नवीन लेखन...

किशोर कुमार – सुसंकृत अवलिया

“दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
सुप्रसिद्ध कवी आरतीप्रभूंच्या या ओली वाचताना मला नेहमी किशोर कुमार यांच्या “चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये” या गाण्याच्या ओळी आठवतात आणि त्यामागोमाग अविस्मरणीय झालेला चित्रपटातील प्रसंग!!
किशोर कुमार यांच्या गायनाचे विश्लेषण करण्याअगोदर या गाण्याच्या निमित्ताने त्यांच्यावरील “यॉडलिंग” करणारा गायक असा लागलेला शिक्का किती चुकीचा आहे, हेच दर्शवायचे आहे. आपण किती सहजपणे कुठल्याही कलाकाराला झापडबंद अशा लेबलात अडकवतो यायचे उत्तम उदाहरण म्हणजे किशोर कुमार.
मध्यप्रदेश राज्यातील खांडवा इथे जन्म. पहिल्यापासून काहीसा हुडपणा अंगात भरलेला ( उडत्या चालीची गाणी सहजपणे म्हणणे हा योगायोग नसावा!!) आणि पहिल्यापासून मनावर सैगल यांच्या गायनाचा प्रभाव पदाला आणि त्याबाबतची कृतज्ञता या गायकाने आयुष्यभर व्यक्त केली. सैगल यांचा प्रभाव किती होता, याबाबत बोलायचे झाल्यास, आपला खास आवाज लवणता ते कळेपर्यंत किशोर कुमार हे सैगल यांच्या गायनाची आणि आवाजाची नक्कल करीत होते. एक उदाहरण याबाबतचे बघायचे झाल्यास, १९४८/४९ मध्ये आलेल्या “झिद्दी” चित्रपटातील “यह कौन आय रे करके सिंगार” तसेच ” मरने की दुआये क्यों मांगू” ही गाणी ऐकावीत. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी त्यांना सैगलप्रमाणेच गायचे असे स्पष्टपणे बजावले होते, असे वाचल्याचे आठवत आहे आणि ही गाणी ऐकताना त्यातील तथ्य जाणवते. परंतु लगोलग आलेल्या “रिमझिम” चित्रपटातील “जगमग जगमग करता चाँद निकाला” या गाण्यात मात्र किशोर कुमार खऱ्या आवाजात गायले. मजेचा भाग म्हणजे हे गाणे देखील संगीतकार खेमचंद प्रकाश यांचीच निर्मिती!! या गाण्यानंतर त्यांची जगाला “गायक” म्हणून ओळख व्हायला लागली.
पुढे हसवणारा/हसविणारा गायक-नायक म्हणून “चम चमा चम” या चित्रपटाने त्यांचे नाव अधिक प्रसिद्ध झाले. रसिकांनी त्यांच्या आवाजाची सांगड प्रथम देवआनंद, पुढे राजेश खन्ना आणि नंतर अमिताभ बच्चन या लोकोत्तर नायकांशी निगडित केले आणि यामागे अर्थात संगीतकार एस.डी.बर्मन यांचा महत्वाचा सहभाग होता.
गायक म्हणून किशोर कुमार यांची ओळख प्रेमगीते, युगुलगीते आणि कॉमिकगीते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीतांतून यथार्थपणे कळून येते. निरनिराळे कण्ठगायनाचे परिणाम साधत असतानाही संगीताचा अनुभव देत राहण्याची त्यांची क्षमता आणि कुवत ही अनन्यसाधारण अशीच म्हणायला हवी. गायनाचा आरंभ करण्यापूर्वी हुंकार गायन देखील अतिशय सुरेल होते तसेच तसे करताना, संभाषणात्मक वातावरण निर्माण करण्याची हातोटी अप्रतिम अशीच होती. वास्तविक हा सगळा नाट्यात्म परिणाम तरीही त्यातील सांगीतिक गुणवत्ता सांभाळण्याचे कौशल्य त्यांच्याकडे भरपूर होते. यांच्यातच त्यांनी निर्माण केलेल्या यॉडलिंगला तुलनाच नव्हती. उदाहरणच द्यायची झाल्यास, “पडोसन” आणि “प्यार का मौसम”या चित्रपटातील गाणी ऐकतांना, त्यासारख्या कंठकौशल्याचा पुरेपूर पडताळा घेता येतो.
