नवीन लेखन...

जीवन ध्येय

प्रभूची लीला न्यारी   विश्वाचा तो खेळ करी

कुणी न जाणले तयापरी   हीच त्याची महिमा   ।।१।।

जवळ असूनी दूर ठेवितो   आलिंगुनी पर भासवितो

विचित्र त्याचा खेळ चालतो   कोणी न समजे त्यासी   ।।२।।

मोठे मोठे विद्वान   त्यांत कांहीं संतजन

अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन   विश्लेषन करिती प्रभूचे   ।।३।।

कांहीं असती नास्तिक   कांही  असती आस्तिक

त्यांत कांही ज्ञानी मस्तक   चर्चा करिती प्रभूची   ।।४।।

सत्य परिस्थीती ऐसी   कुणी न जाणले प्रभूसी

सर्वांची चालना तर्कासी   प्रभू अस्तित्वा विषयीं   ।।५।।

फक्त एकमुखी वाच्यता    असे ती सर्वता

महान शक्ति असता   त्या ब्रह्मांडामध्यें    ।।६।।

सर्वानी जाणले एक    ‘अपूर्व शक्ति’ ह्याचा चालक

त्याच उर्जेचे हे प्रतीक   सारे विश्वमंडल   ।।७।।

कुणी नाहीं दुजा भाव   समजोनी त्या शक्तीची ठेव

ज्ञान विज्ञान देती नाव   निरनिराळे त्या शक्तिसी   ।।८।।

कुणी म्हणती राम    कुणी म्हणे रहीम

कुणी संबोधती गौतम    येशू असे कुणाचा   ।।९।।

परी तत्व नसे वेगळे   नांवे होत निरनिराळे

सामान्यास ते न कळे    हीच खरी शोकांतिका   ।।१०।।

सारे जीवन निघून जाई   परी त्या शक्तीचा बोध न होई

विश्लेषण करीत राही    त्याच्या अस्तित्वाविषयी   ।।११।।

जाणावी ती शक्ति   रुप आकार त्यासी नसती

शक्ति समजोनी करावी भक्ति   आदरभाव ठेवून   ।।१२।।

मानवजन्म श्रेष्ठ ठरविला  विशेष बुद्धी मिळून त्याला

विचार शक्ति उमजण्याला    सर्वप्राण्यामध्ये   ।।१३।।

बहूत झाले विद्वान     कर्तव्याने मिळवी मान

मानव जातीची ती शान   ह्या संसारी   ।।१४।।

मार्ग निरनिराळे दाखवी   सारे मिळती एक ध्येयी

सर्वार्पण त्या शक्ती होई   ध्येय मिळतां जीवनाचे   ।।१५।।

विचार करा मनाशी   वैर आपले आपणाशी

नसते केंव्हां प्रभूशी    हेच मूळ दुःखाचे   ।।१६।।

वाद नसतो ध्येयापरी   चर्चा असे मार्गापरी

हीच मानव निर्मिती खरी   सर्व सुख दुःखाची   ।।१७।।

तथा कथीत पंडित    सामान्यात विद्वान होत

ज्ञान त्यांचे थोडेसे ज्यास्त   बहूजनांपेक्षां   ।।१८।।

वापरुन ज्ञान शक्ति    सामान्यजनास वाकविती

आपले अस्तित्व स्थापती   प्रभू शक्तिसी विसरुन   ।।१९।।

तर्क शक्ति थोर    आहे चा नाही करणार

नाहीं ला आहे म्हणणार   ज्ञानाचा खेळ करुनी   ।।२०।।

मार्गाचा करुनी भेद   करीत राही वाद

जीवन करी बरबाद   विसरुनी ध्येयासी   ।।२१।।

ध्येय असे महान   मार्ग हे साधन

साधनास साध्य समजून   वाया जाई आयुष्य   ।।२२।।

साध्य नका समजू साधनासी   ठेवा विश्वास साध्यासी

कोणत्याही साधनाने गेल्यासी  साधका प्राप्त होई साध्य   ।।२३।।

निरनिराळ्या मार्गाचे प्रयोजन   ज्ञान शक्ती वापरुन

स्व अस्तित्व ठेवण्या टिकवून   केले असे   ।।२४।।

आस्तित्वाची भावना मोठी   प्रत्येक झगडतो त्यासाठीं

आयुष्य खर्ची त्या पोटी   सकळजन   ।।२५।।

न कळे त्यास देवपण   भांडण्यांत जाई विसरुन

आयुष्य मातीमोल करुन   टाकीत असे   ।।२६।।

विसरुन जा सर्व भेद   मिटवा वादविवाद

लहान मोठ्यांचा संवाद   नष्ट करा त्वरीत   ।।२७।।

सारेच आहे समान   न कुणी मोठे न लहान

घ्या सारे समजून   असती सारे मानवनिर्मित   ।।२८।।

ज्ञात धर्म होत अनेक   हे मानवनिर्मीत प्रतिक

सर्व मार्गाचे ध्येय एक   न कळे अज्ञानामुळे   ।।२९।।

मानव शक्ति तीच ईश्वर   दुसरा नसे कोणी वर

आपणची देतो त्यासी आकार   सगुण रुप देऊनी   ।।३०।।

मानवता हाच धर्म खरा   आपसातील भेद विसरा

प्रभू देई तयाना आसरा  जीवन सुखी करण्या   ।।३१।।

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..