नवीन लेखन...

कौटुंबिक उत्सवाची महती



दिवाळीमध्ये सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पाहताच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. लहानपणी या दिवसांमध्ये रात्री चांदण्यांनी खच्च भरलेले आभाळ पहायला मिळायचे. दिवाळी खर्‍या अर्थाने साजरी करायची असेल तर इतरांचे आयुष्य उजळवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. दिवाळी हा सामाजिक उत्सव

नसून तो कौटुंबिक सण आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा आनंद लुटतो.’ही दिवाळी आणि नवे वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे, सुखसमृद्धीचे, भरभराटीचे जावो’ या एका वाक्यात व्यक्त झालेली ही शुभेच्छा किती तरी अव्यक्त भावना सांगून जाते. दिवाळी म्हणजे मूर्तिमंत आनंद. दिवाळीच्या निमित्ताने माणसामाणसांच्या मनातील सद्भावनांच्या ऐश्वर्याला उधाण येते. प्रत्येकाच्या घरी हा प्रकाशाचा सण धूमधडाक्यात, उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक जण आनंदाने ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ असे गुणगुणत असतो.दिवाळीच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. दिवाळीशी माझे लहानपणापासूनचे जवळचे नाते आहे. माझे बालपण खेड्यात गेले. शहरापेक्षा ग्रामीण भागातील दिवाळी खूप वेगळी असते. मुंबईत कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होत नाही. त्यामुळे मुंबईकरांना या दिवसांमध्ये तिथे राहणे असह्य होते. आमच्या गावी मात्र दिवाळी साधेपणाने साजरी व्हायची. त्या साधेपणातही सौंदर्य असायचे. पूर्वी एवढे फटाके वाजवले जात नव्हते. छोट्या टिकल्या वाजवून आम्ही फटाक्यांचा आनंद लुटायचो. पहाटे उठायचे, अभ्यंगस्नान करायचे, देवाची पूजा करायची असा आमचा दिनक्रम असायचा. सकाळी कडाक्याची थंडी असली तरी ते वातावरणही आल्हाददायक वाटायचं. दिवाळी म्हणजे फराळावर ताव मारायची मेजवानीच. ज्वारीच्या पिठाच्या चकल्या करण्याची आमच्याकडे पद्धत होती.पहाटे उठल्यावर आणि रात्रीही चांदण्यांनी खच्च भरलेले आभाळ पहायला
िळायचे. आजकाल आकाश प्रकाशाने उजळूननिघालेले असते. पण, तो प्रकाश कृत्रिम असतो. त्यामुळे पूर्वीसारखा आनंद लुटता येत नाही. आम्ही खेड्यामध्ये शेणाने महिषासूराचे चित्र काढायचो, गावातील रेडे ते उधळून टाकण्यासाठी यायचे. लक्ष्मीची आणि देवींची चित्रही शेणानेच काढली जायची. दिवाळीच्या दिवसांमध्ये गवळणींचे सुंदर लोकनृत्य पहायला