नौशाद, शंकर-जयकिशन, मदन मोहन, हेमंतकुमार, चित्रगुप्त, एस,डी. बर्मन, आर.डी बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी इत्यादी संगीतकारांकडे गायलेल्या रचना ऐकताना वरील सांगीत बहुलत्वाचे प्रत्यंतर येते. रफीसारख्यांची स्पर्धा असून देखील ते सुमारे १७ वर्षे उच्च स्थानी विराजमान होते. “आराधना” नंतर तर काही काळ लकप्रियतेत इतरांपेक्षा फारच पुढे होते. इतर गायकांना डाचणारी generation gap त्यांच्याबाबतीत संपूर्णपणे निष्प्रभ होती, असे म्हणायला कसलाच प्रत्यवाय नसावा. शास्त्रोक्त संगीताची टाळी नसताना ते सर्व प्रकारची गाणी अधिकाराने गात असत. उदाहरणार्थ “मेरे नैना सावन भादो” (चित्रपट महेबुबा) सारखे लयीला अतिशय अवघड गाणे अतिशय ठोसपणे सादर केले आणि तसे करताना त्यातील शिवरंजनी रागाची  बरीच मेहनत केली असावी असे वाटते.  त्यांचा आवाज पातळ नव्हता पण अगदी रुंद वा जाड देखील नव्हता. जास्तीतजास्त डिड सप्तकाचा पल्ला धुंडाळाणे त्यांना जमत असे, पण तेंव्हा तसे गाताना कुठेही चाचपडणे नव्हते. त्यांचे अष्टपैलुत्व असे की, रुंजी घालणारे “हुस्न  भी है उदास” (चित्रपट फरेब) या गीतापासून ते अगदी आनंदाने धिंगाणा घालण्याचे गाणेही ते अतिशय रंगून गात असत. मी खालील प्रमाणे काही उदाहरणे देतो जेणेकरून माझा मुद्दा अधिक ठाशीवपणे सिद्ध होईल.
        गाणी                       वैशिष्ट्य                         चित्रपट 
इना मीना डिका            रॉक अँड रोल                        आशा
दुखी मन मेरे                 गंभीर आणि अंतर्मुख              फंटूश
कोई हमदम ना रहा        मधुर, दु:खभरे                      झुमरू
मेरे नैना सावन  भादो       आवाहक, पारंपारिक             महेबुबा
 
राजकपूर, देवानंद आणि दिलीपकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीस तीन अभिनयशैली असे म्हटले जाते आणि त्यात बरेच तथ्य आहे. याच चालीवर पुढील टप्पा घ्यायचा झाल्यास, किशोरकुमार यांनी चौथी शैली प्रदान केली असे मान्यच करायला हवे. प्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांनी “किशोर कुमार हे सर्वोत्तम गायक होते” हे मत व्यक्त केले आणि ते मनापासून केले असणार. कारण, त्यांच्याच  काळात सगळेजण रफींना घेत असताना, आणि बिस्वास यांनी अतिशय तुरळक किंवा अपवादात्मक प्रसंगीच रफींच्या आवाजात गाणी तयार केली.
किशोर कुमार यांनी सर्वात प्रथम “झुमरू” या चित्रपटाची निर्मिती केली – साल १९६१. त्या चित्रपटात त्यांनी “कोई हमदम ना रहा” या अविस्मरणीय गीताची रचना रचना केली. याच चित्रपटात त्यांनी “मैं हूं झूम झूम झुमरू” सारखे गीत लिहिले. या रचनेत त्यांनी आपल्याकडील सगळ्या कंठगत कौशल्यांना भरपूर वाव दिला, असे म्हणता येते.
थोडेसे मूल्यमापन 
थोडक्यात आपण किशोर कुमार गुणवत्तेचे मूल्यमापन करायला घेऊ.
कंठगत कामगिरी 
१) त्यांच्या कंठगत-कारागिरीची फार मोठा विस्तृत पट्टा ही त्यांच्या जमेची फार मोठी बाजू आहे. याबाबतीत समकालीनांत त्यांचा हात धरणारा कुणीही आढळत नाही. एका गायकांकडून इतके परिणाम मिळणे ही गोष्ट अजिबात सामान्य नव्हे. किशोर कुमार जे कण्ठध्वनिपरिणामपट उपलब्ध करून देऊ शकत, त्यात पुढील काही गोष्टींचा समावेश करता येईल. यॉडलिंग आणि शिट्टी, विविध स्वरवर्णांवर हुंकारयुक्त गायन, ला ला ला वगैरेंचे गायन, नि:श्वास, खाकरणे – खोकणे, हा ही हू हे ध्वनी, अर्धमूक्त, पूर्णमुक्त वा खुला आवाज.
