नवीन लेखन...

गोळी ….

मुंबईतील घाटकोपरच्या पूर्वेला असलेला गारोडिया नगर हा भाग पहिल्यापासूनच उच्चभ्रू गुजराथी समाजाचा. प्रामुख्याने केमिकल्स चे कारखानदार , हिरे , किंमती खडे याचे व्यापारी यांची निवासस्थाने असलेला.
फेब्रुवारी १९९० मधे या परिसरातील इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याला राहत्या घरात लुटल्याची घटना घडली. त्यांच्या घरगड्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने दोघांचेही हात आणि तोंड बांधून ठेऊन घरातील दागदागिने आणि थोडी रोकड लुटून पलायन केल्याची जबरी चोरीची फिर्याद पंतनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर होतेच , त्यात लुटलेल्या दगिन्यांमधे बव्हंशी दागिने हिरेजडीत असल्याने लुटीची एकूण किंमतही मोठी होती.
असा काही गंभीर गुन्हा नोंदला गेला की त्या परिसराशी संबंधित क्राइम ब्रँच युनिटच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून समांतर तपास करणे अपेक्षित असते.
घाटकोपर पासून मुलुंड पर्यंत हद्द असलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या युनिट ६ मधे त्यावेळी मी नेमणुकीस होतो. सर्वप्रथम मी आणि माझे सहकारी हवालदारानी फिर्यादीच्या घरी विचारपूस केली. फिर्यादी कुटुंबीयांचा रबर उत्पादनांचा पिढीजात व्यवसाय आणि स्वतःचा कारखाना होता. दोन मोठी लग्न झालेली मुले , त्यांच्या पत्नी , मुले, आणि आईवडील अशा या मोठ्या कुटुंबाला राहण्यासाठी पाचव्या मजल्यावर भला मोठा पाच खोल्यांचा फ्लॅट होता. वय झाल्यामुळे वडील सध्या घरातच असत. एरवी आजीआजोबां बरोबर सुना नातवंडे सुद्धा घरात असत. मात्र ज्यादिवशी हा गुन्हा घडला त्याच्या आदल्या दिवशी ते वृद्ध दाम्पत्य वगळता घरतील इतर सर्वजण त्या कुटुंबाच्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेर गेले होते. नेमकी ती वेळ साधून घरगड्याने आपले काम फत्ते केले होते.
घरगड्याचे नाव विचारले . ” राजू” … अपेक्षित उत्तर मिळाले. पूर्ण नाव ?..” माहीत नाही.”
“त्याचं गाव? …
.”मद्रासी है “. आता मद्रासी म्हणजे कर्नाटक, आंध्र, केरळ किंवा तामिळनाडू अशा कोणत्याही दक्षिणेकडील प्रांतातून आलेल्या इसमाला लोक मद्रासी म्हणून संबोधतात.
“राहतो कुठे? …
” रमाबाई कॉलनीके आजूबाजूमे. कभी बोला था.”… अशी प्रश्नोत्तरे झाली.
संशयित आरोपीचा माग काढण्यात आम्हाला वाटल्या होत्या तशाच अडचणी समोर दिसू लागल्या.
पोलिसांनी असंख्य वेळा जनजागृती कार्यक्रमांद्वारे आवाहन केले असले तरी बव्हतांशी लोक आपल्या घरात कामाला ठेवलेल्या नोकराची तपशीलवार माहिती जवळ ठेवत नाहीत. हल्लीच्या काळात असते तसे आधार कार्ड वगैरे त्या काळात नव्हते. तरीही त्याचं पूर्ण नाव, राहता आणि गावाकडील पत्ता टिपून ठेवायला कितीसा वेळ लागतो? पण त्यातही बेफिकीरी असते.
असाच प्रकार मोटर वाहनांच्या संबंधी गुन्हे तपासातही होतो. गॅरेज मधे काम करणाऱ्या बहुतेक मुलांची नावे राजू, मुन्ना, छोटू अशी असतात. शाळा सोडलेली मेहेनती मुले घराला आधार म्हणून मेकॅनिकचे काम शिकू लागतात. त्यांचे उस्ताद किंवा गुरू त्यांना अशा सुटसुटीत नावाने हाक मारतात आणि ते नाव त्यांना कायमचे चिकटते.
इथे तसे नसले तरी दक्षिण प्रांतातून आलेल्या मुलांची नावे लांबलचक असल्यामुळे घरकामासाठी नोकरीच्या ठिकाणी मालक मालकीण त्याला राजू किंवा पिंटू करून टाकतात.
या दांपत्याकडे असलेला घरगडी त्या दिवशी भांडी धुणी करून दुपारी गेला .मात्र संध्याकाळी आपल्या दोन मित्रांना घेऊन परत आला. मालकीणीने दार उघडल्यावर त्याच्याबरोबर असलेले मित्रसुद्धा घरात घघुसले. त्या वृद्ध दाम्पत्याला असे काही होईल याची पुसटशी कल्पनाही नव्हती. तिघांनी घरातील टॉवेल, पंचे घेऊन शेठ, शेठाणीला खुर्चीला बांधले. दोघांनीही आरोपीना हवे ते घ्या पण आम्हाला मारू नका असे विनवले. त्यांच्यातील म्होरक्या त्याच घरातील घरगडी होता. त्याने शेठाणीला धमकावत तिच्या अंगावरील दागिने आणि कपाटाच्या चाव्या घेतल्या. लॉकर उघडून होते तेवढे दागिने आणि होती ती रोकड काढून घेतली. सुना लग्न समारंभाला गेल्यामुळे बरेचसे दागिने त्यांच्याबरोबरच गेले असल्याने ते मात्र वाचले.
