नवीन लेखन...

एक थेंब, तहानलेला !

लेफ्टनंट जनरल निंभोरकरांचे ते शब्द ,पाण्याच्या त्या एका थेंबाने ऐकले आणि तो एकदम उत्तेजित झाला ..थेंब रोमांचित झाला.
थेंबाचा अणुरेणू प्रफुल्लित झाला.
हे काहीतरी विलक्षण ऐकायला मिळालं होतं.
देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या अतुलनीय धैर्यवान जवानांच्या मुखातील ते शब्द थेंबानं ऐकले.
आणि जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं त्याला.
स्वर्गप्राप्तीपेक्षा लाखमोलाचे होते जणू ते शब्द .
आयुष्याच्या इतिकर्तव्यतेवर त्या शब्दांनी सुवर्णमोहर उमटवली होती.
थेंब धन्य झाला होता .
मनोमन कृतकृत्य झाला होता .

लेफ्टनंट जनरल निंभोरकर म्हणाले होते :

” कारगील क्षेत्रात अवघड पहाडी भागात पेट्रोलिंग करीत असताना सलग तीन दिवस अन्नपाण्याशिवाय काढावे लागले होते, शरीर जवळपास कोमात गेल्यासारखे वाटत होते, पण निर्धार कायम होता, पाकड्याना ठेचण्याची जिद्द कायम होती, पण पाण्याचा थेंबही कुठे दृष्टीला पडत नव्हता, हवामान खराब होतं, परिसर भयाण आणि भयावह होता, गरज होती ती पाण्याच्या एका थेंबाची, आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आमच्यातल्या एकाला थोडं पाणी दिसलं, सगळ्यांच्या जिवंत जीव आला, आम्ही पुरवून पुरवून थेंब थेंब पाणी प्यालो,आणि त्या पाण्याच्या थेंबाच्या जीवावर पाकड्याना कंठस्नान घातलं !”

बस !

आपलं जीवन सार्थकी लागलं , देशरक्षणाच्या कामी आलं , याचा त्याला विलक्षण अभिमान वाटला .
ही भावना त्यावेळी सुद्धा झाली होती , जेव्हा शेतकरी ग्रीष्माच्या उन्हात आभाळाकडे डोळे लावून बसला होता आणि अनपेक्षितपणे पावसाच्या पाण्यानं त्याच्यावर, त्याच्या लाल,काळ्या मातीवर धुवांधार वर्षाव केला होता, आणि त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात , मनात कृतज्ञतेची आसवं उभी राहिली होती.
तेव्हाही तो पाण्याचा थेंब अंतर्बाह्य थरारला होता.
रोमांचित झाला होता.
थेंबाचा अणुरेणू उत्तेजीत झाला होता.
कृतज्ञता , कृतार्थता आणि असं बरंच काही त्याच्या अंगोपांगावरून निथळत होतं.
विश्वातलं स्वर्गीय सौंदर्य, अभिजात काव्य , प्रतिभाशक्तीचं अलौकिकत्व… हे सगळं क:पदार्थ वाटलं होतं त्याला त्यावेळी.

नेमकी तशीच भावना आत्ताही दाटली होती मनात .
तरीही आपल्या दातृत्वापेक्षा सैनिकांचं कर्तृत्व परमश्रेष्ठ वाटलं होतं.
पृथ्वीवर , आपल्या समर्पणापेक्षा शेतकऱ्याच्या मनातली समाधानाची भावना त्या थेंबाला अपूर्वाईची वाटली होती.
देशभक्तीचं दुसरं नाव म्हणजे शत्रूशी लढणारे सैनिक आणि कष्टप्रद परिस्थितीत शेती पिकावणारे शेतकरी !
थेंब नम्र झाला . विनयानं त्याची मान खाली झुकली , आणि तो हादरला.
मुळापासून हादरला , भयकंपित झाला . आणि संतापला.
सहस्र सूर्य एकाचवेळी पेटून उठावेत तसं त्याचं मन पेटून उठलं.
त्यानं पाहिलं ते महाभयंकर होतं.
त्यानं पाहिलं ती कृतघ्नतेची परिसीमा होती.
शेतकऱ्यांशी, सैनिकांशी आणि खऱ्याखुऱ्या देशभक्तांशी केलेला तो द्रोह होता.
द्रोह ! राष्ट्रद्रोह !! निसर्गद्रोह !!!
पाण्याच्या निर्मळ ,पारदर्शी प्रवृत्तीला ते सारं अकल्पनीय वाटलं. अविश्वसनीय वाटलं.
कारण ;

मनुष्य पाण्याचा प्रचंड उपसा करीत होता,
पाणी अशुद्ध करीत होता,
बेजबाबदारपणे वापर करीत होता,
भविष्यकाळाची चिंता न करता पाण्याचा सर्वनाश करीत होता,
झरे उद्ध्वस्त करीत होता,
पाण्याशी द्रोह करीत होता,
पाण्यावरून भांडत होता, रक्तरंजित संघर्ष करीत होता,
जलचरांचा , निरागसांचा , वृद्धांचा , प्राणिसृष्टीचा विचार न करता केवळ आणि केवळ क्षुद्र स्वार्थापोटी पाणी संपवीत होता.

पाण्याचा तो थेंब खजील झाला.
हे सारं पाहण्यापेक्षा विरून जावसं वाटलं त्याला .
क्षणभर तो थांबला.
त्याच्या लक्षात आलं , आपणही तहानलेले आहोत.
माणसानं सर्व काही लक्षात घेऊन थेंब थेंब जपायला हवा.
अगदी प्राणाच्याही पलीकडे.
हीच तहान लागली त्याला .
आणि आशेनं तो पाहू लागला;

एकदा सैनिकाकडे , एकदा शेतकऱ्याकडे आणि…

…एकदा कृतघ्न असणाऱ्या माणसाकडे तो पाहत राहिला …

— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..