नवीन लेखन...

चतुरंग प्रतिष्ठानचा ४७ वा वर्धापन दिन

मुंबईतील गिरणगावात सुरू झालेली आणि कालांतराने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणारी ‘चतुरंग प्रतिष्ठान’ ही संस्था. संगीत, नाटय़, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्य या क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानची स्थापना अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर १९७४ रोजी झाली. कोकणातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी सुरू केलेल्या या संस्थेच्या कामात अनेक मानाचे तुरे खोवले गेले आहेत. १९८८ मध्ये सुरू झालेली सवाई एकांकिका स्पर्धा ही त्यापैकी एक. या स्पर्धेने महाविद्यालयीन नाटय़कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. आज नाटय़-चित्रपट क्षेत्रात स्थिरावलेले अनेक कलाकार ‘सवाई’ची देणगी आहेत. दरवर्षी २५ जानेवारी रोजी आयोजित केली जाणारी ही स्पर्धा नाटय़रसिकांसाठी मेजवानी असते. सवाई एकांकिका स्पर्धेबरोबरच दिवाळी पहाट हा नवा पायंडा चतुरंगने सुरू केला आहे. चतुरंगची पहिली दिवाळी पहाट १९८६च्या दिवाळीत दादरच्या शिवाजी मंदिर नाटय़गृहात पार पडली होती. दिवाळीमध्ये पहाटे नाटक-संगीताची सुरेल मेजवानी, सर्वत्र दिव्याची आरास, फटाके, अत्तरगंध, रांगोळी, आकाशकंदील आणि त्याबरोबरच फराळ हे चतुरंगच्या दिवाळी पहाटचे स्वरूप. त्यानंतर अनेकांनी दिवाळी पहाटचा कित्ता गिरवला. मात्र चतुरंगने सुरू केलेली दिवाळी पहाट कायम चाहत्यांचा आकर्षणाचा विषय राहिली.

कोकणातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत म्हणून पुस्तके, वर्तमानपत्रे, अभ्यास वर्गही चतुरंगकडून राबवण्यात येतात. याखेरीज शाळासाहाय्य योजना, नाताळ अभ्यासक्रम, व्यवसाय मार्गदर्शन, कपडे-दूध वाटप योजना, निर्धार वर्ग अशा विविध उपक्रमांतून चतुरंग नेहमीच चर्चेत असते.

चतुरंगने गेल्या ४६ वर्षांत विविध प्रकारच्याउपक्रमांद्वारे अनेक कार्यक्रम साकारले आहेत. मुंबईतील गिरगावात सुरू झालेल्या चतुरंग प्रतिष्ठानची शाखा आज डोंबिवली, पुणे, चिपळूण, रत्नागिरी, गोवा या शहरांमध्येही वाढली आहे.

विविध क्षेत्रांत निरपेक्षपणे कार्यरत असलेल्या व्यक्तीचा कृतज्ञ भावनेने केलेला गौरव म्हणजे चतुरंगचा जीवनगौरव पुरस्कार. गेल्या अनेक वर्षांत अनेक संस्थांनी जीवनगौरव पुरस्कार सुरू केला आहे. मात्र या पुरस्काराचा पायंडा चतुरंगने केला आहे. या पुरस्काराचे ‘जीवनगौरव’ हे नाव पु. ल. देशपांडे यांनी सुचवले होते. सुधीर फडके (१९९६), प्रा. राम जोशी (१९९७), बाबासाहेब पुरंदरे (१९९८), पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९), लता मंगेशकर (२०००), बॅरिस्टर पी. जी. पाटील (२००१), श्री. पु. भागवत (२००२), नानाजी देशमुख (२००३), डॉ. जयंत नारळीकर (२००५), नटवर्य भालचंद्र पेंढारकर (२००६), साधना आमटे (२००७), पंडित सत्यदेव दुबे (२००८), डॉ. अशोक रानडे (२०१०), शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी (२०११), विजया मेहता (२०१२), डॉ. गो. बं. देगलूरकर यांसारख्या अनेकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

एक कलाकार, एक संध्याकाळ हे चतुरंगच्या कलादालनातील आणखी एक पुष्प. एका संध्याकाळी गच्चीवर जमा झालेल्या अभ्यासू प्रेक्षकांसोबत कलाकारांच्या रंगलेल्या गप्पा या उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक झाले. या उपक्रमात कलाकाराची संकल्पना व्यापक ठरवून केवळ साहित्य, चित्रपट, संगीत या क्षेत्रापुरते सीमित न राहता शैक्षणिक, संशोधन, अर्थ या क्षेत्रांतील मान्यवरांचाही समावेश करण्यात आला. येथे प्रेक्षकांसाठी खुले व्यासपीठ असते. पहिली संध्याकाळ १९८४ साली सुरू झाली. त्यावेळी केवळ ६० प्रेक्षक उपस्थित होते. मात्र हळूहळू या खुल्या गप्पागोष्टी लोकांना आवडू लागल्या आणि गच्चीवर सुरू झालेला छोटेखानी कार्यक्रम मोठय़ा स्वरूपात राबवला जाऊ लागला.

चतुरंग प्रतिष्ठानची वेबसाईट : http://www.chaturang.com

संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..