नवीन लेखन...

मधुमेह आणि रोगप्रतिकारक शक्ती

सध्या व्याधिक्षमत्व हा परवलीचा शब्द आहे . कोविड १९ च्या काळात तर याला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे . दिवाळीच्या आनंदाच्या काळात मधुमेहावर बोलणे जरा अवघडच ! पण तरीही ‘ आरोग्यं धनसंपदा ‘ हा मंत्र जपत आपणाला काही काळजी तर घ्यावीच लागणार .

व्याधिक्षमत्व म्हणजे शरीराची व्याधीपासून संरक्षण करण्याची शरीराची क्षमता . यालाच Immunity किंवा प्रतिकारशक्ती आपण म्हणू शकतो . एखादा आजार होऊ नये म्हणून शरीर स्वाभाविकपणे नैसर्गिक तत्त्वांनुसार स्वतःची काळजी घेत असते . तरीही एखादा आजार झालाच तर त्यापासून सुटका करण्याची शरीरातील पेशींची धडपड सुरू असते . या सर्वांचा अंतर्भाव व्याधिक्षमत्व या संकल्पनेत होतो .

गंमत अशी आहे की हे व्याधिक्षमत्व मोजता येत नाही . म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वजन साठ किलो आहे , हिमोग्लोबीन १२ ग्रॅम आहे तसे एखाद्याचे व्याधिक्षमत्व सांगता येत नाही . त्यामुळे संख्याशास्त्राप्रमाणे ते मांडता येत नाही . त्याचे सूत्र किंवा सुसंगत समीकरण सांगता येत नाही . अशा अनेक संकल्पना आहेत ज्यांना प्रत्यक्ष प्रमाण वा statistics मधे बसवता येत नाही . त्यामुळे एखाद्या संशोधनाने त्याची सत्यासत्यता मांडणेही कठीण जाते . म्हणूनच व्याधिक्षमत्वावर अनेक मतमतांतरे आपल्याला पहायला मिळतात .

पुस्तक वाचून पोहता येत नाही . त्यासाठी कधी ना कधी पाण्यात उतरावेच लागते . तुमचे व्याधिक्षमत्व कसे आहे याचा पडताळा आजार झाला किंवा आजाराचे संक्रमण आले तरच घेता येतो . अन्यथा आपल्याला अनुमानाने ते ठरवावे लागते .

माणसाच्या जन्मजात प्रकृतीपासून ते त्याने आहार – व्यायाम यांच्या जोरावर कमावलेल्या शरीरसंपदेपर्यंत सर्व गोष्टी याला कारणीभूत ठरतात . आधुनिक विज्ञानाप्रमाणे
१. Natural immunity आणि
२. Acquired immunity
असे ढोबळ मानाने दोन प्रकार पडतात .

Natural Immunity मध्ये जन्मजात प्रकृती , आहार , विहार आणि आचार यातून निर्माण झालेली नैसर्गिक प्रकृती या सर्वांचा समावेश होतो .

Acquired Immunity मधे लसीकरण , औषधे यातून मिळालेले व्याधिक्षमत्व आणि एखादा आजार होऊन गेल्यानंतर शरीरात निर्माण झालेल्या antigen antibodies यामुळे मिळणारे व्याधिक्षमत्व यांचा समावेश होतो .

या सर्वांसाठी कोणतेच statistics मांडता येत नाही . सर्वच निरनिराळया गोष्टींच्या परिपाकातून एकंदर परिणामस्वरूप ही घटना घडत असते . अगदी सर्वसमावेशक दृष्टीने पाहिले तर खालील पाचही मुद्यांचा यात अंतर्भाव व्हायला हवा :
१. शारीरिक
२. मानसिक
३. आध्यात्मिक
४. आर्थिक
५. सामाजिक
या पाचही दृष्टिकोनातून विचार करून आपल्याला योग्य उत्तर शोधावे लागेल . म्हणून ते प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच वेगवेगळे असणार आहे . आज आधुनिक विज्ञान Personalised medicine व्यक्तिसापेक्ष औषधप्रणालीचा विचार करू लागले आहे . यासाठी देखील व्याधिक्षमत्वाचा वेगळ्या पातळीवर कार्यकारणभाव पहावा लागेल .