२० ते २५ मिनिटे घरात वावरून तिघेही आरोपी लुटीचा माल घेऊन बाहेर पडले. ते गेल्यावर मालकीणीने महत्प्रयासाने आपले बांधलेले हात सोडवून घेतले आणि १०० नंबर फिरवून पोलिस कंट्रोल रूमला घडल्या प्रकाराची माहिती दिली. तात्काळ पोलिस हजर झाले आणि “घरातील जबरी चोरी”चा गुन्हा पंत नगर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला.
मुख्य आरोपी त्याच बिल्डिंग मधे दुसऱ्या बिऱ्हाडातही भांडी धुण्याचे काम करत असे. त्या घरातून असे कळले की त्यांच्या गिरगाव मधील बहिणीकडे जो घरगडी होता त्याचा हा लांबचा नातेवाईक होता. त्याच्याच शिफारशीवरून याने घाटकोपरला काम मिळवले होते. दुर्दैवाने शिफारस करणारा गिरगावमधील घरगडी त्यावेळी त्याची बायको आजारी असल्याने गावी गेला होता. बरं, त्याचं नाव विचारलं तर तेही “राजू ” असे कळले आणि गाव ?…..माहीत नाही.
आली का पंचाईत ! मात्र गिरगाव मधील संबंधित घराचा पत्ता , व्ही. पी. रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विल्सन स्कूलच्या बाजूला असे कळले. त्या पोलिस ठाण्यात पूर्वी नेमणुकीस असलेले माझे जुने जाणते सहकारी भरगुडे हवालदार ताबडतोब म्हणाले ” सर, आरोपी पोरं आंध्र प्रदेशची आहेत. आदिलाबाद किंवा करीम नगर डिस्ट्रिक्ट.शंकाच नको “
त्यांनी हे छातीठोकपणे सांगण्याचे कारण म्हणजे मुंबईत डोक्यावरच्या करंडीत कुल्फिचे कोन घेऊन रात्री ” कुल्फी s s ये” ओरडत फिरणारे जसे एकाच तालुक्यातील, मुंबईतील डबेवाले जसे एकाच तालुक्यातील , चौपाटीवर रात्री काळे जाकीट घालून ” तेल मालीश ” असे ओरडत फिरणारे जसे बिहारमधील एकाच भागातील तसे गिरगाव मधील विल्सन शाळेच्या परिसरातील एकजात घरगडी आंध्र प्रदेश मधील त्या ठराविक दोन जिल्ह्यातीलच असत.
आमची एक टीम ताबडतोब रमाबाई कॉलनी मधील आंध्र प्रदेशकडून आलेल्या कामगारांची राहती ठिकाणे हुडकून काढण्यासाठी रवाना झाली. जे घरगडी नव्हते ते बांधकाम मजूर म्हणून काम करणारे होते. गरिबीने पिचलेले असे राजय्या ,व्यंकय्या अशा नावाचे ते कामगार एकमेकांपासून जवळ जवळ रहात होते. त्यांच्या चौकशीत असे निष्पन्न झाले की आदल्या दिवशी एकूण पाच गाववाले रात्री घरी आलेच नव्हते. फिर्यादीच्या घरी काम करणारा म्होरक्या आरोपी या पाचामध्ये होता. सर्वांची नावे गावेही मिळाली. इतकेच नव्हे तर पाच आरोपींपैकी एकाचे वडील आम्हाला भेटले. नरसय्या नावाचा हा चाळीशीचा इसम आम्हाला तपासात मदत करण्यास स्वतःहून तयार झाला.
२४ तासाच्या आत आरोपींची ओळख पटल्याचा आम्हाला आनंद वाटत असला तरी खरे आव्हान पुढे होते. या पाचही संशयित आरोपींचे खेडेगाव रामगुंडम नावाच्या गावा शेजारी. जिल्हा आदिलाबाद , आंध्र प्रदेश. हा आणि त्याला लागून असलेला करीमनगर हे दोन्ही जिल्हे त्यावेळी नक्षलवाद्यांच्या सुळसुळाटामुळे कुप्रसिद्ध होते.
मी , भरगुडे हवालदार, अंकुश कोंडे हवालदार असे नरसय्या ला बरोबर घेऊन प्रथम हैदराबाद आणि तेथून एस टी बसने करीमनगर मार्गे आदिलाबाद जिल्ह्यामधील मंचेरियाल तालुक्यातील रामगुंडम येथे पोहोचलो. जाताना हैदराबाद येथे राज्य पोलिस मुख्यालयात जाऊन तेथील वरिष्ठांची भेट घेऊन आमच्याकडील तपासाची माहिती सादर केली आणि ज्या ठिकाणी जायचे होते तेथील संबंधित पोलिस ठाण्यासाठी आम्हाला स्थानिक पातळीवर आवश्यकता भासल्यास मदत करण्याच्या सूचना पारित करून घेतल्या. तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या भागात नक्षलवाद्यांचा सतत वावर असल्याचे सांगून आवश्यकता असल्याशिवाय आणि स्थानिक पोलिसांना कल्पना दिल्याशिवाय कोठेही फिरू नका अशा सूचना आम्हाला दिल्या. त्याबरोबरच विशेष शाखेचा एक अधिकारी आमच्याबरोबर दिला.
