नवीन लेखन...

करोना विषाणू थांबवण्यासाठी भारताच्या ऊपाययोजना

सध्याची परिस्थिती

१० फ़ेब्रुवारी पर्यंत चीनमध्ये करोना विषाणूच्या संसर्गाच्या बळींची संख्या ७२२ झाली असून, एकाच दिवशी ८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश मृत्यू हुबेई प्रांतातील आहेत. चिनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३४,५४६ इतकी झाली आहे. चीनच्या बाहेर एकूण ४२१४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, १२८० रुग्ण गंभीर आजारी आहेत, तर ५१० रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. ‘करोना’ संसर्गामुळे परदेशामधील बळींची संख्या २२० झाली आहे. त्यापैकी जपानमध्ये ८६, तर सिंगापूरमध्ये ३३ मृत्यू झाले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता जगभरात होत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला कमकुवत आरोग्य व्यवस्था असलेल्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची चिंता भेडसावत आहे. “कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. आपण सर्व एकत्र आलो तरच कोरोनाला रोखणे शक्य आहे”, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टीड्रोस म्हणाले. “कोरोना विषाणूचा फैलाव आतापर्यंत १५ देशांमध्ये झाला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चीनने वुहानसह काही शहरे पूर्णपणे बंद केली आहेत. वुहान हे कोरोना विषाणूच्या फैलावाचे मुख्य केंद्र आहे.

कोरोना’ विषाणूच्या लागणची लक्षणे

‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गामध्ये श्वसनसंस्थेसंबंधी सौम्य ते तीव्र स्वरूपाची लक्षणे, चिन्हे आणि गुंतागुंती उद्भवतात. त्यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, ताप, सर्दी, खोकला ते अतिगंभीर फुफ्फुसदाह, अतिसार, मूत्रपिंड निकामी होणे, ‘अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ आणि शेवटी मृत्यू अशा समस्या उद्भवतात. वृद्ध माणसे, मुले आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशांना संसर्ग होण्याचा धोका अधिक संभवतो.

चीनी अर्थव्यवस्थेवर गंभिर परिणाम

या साथीच्या आजाराची बातमी फुटली त्या दिवशी वुहान प्रांतातील भांडवली बाजार कोसळला. साथीची खातरजमा होण्याआधी चीनच्या आर्थिक प्रगतीचा दर जेमतेम सहा टक्के इतका होता. त्यात या विषाणूने किमान दोन टक्क्यांनी घट केल्याचे दिसते. कोरोना विषाणू चीनची अर्थव्यवस्था पोकळ बनवत आहे. गेल्या ३० वर्षांत प्रथमच चीनची अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे.अमेरिकेबरोबर चाललेल्या व्यापार स्पर्धेमुळे चिनी कारखाने आधीपासूनच दबावात आहेत आणि आता कोरोना व्हायरसने त्यांना आणखी एक धक्का दिला आहे. गेल्या ३० दिवसांत ४२,००० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक बुडल्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण आला आहे.

चीनचा शेअर बाजार नऊ टक्क्यांहून अधिक खाली आला आहे. त्याच बरोबर, २०२०च्या सुरुवातीपासूनच चीनचे चलन युआन आतापर्यंत १.२ टक्क्यांनी कमकुवत झाले आहे. या परिस्थितीला पूर्ववत करण्यासाठी सरकारकडून शेअर बाजारात नव्याने १७४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे चीनच्या मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.

या साथरोगाची एवढ्या झपाट्याने लागण झाली की अख्खे वुहान शहर आता ठप्प पडले आहे. हुबेई प्रांतातील हे एक महत्त्वाचे शहर असून त्यापाठोपाठ राजधानी बीजिंग, शांघाय, शेनझेन, ग्वांगझू या चीनमधील मोठ्या शहरांमध्ये वेगाने त्याची लागण झाली. सन २००२-०३ मध्ये चीनमधूनच पसरलेल्या ‘सार्स’ या रोगामुळे चीन आणि हाँगकाँगमध्ये ८०० जणांचे बळी गेले होते.

संसर्ग भारतात पसरू नये म्हणुन उपाय योजना

संसर्ग भारतात पसरू नये म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बाधित देशांमधून येणार्या प्रवाशांचे ‘स्क्रिनिंग’ जातीने केले जात आहे. अशा प्रवाशांमधून आढळलेल्या संशयित रुग्णांचा व त्यांच्या निकट सहवासितांचा पाठपुरावा आणि आवश्यक कार्यवाही एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत केली जात आहे. या विषाणूजन्य आजाराच्या निदानाची सोय पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत उपलब्ध आहे.कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील वुहान प्रांतातून भारतात परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी भारतीय सैन्यातर्फे विशेष सुविधा करण्यात आली आहे. सैन्यातर्फे हरियाणातील मानेसर येथे विशेष वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे सुमारे ३०० जणांना ठेवण्याची सुविधा आहे. या कक्षात विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टर्सतर्फे तपासणी करण्यात येणार असून त्यांना किमान दोन आठवडे देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.भारतामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचा फक्त एक रुग्ण आढळला आहे.घाब रुन जाय चे काहीच कारण नाही.

