नवीन लेखन...

लेखक, चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर

लेखक, चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचा जन्म ११ जून १९३९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथे झाला.

नाटकाचे वेड असलेल्या, महाराष्ट्रात सिनेमासारखी नवी विज्ञानाधिष्ठित कला रुजवण्याचे खडतर काम सुधीर नांदगावकर यांनी केले. त्यांनी महाराष्ट्रात आणि भारतातही फिल्म सोसायटीची चळवळ पसरवली. सुधीर नांदगावकर यांचा प्रवास छापील माध्य्माकडून दृकश्राव्य माध्यमाकडे असा झालेला दिसतो. सुधीर नांदगावकर यांचे बालपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छायेत गेले. त्यामुळे त्यांनी सतत भाजपचाच पाठपुरावा केला. वाजपेयी-आडवाणी यांच्यावर त्यांची अपार श्रध्दा. त्यांनी भाजपसाठी मुंबई शहरात अनेक कामे केली; विशेषत: प्रसिध्दीच्या बाबत. मात्र सुधीर नांदगावकर यांनी राजकारण सिनेमाच्या क्षेत्रात येऊ दिले नाही. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नांदगावचा. त्याचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाल्यावर ते कोल्हापूरला कॉलेजात गेला व त्यांनी पदव्युत्तर शिक्षण मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमधून घेतले. तेव्हाच, ते ‘मराठा’ दैनिकात काम करत होता. पुढे, त्यांनी वसंत सोपारकरच्या सहाय्याने ‘रंजना’ नावाचे साप्ताहिक सुरू केले. ते अल्पजीवी ठरले. त्यानंतर ते तिकोने यांच्या सहकार्याने मुद्रण व्यवसायात शिरले.

सुधीर नांदगावकर हे साहित्यशास्त्राचे विद्यार्थी, ते मराठी घेऊन एम.ए. झाले. अनंत काणेकर, रमेश तेंडुलकर अशा प्राध्यापकगणांच्या संगतीत वाढले. त्यांना कवितांची विशेष आवड होती. त्यांनी काही काळ मुंबईच्या पोद्दार कॉलेज मध्ये मराठी विषय शिकवलादेखील, पण त्या काळी सारा सांस्कृतिक माहोल बदलत होता. नव्या विचारांची व त्याचबरोबर नव्या कलांची समजूत समाजात पसरत होती, त्या टप्प्यावर नांदगावकर सिनेमाकडे, माध्यम म्हणून खेचला गेले. भारतदेश तसा सिनेमावेडा १९३० नंतर (बोलपट अवतरल्यानंतर) झाला होताच. स्वातंत्र्योत्तर, ते खूळ वाढतच गेले. पोटाला मिळाले नाही तरी लोक झुंडीने सिनेमा थिएटरांत जात होते.

भारतात सिनेमाने असे व्यसनाचे स्वरूप धारण केले असताना जगात सिनेमा माध्यमातील कलात्मकता शोधण्याचे प्रयोग चालू होते आणि ते सुधीर नांदगावकर यांची पिढी वयात आली तोवर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, फिल्म सोसायटी चळवळ अशा व्यासपीठांमार्फत भारतात येऊन पोचले होते. नांदगावकर ‘फिल्म फोरम’ या संस्थेचा सभासद बनले ते १९६४-६५ च्या सुमारास. तेथे ते जागतिक सिनेमा पाहून प्रभावित झाला आणि त्यांच्या पुढाकाराने ५ जुलै १९६८ रोजी प्रभात चित्र मंडळाची स्थापना झाली. सुधीर नांदगावकर म्हणतात, की ‘प्रभात’ स्थापन करण्यामागे दोन हेतू होते: एक- फिल्म सोसायटी चळवळ दक्षिण मुंबईत केंद्रित झाली होती, ती उपनगरांत आणायची आणि दुसरा हेतू म्हणजे मराठी माणसांना चांगल्या सिनेमाची, या माध्यमातील ‘कले’ची जाण करून द्यायची. प्रभात चित्र मंडळ अव्याहत चालू आहे. सुधीर नांदगावकर यांनी दोन्ही हेतू साधण्यासाठी परोपरीने प्रयत्न केले, पण त्यांची खंत अशी, की मराठी समाज काही त्याच्या प्रयत्नांना बधला नाही. ते आपल्या डबक्यातील साहित्यकलेत खुळावून राहिला. टेलिव्हिजनचे माध्यम आल्यानंतर तर तो त्यात अधिकच रमून गेला! ‘प्रभात’ने जुने भारतीय-मराठी अभिजात सिनेमा दाखवले, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवले, वेगवेगळ्या देशांच्या उत्तमोत्तम चित्रपटकृती आणवत त्यांचे प्रदर्शन घडवले, भारतीय समांतर सिनेमाची माहिती करून दिली, चित्रपटविषयक चर्चा घडवून आणल्या, ‘प्रभात’च्या या कार्यक्रमांचा कर्ता असे तो नांदगावकर. कार्यक्रमांना प्रेक्षक-श्रोत्यांची गर्दी होई, परंतु त्यांमुळे त्यांची उत्सुकता, जिज्ञासा वाढल्याचे आढळून आले नाही. दरम्यान, सुधीर नांदगावकर हे फिल्म सोसायटी चळवळीचे कार्यकर्ता बनून गेले होते. तेच त्यांचे ‘मिशन’ झाले होते. भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय, ब्रिटिश चित्रपट समीक्षक मारी सेटन या मंडळींनी भारतातील फिल्म सोसायटी चळवळीला चालना दिली. आरंभापासून, सरकारी आश्रय लाभल्याने चळवळीचे अधिष्ठान देशाच्या चारी टोकांना पसरले, परंतु त्याचमुळे चळवळीचे कामकाज समाजात पसरायला अडचणी येऊ लागल्या, तेथे संस्थाशाही निर्माण झाली. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया व त्यांचे देशातील चार विभाग यांवर बंगाली वरचष्मा लादला गेला.
सुधीर नांदगावकर यांनी फेडरेशनमध्ये घुसून तेथील ‘बाबुशाही’ नष्ट केली, तेथे चळवळीचे ‘स्पिरिट’ आणले. ते स्वत: फेडरेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदापर्यंत पोचला. आरंभापासून, फेडरेशनच्या अध्यक्षपदी चित्रपटक्षेत्रातील नामांकित व्यक्ती -सत्यजित राय, श्याम बेनेगल- असत. नांदगावकर यांनी फेडरेशनचा कारभार सुरळीत केला. त्यात लोकशाही कार्यपद्धत आणली. ते त्यांचे संघटनकार्य कौशल्याचे म्हणून वाखाणले जाते. फेडरेशनला पन्नास वर्षे झाली तेव्हा त्याचा सुवर्णमहोत्सव दिमाखदारपणे व हेतु पूर्णरीत्या साजरा करून, नांदगावकर यांनी फेडरशनमधून व ‘प्रभात’मधूनही अंग काढून घेतले आणि त्यांनी महाराष्ट्रात पन्नास फिल्म सोसायटी सुरू करण्याचा संकल्प सोडला. त्यासाठी फेडरेशनचा ‘महाराष्ट्र चॅप्टर’ निर्माण केला. नांदगावकर तीन वर्षांत त्या टप्प्याजवळ पोहचले आहेत.

