नवीन लेखन...

संरक्षणाचे धोरण ‘प्रोअॅक्टिव्ह’ हवे



पाकिस्तानला चीनकडून मिळणारी मदत आणि पाकपुरस्कृत दशहतवाद्यांच्या भारतातील कारवायांच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षाव्यवस्था अधिक सतर्क असायला हवी. आलेल्या संकटांना तोंड देण्याचे आजवरचे धोरण सोडून देऊन भविष्यात ही संकटे येऊच नयेत म्हणून प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी आपल्याला मूळ धोरणातच बदल करायला हवा.पाकिस्तानमध्ये कोणत्याही पक्षाला सत्तास्थानी राहायचे असेल तर त्यांना भारतविरोधी धोरण पत्करावेच लागते. पाकिस्तानात विकासाच्या मुद्यावर नव्हे तर भारत द्वेषाच्या मुद्यावरच राजकारण चालते असा आजवरचा अनुभव आहे. भारतात होणारे दहशतवादी हल्ले म्हणजे काश्मिरी जनतेने स्वयंस्फुर्तीने उचललेले पाऊल असे आजवर पाकिस्तानचे म्हणणे होते. काश्मीरच्या प्रश्नावर अतिरेक्यांना पाकिस्ताची केवळ सहानुभूती आहे; परंतु पाकिस्तानने कधीही या हल्लेखोरांना मदत केली नाही, असेच त्यांनी जगाला ठासून सांगितले. पण मध्यंतरी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भारतविरोधी कारवायांसाठी अतिरेकी तयार केले आणि पोसले अशी कबुली दिली. पाकिस्तानच्या जबाबदार आणि उच्चपदस्थ नेत्याने अशी जाहीर कबुली देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या डेव्हिड कोलमन हेडली यानेही मुंबई हल्ल्यासंदर्भात अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यात आणि या हल्ल्याचे नियोजन करण्यास पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सचा (आयएसआय)सक्रीय सहभाग असल्याचे मान्य केले. या घटनांमुळे भारतातील दहशतवादामागे पाकिस्तान सरकारचा हात असल्याचे ‘उघड गुपित’ जगासमोर उघड झाले. या पार्श्वभूमीवर आपण या दहशतवादाला कसे तोंड देत आहोत आणि देणार आहोत हे पाहणे महत्त्वाचे ठरते.आजवर आलेल्या संकटाला सर्व शक्तनिशी तोंड देणे असेच आपले धोरण राहिले
आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ले, संसदेवरील हल्ला, मुंबईतील बॉम्बस्फोट, ताज आणि ट्रायडेंट हॉटेलवरील हल्ला या सर्व प्रकरणांमध्ये आपण घटना घडल्यानंतरच कारवाई केली. या हल्ल्यांपासून धडा घेऊन पुढील काळात हल्ले होऊ नयेत म्हणून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करून ती अधिकच सतर्क करणे आवश्यक ठरते; परंतु आपल्याकडे तसे झाल्याचे

