नवीन लेखन...

कोकणचा मेवा – भाग २

रत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदेही पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळीतून ग्रामीण महिलांनी (कोकणात त्यांना मामी म्हणतात) बाजारात आणलेले ताजी करवंदे पाहून तोंडाला पाणी सुटते. अत्यंत चवदार असलेल्या या करवंदांचे सरबतही कोकणात मिळते. पाच रुपयाचा वाटा घेतल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासात हा गोडवा सहजपणे जिभेवर रेंगाळतो.

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत. एरवी बाजारात दिसणाऱ्या जांभळापेक्षा लहान आकारातली ही जांभळे खूप गोड आणि चविष्ट असतात. पानांच्या कोनमध्ये त्यांचे सौंदर्यही लोभस वाटते. जांभळाच्या सरबताची चवही समुद्र किनाऱ्यावरील स्टॉल्समध्ये घेता येते. मात्र ताज्या जांभळाची चव काही निराळीच…

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस वजनदार असूनही तो सोबत नेतांना भार जाणवत नाही. त्याची गोडीच मुळी अशी असते. अनेक पौष्टिक घटक असलेल्या फणसात कापा आणि बरका असे दोन प्रकार येतात. कापा हा प्रकार जास्त प्रिय आहे. फणस कापण्याचे कष्ट नको असतील तर तयार गरेदेखील बाजारात मिळतात. सोबत दुकानातून फणसाचे तळलेले गरेदेखील मिळतात. कच्च्या फणसाच्या भाजीची चवही एखाद्या कोकणी माणसाच्या घरी घेता येते. लहान गोल आकाराचे क्वचीत आढळणारे बटाटा फणसाच्या (विलायती फणस म्हणूनही परिचीत आहे) भाजीची चव काही निराळीच असते. हे फणस सहजपणे सोबत नेता येते.

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे जामफळ. पांढऱ्या शुभ्र रंगाचे घंटेसारख्या आकारातील हे फळ फारसे गोड नसले तरी त्याची चव छान असते. त्यापेक्षाही त्याचे गुणधर्म शरीलाला पोषक असतात. दहा रुपयात डझनभर फळ घेतल्यावर प्रवासात फारशी तहान जाणवत नाही.

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ही चव सोबत ठेवण्यासाठी किंवा आवडत्या पाहुण्यांचा पाहुणचार करतांना या मेव्यापासून बनविलेले पदार्थ उपयोगात आणले जातात. रत्नागिरीच्या गावागावातून असे पदार्थ तयार स्वरुपात मिळतात. फणसपेाळी, आंबापोळी, आंबावडी, विविध प्रकारची सरबते, कैरीचे पन्हे, चॉकलेट्स, टीन किंवा बाटलीबंद आंब्याचा रस, चिक्की आदी विविध पदार्थ पर्यटक आवडीने खरेदी करतात. या प्रक्रीया उद्योगावर अनेकांचे रोजगारही अवलंबून आहेत. या पदार्थंाच्या माध्यमातून कोकणची ओळख देशाच्या विविध भागात जाते.

कोकणात मिळणाऱ्या या मेव्यामुळे उन्हाळ्यातली ही सफरही आनंददायी होत असते. आपल्या आवडत्या व्यक्तिकडे हा मेवा पाठविण्यासाठी कुरिअरची मदतही घेतली जाते. कोकणी मेव्याने रोजगाराची आणि तेवढ्याच ‘मधूर’ संबंधाची अशी साखळीच तयार केली आहे. ‘कोकणच्या राजा’ ने रत्नागिरीचे नाव सर्वदूर पोहोचविले असले तरही कोकणचा इतरही मेवा सर्वांच्या पसंतीस उरला आहे. म्हणूनच कवीमनही या मेव्याच्या प्रेमात पडून
गळे वसंती टपटप जेव्हा आंब्याच्या डाहळी!
पिकले आंबे गळुनि भ्‌तळी रस जोवरि वाहतो
वनदेवींसह झिम्मा खेळत तोवरि नृप राहतो
कुठे आढळे फळभाराने लवणारी आवळी,
कुठे गाळिती भुळभुळ आपुली पक्व फळे जांभळी

असे कोकणचे वर्णन करतांना आनंदते. अनेकांना रसस्वादाचा आनंद देत हा मेवा आपल्यालाही खुणावतो आहे. मग पुढच्या उन्हाळ्यात यायचं हं कोकणला!
— डॉ.किरण मोघे
जि.मा.अ.रत्नागिरी

शुक्रवार, ८ जुन, २०१२

‘महान्यूज’मधील मजकूर आपण ‘महान्यूज’च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..