नवीन लेखन...

खांबावरचा ‘मल्ल’



पूर्वी राजांच्या काळात प्रसिद्ध असलेला मल्लखांब हा क्रीडा प्रकार तसा दुर्लक्षितच. शरीराच्या सर्वांगीण व्यायामाच्यादृष्टीने आवश्यक असा हा खेळ. शरीर निरोगी राखण्याचे काम हा खेळ करतो. कोकणात असे काही कलाकार आहेत, की ज्यांच्यातील सुप्त गुणांना कधी वावच मिळाला नाही. कोकण ही कलाकारांची खाण म्हटले तर वावगे ठरू नये. क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक

क्षेत्रात कोकणातील अनेक हिरे चमकले. ‘मल्लखांब’ हा क्रीडा प्रकार तसा कठीण. पण कोकणच्या काही क्रीडापटूंनी तो लीलया पेलला. त्यातलाच एक क्रीडापटू विजयकुमार.

कोकणच्या या कलासंस्कृतीला झी मराठीने एक व्यासपीठ दिले आणि त्यामुळेच हा क्रीडा प्रकार जनसामान्यांपर्यंत पोहोचला. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या मराठमोळ्या कार्यक्रमांमधून अनेक कलाकार घडले, पुढे आले. कोकणातील कलाकारांचा कस या कार्यक्रमांतून पाहावयास मिळाला. काही शाळांमधून आजही मल्लखांबाचे प्रशिक्षण दिले जाते. खरे तर डेरवणच्या विठ्ठलराव चॅरिटेबल ट्रस्टचा विद्यार्थी विजयकुमार भल्लाने मराठी वाहिनीवर हा क्रीडा प्रकार प्रथम सादर करून चित्तथरारक अशा कसरती सादर केल्या. विजयकुमार हा संगमेश्‍वर (जिल्हा : रत्नागिरी) तालुक्यातील आरवली गावचा. त्याला लहानपणापासूनच मल्लखांबाची प्रचंड आवड आणि कुतूहल होते. शाळेच्या बागेत फिरायला जाणार्‍या विजयकुमारला तेथे सुरू असलेल्या मल्लखांबाच्या प्रशिक्षणाने प्रभावित केले. आपणही या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण घ्यावे, असे त्याला वाटले. तसा हट्टही आई, वडिलांसमोर धरला. हा खेळ शरीर आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी पोषक असल्याने पालकांनीही त्याला संमती दिली. त्यानंतर तो सहावीपासूनच प्रशिक्षण घेऊ लागला. शालेय स्तरावर होणार्‍या जिल्हा स्पर्धेत त्याने सहभाग घेतला. पण तिथे त्याला अपयशाने वाकुल्या दाखविल्या
. पण विजयची जिद्द अफाट! प्रचंड मेहनतीच्या जोरावर कोकणचे नाव उज्ज्वल करण्यासाठी त्याने कंबर कसली. मिरज येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याची निवड झाली. पण त्याच्या पदरी त्यावेळीही अपयश पडले. पण तो खचला नाही. पुन्हा जोमाने सराव सुरू केला. एक ना एक दिवस यशाला खेचून आणू हे त्याचे ध्येय होते. २००७ सालच्या मे महिन्यात १९५७च्या स्वातंत्र्य समराला १५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मल्लखांबाचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यासाठी चार मल्लखांबपटूंची निवड झालेल्यांत विजयकुमार होता. त्यामुळे त्याला थेट दिल्लीला जाण्याची संधी मिळाली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम, लालकृष्ण अडवाणी, प्रणव मुखर्जी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या स्पर्धेत विजयकुमार जिद्दीने उतरला. तृतीय बक्षिसाचा तो मानकरी ठरला. त्यानंतर सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत चौथा येण्याचा बहुमान त्याला प्राप्त केला. अकरावीला असताना विजयला आपले कौशल्य जगासमोर आणण्याची सुवर्णसंधी चालून आली. झी मराठीवर गाजलेल्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी विजयला आणि त्याच्या चमूला मिळाली. विजयकुमारने आपल्या कलेचे उत्तम सादरीकरण करून परीक्षकांनाही मोहात पाडले. मल्लखांब हा क्रीडा प्रकार काय करू शकतो, याची कल्पनाही नसलेल्या परीक्षकांना मल्लखांबाचे विविध प्रकार अनुभवता आले. या चमूला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत कला सादर करण्याची संधी मिळाली. बारावीत असताना विजयने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. सातारा येथे विभागीय स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळविला. राज्यस
्तरावर निवड होऊन मिरज येथे द्वितीय क्रमांक प्राप्त केला. राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवले. मल्लखांबाचा प्रसार करण्यासाठी विविध ठिकाणी तो प्रात्यक्षिके करतो. नवनवीन खेळाडू निर्माण व्हावेत ही त्याची प्रामाणिक इच्छा आहे. रामदेवबाबा तसेच अन्य मंत्र्यांनी त्याचा उचित गौरव केला आहे. पूर्वी शाळांमधून मल्लखांबाचे शिक्षण दिले जात असे. अनेक शाळांमध्ये हे साहित्य धूळखात पडले आहे. शाळांमधून हे शिक्षण पुन्हा दिले गेल्यास नक्कीच कोकणचे नाव जगाच्या कानाकोपर्‍यात घुमणार असल्याचा आत्मविश्‍वास विजयला आहे.
कोकणने आत्तापर्यंत अनेक कलाकार रत्ने दिली. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक मातब्बर निर्माण झाले. त्यांनी आपल्या कला कौशल्याने कोकणचे नाव उज्ज्वल केले आहे. मल्लखांबाला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. व्यायामांच्या प्रकारातही त्याला चांगले स्थान आहे. त्यामुळे या क्रीडा प्रकाराचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. खरे तर कोकणच्या हिर्‍यांनी हा क्रीडा प्रकार आजही जोपासला आहे. त्याचे जतन होणे गरजेचे आहे. विजयकुमारच्या प्रात्यक्षिकानंतर अनेक शाळांनी हा क्रीडा प्रकार शाळांत शिकविण्याची तयारी दाखविली आहे. विजयकुमारच्या जिद्दीचे हे फळ म्हटल्यास वावगे ठरू नये.
(दैनिक नवप्रभाच्या सौजन्याने…. )

— लाडोजी परब

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..