नवीन लेखन...

गोवरी दहन की लाकूड दहन

दहनासाठी लाकडाचा प्रघात कधी सुरु झाला हे सांगणे कठीण आहे, पण काही समाजांचे निरीक्षण केल्यावर असे आढळते की फार पूर्वी गोवरी दहन हिच परंपरा होती, त्याची काही उदाहरणे खाली नमूद केली आहेत, तसेच बऱ्याच वेळेस संभाषणात, “अर्ध्या गोवऱ्या मसणात गेल्या” या वाक्यप्रचाराचा वापर केला जातो, हेही लक्षात घेतले पाहिजे.

विदर्भात कोष्टी किव्वा हलबा समाजात पारंपारिक पद्धतीत दहनासाठी गोवरीचाच वापर करतात, आणि हि प्रथा त्यांच्यात हजारो वर्षापासून चालू आहे. मध्य प्रदेशात सर्व छोट्या गावात खूप सुंदर प्रथा आढळून आली, खेडेगावात जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा त्या गावातील प्रत्येक घरातून किमान २५-५० गोवऱ्या अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांच्याकडे सुपूर्द केल्या जातात, अथवा स्वतःच्या घराबाहेर त्या घेऊन जाण्यासाठी ठेवल्या जातात, प्रेत यात्रा रस्त्यातून जाताना अश्या तर्हेने घराबाहेर जमा केलेल्या गोवऱ्यावरच मृत व्यक्तीचे दाह संस्कार केले जातात. ही प्रथा या गावातून अनादी काळापासून जोपासली जात आहे, यातून मृत व्यक्तीचा आदर केला जातो, तसेच याचा अर्थ असा आहे कि भारत भूमीत गोवरीवरच अंत्य संस्कार करण्याची प्रथा होती.

आपल्या देशात प्रत्येक लाकूड दाह्संस्कारच्या वेळेस उपस्थीत लोक गोवरीचा तुकडा टाकून, प्रतिकात्मक गोवरी दहन केले समजून घरी जातात, पण याच लोकांना पूर्ण गोवरी दहनाचा पर्याय दिला तरीही लाकडासाठीच हट्ट धरतात, यात सुशिक्षित – अशिक्षित हा भेदभाव नाही. समाज परिवर्तन करण्यास वेळ लागतोच हे आम्ही जाणून आहोत, त्यासाठी आमची संस्था जोमाने काम करत आहे, आणि त्यात अपेक्षित यश येऊ लागले आहे.
आता भारतीय समाज लाकूड दहानाकडे कधी वळला याचा मागोवा घेऊया.

साधारण १००० व्या शतकापासून यवन भारतावर वारव्वार हल्ला करू लागले आणि अधिक, अधिक भूमी काबीज करू लागले, त्या पूर्वी या देशात लोकसंख्येच्या ४-५ पट जास्त दुध देणाऱ्या गाई – म्हशी सारखी जनावरे होती, त्यामुळे दुध व दुग्ध पदार्थ कोणीही विकत नसत कारण प्रत्येक घरात ते मुबलक असे. आपण कृष्णाच्या मथुरा-वृंदावन कथांमधून हे वाचलेले आहेच, तसेच आपल्या पौराणिक कथेतही राजे लोक प्रजेला बक्षीस अथवा भेटीच्या रुपात गाई देत असत, याचा अर्थ गाईला अन्यनसाधारण महत्व होते हे सिद्ध होते, व गाय पूजनीय मानल्यामुळे तिची कत्तल होत नसे.

यवनांना गाईचे मांस खाणे निषिद्ध नसल्यामुळे, ज्या प्रदेशात त्यांनी हल्ला केला तिथल्या गाई मारून खाण्यास सुरुवात केली, त्यामुळे शेणाची उपलब्धता कमी झाली. तसेच लढाईमुळे मरणाऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा कित्तेक पटीने वाढली, व सामुहिक दहनविधी करण्याची वेळ आली, अश्या विधीत मोठ्या प्रमाणात गोवऱ्या पुरवणे कठीण झाल्यामुळे, पर्याय म्हणून लाकडे वापरण्यास सुरुवात झाली, आणि लाकूड दहन या प्रथेने जन्म घेतला. येणाऱ्या काळात लढायांची संख्या वाढत गेली, मोठ्या प्रमाणात माणसे मारली जाऊ लागली, त्यामुळे सामुहिक दहन वाढत गेले, लाकडाचा वापर सर्रास होऊ लागला, व लाकूड दहन प्रथेला पूर्ण मान्यता मिळाली.
मी वेळोवेळी आधीच्या लेखातून सांगितले आहे, तरीही परत सांगतो की हिंदू धर्माच्या कोणत्याही ग्रंथात लाकूड दहनानेच मोक्ष मिळतो असे कुठेही लिहिलेले आढळले नाही. या ग्रंथात मोक्ष प्राप्तीसाठी दहन क्रिया आवश्यक आहे हे मात्र जरूर लिहिलेले आहे, याचा अर्थ हा होतो की दहनासाठी कोणतेही इंधन चालते.

आधुनिक जीवन शैलीचा विचार केल्यास ग्यास दाहिनी सोयीची आहे, ज्यामध्ये २ तासात रक्षा मिळते. ज्यांना याचा आक्षेप असेल त्यांनी गोवारीचा वापर करावा हि माझी आग्रहाची विनंती आहे. गोवारी दहनाचे फायदे मी या पूर्वीच्या लेखात दिलेले आहेत, आपल्या शंका समाधानासाठी ते जरूर वाचावे.

