नवीन लेखन...

हुस्नलाल-भगतराम पैकी हुस्नलाल

हिंदी सिनेमांतील पहिली संगीतकार जोडी म्हणून ओळख असलेले हुस्नलाल-भगतराम पैकी हुस्नलाल यांचा जन्म १९१६ मध्ये जालंधर येथे झाला. हुस्नलाल व भगतराम हे दोघेही लाहोरच्या सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू. हुस्नलाल उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते. वयाच्या १७-१८ व्या वर्षीपासून त्यांनी लाहोर, अमृतसर, दिल्ली येथील बर्यानचशा मैफिली व्हायोलिनवर शास्त्रीय संगीत वाजवत गाजवल्या होत्या. त्या व्यतिरिक्त ते उत्तम शास्त्रीय गायकही होते. अमरनाथ यांनी आपल्या धाकट्या भावांना १९४३ साली मायानगरी मुंबईत धाडलं.

प्रभातचा ‘चॉंद-१९४४’ हा ह्या जोडीचा पहिला चित्रपट. आणि बघता-बघता ‘दो दिलोंको ये दुनिया मिलने’ ह्या गाण्यानं संपूर्ण अखंड भारतात धुमाकूळ घातला. १९४६ साली पुन्हा या जोडीच्या वाट्याला प्रभातचाच ‘हम एक है’ आला. हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीला तीन नवे कलाकार देणार होता. गुरुदासपूर/लाहोरचा देव आनंद, पेशावरचा रेहमान व मंगलोरचा गुरू दत्त पदुकोण. गंमत म्हणजे गुरू दत्त हा या चित्रपटाचा नृत्य-निर्देशक होता. यातील गाणी फारशी लोकप्रिय होऊ शकली नाहीत. १९४७ च्या जून मध्ये ‘मिर्झा साहिबान’ प्रदर्शित झाला. ‘मिर्झा साहिबान’ या चित्रपटाचे मूळ संगीतकार अमरनाथ होते, पण १९४५ साली त्यांचे आकस्मिक निधन झाले व अन्य काही कारणांमुळे हा चित्रपट रखडला व शेवटी बॅकग्राऊंड संगीत व बर्यापच गाण्याचं रेकॉर्डिंग याची जबाबदारी हुस्नलाल- भगतराम यांनी समर्थपणे पार पाडल्याचे एकदा नूर जहानने स्वतः सांगितले होते.

‘आजा तुझे अफसाना जुदाई का सुनाये’, ‘हाथ सीनेपे जो रख दो’ ही यातील काही आजही आवडीनी ऐकली जाणारी गाणी. या दोघांनी आपली सिने करियर ची सुरवात १९४४ मध्ये प्रदर्शित चित्रपट “चांद” पासून केली. या चित्रपटातील “दो दिलों की ये दुनिया” गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

१९४८ पासून हुस्नलाल भगतराम जोडी खर्याल अर्थानी नावारूपास आली. ‘प्यार की जीत’ हा सुरैया, रेहमान अभिनीत चित्रपट प्रचंड गाजला व गाजली ही गाणी – ‘तेरे नैनों ने चोरी किया (सुरैया) व ‘एक दिल के टुकडे हज़ार हुए’ (मोहम्मद रफी). मूळची लाहोरची सुरैया ही त्याकाळातील अव्वल दर्जाची अभिनेत्री होती आणि तिची गाणी ती स्वतःच गात असे. तिने ९ सिनेमांमधून ६० च्या आसपास गाणी या जोडीकरिता गायिली आहेत. त्यावरून या जोडीच्या लोकप्रियतेची कल्पना येऊ शकते वाचकांना. एवढी गाणी तिची कोणत्याही अन्य संगीतकारा बरोबर नाहीत. ‘वो पास रहें’ (बडी बहन-१९४९), ‘इसका क्या मतलब है’ (सनम-१९५१), ‘बेकरार है कोई’ (शमा परवाना – १९५४) ही काही अविस्मरणीय सुरैय्याची गाणी त्यांच्या संगीतातील. १९४८ साली महात्मा गांधीच्या हत्येनंतर आलेल्या बापूंकी अमर कहानी या चित्रपटाला हुस्नलाल- भगतराम यांनी संगीत दिले होते. मोहम्मद रफी यांनी गायलेले राजेद्र कृष्णा लिखित हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते.

