नवीन लेखन...

मोरूचा बाप, मोरुला म्हणाला..

दसरा संपला तसा मोरू जागा झाला.

मोरूचा बाप मोरूला म्हणाला , ‘ ऊठ लेका , जागा हो , तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा . आता कोणत्याही क्षणी मतांची भीक मागायला आणि आपली सेवा करावयाला विविध पक्षांचे विनम्र पाईक कर जोडून येतील , त्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे , त्यांना म्हणावे , हे आमचे अपेक्षापत्र आहे. ते वाचण्याची कृपा करावी . तत्पूर्वी तूही ते नजरेखालून घालावेस , हे बरे . म्हणजे वादविवाद नामक प्रेमळ संवादासाठी तुला तयारी करता येईल.’

मोरूने आज्ञाधारकपणे मान तुकवली , आणि एकवार चळतीतल्या कागदावर नजर टाकली . त्यातील मुद्दे येणेप्रमाणे होते :

आम्ही मते त्यांनाच देऊ , जे आमच्या पुढील अपेक्षा पूर्ण करण्याची हमी देतील .

१ : मूल जन्माला आल्यापासून ते जितके शिक्षण घेईल त्यासगळ्याचे शुल्क (फी) भरावे लागणार नाही , यात ते मूल एकेका इयत्तेत वा वर्गात कितीही वर्षे नापास झाले तरीही फी भरावी लागणार नाही , हे अध्याहृत आहे.

२ : त्यामुलाचे शिक्षण , नोकरी , व्यवसाय , लग्न , त्याचा वाढणारा कुटुंबकबिला यासगळ्याचा खर्च आणि बेकार भत्ता , म्हातारपणाचा भत्ता , (यात लिंगभेद, धर्मभेद, जातीभेद करू नये ) व वयोगटानुसार प्रत्येकाला भरघोस पेन्शन देण्यात यावी , ती करमुक्त असावी .

३ : केवळ शेतकरीच नव्हे तर महाराष्ट्रातील नोकरदार , छोटेमोठे व्यावसायिक , अनधिकृत व्यवसाय करणारे (उदा . चहाच्या टपरी , चायनीज गाड्या , आईस्क्रीमच्या गाड्या ) यासर्वाना कोणताही कर लागू करू नये .

४ : रस्तोरस्ती , गल्लोगल्ली , विमानतळ , रेल्वेस्टेशन , बसस्टँड अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणी मोफत नाश्ता सेंटर , मोफत भोजनालये , ओपन जिम , मोफत दारूविक्री केंद्रे सुरू करावीत , त्यात कुणी विक्री करताना आढळला तर जबरी शिक्षा द्यावी .

५ : राज्यात सर्वत्र विनामूल्य औषधकेंद्रे , मोफत रुग्णालये , मोफत चिकित्सालये उघडावीत. ऑपरेशन मोफत , अवयव मोफत , रक्त मोफत असं सर्वत्र असावं .

६ : राज्यातील सर्व गुंड सर्वांची अब्रू लुटत असतील तर फारसे मनावर घेण्यात येऊ नये .

७ : सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये , संस्थांमध्ये , किमान सहा आकडी पगार , भरपगारी लागतील तेव्हढ्या रजा देण्यात याव्यात . काम करायला हवेच , अशी क्षुल्लक अट घालणाऱ्यांना त्वरित निलंबित करावे .

८ : बिल्डरांनी कुठेही इमारती उभाराव्यात आणि त्या सरकारने विकत घेऊन मोफत निवाऱ्याची सोय सरकारने करावी .

९ : चंद्र आणि मंगळवर प्लॉट पाडुन गरजुंचा निवाऱ्याचा प्रश्न सोडवावा .

१० : सर्व प्रकारची वाहतूक , पर्यटन , स्थलदर्शन सरकारने मोफत करावी .

११ : जे जे म्हणून गरजेचे आहे , ते ते सरकारने कर्तव्य भावनेतून विनामूल्य , तात्काळ उपलब्ध करून द्यावे.

१२ : परतफेड करण्याची अट नसणारे कर्ज देण्यात यावे , प्रत्येक कुटुंबाला ,लोकसंख्येच्या समप्रमाणात मोफत पेट्रोल वा डिझेल विनामूल्य देण्यात यावे .

१३ : जनतेला हवी तेव्हा सर्व प्रकारची करमणूक विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावी .

१४ : सर्व प्रकारचे ( गरम , थंडगार , सौम्य , ) फिल्टर्ड पाणी , स्वच्छ हवा सरकारने मोफत द्यावी .

15 : सार्वजनिक आणि घरगुती स्वच्छता सरकारने करावयाची आहे तीही विनामूल्य याची हमी द्यावी .त्यात आळस झाल्यास वा कुचराई झाल्यास होणाऱ्या रोषास सरकारने तोंड द्यावे .

१६ : आंदोलने केली जातील , ती हिंसक असतील आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाईल त्याची भरपाई सरकारने करावयाची आहे . ती जबाबदारी आंदोलकांवर टाकून हात वर करू नये .
कागदाची चळत वाचता वाचता मोरू थकला आणि पुन्हा गाढ झोपी गेला.

मोरूच्या बापाने ते पाहिले , त्यास खूपच राग आला , तो म्हणाला ;

…’ मोरू , मोऱ्या ऊठ , लेका दसरा संपला काल , अजून तू झोपलेला ? आणि झोपेत काय बडबडत होतास ? मी ऐकलेय सगळे , आता तोंड खंगाळ आणि जा बाहेर . हे पैसे घे आणि शिक्षण , मालमत्ता , वाहन, रस्ता , दैनंदिन गरजेच्या वस्तू , हे आणि सरकारने लादलेले इतर सगळे कर भरून ये . तू झोपेत जे बडबडत होतास ते सगळे सरकारने, विनामूल्य आणि मोफत द्यायला हवे असेल तर आपल्यासारख्या प्रामाणिक करदात्यांनी कर भरल्याशिवाय सरकारला शक्य नाही . जा ऊठ आणि आदर्श नागरिक म्हणून , सरकारकडून कुठल्याही विनामूल्य गोष्टींची अपेक्षा न ठेवता , कर भरून ये !!! ‘

मोरू उठला आणि बापाच्या आदर्श तत्वज्ञानाला नमस्कार करून , पैसे घेऊन , कर भरायला बाहेर पडला …

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 150 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

1 Comment on मोरूचा बाप, मोरुला म्हणाला..

  1. जोशी साहेब नमस्कार.

    फार पूर्वीच्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये मोरूचा दसरा असा एक धडा किंवा कविता होती

    ज्याच्या मध्ये सुरुवात होते – मोरूचा बाप मोरूला म्हणाला मोरू उठ आज दसरा .

    आणि शेवटी
    सोने लुटूनी मोरू आला
    बहीण काशी ओवाळी त्याला

    मला इंटरनेटवर हा धडा किंवा कविता सापडली नाही आपणास माहित असेल तर कृपा करून मला फॉरवर्ड करा

    आज दसऱ्याच्या आपणाला व आपल्या परिवाराला शुभेच्छा

    सुनील गुप्ते.

Leave a Reply to SUNIL GUPTE Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..