तेव्हाची एक आठवण न विसरता येण्याजोगी आहे. करीमनगरहून बस सुटल्यावर सुमारे एक तासाने अंधारातून आमची बस जात असताना रस्त्यात अचानक थांबली. माझ्याशेजारी बसलेल्या अधिकाऱ्याने चपळाईने हालचाल करत आपले रिव्हॉल्व्हर काढले . आणि डोळे मोठे करत मलाही कानात ” Possibly radicals. Keep your weapon ready to fire ” असे सांगितले. माझ्या जवळच्या छोट्या बॅग मधे माझे भरलेले सर्विस रिव्हॉल्व्हर होतेच. ते मी तातडीने बाहेर काढले . मात्र तसा काही प्रसंग आला नाही. वाटेत काळोखात गडीची वाट पाहत असलेल्या एका जोडप्याने गाडीला हात दाखवला होता. मंचेरियालला पोहोचल्यावर गाडीतून उतरण्याआधी त्या अधिकाऱ्याने ड्रायव्हरचा तपशील आणि गाडी क्रमांक टिपून घेतला. कारण त्याकाळी त्या परिसरात सूर्यास्तानंतर वाटेत कोणीही हात दाखवला तरी गाडी थांबवायची नाही अशा सक्त सूचना होत्या .ड्रायव्हरने गाडी थांबवली म्हणून तो अधिकारी त्याचा रिपोर्ट करणार होता.
आम्ही रामगुंडंमला रात्री पोचलो. स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन रिपोर्ट दिला . मुख्यालयातील अधिकारी बरोबर असल्याने सगळ्या प्रक्रिया सुकर झाल्या. आम्ही रात्रीच आरोपींच्या वस्तीवर जाण्याचे ठरवले होते परंतु स्थानिक पोलिस ठाण्याने रात्रीच्या वेळी कारवाईस ठाम विरोध दर्शविला. सकाळी भल्या पहाटे त्या कामगिरीवर निघण्याचे आम्ही ठरवले. आरोपी हुडकण्याच्या प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी आमच्या बरोबर असण्यासाठी दोन पोलिसांची नेमणूकही पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याने केली. हे सर्व सोपस्कार आटोपून आम्ही त्या गावातील एकुलत्या एक लॉजमधे उतरलो.
रामगुंडम हे छोटेसे गाव तेथील औष्णीक वीज केंद्रासाठी प्रसिद्ध आहे. वीज केंद्राच्या महाअजस्त्र भट्ट्या दररोज हजारो ट्रक भरून दगडी कोळसा भस्मसात करतात. त्या भट्ट्यांमुळे गावचे तापमान दिवसा कायम ४५ अंशाच्या पुढे असते
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आम्ही पोलिस आणि
नरसय्या आणि दोन पंच साक्षीदार असे पोलिस जीपने आरोपींच्या वस्तीवर २० मिनिटात पोहोचलो. नरसय्याला बुरखा घातला होता कारण त्याची ओळख त्या वस्तीवर कोणालाही पटून चालणार नव्हते. आम्हाला तिथपर्यंत नेणारा आपल्यातील नरसय्या आहे हे इतर आरोपींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना समजले असते तर नजीकच्या भविष्यात त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.
अजून उजाडले नव्हते.वस्तीवरील कुत्र्यांच्या भुंकण्याने काही दारे किलकिली झाली , मात्र हत्यारबंद पोलिसांचा जथा पाहून कोणीही घराबाहेर पाऊल टाकायला धजावले नाही.
त्या वस्तीवर आरोपींची झोपडीवजा घरे दाखवून झाल्यावर नरसय्याला एका पोलिसासोबत जीपने लॉज वर परत पाठविले.
तिथे वस्तीवर भेटलेल्या त्यातल्या त्यात समजूतदार माणसाला हेरून आरोपींची चौकशी केली. आरोपींपैकी दोघेजण दोनच दिवसापूर्वी येऊन घटकाभर थांबून लगेच हैदराबादकडे कामासाठी जातो असे सांगून निघाले होते. त्यांच्यापैकी एकाची तब्येत बरी नव्हती असेही कळले. सर्व आरोपींच्या घरांची पंचासमक्ष झडती घेतली. काही हाती लागले नाही. फक्त त्यांच्या घरातील अठराविशे दारिद्र्याचे दर्शन झाले. आजूबाजूच्या ओढे, तळ्यातील मासे पकडून आणि मिळेल त्या मोलमजुरीवर काम करून उदनिर्वाह करणाऱ्यांच्या घरात काय असणार ?
आम्ही लॉजवर परतलो.