१९४९ पासून लता मंगेशकर त्यांच्यासोबत आल्या. लता मंगेशकर म्हणजे एक हिरा., शास्त्रीय संगीताची अभूतपूर्व बैठक त्यांच्या स्वरांना, पण पार्श्व्गायनाचे पैलू या हिर्या्ला ज्यांनी पाडले असतील त्यात हुस्नलाल भगतराम यांचा प्रामुख्याने समावेश करणे आवश्यक आहे. लता मंगेशकर यांना प्रत्येक रचना हुस्नलाल पेटी अथवा व्हायोलिनवर वाजवून दाखवत असत आणि त्या मग त्या स्वरांना हुबेहूब आपल्या गायनात उतरवत असत. १९४९-५७ या ८ वर्षांच्या काळात लता मंगेशकर या जोडीच्या २५ च्या वर चित्रपटांतून शंभर हून अधिक गाणी गायल्या. लता मंगेशकर यांच्या कोवळ्या स्वरांतील ‘दर्द’ आपणांस जाणून घ्यायचा असल्यास हुस्नलाल-भगतराम यांना ऐकणे भाग आहे. साहजिकच आहे, ते स्वतःही लताबाईंच्या स्वरांवर तेवढेच भारावलेले असावेत. त्यांच्या अनेक रचनांमध्ये त्यांनी लताबाईंकडून कमालीचे सुरुवाती आलाप गाऊन घेतले आहेत, जे अगदी हृदय हेलावून सोडतात.

उदाहरणार्थ- ‘जो दिल मे’ (बडी बहन-१९४९), ‘जिगर के टुकडे किये’ (सरताज-१९५०), ‘मोहब्बत मे हंसी’ (स्टेज-१९५१), ‘जुदाई की खबर’ (आंसू-१९५३). कस काढलाय् लताबाईंचा! अन्य माझी काही आवडीची विरह गीतं आहेत – ‘लूट गयी’ (जलतरंग-१९४९), ‘दिल ही तो है’ (आधी रात-१९५०), ‘ठहर हो जानेवाले’ (बिरहा की रात-१९५०), ‘दर्द-ए-जुदाई’ (छोटी भाभी-१९५०), ‘अगर दिल किसीपे’ (गौना-१९५०), ‘आंसू अब तुम’ (काफिला-१९५२).
असे अजिबात नाही की हुस्नलाल-भगतराम यांनी लता मंगेशकर यांना केवळ विरह गीतंच गायला दिली. ‘चूप-चूप खडे’ (बडी बहन-१९४९), ‘तेरी अंखिया’ (सावन भादो-१९४९), ‘काहे धीरे’ (राखी-१९४९), ‘ना जाना ना जाना मेरे बाबू’ (छोटी भाभी-१९५०), ‘वो आए बहारें’ (अफसाना-१९५१), ‘तेरी गली में (फर्माइश-१९५३) अशी कित्येक साध्या चालीची, परंतु अत्यंत मंजुळ गाणी देखील दिली आहेत. ‘राजा हरिश्चंनद्र-१९५२’ मधील ‘गोरी-गोरी चांदनी’ हे गाणं म्हणजे गोडव्याचा कळस आहे. हार्मोनियम व सतार पूरक आहेत लताबाईंच्या स्वरांना. कहर केला आहे या गाण्यात.

