्राणांतिक वेदना होत आहेत . तरीही तो येतोय . सावकाश . पायाच्या वेदना सहन करत . त्या वेदना मलाही जाणवत आहेत . म्हणूनच वाट बघतोय .”
कृष्णानं सांगितलं .
आणि आता तिची तिलाच लाज वाटली . आपण त्याच्या वेदनांचा विचार न करता केवळ मुरलीधराच्या वंशीचा वेध घेत आलो आणि हा कन्हैया त्याच्या वेदनांची काळजी करतोय . तिची मान खाली गेली .
” तो बघ , अनय आलाच . ”
खूप वेळाने कृष्ण म्हणाला .
तिनं वर पाहिलं .
अनय तिच्याकडेच पहात होता .
” बरी आहेस ना तू . अंधारातून , पावसातून , चिखलातून येताना लागलं तर नाही ना तुला ? कालिंदीच रौद्ररूप पहायचं होतं की आपलं गोधन हरवलं असं वाटलं तुला ? की या श्रीकृष्णाने तुला पुन्हा बोलावून घेतलं .? ”
” किती ते प्रश्न ? अरे तुम्ही दोघं इथं यावीत असं मलाच वाटलं . कधी नव्हे ते कालिंदी भरभरून वाहते आहे . प्रचंड पाऊस पडतो आहे . आणि आता भविष्यात ही भूमी सुजलाम् सुफलाम् होईल अशी खात्री मला वाटली . म्हटलं चला , हा निसर्गोत्सव तुमच्यासवे पाहू या . ”
” माधवा , तुला काही तरी वेगळं सांगायचं आहे . बरोबर ना ? ”
कृष्ण हसला .
“अनया , तुला जे कळतं , ते विलक्षण आहे . तुला माहितेय, ही राधा म्हणजे केवळ स्त्रीशक्ती नाही , ते धरतीचं दुसरं रूप आहे . तिची काळजी तुला वाटली . हे ही मला अपेक्षितच होतं . कारण तू म्हणजे नुसता अनय नावाचा पुरुष नाही . तर स्वतःला होणाऱ्या वेदना सहन करत धरतीची काळजी घेणारा महान पुरुष आहेस . आणि ही नदी , हा पाऊस , ही गोधने आणि भवतालचा सगळा निसर्ग, हे सगळं तुझ्यामुळं भविष्यात समृद्ध होणार आहे . हे तुम्हाला दाखवायचं होतं . म्हणून हा घाट घातला . तुझ्या वेदना राधेला सांभाळण्यानं कमी होणार आहेत . आणि मी केवळ निमित्तमात्र आहे . राधे , जा , या अनयला घेऊन जा .आणि असेच एकमेकांना जपत राहा . ”
कृष्ण निर्व्याजपणे हसला .
पुन्हा एकदा वीज चमकली .
त्या प्रकाशात कृष्ण अंतर्धान पावताना सगळ्यांना दिसला .
राधेनं डोळे पुसले .
अनयचा हात हाती घेऊन ती घरी निघाली .
अंतर्धान पावणाऱ्या कृष्णानं हळूच पाठी वळून पाहिलं .
आणि तो हसला .
पाऊस पूर्ण थांबला होता .
सस्यश्यामल धरती प्रसन्नपणे हसत होती .
———–
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
८९५१९०६७०१
————
ही रूपककथा आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला आणि अभिप्राय कळवायला हरकत नाही


Leave a Reply