कोविड १ ९ च्या बाबतही लस आली म्हणजे सर्व प्रश्न सुटतील अशा भ्रमात कुणी राहून चालणार नाही . लसीकरण हा अनेक उपायातील एक उपाय आहे . त्यातही अनेक धोके , आर्थिक गणिते आणि आंतरराष्ट्रीय वाद आहेतच . आपल्या पारंपरिक आहाराला आणि आचार पद्धतीला चिकटून रहाणे आपल्याला जास्त सोपे आहे . त्याला औषधी आणि आयुर्वेदातील रसायन चिकित्सा यांची जोड देऊन आपल्याला लढण्यासाठी सक्षम बनविणे हा राजमार्ग आहे पुन्हा एकदा विनंती , वैद्यकीय उपचार हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत . व्हॉटस्‌ऍप युनिव्हर्सिटी किंवा अमक्या तमक्याच्या सांगण्यावरून उपचार करू नयेत .

असा व्याधिक्षमत्वाला खीळ घालणारा आणि तुमच्या कामावर पाणी फिरवणारा एक आजार म्हणजे डायबेटिस . साध्या शब्दात डायबेटिस म्हणजे रक्तात वाढलेली शुगर !

प्रोटीन्स- फॅट- कार्बोहायड्रेट आपल्याला आपल्या आहारातून मिळतात . शरीर आपल्या चयापचय क्रियेतून आपल्या पेशींना पाहिजे त्या स्वरूपात आणून त्यांचे नियोजन करते . या कामी शरीरातील वेगवेगळे enzymes Harmones यांना मेंदू सूचना देतो आणि बरोब्बर काम करवून घेतो . जोपर्यंत ह्या सर्वांमध्ये सुसंवाद असतो तोपर्यंत सर्व काही आलबेल असतं , आपण निरोगी असतो . परंतु एकदा बिघाड झाला की आजारपण आलेच समजा !

आपल्याला सर्व कामात जी ऊर्जा लागते ती प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्सच्या स्वरूपात प्राप्त होते ज्या ज्या वेळी जास्त ऊर्जेची गरज निर्माण होते , त्या त्या वेळी शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वेगवेगळ्या प्रक्रियेतून वाढविले जाते . हा ताण सतत येत राहिला आणि रक्तातली शर्करा सतत वाढत राहिली तर मात्र त्याचा परिणाम वाईट घडू लागतो . तो टाळण्यासाठी इन्सुलिन नामक स्राव रक्तात येऊन त्याचे नियंत्रण करू लागतो . त्याच्याही मर्यादेबाहेर जेव्हा हे काम जाते किंवा त्याच्या कामात काही बिघाड होतो त्यावेळी ग्लुकोजचे प्रमाण अवाजवी स्वरूपात रक्तात वाढत जाते . यालाच मग डायबेटीस असे म्हणतात.

अर्थातच हे वाढलेले ग्लुकोज अनेक जीवाणू आणि विषाणूंचे आयते खाद्य असते . मग त्यांच्या टोळ्या तुमच्या शरीरात स्थलांतर करून येथेच मुक्काम ठोकतात . ही मंडळी तुमचे संविधान मानत नाहीत . ते तुमच्या अंतर्गत कारभारात बंडाळी करतात . मग एकामागून एक तुमची सगळी आरोग्य व्यवस्था आजारी पडते . येथे आहे ना लक्षात ? वाढलेले ग्लुकोज शरीरातील संस्थांना आपले काम व्यवस्थित करू देत नाही . या सर्वांचा पुन्हा एकदा अतिरिक्त ताण शरीरावर पडतो .

मधुमेहाच्या उपचारातही काही गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या पाहिजे . त्यातील प्रमुख औषधे ही रक्तातील शर्करेचे प्रमाण अवश्य कमी करतात परंतु शरीरावरील ताण किंवा इन्सुलिनचे स्रवण यात योग्य बदल करू शकत नाहीत . एका तऱ्हेने शरीराला आवश्यक असणारे ग्लुकोज फक्त कमी करतात . शरीरातील ग्लुकोज कमी होण्याची घटना वारंवार घडली की मेंदू या औषधींचा अंतर्भाव शत्रुपक्षात करतो . या शत्रुपक्षाचे सिग्नल्स सर्व पेशींना दिले जातात . बरेचदा रक्तात शर्करा वाढली तरी त्या व्यक्तीला त्याची जाणीव होत नाही . मात्र हायपोग्लायसेमिया झाला म्हणजेच शर्करा कमी झाली की लगेच कळते . ती लक्षणे पटापट निर्माण होतात .

रक्तातील शर्करा सतत कमी होत राहिली तर जिथे सातत्याने तिची गरज असते असे अवयव म्हणजे मेंदू , हृदय , यकृत आणि किडनी यांना आपल्या कामात ताण जाणवू लागतो . तसेच ज्यांना आपल्या पेशी पुन्हा तयार करता येत नाहीत अशा पेशी असणारे अवयव म्हणजे डोळ्यातील दृष्टिपटल , किडनीतील नेफ्रॉन मज्जासंस्थेतील न्युरॉन्स यांचे अपरिमित नुकसान होते .