तसेच ‘आंसू-१९५३’ मधील ‘आँखोंका तारा प्राणो से प्यारा’ रसिकांनी अवश्य ऐकावे. सुरुवातीला व्हायोलिन व त्यांनंतर इंटरल्यूडमध्ये सतार यांचा अप्रतिम वापर या गाण्याची वैशिष्ट्ये हुस्नलाल-भगतराम यांनी स्वरबद्ध केलेल्या लता-रफी यांच्या युगल गीतांबद्दल काय बोलावे? ‘जरा तुमने देखा’ (जल तरंग-१९४९), ‘छोटासा फसाना है’ (बिरहा की रात-१९५०), ‘पास आके हुए’ (मीना बाजार-१९५०), ‘हमे दुनिया को दिल’ (आधी रात-१९५०), ‘दिल लेके दिल दिया’ (स्टेज-१९५१), तू चंदा मै चांदनी (राजा हरिश्चंणद्र-१९५२), ‘दिन प्यार के’ व ‘सून मेरे साजना’ (आंसू-१९५३) ही त्यांची काही अजरामर गाणी. मागे मला बोलताना खय्याम म्हणाले होते की पहाडी धूनवर आधारित ‘सून मेरे साजना’ हे त्यांच्या अत्यंत आवडीचे गीत आहे. इतकेच नव्हे, तर हे गीत त्यांनी व त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांनी गाऊन देखील दाखवलं. खय्याम व शंकर सुरुवातीच्या काळात हुस्नलाल-भगतराम यांचे सहाय्यक ही होते. मोहम्मद रफी यांच्या करीयर मध्ये हुस्नलाल-भगतराम यांचा मोठा हात आहे. हुस्नलाल-भगतराम यांनी मोहम्मद रफी यांना पहिला ब्रेक दिला होता.

गीता दत्त, झोहराबाई, मुकेश, तलत मेहमूद, आशा भोंसले, सुमन कल्याणपूर इत्यादी कलाकार देखील त्यांच्याकरिता गायले आहेत. तलतची ही दोन गाणी – ‘मुहोब्बत की हम’ (फर्माइश-१९५३) व ‘ए मेरी जिंदगी’ (अदल-ए-जहांगीर-१९५५) तर सुप्रसिद्ध आहेत. १९५२ पासून ते व्यावसायिक पिछाडीवर पडत गेले, त्यात भर पडली त्यांच्या कौटुंबिक समस्यांची. १९५५ पासून तर त्यांना प्रतिष्ठित सिनेमे मिळणे ही कठीण होत गेले. नशिबी येत होते ते दुय्यम दर्जांचे सिनेमे. तरी देखील, लताबाईंची संपूर्ण साथ १९५७ पर्यंत त्यांना राहिली. ‘आनबान-१९५६’, ‘मिस्टर चक्रम-१९५६’ आणि ‘कृष्ण सुदामा-१९५७’ ही लताबाईंची त्यांच्यासमवेत काम केलेली शेवटची ३ सिनेमे. लताबाई १९५६-५७ साली दुय्यम दर्जांच्या सिनेमात देखील गायल्या आहेत हे कोणास सांगितल्यास विश्वाकस बसणार नाही. ‘तुने कैसी आग लगायी’ व ‘ओ आसमान वाले’ (आनबान), ‘क्यूँ झुकी जाती’ (मिस्टर चक्रम) व ‘ओ क्रिष्णा बिगडी बना दे’ (कृष्ण सुदामा) ह्या गाण्यांमधून लता मंगेशकर यांची आपल्या गुरूंबद्दल असलेली निष्ठा दिसून येते.

१९५७-५८ पासून पंडित हुस्नलाल भारतभर व्हायोलिनवर शास्त्रीय संगीत वाजवू लागले, आकाशवाणीवरही त्यांचे अनेक कार्यक्रम झालेत. १९५९ च्या सुमारास मुंबई सोडून ते अखेरीस दिल्लीला परतले. चरितार्था खातर पंडित भगतराम १९६५-६६ पर्यंत दुय्यम चित्रपटांत संगीत देत राहिले व सोबत अन्य संगीतकारांचे सहाय्यक म्हणूनही त्यांना काम करावे लागले. हुस्नलाल यांचे २८ डिसेंबर १९६८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / अजय देशपांडे

हुस्नलाल-भगतराम यांची गाणी.


हुस्नलाल-भगतराम यांची माहिती. https://www.youtube.com/watch?v=dflf6ixWJ4Q&index=2&list=PLII0LdyKA9i7EWfs2773wJYyXIXF_BVRl

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..