गावात डॉक्टर किती आहेत अशी मी लॉजच्या मालकाकडे कडे चौकशी केली.तिथे रेड्डी नावाचे एकुलते एक एल. सी. पी. एस. डॉक्टर होते. त्याना जाऊन भेटलो. त्याना इंग्लिश जेमतेम कळत होते आणि हिंदीचा गंध नव्हता. हे डॉक्टर आपल्या घराच्या ओटीवरच दवाखाना थाटून होते. भाषेची कसरत करत प्रथम मी माझी ओळख करून दिली. दोन दिवसापूर्वी कोणी दोघे तरुण येऊन गेले काय अशी विचारणा करताच ते ” येस येस “, असं म्हणत घरात गेले आणि एक मध्यम आकाराचा Panasonic कंपनीचा कॅसेट टेप रेकॉर्डर घेऊन बाहेर आले. दोघांपैकी आजारी असलेल्याला औषध घेण्यासाठी ते दोन आरोपी या डॉक्टर कडे आले होते आणि फी म्हणून रोख रकमेऐवजी हा टेप रेकॉर्डर डॉक्टरना देऊन गेले होते. फिर्यादी मधे या टेप रेकॉर्डरचा उल्लेख होताच. रीतसर पंचनामा करून तो आम्ही ताब्यात घेतला. त्या केस मधील लुटीचा परत मिळालेला हा माल जरी अत्यल्प असला तरी आमचा तपास योग्य वळणावर असल्याची खात्री पटली होती.
तिकडे आणखी दिवस थांबण्यात काही हंशील नव्हते. आम्ही मुंबईत परतलो.
नरसय्या आमच्या रिमोट निगराणी खाली कामावर जात होता. तो आपल्या नात्यातल्या लोकांशी सतत संपर्कात होता. बिचारा दिवसा बांधकामाच्या साईट वर मजुरी करून संध्याकाळी विक्रोळी, भांडुप परिसरात फिरून अनेक गाववाल्यांच्या भेटी घेत असे. त्याने जमवलेल्या माहितीच्या आधारे आम्ही एक एक करून चार आरोपी उत्तर मुंबईतील वेगवेगळ्या भागातून अटक केले. त्यांच्या कडून अशी माहिती मिळाली होती की त्या वृद्ध दांपत्याकडे घरकाम करणारा सुबय्या याने या गुन्ह्याची आखणी केली होती. घाटकोपर पूर्व भागात कामाला असलेल्या आपल्या चार गाववाल्यांना एकत्र करून त्याने त्याची योजना समजावून सांगितली होती. शेठ कडे रग्गड पैसा आहे आणि इतकी लूट मिळेल की पुन्हा नोकरी करायची आवश्यकता भासणार नाही असे चित्र निर्माण करून त्याने इतरांना गुन्ह्यात सामील होण्यास राजी केले होते. गुन्हा करताना आपल्यासोबत दोघांना घरात घेऊन इतर दोघांना त्याने ,कोणी आलेच तर इशारा करण्यासाठी जिन्यात उभे करून ठेवले होते. आरोपींची संख्या पाच पर्यंत पोचल्याने गुन्ह्याचे स्वरूप ” जबरी चोरी ” वरून ” दरोडा ” या सदरात गेले.
गुन्हा केल्यावर आरोपींना कळून चुकले की अपेक्षा केली हो तशी रोख रक्कम फार काही हाती लागली नाही. जी मिळाली ती पळून जाताना प्रवास खर्चात संपत आली होती. जेवढी उरली त्यातील बरीचशी स्वतःकडे ठेऊन बाकीची म्होरक्या सुबय्याने इतरांना वाटली . लूटीतील इतर सर्व माल मात्र त्याने स्वतःकडेच ठेवला होता. गुन्हा घडल्यावर ते प्रथम गावाकडे पळून गेले. तिथे गावाबाहेरील स्मशानाजवळ उघड्या माळरानावर लूट उघडून पाहिली. त्यात जे काही दागिने होते ते जवळ जवळ सर्वच हिरेजडित होते. त्यांचा हिरमोड झाला. सोनं विकता येईल. पण या हिऱ्यांचं काय करायचं हा यक्षप्रश्न , लहानपणापासून खायची ददात असलेल्या घरात वाढलेल्या त्यांना पडला. एक मोठा चपटा दगड घेऊन त्यावर ठेऊन दुसऱ्या दगडाने एक एक करत सर्व दागिने चेचून टाकत त्यानी सोने हिऱ्यांपासून मोकळे केले. मातीत पडलेले हिरे तिथेच सोडून चेचलेल्या दागिन्यांचे सोने घेऊन खुशीत निघाले. हा ऐवज सुबय्याने स्वतः कडे ठेवला आणि काही दिवसांनी एकत्र भेटल्यावर आपण सोने विकून पैसे वाटून घेऊ असे सांगून बाकीच्यांना एकत्र न फिरण्याविषयी सल्ला देऊन स्वतः कुठे जातोय ते न सांगता निघून गेला.
अगदी खूप नव्हे परंतु काही दिवस काम न करता ढकलता येतील या विचाराने हे चारजण प्रथम हैदराबादला गेले. तिथे त्यांची राहायची सोय नव्हतीच. कामही मिळेना. तेव्हा मग सर्वांना सामावून घेणारी आणि कोणालाही उपाशी न ठेवणारी मुंबई नगरीच बरी म्हणत हे चारही जण मुंबईत परतले.