मिळायचे. अप्रतिम आणि कडाक्याच्या आल्हाददायक थंडीमध्ये आजीने आणि आईने म्हटलेल्या काकड आरतीचे सूर आसमंतात आणि आमच्या मनातही घुमायचे. त्यातून आपोआपच आमच्यावर संस्कार होत गेले. या संस्कारांचा आयुष्यभर उपयोग झाला. आता या वयात पूर्वीप्रमाणे दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटता येत नाही. कारण, तेलकट, तुपकट, गोड पदार्थ खाण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे आनंदावरही मर्यादा येतात ! दिवाळी मात्र पूर्वीइतकीच प्रसन्न, आल्हाददायक वाटते.दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व असते. आमच्याकडे लक्ष्मीपूजनाऐवजी सरस्वतीपूजन केले जाते. ग्रंथ, वह्या, पुस्तके यांची पूजा केली जाते. प्रत्येक जण आजही दिवाळीच्या निमित्ताने सांस्कृतिक वारसा सांभाळत असतो. दिवाळीतील अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. ‘अंध:कारमय वातावरणातून आम्हाला प्रकाशाकडे ने’ अशा भावनेतून ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अशी प्रार्थना केली जाते. ही सुभाषिते आजच्या काळात केवळ भ्रम ठरत आहेत. देशात आणि जगात भ्रष्टाचाराचा, फसवणुकीचा, अत्याचाराचा अंधार पसरला आहे. दिव्यांच्या साहाय्याने तो नाहीसा करणे तितकसे सोपे नाही. दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला आपल्या घरातील आणि मनातील कोपरान् कोपरा उजळवता येत असला तरी समाजातील अंधार दूर करता येत नाही याची मात्र खंत वाटते.आपण सर्वजण आपापल्या तर्‍हेने दिवाळी साजरी करतो. पण, गरिबांचा फारसा विचार केला जात नाही. परवा मी सोयाबीनच्या बाज
रात गेले होते. तेथे व्यापारी शेतकर्‍यांकडून कमीत कमी भावाने सोयाबीन विकत घेत होते. किमान किंमतीत सोयाबीन विकत घेण्याची जणू चढाओढच सुरू होती. स्वत:चा फायदा करून घेण्याच्या धडपडीत त्या गरीब शेतकर्‍यांचे किती नुकसान होत असेल याचा विचार होतच नव्हता. हे एक उदाहरण झाले. पण, आपणही येनकेनप्रकारे गरिबांची फसवणूक करतच असतो. प्रत्येकजण असेच वागत राहिला तर देशातील अंधार दूर होऊन दिवाळी खर्‍या अर्थाने कशी साजरी होणार ? त्यामुळेच ‘तमसोमा ज्योतिर्गमय’ अशी सुभाषिते म्हणजे भ्रम वाटतात. ती सत्यात उतरवायची असतील तर त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. समाजात इतरांसाठी जगणारी, परोपकार करणारी माणसेही आहेत. हे लोक इतरांचे जीवन उजळवण्याचा प्रयत्न करतात. परिस्थितीने ज्यांना शारीरिक, मानसिक व्यंग दिले आहे, अशा व्यक्तीही स्वत:च्या बळावर जीवन प्रकाशमय करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या पाहण्यात दोन्ही हात नसलेली एक मुलगी आहे. पण, या शारीरिक व्यंगावर मात करत तिने शिक्षण पूर्ण केले आहे. पायांनी लिहित, टायपिंग करत ती दहावी उत्तीर्ण झाली. आता तिला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचे आहे. त्यादृष्टीनेतिने प्रयत्नही सुरू केले आहेत. अशांना देवाने अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची शक्ती दिली आहे. अशा लोकांना मदत करण्याची आणि त्यांच्या आयुष्यात दिवाळी आणण्याची क्षमता आणि बुद्धी सगळ्यांना दे अशीच मी देवाकडे दिवाळीच्या निमित्ताने प्रार्थना करेल.आजच्या काळात दिवाळीच्या सणाला सामाजिक रूप आलं आहे. वाहिन्यांवर दिवाळीचं भडक, बाजारू आणि व्यावसायिक रूप दाखवलं जात असल्याने तो सामाजिक सण असल्याचा समज होतो. प्रत्यक्षात हा सामाजिक नव्हे तर कौटुंबिक उत्सव आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने हा सण साजरा करत असतो. गरीबाला थोडे चांगले पदार्थ खायची इच्छा असते तर श्रीमंताना पंचपक्वाने खावीशी
ाटतात. दिवाळीच्या निमित्ताने शेजारी, नातेवाईकांच्या भेटी घेतल्या जातात. भेटवस्तुंची, फराळाच्या पदार्थांची देवाणघेवाण होते. म्हणजेच ही देवाण घेवाण कुटुंबाकुटुंबांमध्ये होत असते. त्यामुळे सामाजिक दृष्टीने त्याकडे पाहणं योग्य ठरणार नाही. सामाजिक भान असलेले काही लोक दिवाळीच्या निमित्ताने अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपतात. पण, हे उमही वैयक्तिक पातळीवरचेच असतात. असे उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने दिवाळी हे केवळ एकनिमित्त असते. प्रत्यक्षात, वर्षातून कधीही मदतीचा हात पुढे करता येतो.भारतीय संस्कृती कृषिप्रधान आहे. आपल्याला एकत्र कुटुंबपद्धतीचा वारसा लाभला आहे. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत दिवाळी थाटामाटात साजरी होत असे. त्यामुळे फराळाच्या पदार्थांचा

घाट घातला जायचा. आई, आजी, काकू, विधवा नणंद अशा कितीतरी बायका एकत्र बसून फराळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात

करायच्या. काळ बदलला तशी विभक्त कुटुंबपध्दती अस्तित्त्वात आली. आजकाल चौकोनी कुटुंबातील एकटी स्त्री सगळे पदार्थांची सासंगीत तयारी करू शकत नाही. तेवढा वेळही तिच्याकडे नसतो. शिवाय, पदार्थ कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन करायला अनुभवी स्त्रीही घरात नसते. अशावेळी बाजारातून तयार पदार्थ विकत आणले जातात आणि घरी त्यांचा आस्वाद घेतला जातो. काळाच्या ओघात झालेला हा बदल स्वागतार्ह आहे. एकीकडे गरजू स्त्रिया फराळाचे पदार्थ करून विकतात आणि नोकरदार महिलांना हातभार लावतात. त्यामुळे नोकरदार महिलांची गरज भागते आणि गरजू स्त्रियांना रोजगारही मिळतो. त्यामुळे दिवाळीच्या रूपात झालेला हा बदल सकारात्मकच आहे असे मला वाटते.(अद्वैत फीचर्स)

— प्रभा गणोरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..