भारताने या आठवड्याच्या सुरुवातीपासून चिनी नागरिकांना तसेच चीनमध्ये वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांना व्हिसा देणे बंद केले असून पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांच्या भारतात येण्यावर निर्बंध लादले आहेत. एअर इंडियाने दोन विशेष विमानांच्या साहाय्याने वुहानमध्ये अडकलेल्या ६५४ भारतीय तसेच ७ मालदीवच्या नागरिकांना सुखरूप परत आणले आहे. विशेष म्हणजे, चीनशी खास मैत्री असलेल्या पाकिस्तानचे विद्यार्थी आणि नागरिक मात्र चीनमध्येच अडकून पडले आहेत.

संसर्गाचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी लोकांना आरोग्य शिक्षण, वैयक्तिक स्वच्छता, जैव-वैद्यकीय कचर्याची सुयोग्य पद्धतीने विल्हेवाट, तसेच रुग्णालयांची तयारी, विलगीकरण कक्ष, गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर आणि जीवनावश्यक प्रणाली सुविधा सक्षमपणे कार्यरत राहतील, याची दक्षता घेण्यात येत आहे. रुग्णांनी आणि नातेवाईकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनतेचे प्रबोधन होण्यासाठी ‘आरोग्य शिक्षण’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे.आपण देशाच्या स्तरावर याचा चांगला मुकाबला करत आहो.

अजुन काय करावे

नवीन ‘कोरोना’ विषाणूकरिता प्रतिबंधात्मक लस अथवा विशिष्ट प्रतिविषाणू औषध उपलब्ध नाही. लक्षणांवर आधारित उपचार आणि गुंतागुंतीचे योग्य व्यवस्थापन इथे फार महत्त्वाचे आहे. सदर विषाणूचा उद्रेक कसा झाला आणि त्याचा प्रसार कसा होतो, यासंबंधी अपुरी माहिती उपलब्ध असल्याने, या संदर्भात ठराविक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे कठीण असले तरी सर्वसाधारणपणे आजाराचे स्वरूप लक्षात घेता आजार होऊ नये म्हणून रुग्णांशी निकट सहवास टाळणे, हातांची नियमित स्वच्छता, कच्चे अथवा अपुरे शिजवलेले मांस न खाणे, फळे व भाज्या धुवून खाणे, खोकताना व शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे इत्यादी प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे आवश्यक आहे. श्वसनसंस्थेसंबंधी लक्षणे असलेल्या, संसर्गग्रस्त देशांमधून आलेल्या तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या आजारी व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच नवीन ‘कोरोना’ विषाणूबाधित देशात प्रवास केला आहे, अशा व्यक्तींनी विनाविलंब वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. गंभीर आजार असणार्या रुग्णांना रुग्णालयात भरती करून योग्य उपचार मिळण्यासाठी व्यवस्था करायला हवी. रुग्णांना उपचार देणार्या डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचार्यांना सदर आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून संबंधितांनी काळजी घ्यायला हवी. अशाप्रकारे ‘कोरोना’विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे.

संकटाकडे एक संधी म्हणून सुद्धा बघा

जगामध्ये आलेल्या  प्रत्येक संकटाकडे भारताने एक संधी म्हणून सुद्धा बघितले पाहिजे.करोना मुळे भारताला निर्माण होणार्या संकटाचा मुकाबला केला पाहिजे,जे सरकार नक्कीच करत आहे. मात्र यामुळे भारता समोर अनेक आर्थिक संधी निर्माण होत आहेत,त्याचा आपण पुरेपुर वापर केला पाहिजे. गेल्या काही दिवसांमध्ये चिन जो जगातला सर्वात मोठा तेल खरेदी करणारा देश आहे, त्याने तेलाची आयात थांबवली आहे.त्यामुळे जगात तेलाचे भाव कोसळले आहेत. यामुळे भारतामध्ये तेलाचे दर तीन ते चार रुपयांनी खाली आले आहेत. ही आपल्या अर्थ व्यवस्थेकरता एक मोठी संधी आहे आहे. भारत औषधे निर्यात करणारा एक मोठा देश आहे. चीनी कारखाने बंद पडल्यामुळे जगातल्या कुठल्याही औषधे निर्माण करण्याकरता लागणारा कच्चा माल मिळत नाही. याचा भारताने फायदा उठवून कच्चा माल भारतामध्ये निर्माण करून जगाला निर्यात करणे फ़ायद्याचे आहे. हे आशा करूया की भारत सरकार या संधीचा नक्कीच फायदा घेईल.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..