२) एकापाठोपाठ पुरुष व स्त्री आवाजात गायन.
३) अगदी सपाट आवाजात गाणे वा सहकंपनयुक्त आवाजात सादरीकरण.
४) स्वरवर्ण व व्यंजनवर्ण बंद करून अगदी एकरेषात्म गाणे
५) विविध प्रमाणात नाकातून गाणे
६) आंदोलित वा द्रुतकंपनयुक्त गायन
७) सांगीत चरणास गद्यत्व देऊन वा उलट प्रकारे गायन करणे
८) द्रुतगती गायनात उत्साहपूर्ण स्वन कायम पातळीवर राखणे
९) सुरेल, नाजूक आणि अंतर्मुख गायन करणे.
कॉमिक गीते 
या प्रकारची गीते गाताना, त्यांनी त्या गायनात खास लक्षणे प्रदान केलेली आहेत.
१) सुरावटीस न बिघडवता फेसाळणारा कॉमिक स्वर सांभाळण्यात तर त्यांचे कौशल्य अतुलनीय असेच होते. २) लोकगीतशैलीप्रमाणे चरण वा शब्द इत्यादी खाली न-स्वारी क्षेत्रात सोडूनही चालीतला सांगीत गुणधर्म राखणे सहजशक्य होत असे.
३) त्यांनी बोलीभाषेतील लगाव – शब्द वा चरणास लागू करून, अनेक गीते रंगवली आहेत.
४) वाद्यध्वनी किंवा त्यांचा रंग, गायनांतून ऐकविणे, हा देखील कॉमिक शैलीचा एक  आणि तो मार्ग किशोर कुमार सहजपणे चोखाळू शकत.
सैगल आणि एस.डी.बर्मन यांचे सर्जक अनुकरण 
सैगल याचे अनुकरण करूनच त्यांनी गायनाच्या क्षेत्रात प्रवेश मिळवला आणि हे तर आपणांवर पाहिलेच आहे. एस.डी.बर्मन यांचा एक खास लोकगायकांसारखा – सुरेल पण सरळ वा सपाट, काहीसा अलिप्त आणि थेट, पूर्ण ताकदीने फेक केलेला लगाव होता. हे दोन्ही लगाव किशोर कुमार सुंदररीत्या उचलत असत.
तांत्रिक सफाई 
या गायकाकडे असलेल्या तांत्रिक सफाई व कामगिरीमुळे बंगाली लोकसंगीत किंवा भक्तिसंगीत, रॉक अँड रोल, कर्नाटक शैलीचे शास्त्रोक्त संगीत, आणि नाईट क्लब गीते, या सगळ्या रचनांमधून ते विनासायास वावरत असत. लय या अंगाबाबत कधीही किशोर कुमार अडचणीत सापडलेले दिसत नाहीत.
मात्रांच्या तालात बसवलेली चाल, राहुल देव बर्मन याचन्हे एकसमयी अवतरणार एकाधिक लयबंध, द्रुत गती किंवा आघाती किंवा कव्वाली प्रकारचे बांध – या सगळ्यांचे सादरीकरण किशोर कुमार अगदी बिनचूक आणि परणामकारकतेने करत असत.
एक गैरसमज 
किशोर कुमार यांच्या अपरिमित लोकप्रयतेवर भुलून अनेक गायक कलाकार या क्षेत्रात आले.त्यांच्याप्रकाराची गाणी गाण्याचा प्रयत्न देखील केला बरेचवेळा अपयश आले. त्या अपयशाची सांगती लावताना, किशोर कुमार काही शास्त्रोक्त संगीताची तालीम घेतलेले कलाकार नव्हते तेंव्हा आपल्याला देखील त्याची अजिबात जरुरी नाही असा विपर्यास करू लागले आणि स्वतः:चे अपयश लपवण्याचा नवीन मार्ग शोधायला लागले. यात एक मेख नेहमीच विसरली जाते – किशोर कुमार अतिशय डोळस आणि दैवी देणगी लाभलेले गायक होते. अशी श्रीमंती लाभलेले कलाकार नेहमीच विरळा असतात. इथेच किशोर कुमार आणि इतर गायक यातील फरक स्पष्ट होतो.
— अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..