नवीन लेखन...

जागतिक तंबाखूविरोधी दिन

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धूम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

भारतात तंबाखू नियंत्रणासाठी कायदा आहे, पण कडक अंमलबजावणीअभावी तो फक्त कागदावरच राहिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार तंबाखूमुळे जगात दरवर्षी 60 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर हा आकडा 2030 पर्यंत 80 लाख होण्याची शक्य्ता आहे. जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणात (जीएटीएस-2) महाराष्ट्रातील अल्पवयीन व तरुणांमधील तंबाखू सेवनाबाबत चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील प्रौढ मंडळींच्या तंबाखू सेवनात गेल्या सात वर्षात 31.4 टक्क्‌यांवरून 26.6 टक्क्‌यांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे, पण 15 ते 17 वयोगटातील नवतरुणांच्या तंबाखू सेवनात मात्र 2.9 टक्क्‌यांवरून 5.5 टक्क्‌यांपर्यंत वाढ झाली आहे. तंबाखू सेवन वाईटच, पण तरी तंबाखू सेवनास सुरुवात करण्याचे सरासरी वयही 18.5 (जीएटीएस-1) वरून 17.4 वर्षावर (जीएटीएस-2) येऊन पोहोचले आहे.

तंबाखूजन्य पदार्थावर लावलेल्या करामुळे सरकारच्या तिजोरीत कोटयवधी रुपयांचा महसूल गोळा होत असला तरी तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे 6 लाख व्यक्तींचा दरवर्षी मृत्यू होत असल्याचे उघडकीस आले आहे. तर दरवर्षी 8 लाख नवे रुग्ण आढळत असून; यातील 3 लाख 20 हजार रुग्ण तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत, अशी माहिती कॅन्सर पेशंट्‌स एड असोसिएशन’ने (सीपीएए)ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात आहे.

तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून; एकटया मुंबईत हे प्रमाण 25.4 टक्के आहे. याशिवाय लहान मुलांतही धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जागतिक तंबाखूविरोधी दिना’निमित्त प्रबोधनावर भर दिला जात आहे.

धूम्रपान करणाऱ्यांसोबतच याचा विपरित परिणाम इतरांवर होतो. तंबाखूच्या उत्पादनांची उपलब्धता आणि घरात एखाद्याला धूम्रपानाची असलेली सवय यामुळे लहान वयात मुलांना विविध व्यसनांची सवय होते. सध्या भारतात वयाच्या अवघ्या नवव्या आणि दहाव्या वर्षी धूम्रपानास सुरुवात करणारी मुले आहेत.

त्यामुळे धूम्रपानाशी निगडित आजारांमुळे मृत्यू होण्याची शक्याताही अधिक असते. धूम्रपान करणाऱ्या 70 टक्के लोकांना धूम्रपानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव असते आणि यातील 50 टक्के लोकांची ही सवय सोडण्याची इच्छा असते, मात्र सततच्या धूम्रपानाच्या सवयीमुळे संबंधित व्यक्तीच्या शरीरावर निकोटिनचा प्रभाव पडलेला असतो, त्यामुळे ही सवय सुटता सुटत नाही. निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी’ (एनआरटी) हा उपचार करून धूम्रपानाची सवय सोडता येते, मात्र कायमस्वरूपी हे व्यसन सोडणे व्यक्तीच्या इच्छेवरच अवलंबून असते.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्यांच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा.

— डॉ.अनिल आलुरकर.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..