नवीन लेखन...

लगन गंधार !

आता हे काय नवीन ?
असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल .
…तर ते एक छोट्याशा हॉटेलचे नाव आहे .
अर्थात ही जाहिरात नाही त्या हॉटेलची किंवा तिथल्या खाद्यपदार्थांची !
मग हे लगन गंधार मध्येच कुठं आलं , असा एक सवाल पैदा होऊ शकतो .

तर त्यासाठी थोडा प्रवास करायला हवा . रत्नागिरीहून कोल्हापूरला जाताना , आंबा घाट चढून गेल्यावर , थोड्या अंतरावर उजव्या हाताला एक अगदीच छोटेसे हॉटेल दिसते , त्याचे नाव लगन गंधार . खूप छान काव्यात्मक नाव असलेले हॉटेल ,जसे नावामुळे लक्षात राहिले ,तसे दोन वर्षांपूर्वीच्या प्रसंगामुळे लक्षात राहिले आहे. ज्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर ते हॉटेल आहे , तो डोंगर दोन वर्षांपूर्वी, अतिपावसामुळे त्या हॉटेलवर कोसळला होता . प्रचंड आर्थिक नुकसान होऊनही ते हॉटेल पुन्हा दिमाखात उभे होते .

पण त्यापेक्षासुद्धा माझ्या लक्षात राहिली, ती रसिकता , संवेदनशीलता आणि कुमार गंधर्वांच्या गाण्यावरील प्रेम !

अरेच्चा !
आता हे काय नवीन ?

मग सगळं सांगायलाच हवं मला …

तुम्ही आंबा घाटातील पाऊस अनुभवलाय ?
प्रचंड धुकं . सोसाट्याचा वारा . आडवातिडवा कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शरीर गोठवून टाकणारी बोचरी थंडगार हवा …

पुण्याहून येताना त्यादिवशी असंच वातावरण होतं. किंबहुना जास्तच . पुढचं काही दिसत नव्हतं . अशा परिस्थितीत गाडी थांबवण्याशिवाय पर्याय नव्हता . त्या अंधुक गूढ वातावरणात लगन गंधारचा बोर्ड दिसला आणि गाडी थांबवली . पळतच हॉटेलात घुसलो . त्या गारठ्यात गरम चहाची तल्लफ आली होती . पण ऑर्डरचे शब्द तोंडात येण्यापूर्वी कानात कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनाचे स्वर घुमू लागले .

बिन सतगुरु नर रहत भूलाना ।

भजन थांबलं तेव्हा भानावर आलो . आणि काउंटरवर हातांनी ताल धरणाऱ्या मालकाला न राहवून विचारलं ,
‘ एफ एम वर लागलं होतं का हे भजन ?’
तो माझ्याकडे बघत राहिला , म्हणाला ,
‘ मी ,यु ट्यूबवर ऐकतो कुमारजी , मला आवडतो त्यांचा आवाज , त्यांची निर्गुणी भजनं , खूप समाधान मिळतं मला …’
तो भरभरून बोलत होता . आमच्याप्रमाणे इतर गिऱ्हाईक सुद्धा त्याचं बोलणं ऐकत होती . आम्ही न सांगता त्यानं गरमगरम वाफाळलेला चहा आमच्या समोर आणला.
ते क्षण अविस्मरणीय होते .
तिथून निघताना त्यानं शुभ्र पांढऱ्या शेवंतीचं , एक छान रोप सुद्धा दिलं.

त्याचा निरोप घेताना वाटलं ,
जपून दांडा धर ,
साजूक तुपातली पोरगी,
शांताबाई,
वाट बघणारा रिक्षावाला,

ही आणि अशीच सैराटलेली गाणी ऐकवण्याची क्रेझ असताना , हा संगीतप्रेमी लगन गंधार हॉटेलवाला वेगळा कसा ? याची आवडनिवड वेगळी कशी ? ही सांगितिक सुसंस्कृतता येते कुठून ?

प्रश्न मला पडले पण त्याची उत्तरं तुम्हाला माहिती असतील कदाचित .
खरं ना….

— डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..