आज लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या प्रमाणात पारंपरिक इंधन उपलब्ध होणे येणाऱ्या काळात फार कठीण होणार आहे, याचा विचार करता, आम्ही आणखी एक इंधन प्रकार समोर आणला आहे, हे शेतातील तुराटी, पराटी किव्वा agrowaste पासून बनवलेल्या विटा आहेत ज्याला मोक्षकाष्ठ असे नाव दिले आहे. याचा वापर नागपूर मध्ये मोठया प्रमाणात सुरु झाला आहे, ज्यामुळे पारंपरिक इंधनाचा होणारा तुटवडा कमी करण्यात यश आले आहे. यातून शेतकरी अर्थार्जन करू शकेल, ज्यातून त्याच्या प्रार्थमिक गरजा भागू शकतील, तसेच प्रदूषणावर आळा बसण्यास मोलाची साथ लाभेल.

विजय लिमये (9326040204)

Avatar
About विजय लिमये 49 Articles
श्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.

2 Comments on गोवरी दहन की लाकूड दहन

  1. नमस्कार.
    हा माझा पुढील अभिप्राय.
    – माझ्या माहितीप्रमाणें, लोकांना शेणाची व पर्यायानें गोवर्‍यांची कमतरता पडलेली नसे. अगदी १९७०-१९८० च्या दशकापर्यंत मी खेडेगांवांत घरें शेणानें सारवलेली पाहिलेली आहेत. पूर्वी, भिती मातीच्या, भेंडाच्या असत; किवा कुडाच्या असल्या तरी त्यावर माती थापलेली असे. जमीनही मातीची असे. (हे ‘देशा’वरील घरांचें वर्णन आहे, कोंकणातील नव्हे). त्यामुळे जमीन व भिंती सारवणें आवश्यकच असे. ( आतां, खूप ठिकाणी सिमेंटची घरें झाली आहेत). तसेंच, स्वयंपाकाच्या चुलींसाठी लाकडें किंवा गोवर्‍या वापरत असत / आहेत (शहरें सोडून) .
    – त्यामुळे, गाई अधिकाधिक खाल्ल्या गेल्या म्हणून गोवर्‍या कमी मिळूं लागल्या, हें समीकरण बरोबर वाटत नाहीँ. (क्षमस्व).
    – इलेल्ट्रक दाहिनी नक्कीच सर्वोत्तम. पण ती किती ठिकाणी मिळते ? मुंबईसारख्या शहरातही अशा दाहिन्या प्रत्येक स्मशानात नाहीत. तेव्हां, इतरत्र या सोयीची वानवाच असाणार, हें उघड आहे. त्यामुळेंच, हजारो-लाखौ टन लाकूड दहनासाठी वापरलें जातें. म्हणजेच, तेवढी वृक्षतोड होते आहे. हें पर्यावरणासाठी नक्कीच चांगलें नाहीं.
    – तेव्हां सरकारनेंच पुढाकार घेऊन विद्युत-दाहिनीची सोय अधिकाधिक ठिकाणी करायला हवी.
    – अर्थात्, त्याचा एक परिणाम म्हणजे, वीजनिर्मिती व वीजवापर यांतील तफावत वाढेलच. पण त्यासाठी ( व अन्य अनेक कारणांसाठीही) पारंपारिक व अपारंपारिक वीजनिर्मिती वाढवणें , हाच एक पर्याय सरकारपुढे आहे.
    सस्नेह
    सुभाष स. नाईक

  2. नमस्कार.
    छान, माहितीपूर्ण लेख.
    लाकडांनी शवदहन इ.स १००० पासून सुरूं झालें , अशें आपण लिहिलें आहे. परंतु, महाभारतात उल्लेख आहे की, युद्धानंतर जेव्हां राजस्त्रिया कुरुक्षेत्रावर आल्या, तेव्हां त्यांनी तिथें पडलेले तुटके रथ, मोडके बाण इत्यादी वापरून तिथल्या अनेक शवांचे दहन करविले. आतां, असें हें लाकडानें दहन म्हणजे, regular practice होती, की तें एक exception होतें, याची कल्पना नाहीं. पण, हें लाकडानें दहन, कुरुक्षेत्रयुद्धकाळात , म्हणजे इ.स. पू. कांहीं शतकें-सहस्रकें आधी झालेलें आहे, हें मात्र खरें.
    दुसरी गोष्ट म्हणजे, पुरातन काळात, जंगलें खूप खूप होती. In fact, वस्तीसाठी वनें-अरण्यें जाळत असत. कृष्णार्जुनानें केलेंलें, ‘खांडववन जाळणें’ ही प्रसिद्ध घटना आहे. त्याचप्रकारें, पुरातन काळातच एका अन्य राजानेंहीं वस्तीसाठी असेंच वन जाळलेलें आहे, असा उल्लेख येतो.
    पुरातन काळात गाई खूप होत्या हें नक्कीच खरें, पण जंगलेंही खूप होती, म्हणजेच लाकडेंही खूप होती. म्हणजे, त्या काळापासूनच कदाचित् लाकडानें शवदहन होत असेल काय ?
    याबद्दल आपण कांहीं खुलासा केल्यास आभारी होईन.
    स्नेहादरपूर्वक,
    सुभाष स. नाईक.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..