घाटकोपर पासून लांब राहिलो तर पोलिस पकडू शकणार नाहीत या भ्रमात त्यांनी विक्रोळी भांडुप परिसरात मजुरी करून गुजराण करायला सुरुवात केली होती.
त्यांच्यापैकी एका आरोपीला घेऊन आम्ही परत रामगुंडम गाठले. जिथे या आरोपींनी सोने आणि हिरे वेगळे करण्यासाठी दगडाने चेचले होते त्या जागेचा पंचनामा करून तेथील माती, पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ जशी उकरतात तशी काळजीपूर्वक तपासत त्यातील लहान मोठे हिरे जमा केले. जमीन ढेकळांची होती. त्यांच्या फटीत टॉर्च मारला की आतून हिरे चमकत . मग अगदी खालची माती काढणे भाग पडायचे. त्यात पाचू , माणिक असे किंमती खडेही मिळाले. माती लागून मळलेले हिरे पटकन दृष्टीस पडत नसत. त्यामुळे जवळ जवळ पाच फूट व्यासाचे क्षेत्र फुटभर उकरून काढून त्यातील माती काळजीपूर्वक तपासत हिरे माणके अथकपणे शोधण्याचे काम काही तास चालले.
रोकड आणि सोने सोडून बाकीचा लुटीचा बहुतेक सर्व माल आता हस्तगत झाला होता.
गुन्ह्यातील मुख्य आरोपींकडे सगळे सोने असल्याने त्याला लवकरात लवकर अटक होणे जरुरीचे होते. त्याच्या राहत्या गावातील घरात कोणीही नव्हते. ते घर बंद असल्याने त्याच्या नातेवाईक, मित्रमंडळी विषयी काही माहिती मिळत नव्हती. त्याचे वर्णन आणि इतर आवश्यक तपशील नमूद करून तो “wanted” असल्याचे आणि त्याचा सुगावा लागल्यास अटक करून मुंबई पोलिसांना तत्काळ कळविण्याबद्दलचे पत्र स्थानिक पोलिस ठाण्याला देऊन आम्ही परतलो.
मे महिना उजाडला आणि एक दिवस रामगुंडंम पोलिस ठाण्यातून आमच्या युनिट मधे फोन आला की वॉन्टेड आरोपी सुबय्या त्या पोलिस ठाण्याला सापडला आहे.
पुन्हा रामगुंडम. आम्ही विनाविलंब निघालो. यावेळी जरा अधिक उत्साहात. कारण मुख्य आरोपीला ताब्यात घ्यायचे होते.
यावेळी काही तांत्रिक कारणामुळे रेल्वे गाडी हैदराबाद येथे फार उशिरा पोहोचली. तेथून करीमनगर, मंचेरियाल करत रामगुंडंम येथे आम्ही मध्यरात्री पोहोचलो. एकदा आरोपीचा ताबा घेतला की कशालाही फुरसत मिळणार नाही अशी खूणगाठ मनाशी बांधून सर्व आवरून पोलिस स्टेशनला सकाळी लवकर गेलो.
आरोपी कुठे आहे विचारलं तेव्हा तेथील हवालदारानी खोलीतल्या एका कोपऱ्यात बोट दाखवलं.
तीन दिवसांपूर्वी पकडलेल्या या सुबय्याने केलेल्या गुन्ह्याची आणि त्यातील त्याच्या सहभागाची पुरेपूर कल्पना असलेल्या स्थानिक पोलिसांनी तो आढळताच आमचे काम हलके करण्या साठी त्याची कसून “चौकशी ” केली होती. परंतु सुबय्या लुटीतील सोन्याबद्दल काही बोलला नव्हता. ते सोने इतर आरोपींकडेच असल्याचा घोषा त्याने चालू ठेवला होता.
मी त्याच्या जवळ गेलो.
पोटाशी पाय धरुन जमिनीवर मुटकुळं करून निपचित पडून राहिलेल्या त्या अत्यंत कृश प्रकृतीच्या तरुणाच्या डोळ्यात कसलीच जाणीव दिसत नव्हती. त्याला ताबडतोब डॉक्टरकडे न्यायला पाहिजे असं मी तिथल्या अधिकाऱ्याला सांगितलं. त्यावर ” हां हां. मंचेरीयाल लेके जाना पडेगा. डॉक्टर आनेका मेसेज मिलतेही भेज देंगे l” असं सांगितलं.
अशा अवस्थेत आरोपीला मुंबईपर्यंत नेणे अशक्य होते. त्याला उभं राहण्याचेही त्राण नव्हते. त्याने सोने कुठे ठेवले आहे याची चौकशी होणे तर तातडीचे होते. माझे सहकारी हवालदार अंकुश कोंडे यांना मी खूणाऊन आरोपीला पोलिस ठाण्याच्या बाहेरील ओट्यावर घेऊन यायला सांगितले. सुबय्या उठू शकत नव्हता. कसाबसा खुरडत तो बाहेर आला. कोंडे यांनी त्याला ओट्याशी टेकून बसवला. हनुवटी छातीला टेकवून, मान खाली घालून तो बसला.
