नवीन लेखन...

अनवट-सीता रामम !

१९६५ आणि १९८५ साली मानव्य आणि प्रियकर-प्रेयसी यांच्यातील प्रेम किती जिवंत,हळुवार, रसरशीत, नाजूक आणि भिडून जाणारं होतं याचा प्रत्यय काल “सीता रामम ” बघताना आला. मूळ भाषा तेलगू असली (with English subtitles) तरी दर्जेदार कलाकृती कायम भाषेच्या अडसरांना ओलांडून “ये हृदयीचे ते हृदयी ” पोहोचविते याचा हा दुसरा अनुभव.

पहिल्यांदा पुलंनी कौतुक केलेला “शंकराभरणं ” एका रविवारी दुपारी डी डी वर रिजनल मूव्हीज अंतर्गत पाहिला होता- १९९३ किंवा १९९४ साली आणि त्यातील सोमयाजुलू आजवर आत भिनलाय. (नंतर “जाग उठा इन्सान “मध्येही त्याने डोळ्यांचे पारणे फेडले होते. असो)

सीता रामम अधून मधून “रोजा” च्या मार्गाने जातो (काश्मीर, पाकिस्तान, अतिरेकी वगैरे) पण “रोजा” चा क्वचित अंगावर येणारा बटबटीत उग्रपणा येथे संयतपणे भेटतो आणि अधिक परिणाम करतो.

“कोई होता जिसको अपना ” या गुलज़ारच्या ओळींना खोटं ठरवीत येथे अनाथ रामला भारतातून असंख्य पत्रे येतात-देशसेवेसाठी त्याने फौजी म्हणून केलेल्या महान कार्यासाठी. आणि विटंबना म्हणजे चित्रपटाच्या शेवटी भारताशी दगलबाजी या न केलेल्या गुन्ह्यासाठी पाकिस्तानात वीस वर्षांच्या कैदेनंतर ( थोडासा ” वीर जारा ” पण साम्य चिमूटभर) आपला प्राण द्यावा लागतो.

तेथील कैदेत त्याने भारतातल्या सीतेला ( प्रत्यक्षात भारतातील हैद्राबादच्या नूरजहाँ या मुस्लीम राजकुमारीला- जे त्याला अखेरपर्यंत माहित नसते)) एक पत्र लिहिलेले असते, जे पाकिस्तानी सैन्यातील हुद्देदार सचिन खेडेकर आपल्या नातीला तिच्या पर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी देतो. या पत्राचा प्रवास, सीतेचा शोध, भारत-पाक मधील कडवेपण (आतमध्ये मानव्याच्या निर्मळ झरा) आणि अकल्पित सत्य यांचा प्रवास म्हणजे हा अनवट अनुभव!

प्रमुख पात्रांमधील अशारीर, हळवं आणि एकमेकांना जपणारं प्रेम बघून थरथरायला होतं – ” हाथ से छुकर इसे रीश्तोन्का इल्जाम ” ची अनुभूती मिळते पण खाडकन लक्षात येतं -साल आहे १९६५ आणि या प्रेमाचा प्रवास आहे-१९८५ पर्यंत, वीस वर्षांचा!

त्याकाळात नवथर,अल्लड,समजूतदार आणि शेवटी प्रगल्भ प्रेम असेच दाखवायचे कारण ते तसं असायचं.

One who can’t forgive, has no right to commit mistakes
सारखं वाक्य चित्रपटाच्या प्रवाहातून अलगद माझ्या मनात जाऊन बसलंय.

सीतेच्या मैत्रिणीला आपलं नांव कसं कळालं हे प्रश्नचिन्ह घेऊन हिंडणारा राम ” अरे, तुला असंख्य पत्रं तिने पाठवलीयत पण त्याही पेक्षा खूप अधिक न पाठवलेली आहेत” असं उत्तर मिळाल्यावर आपल्यालाही या प्रेमातील निरागस अवखळपणा अनुभवायला मिळतो.

गाण्यांचे तेलगू शब्द, इंग्रजीत वाचताना इतके कोवळे आणि अर्थपूर्ण वाटले की त्या काव्याला मी मनोमन दाद दिली.

२०२२ मध्ये एक अशी कलाकृती निर्माण होते जी भारत-पाक द्वेष, हिंदू -मुस्लिम भिंती पाडून आपल्या आतवर दडलेल्या आणि कालौघात लुप्त झालेल्या खळाळत्या मानव्याला हुडकून आणते आणि आपल्या हाती आपले खरे रूप ठेवते- अलगद! हेच विशेष.
तिला सलाम!!

पांढऱ्या पडद्यावर पुन्हा विश्वास बसायला लागलाय.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..