नवीन लेखन...

ईश्वर नाम भाषेचे जनक – श्री संत राममारुती महाराज

(लेखक – दिलीप प्रभाकर गडकरी)

युनोतर्फे २००५ साली केलेल्या पहाणीनुसार जगात ६९१२ भाषा बोलल्या जात होत्या. भाषा तज्ञांच्या मते दर पंधरा दिवसांनी जगातील एक भाषा कायमची नष्ट होते. अशीच एक ईश्वर नाम भाषा १८९३ साली निर्माण झाली आणि २८ सप्टेम्बर १९१८ रोजी नष्ट झाली. त्या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे ती एका व्यक्तीने निर्माण केली. पंचवीस वर्ष वापरली, ह्या पंचवीस वर्षात त्यांनी इतर कोणत्याही भाषेचा वापर केला नाही. जगात ती भाषा फक्त त्यांनीच वापरली व त्यांच्या निधनानंतर ती भाषा नष्ट झाली. ही सुध्दा ईश्वराचीच इच्छा दुसरे काय ?

ईश्वरनाम भाषेचा जन्म एका चमत्कारिक प्रसंगातून झाला. ह्या भाषेचे जनक श्री संत राममारुती महाराज १८९३ साली काशीक्षेत्री आपल्या गुरुबंधु समवेत एका सिध्दांतावर चर्चा करण्यासाठी एका बठकीसाठी गेले. तेथे अनेक विद्वान व्यक्ती जमल्या होत्या. एका सिध्दांतावर खूप वादविवाद सुरू होता. गुरुबंधुनी सिध्दांतावर योग्य प्रतिपादन करण्याचा प्रयत्नं केला. परंतु विद्वानांचे समाधान झाले नाही. इतकावेळ गप्प बसलेल्या श्री संत राममारुती महाराजांनी प्रतिपादन केले त्यामुळे सर्वांचे समाधान झाले. सर्वानी महाराजांचे कौतुक केले. परंतु त्यांचे गुरुबंधु मात्र नाराज झाले. त्यांनी महाराजांना सागितले की तुमचे भाष्य योग्य व निर्णायात्मक असले तरी त्यामुळे मला थोडा कमीपणा आला. हे बरोबर झाले नाही. कारण मी येथील कायमचा रहिवासी आहे. हे ऐकून महाराजांचे मन उदास झाले. नकळत का होईना आपल्यामुळे आपल्या गुरुबंधुनां त्रास झाला. त्यामुळे महाराजांनी गुरुबंधुच्या पायांवर डोके ठेऊन क्षमा मागितली व “अशा वादासाठी यापुढे मी भाषा वापरणार नाही, या क्षणांपासून मी प्राकृत भाषेचा त्याग करत आहे” असे सांगितले .
महाराजांना प्राकृत भाषेचा त्याग करून मौन पाळणे शक्यच नव्हते. त्यांनी अल्पावधीत स्वतःची एक स्वतंत्र ईश्वरानाम भाषा तयार केली. त्यात ईश्वराची फक्त बावीस नांवे वापरली. ‘रामचंद्र’ या नावाचा उपयोग केवळ ईश्वरनाम घेण्यासाठी होत असे. आनंदमय स्थिती दर्शवण्यासाठी ‘श्रीराम’ शब्द वापरला जात असे .(यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास डॉ.सौ.आशा अशोक गडकरी लिखित दोनशे सहा पानी “योगीराज चैतन्यमूर्ती श्री राममारुती महाराज यांचे चरित्र” ह्या ग्रंथातील पान नंबर ६७ ते ७२ वाचावे.)

महाराज स्वनिर्मित भाषेत व्यवहारीक व पारमार्थिक विषयांवर सुध्दा ओघवत्या भाषेत प्रतिपादन करीत. त्यांच्या बोलण्याचा अर्थ सामान्य लोकांनासुध्दा अल्प सहवासाने स्पष्ट समजत असे. इतकेच नाही तर ही कर्णमधुर भाषा अशीच त्यांच्या तोंडून ऐकत रहावी अशी प्रबळ इच्छा ऐकणाऱ्या सर्वांच्यात निर्माण होत असे. विशिष्ट व्यक्तींचे नांव व क्वचित प्रसंगी न समजलेले वाक्य दगडी रुळाने पाटीवर लिहून दाखवित. या ईश्वरनाम भाषेत महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या शाळकरी मुलांना अवघड गणिते सोडवून देत व त्यांच्या रिती सुध्दा समजाऊन सांगत. याच भाषेत महाराज अनेक विद्वान व्यक्तींबरोबर तत्वज्ञानावर चर्चा करत.

ईश्वरनाम भाषा ही फक्त बावीस शब्दांचीच तरीही परीपूर्ण होती. या भाषेशिवाय इतर कोणत्याही भाषेचा एकही शब्द तोंडातून न निघणे व बावीस ईश्वरनामा शिवाय एकही इतर कुठलेही ईश्वरनाव तोंडातून न निघणे याला प्रचंड मनोनिग्रह, दृढनिश्चय व जागरूक बुध्दी इत्यादी महान गुणांचा समुच्चय व्यक्तीच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यांच्या अलौकिक साधूत्वाने व सामर्थ्याने ही ईश्वरनाम भाषा शेवटपर्यंत अगदी जन्मजात भाषा असल्या सारखी वापरली. हे एका सिध्द योग्यालाच जमू शकते. महाराजांनी ही भाषा विवक्षित रितीने बसवली होती. ते ती भाषा इतके जलद बोलत की जणू काय आपल्या व्यवहारातीलच भाषा आहे असा भास होई. महाराजांनी १८९३ पासून २८ सप्टेंबर १९१८ म्हणजे निधनापर्यंत जवळ जवळ पंचवीस वर्ष ही भाषा वापरली.

“ईश्वरनाम भाषा” अल्पावधीत तयार केली. फक्त त्यांनीच पंचवीस वर्ष वापरली व त्यांच्या निधनानंतर त्या भाषेचा अस्त झाला .ही सुध्दा ईश्वर इच्छाच दुसरे काय ? ही जगातील एकमेव भाषा ठरेल यात शंकाच नाही .

— दिलीप प्रभाकर गडकरी
कर्जत -रायगड
मोबाईल -९०८२९५३०५३

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..