त्याला बोलतं करण्यासाठी मी त्याला पुनः पुनः हाका मारल्या. पण तो वर पाहत नव्हता.बोलण्याच्या ओघात मी त्याच्या हाताला धरून किंचित हलवले आणि हाताला अक्षरशः चटका लागला. त्याचं अंग तापाने फणफणलं होतं. कोंडे यांना मी ताबडतोब लॉजवर पाठवून माझी सुटकेस घेऊन यायला सांगितलं. दहा पंधरा मिनिटात कोंडे आले. दुसऱ्या प्रदेशात तपासाला जाताना आम्ही पोलिस नेहमी ताप , सर्दी खोकला , पोट बिघडणे यावरील जुजबी औषधे आमच्या बरोबर नेत असतो. त्यातील क्रोसिन ची गोळी आणि पाण्याची बाटली मी सुबय्याच्या पुढे धरली.
” ये दवा लो ” असे सांगताच त्याने प्रथम गोळीकडे आणि मान कष्टाने वर करत माझ्याकडे पाहिले. आणि गोळी घ्यायला नकारार्थी मान हलवली. एकतर पोलिस आपल्या हाताने औषध देत आहेत हे त्याच्या दृष्टीने अतर्क्य होते किंवा ती गोळी औषधाचीच की आणखी कसली देत आहेत याबाबत तो साशंक असावा.
मी त्याला हाक मारून ” ये देखो ” असे म्हणत त्या गोळीचा एक लहान टवका काढला आणि त्याच्या समोर तोंडात टाकून गिळला. तो प्रथमच क्षीण हसला. पुन्हा राहिलेली गोळी त्याच्या समोर केली. त्याने ती घेतली . त्यावर हळू हळू पाणी प्यायला. समोरच्या चहाच्या टपरीवरून त्याच्यासाठी मी दोन कप चहा मागवला. माझ्या बॅगमधे असलेल्या glucose बिस्किटांचा पुडा उघडून त्याच्या हातात दिला. तो विलक्षण ओशाळला. चहा बिस्कीट घेईना. औषध उपाशीपोटी घेतलं तर त्रास होतो हे त्याला सांगून त्याचे ओशाळणे कमी व्हावे म्हणून मी तिथून उठलो आणि जरा लांब गेलो. कोंडे यांनी त्याला विश्वासात घेऊन समजावून सांगितलं तेव्हां कुठे त्याने चहा बिस्किटे खाल्ली. अर्धा तास झाला असेल नसेल , त्याला तरतरी वाटू लागल्याचे स्पष्ट दिसू लागले.
मी पुन्हा त्याच्या जवळ खुर्ची टाकून बसलो.त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती. तो काहीही बोलायच्या आधी स्थानिक पोलिसांपैकी कोणी ऐकतय का याचा कानोसा घेत होता.
दुपार उलटून गेली होती .त्याच्याशी तिथे बोलण्यातून फार काही निष्पन्न झाले नव्हते. थोड्याच वेळात त्याची तब्येत बरी झाली की रिमांड घेऊन रीतसर चौकशी करू असा विचार करून “चलो , मैं निकलता हुं! “
असे म्हणून मी उठलो तोच त्याने एका हाताने माझा पाय जवळ पकडला आणि मला म्हणाला ” रुको साब.मत जाओ “. त्याच्या त्या चार शब्दात मला, का कोण जाणे एक वेगळे आर्जव जाणवले आणि मी पुन्हा खुर्चीत बसलो.
मध्यंतरी त्याला आणखी बिस्किट्स आणि गरम चहा दिल्यामुळे त्याच्या तब्येतीत तुलनेने बराच फरक पडला होता. आता तो स्वतः उठून बसू शकत होता.
तिन्हीसांजेला काळोख पडताना तो सरकत खुरडत एका झाडाजवळ गेला . कोंडे आणि माझ्याशिवाय कोणी पहात नाही ना याची खात्री करून त्याने छोट्या काडीने तिथे थोडी जमीन उकरून तिथून एक हिरा बसवलेली सोन्याची अंगठी काढून माझ्या हातात दिली. लुटीपैकीच ही अंगठी असणार हे मी ताडले आणि
” बाकी सोना कहां है ?” असं त्याला विचारताच ” मेरे ससुरालमे है . आपको सब देगा ” असं म्हणाला.
त्याला अटक करून पोलिस ठाण्याच्या लॉक अप मधे ठेऊन आम्ही लॉजवर परतलो.
दुसऱ्या दिवशी स्थानिक न्यायालयात त्याचा रिमांड घेऊन आम्ही पोलिस ठाण्यात परत आलो.