दिसत नाही. यापुढील काळात

तरी आपण त्या दिशेने पाऊल टाकायला हवे. पाकपुरस्कृत अतिरेकी भारतात येऊन दहशतवाद माजवतात. केवळ त्यांच्या कारवायांना प्रत्युत्तर देऊन दहशतवाद थांबणार नाही. त्यासाठी त्यांची प्रशिक्षण केंद्रे आणि दहशतवादी जाळे उद्ध्वस्त करायला हवे. अर्थात यासाठी पाकिस्तानवर थेट आक्रमण करण्याची गरज नाही. प्रत्यक्ष सैन्य न वापरता युक्तीनेही हे काम करता येऊ शकते. त्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणायला हवा.आपण थेट कारवाईसाठी कचरतो असा अनुभव आहे. जगात महासत्ता म्हणून नावारुपाला आलेल्या अमिरेकेने स्वत:वरील हल्ल्याला प्रत्युत्तर देताना दहशतवाद्यांच्या तळांवर थेट हल्ले करण्याचे धोरण अवलंबले. स्वत:चे राष्ट्रीय हित साधण्यासाठी अमेरिका इतर देशांमध्ये जाऊन युद्ध करते. इराक आणि अफगाणीस्तानवर हल्ले करून त्यांनी हे दाखवून दिले आहे. 9/11 ला अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेने पुन्हा अतिरेक्यांची वाट पाहिली नाही. त्यांनी अफगाणीस्तानमध्ये जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यांचे सैन्य अजूनही अफगाणीस्तानमध्ये आहे. आपणही अशाप्रकारे इतर देशांमध्ये जाण्याची तयारी ठेवायला हवी. आक’मक असणे म्हणजे आक’मण करणे नव्हे. पण इतरांनी आक्रमण केल्यानंतर आपण केवळ बचाव न करता त्यांच्या भूभागावर आक्रमण करणे याला आक्रमता म्हणतात. काश्मीरचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला
हे. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आरडाओरड करून हा प्रश्न धगधगत ठेवला आहे. काश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचीही त्यांची ओरड आहे. या प्रश्नाला आता आंतरराष्ट्रीय स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपण पाकिस्तानवर थेट आक्रमण करू शकणार नाही. पण सीमेच्या आत बसून संरक्षणाची कल्पना बाजूला सारायला हवी. आक्रमक धोरण म्हणजे शत्रूला आपल्या क्षमतेचा प्रत्यय यायला हवा, त्याशिवाय त्याला आपली भीती वाटणार नाही. मुंबईवर हल्ला करणार्‍या अतिरेक्यांना आपली पोहोच, संहारक क्षमता किती आहे याचा अंदाज यायला हवा. ही संहारक क्षमता वेळोवेळी वाढवायला हवी. या क्षमतेची माहिती जगालाही मिळायला हवी. पण हे नेमके सर्वांना कसे समजणार ? त्यासाठी प्रत्यक्ष ताबारेषेपासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील गावांमध्ये असलेल्या अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर आक्रमण करायला हवे. अर्थात, त्यासाठी ताबारेषा ओलांडून त्या गावामध्ये जाण्याची गरज नाही. सीमेच्या आत राहूनही आपण या केंद्रांवर अचूक हल्ले करू शकतो. एक सार्वभौम देश म्हणून इतर कोणालाही आपल्या देशात येऊन नुकसान करू देणार नाही असे मनोमन ठरवायला हवे. तरच आपल्या सीमा सुरक्षित राहू शकतील आणि आपल्यावर आक्रमण करण्यापूर्वी शत्रू दहावेळा विचार करेल.आपल्यात क्षमता आहे हे लोकांना माहित असायलाच हवे, पण त्या क्षमतेचा वापरही करू शकतो याची कल्पना सर्वांना यायला हवी. त्यासाठी ग्रामीण भागातील पैलवान केवळ रोज व्यायाम करून शरीर कमवतात असे नव्हे तर अधून-मधून ते या कमवलेल्या शरीराची प्रचितीही देत असतात. म्हणून गावातील कोणीही त्यांच्याविरुद्ध जाण्यास धजावत नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यामध्ये गावच्या प्रमुखाजवळ बंदूक असते, पण ती

केवळ दाखवायला आहे अशी इतरांची समजून होऊ नये म्हणून तो सर्वांसमोर ती साफ करतो आणि काही विशिष्ट प्रसंगी हवेत बारही उडवतो. यामुळे लोकांमध्ये त्याचा दरारा राहतो. असेच धोरण सीमेवरील सैन्याने राबवायला हवे. मुष्टियुद्धामध्येही सर्वप्रथम आक्रमण करणारा खेळाडूच जिंकतो असे पाहायला मिळते. डाव्या हाताने स्वत:चे संरक्षण करून उजव्या हाताने प्रतिस्पर्ध्यांवर पंचेस मारत राहण्यानेच विजय मिळू शकतो. विजयासाठी केवळ आक’मणाला प्रतिसाद देण्यापेक्षा स्वत:हूनच पुढाकार घेऊन कृती करणे आवश्यक असते. इंग्रजीमध्ये रिअॅक्टिव्ह आणि प्रोअॅक्टिव्ह अशा संकल्पना आहेत. रिअॅक्टिव्ह असणे म्हणजे संकट आल्यानंतर ते दूर करण्याचे प्रयत्न करणे तर प्रोअॅक्टिव्ह असणे म्हणजे पुढील काळात संकटे येऊ शकतील म्हणून त्यांना तोंड देण्याची तयारी आजच करून ठेवणे. आपण केवळ रिअॅक्टिव्ह असून उपयोग

नाही तर प्रोअॅक्टिव्ह असायला हवे.जगाच्या इतिहासात भारताने कोणत्याही परिस्थितीत

दुसर्‍या देशावर आक्रमण केले नसल्याचे आढळून येते. यालाच आपण सहिष्णुता हे गोंडस नाव दिले. या सहिष्णुतेचा गैरफायदा घेत मुघलांपासून इंग्रजांपर्यंत अनेकांनी आपल्यावर आक्रमणे केली. आता सहिष्णुतेचा नवा अर्थ लावायला हवा. आपण इतर देशांवर आक्रमण करणार नाही हे धोरण बदलायला नकोच, पण इतरांनी केलेली आक्रमणे केवळ आपल्याच भूमीत राहून परतवून लावू हाही विचार सोडून द्यायला हवा. तशी वेळ आली तर आक्रमकांच्या भूमीवर जाऊन त्यांना नेस्तनाबूत करण्याचे ध्येय ठेवायला हवे.

(अद्वैत फीचर्स)

— वा. दा. रानडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..