ज्यांना इन्सुलीन बाहेरून पुरवले जाते त्यांना वेगळ्या गोष्टींना तोंड द्यावे लागते . इन्सुलिन आयतेच मिळत असल्यामुळे त्यांच्या स्वादुपिंडातील संलग्न सिस्टीम आळशी बनत जातात . रक्तात इन्सुलिन आले की मेंदूला नेहमी वाटते की ग्लूकोज पुरेसे आहे आणि तो तसे सिग्नल शरीराला विशेषतः यकृताला देतो . यानंतर पूर्णच पचन संस्था आळसावते . जर यावर नियंत्रण आणता आले नाही तर मात्र हळूहळू व्याधिक्षमत्व फारच कमी होत जाते .

एकंदरीत डायबेटिसच्या बाबतीत स्वतः आजार आणि त्याचे औषधोपचार दोघेही व्याधिक्षमतांचे खच्चीकरण करण्यास कारणीभूत ठरतात . यासाठी डायबेटिस मध्ये शुगर एका ठराविक मर्यादित ठेवणे फार आवश्यक आहे . त्याचबरोबर कमीत कमी औषधांचा योग्य मात्रेत , योग्य प्रमाणात वापर करणेही महत्त्वाचे आहे .

औषधांची मात्रा कमी करण्यासाठी शरीर आणि मनावरचा अतिरिक्त ताण कमी करणे फार गरजेचे आहे . मनावरील ताण कमी करण्यासाठी स्वतःसाठी काही नियम घालून घेणे , ध्यानधारणा करणे , ठराविक आसनांचा अभ्यास करणे आणि त्यानंतर प्राणायाम या सर्वांचा अतिशय चांगला उपयोग होतो . सद्वृत्त पालन हे यासाठी फार आवश्यक आहे .

शरीरावर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी आहार प्रामुख्याने पारंपरिक आणि आपल्या प्रकृतीनुसार घ्यावा . जिभेच्या आवडीने खाणे टाळावे . खाण्याच्या वेळा पाळणे खूप आवश्यक आहे . बरेचदा आपले काम व्यवसाय यांचे कारण यासाठी दिले जाते . पण आपली सर्व धडपड सुखी जीवनासाठी आहे . त्यामध्ये आरोग्य हा फार महत्त्वाचा स्तंभ आहे . त्याच्यासाठी जेवणाची वेळ पाळणे वा सुधारणे नितांत आवश्यक आहे .

जेवणाच्या वेळी अन्न हे पूर्णब्रह्म आहे हे ध्यानात ठेवून पूर्ण लक्ष खाण्यावर केंद्रित करावे . जेवताना पहिला घास सगळ्या पंचज्ञानेंद्रियांना सुखावेल अशा पद्धतीने खावा . म्हणजे जेवणातील तृप्ती लवकर होते आणि पुढील चयापचय क्रिया सुलभतेने होतात . जेवतानाच पुरेसे पाणी प्यावे . जेवणापूर्वी व नंतर अति पाणी पिऊ नये . जेवणाव्यतिरिक्त आपल्याला तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये . डायबेटिसच्या पेशंटस् ना तहान जास्त लागते . जेव्हा तहान लागेल तेव्हा आचमन केल्यासारखे दोन ते चार घोट पाणी प्यावे .

शरीरावरील ताण कमी करण्यासाठी आहाराबरोबरच योग्य व्यायामाचीही गरज आहे . व्यायामामुळे शरीराला स्थैर्य येते . शरीरातील सर्व सिस्टिम्स उत्तम काम करतात . महत्त्वाचे म्हणजे शरीरावरील Oxidative load ताण कमी व्हायला मदत होते . आहार आणि व्यायाम यांचा समतोल ठेवला तर सर्वच पेशी उत्तम कार्य करू लागतात . मग मधुमेहच काय कोणताही आजार तुमच्या शरीरातून लवकरच पळ काढतो किंवा तुमच्या निरोगी शरीराकडे वळूनही पाहत नाही .

ही दीपावली आनंदाने आणि मजेत साजरी करा . मात्र तीन चार दिवस मजेत घालवताना महिन्याचे इतर सर्व दिवस सर्व नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे . व्याधिक्षमत्व किंवा निरोगी शरीर ही थोड्या काळात मिळणारी गोष्ट नाही . यासाठी सतत अभ्यास आणि सराव यांची गरज आहे .

आरोग्यं धनसंपदा ! शुभ दीपावली !!

वैद्य . श्रीराम शरद खाडिलकर ,
श्रीराम पंचकर्म ,
कट्टा , मालवण
९८६०८११४०९

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..