त्याच्याकडे विचारपूस केली तेंव्हा असे निष्पन्न झाले की इतर आरोपी हैदराबाद येथे रवाना झाल्यावर हा करीमनगर येथील एका सराफाकडे दगडानी ठोकून हिरे बाजूला केलेला एक दागिना विकण्यासाठी गेला. त्या सराफाला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्याने याला बसायला सांगितले आणि कुणाला तरी फोन केला. हळू आवाजात बोलणारा सराफ आपल्याबद्दल पोलिसांना खबर देतोय असा संशय येऊन सुबय्या तेथून सटकला आणि थेट गंभीररावपेट या गावी आपल्या सासरी जाऊन राहू लागला. इकडे रामगुंडम गावाजवळील त्यांच्या वस्तीतून दूर गेलेले त्याचे कुटुंबिय सुद्धा त्याच्या सासरी जाऊन राहू लागले. दोन तिन महिने लोटल्यावर पोलिसांचा ससेमिरा बंद झाला असेल या कल्पनेत बापलेक घराला भेट देण्यासाठी आले आणि स्थानिक पोलिसांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सुबय्याच्या वडिलांना धरून पोलिस ठाण्यात नेले. सुबय्या तेव्हा घरी नव्हता. मात्र तो मिळाल्याशिवाय वडिलांना पोलिस सोडणार नाहीत याची खात्री असल्याने तोही पोलिस ठाण्यात हजर होण्यासाठी गेला.
सर्व आरोपींनी ,हिरे आणि किंमती खड्यांपासून , दागिने वेगळे करण्या अगोदर त्या लुटीतील एक टपोरा हीरा बसवलेली अंगठी सुबय्याला फार आवडली होती. त्याने ती गुपचूप बाजूला काढून ठेवली होती. बाकी आरोपी गावाला येऊन काम शोधण्यासाठी पुन्हा हैदराबादला रवाना झाल्यावर तो , ती अंगठी बोटात घालत असे. पोलिस ठाण्यात हजर होण्यासाठी तो आला तेव्हा ती अंगठी त्याच्या बोटात होती.मात्र पोलिसांनी ती आपल्या हातात पहिली तर आपण पुरव्यासकट आयतेच अडकले जाऊ हे समजण्याइतका तो शहाणा होता.
पोलिस ठाण्यापाशी आला .चौकशी दरम्यान त्याच्या वयस्क वडिलांची पोलिसांनी अरोपीसारखी अवस्था केल्याचे त्याला कळले आणि तो बिथरला. अगोदर त्याने ती अंगठी पोलिस ठाण्याच्या आवारात एका ठराविक जागी मातीत पुरून ठेवली. आणि पोलिसांना सामोरा गेला. पोलिसानी त्याच्या वडिलांना सोडून दिले. सुबय्या ची दोन दिवस त्यानी फारच सक्त चौकशी केली . मात्र त्याने कबुली दिली नाही.
माझ्या ताब्यात स्वतःहून दिली होती ती हीच अंगठी. त्या अंगठीच्या केवळ खड्याची किंमत त्या काळी पासष्ट हजार रुपये इतकी होती.
सोने ताब्यात घेण्यासाठी त्याच्या सासरच्या गावाला तातडीने जाणे क्रमप्राप्त होते. त्याचे गाव गोदावरी नदीच्या पलीकडच्या बाजूला. मंचेरियाल पासून रेल्वेने बेदमपल्ली आणि तिथून
२० किलोमीटर अंतरावर गंभीररावपेठ . मंचेरीयाल स्टेशनवर आम्हाला नशिबाने लगेच रेल्वेगाडी मिळाली.
बेदमपल्ली स्टेशनवरून आम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तेथील माहितगार पोलिस अंमलदार बरोबर मिळावा म्हणून विनंती केली. प्रभारी अधिकाऱ्याने उत्तम सहकार्य करत पोलिस स्टेशन मधील जीप आणि एक माहितगार अंमलदार आमच्या दिमतीला दिला. मोठी बाजारपेठ असलेल्या या गावातील रस्ते मात्र तेव्हा अतिशय अरुंद होते. ठळकपणे दृष्टीस पडणारी एक गोष्ट म्हणजे जागोजागी दोन तीन फूट उंचीचे लाल रंगाचे छोटे चबुतरे उभे केलेले. त्याबद्दल असे कळले की पूर्वी नक्षलवाद्यांशी पोलिसांची चकमक होऊन जिथे जिथे नक्षली मारले गेले होते त्या त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी असे चबुतरे उभे केले होते .
सुबय्याची सासुरवाडी बेदमपल्ली गावापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर एका डोंगरमाथ्यावर असलेल्या आदिवासी वस्तीत होती. तेरा किलोमीटरचा रस्ता जंगलातून जाणारा चढ होता. त्या डोंगर माथ्यावर पोहोचतोय तर वस्तीच्या वेशीपाशीच आंध्र प्रदेशच्या राखीव पोलिस दलाची एक प्लाटून सामोरी आली. आम्हाला त्यानी थांबवलं . येण्याचं कारण विचारलं. ते सांगितल्यावर ते सारे जवान मराठीत बोलू लागले. बहुतेक सगळे नांदेड जिल्ह्यातील होते .आपली भाषा परक्या मुलखात कानावर पडली की किती आनंद होतो याचा प्रत्यय आला.
त्या परिसरात त्याकाळी नक्षलवादी घटकांचा सुळसुळाट असल्याने खास राखीव पोलिसांची एक प्लाटून तिथे कायम बंदोबस्ता करिता तैनात असल्याचे कळले. तिथले काम लवकरात लवकर आटोपून परत जावे असे त्या तुकडीच्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हाला सुचवले. आणि “काळजी करण्याचे कारण नाही .आम्ही तुम्हाला कव्हर करतो ” असेही आश्वासित केले.