सुधीर नांदगावकर यांनी याच काळात आग्रहाने विद्यापीठीय विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सिनेमाची अभिरूची निर्माण होईल यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी ‘कॅम्पस फिल्म सोसायटी’ हा नवा उपक्रम राबवला. तेथेही त्यांच्या प्रयत्नांना उत्तम यश लाभले.

सुधीर नांदगावकर हे गेली चाळीस वर्षे चांगल्या सिनेमाची जाण मुंबई-महाराष्ट्रात, मुख्यत: मराठी समाजाला यावी यासाठी झटत आहेत. त्यांनी मुंबई या शहराचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मामी) सुरू केला, हे त्यांचे श्रेय तर फार मोठे आहे. त्यामुळे ते स्वत:ही जागतिक स्तरावर पोचला आणि त्यांनी कान्स सहित अनेक चित्रपट महोत्सवांत परीक्षक म्हणून कामगिरी बजावली आहे. अनेक नवनव्या माध्यमांमुळे जागतिक कीर्तीचे चित्रपट घरबसल्या पाहायला मिळतात, अशा वेळी ‘आपण व आपले शेजारी आणि त्यांची संस्कृती’ हे सूत्र पकडून त्यांनी ‘एशियन फिल्म फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली आणि त्यामार्फत दरवर्षी आशियाई चित्रपट महोत्सव (थर्ड आय) मुंबईत होऊ लागले. आता, तेच ‘पॅकेज’ राज्याच्या वेगवेगळ्या मोठ्या शहरांतून प्रदर्शित होऊ लागले आहे. एकाच व्यक्तीने जमीन नांगरण्यापासून पीक काढेपर्यंत शेतीची सर्व कामे करावीत तसा नांदगावकर यांचा चित्रपट अभिरुची संवर्धनासंबधातला आतापर्यंतचा हा प्रयत्न आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व प्रयत्नांत सुधीर नांदगावकर यांचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व विकसित होत गेले आहे. त्याची स्वत:ची समजूत प्रगल्भ झाली आहे. ते ‘शब्दमाध्यमाकडून चित्रमाध्यमा’कडे या संकल्पनेपर्यंत पोचला आहेत. त्याचे सूचन त्यांच्या ‘सिनेमासंस्कृती’ या पुस्तकात होते. त्यांच्या चाळीस वर्षांच्या परिश्रमाचे हे फलित आहे. महाराष्ट्रभर पसरत असलेल्या चित्रपटविषयक सुजाणपणाला योग्य अशी सामग्री या पुस्तकामधून मिळू शकते.

नांदगावकर हे स्वत: चित्रपटमाध्यमाची ओळख करून देणारे पॉवरपॉइंट लेक्चर झकास देतात. त्यांचा सर्वात आवडता दिग्दर्शक ‘सत्यजित राय’ व आवडता चित्रपट म्हणजे ‘अपु ट्रिलॉजी’. त्याबद्दल ते हळवा होऊन बोलतात. नांदगावकर यांचे ‘अभिजात’ नावाचे राय यांच्या चित्रपटांबाबतचे अनुवादित पुस्तक प्रसिद्ध आहे. पण संघटक म्हणून सुधीर नांदगावकर यांच्या कामाचे चीज या समाजात झाले नाही.

— दिनकर गांगल (थिंक महाराष्ट्र)

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..