ताडाच्या झावळ्यानी शाकारलेल्या , बांबूपासून केलेल्या चटयांच्या, शेणाने सारवलेल्या भिंतींच्या गोल आकाराच्या झोपडया वर्तुळाकार मांडून ठेवल्यासारखी रचना असलेली ती वस्ती पाहताना एखादे चित्र पहात आहोत असे वाटत होते.
आमची गाडी पुढे आणि राखीव पोलिसांची गाडी मागे असे आम्ही त्या वस्तीत सुबय्याने दाखवलेल्या झोपडीजवळ पोचलो , तेवढ्यात त्या झोपडीतून परकर पोलकं घातलेली मुलगी दोन्ही हाताने पोटाशी काहीतरी धरून दुसऱ्या झोपडीकडे धावत जाताना दिसली. ती सुबय्याची पत्नी होती.तिला पाहताच सुबय्याने तिला मोठ्याने हाक मारून थांबवले. तिच्या हातातला पत्र्याचा एक गंजलेला डबा मागून घेतला आणि तो त्याने माझ्या स्वाधीन केला. दगडाने ठोकून वाकडे तिकडे झालेले सोन्याचे सगळे दागिने त्यात होते हे सांगायला नकोच. तो ऐवज रीतसर ताब्यात घेऊन , राखीव पोलिसांचे आभार मानून आम्ही बेदमपल्ली मंचेरीयाल मार्गे रामगुंडम येथे परतलो.
सुबय्या कोणाशीही बोलत नसे . मी आणि कोंडे असे दोघे सोडले तर कुणाच्या प्रश्नाला उत्तरही देत नसे.
इथे येण्याची ही तिसरी वेळ होती. काही थोडी रोकड सोडली तर लुटीतील सर्व मालमत्ता परत मिळवण्यात आम्हाला यश आले होते. घेतलेले श्रम सार्थकी लागले होते.
मुंबई सेशन कोर्टात खटला दाखल झाला. सुनावणी दरम्यान आरोपींना जेल मधून अगोदरच कोर्टात आणून बसवून ठेवलेले असे. मी आणि कोंडे केस साठी कोर्टात गेलो की सुबय्याचा चेहेरा उजळत असे .
फिर्यादी , पंच आणि ज्याच्याकडून टेप रेकॉर्डर ताब्यात घेतला होता ते डॉक्टर , अशा सर्वांच्या साक्षी उत्तम झाल्या. डॉक्टरांच्या साक्षीच्या वेळी दुभाष्या लागेल की काय या विवंचनेत मी होतो. मात्र स्वतः न्यायमूर्ती दाक्षिणात्य आणि त्यातही तेलगू भाषा उत्तम जाणणारे होते त्यामुळें तोही प्रश्न सुटला.
सर्व आरोपींवर गुन्हा शाबीत होऊन सर्वांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
कोर्टात शेवटच्या दिवशी आरोपींना जेलमधे घेऊन जाण्याच्या आधी सुबय्याने मला हात केला. कोंडे आणि मी त्याच्या जवळ गेलो तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. पटकन वाकून त्याने दोघांना नमस्कार केला. “साब ” असं म्हणून त्याने माझा हात हातात घेऊन किंचित दाबला आणि निरोपाचं हसला.
गुन्हेगारांची चौकशी करण्याच्या पद्धतींमध्ये. ” Emotional
Interrogation Tactics ” हा विषय अलीकडच्या काळात महत्त्वाचा ठरत आहे. चौकशी करताना आरोपीच्या जाणीवांना हात घालण्याची हातोटी असली तर त्या व्यक्तीच्या मनामधे पश्चात्ताप किंवा उपरती निर्माण होते. त्यातून चौकशीचा हेतू सहज साध्य होतो , हे आता सिद्ध झालं आहे. याच सूत्राचा प्रत्यय सुबय्याच्या बाबतीत ,त्याच्या आजारपणात त्याला औषधाची गोळी दिल्याने आम्हाला अजाणतेपणी आला होता. गोळी औषधाची , परंतु त्याच्या वर्मात घुसली होती.
उत्कृष्ट तपास करत सर्व आरोपींना अटक करून , थोडीफार रोकड सोडली तर लुटीतील उरलेला सर्व माल नक्षलग्रस्त भागातून चिकाटीने हस्तगत केल्याबद्दल न्यायालयाने निकालपत्रात आमची प्रशंसा केली .
खरं तर ती प्रशंसा, मरणासन्न अवस्थेत असलेल्या एका व्यक्तिला , तो गुन्ह्यातील आरोपीत असला तरी , प्रथम वैद्यकीय मदत देण्यासाठी आम्हाला उद्युक्त करणाऱ्या माणुसकीची होती, हे मी आणि कोंडे जाणून होतो.
————————————-
-–अजित देशमुख.
( नि) अप्पर पोलिस उपायुक्त.
9892944007.
ajitdeshmukh70@yahoo.in

1 Comment on गोळी ….

  1. POLICE YA YANTRANE BADDAL SATYA KAMI AANI GAIRSAMAJ SAMAJAT JAST KARANYAT AALE TY MULE POLICE YANTRANES KAYAM DURLAKSHIT KARANYAT YETE.AAPLYA SARAKHYANCHYA LIKHANATUN SATY SAMOR YE ASATE.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..