नवीन लेखन...

व्हाय वुई  किल्ड गांधी

प्रत्येकानेच गांधीजींना थोडे थोडे मारले आहे, कोणी विचाराने मारले आहे कोणी आचाराने मारले आहे. जगणे आज त्या त्या भूमिकेत शिरणं व त्या त्या संदर्भासहित जगणं हेच अभिप्रेत आहे. विचार व आचार पूर्वी अमलात आणण्यासाठी होते आता ते जाहिराती मध्ये व जाहिरातीसाठी वापरले जातात. जाहिरातींना वास्तवाशी काही देणेघेणे नाही. त्या त्या क्षणांना जिंकणं एवढेच माणसांनी आत्मसात केले आहे. क्षणांनूसार  भूमिकेत बदल केला नाही की अस्तित्व धोक्यात येत आहे.

अस्तित्वासाठी माणसें वास्तव व इतिहास सुद्धा बदलण्यास तयार असतात. सोयीनुसार. गांधींच्या भूमिकेत कोणी शिरलं, कोणी शिरलंच नाही. गांधीजींची भूमिका कोणी तत्वांना तिलांजली देऊन केली कोणी तत्व जगवण्यासाठी केली. ज्यांना ज्यांना गांधी, जसे जसे समजले त्यांनी ते तसे तसे आपापल्या कुंचल्याने मनावर साकारले.

काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत त्यापैकीच गांधीजी. आपल्याच विचारांना आपल्याला ठार मारायचा असतं पण आपण तसं करू शकत नाही, वारंवार ते विचारू उफाळून येतात, तसंच गांधींचं झालं आहे. आजकाल कोणतीही भूमिका सावधपणे स्वीकारावी लागते कारण संदर्भ बदलले की भूमिका बदलावी लागते.  काही दारू पिल्या ची नक्कल करणारे असतात, तसंच गांधींच्या विचारांना न शिवता गांधी सारखे विचारवंत भासवणारे सुद्धा अनेक जण आहेत. गांधी महात्मा वगैरे असतील पण आमच्या जीवनात त्यांनी आधी निर्माण करु नये असा मानणारा सुद्धा एक वर्ग आहे.

गांधी शरीराने संपवता आला पण विचाराने नाही. सत्तेत यायला व सत्तेसाठी अनेकांना गांधीच हवेत.फोटोला हार व समाधी समोर खोटी शपथ घ्यायला गांधीच हवेत.

तिकीटासाठी कुणी लाचार

मुकुटा साठी कुणी लाचार

पक्षासाठी ही कोणी लाचार

सगळेच कसें विसरले आचार.

गांधी नंतर खूप काही बदललंय.गांधीचें आदर्श कुठे आहेत? असा प्रश्न पडतो.

आदर्श जेव्हा जयंती, पुण्यतिथी पुरते उरतात तेंव्हा ते फोटो, पुतळे यात बंदिस्त होतात.अब्राहम लिंकनचे मुख्याध्यापकास लिहिलेले पत्र व्यवहारात कुठे आहे? ते केव्हांच शाळेच्या भिंतीवर बंदिस्त झालय, खुंटीला टांगलय.जे रूचतं आणि रुजतं ते ज्ञान. जे रुचतं पण रूजत नाही ती माहिती. विचार जेव्हा रूचतात, तेंव्हाच ते आचरणात रूजतात.

गांधीची माहिती अनेकांना आहे, गांधीचं तत्वज्ञान त्याप्रमाणात रूजलं नाही. अभ्यासक्र मात गांधी टिपा द्या पुरतें उरलें आहेत.अहिंसे पेक्षा हिंसेने सर्व प्रश्न सोडवले जात आहेत.क्रिकेटच्या मैदानात आजही वांशिक टिप्पणी होते.

पिड पराई कोणीच जाणंत नाहीं. चिमुरडीवर अत्याचार करून त्यांना संपवलं जातं, जिवंत बाळं जळतात, माणसं दगड झाली आहेत केवळ मूक साक्षीदार.

गांधीच्या फोटोला व समाधीला हार घातले की लोक इतरांचे हार करायला मोकळे.

शिकण्याचे, जगण्याचे संदर्भ बदललें की गांधी तीव्रतेने आठवतात. गांधी नी जीवनशैली बदलली त्यावेळेस कुणीच मानले नाही,आता विषाणूने बदललेली जीवनशैली प्रत्येकजण आंगिकारत आहे, त्याशिवाय पर्यायच नाही. गांधीचें विचार व लोकांचे आचार एकत्र नांदत नाहीत.  अस्तित्व धोक्यात येत नाही तोपर्यंत माणसे बदलंतच नाहीत. आज माणसे अस्वस्थ आहेत उद्ध्वस्त आहेत.गांधी चलनात आहेत पण अनेकांच्या मनात नाहीत.लोकांना गांधी प्रोजेक्ट करायला आवडतो, पण प्रोटेक्ट करायला आवडत नाही.गांधीची प्रतिमा ज्या प्रमाणात वापरली जाते त्या प्रमाणात गांधीची प्रतिभा झिरपत नाही किंवा झिरपूं दिली जात नाही.

फक्त स्वतःच्या अस्तित्वाला गांधी नावाची झालर लावण्यात लोक धन्यता मानत आहेत.

गांधीनी सत्याचे प्रयोग केले पण आज असत्याचे प्रयोग  यशस्वी होत आहेत.सत्य समोर येऊ द्यायचं नाही हे नवीन तंत्र लोकांनी शोधून काढले आहे. घटना एकच असली तरी अनेक जण अनेक संहितेचा बाजार मांडण्यास उत्सुक आहेत.चरख्यावर सूत काढण्या ऐवजी लोकं ऑनलाईन सुत जमवण्यात व्यस्त आहेत. ज्ञान, कौशल्य, माहिती आता ऑनलाइन विक्रीला तयार आहेत.

पाहून शिकणारे एकलव्य आता नाहीत. ऑनलाइन मध्ये पैसे दिले की कर्तव्य संपतं.कौशल्यापेक्षा कौशल्य प्रमाणपत्र देणाऱ्या अनेक संस्था हात धुवून मागे लागल्या आहेत.द्रोणाचार्य आता खूप स्वस्त झालेत, स्वतःची ते जाहिरात करतात.एकलव्य अंगठा देत नाहीत, तर अंगठा दाखवत आहेत.

विचारात मुलं जरी ऑनलाइन असली तरी आचारात ऑफलाईन झाली आहेत हे त्यांनाही कळले नाही. संवादाचे सुद्धा कष्ट न घेणारी पिढी मूकबधिर झाली आहे.

वृद्धापकाळात नांगी टाकणाऱ्या अवयवांनी  शैशवातच नांगी टाकणें सुरू केले आहे. श्रमप्रतिष्ठा जाऊन खोटी प्रतिष्ठा जपण्यात माणसाच आयुष्य चाललें आहे. परिमांण बदलले की परिणांम बदलतात. गांधीजयंती आणि पुण्यतिथिला अभिवादन, पुतळे, चलनी नाणं, लेख,पुस्तकें, एवढ्या पुरते़च गांधी सिमित आहेत काय? असा प्रश्न पडतो.

जीभ कापून, गुडघा दाबून चित्कार थांबवायचे असेअनेक नवीन तंत्र आता आले आहेत.

मी नशा केली नाही

मी काही सांगणार नाही

हावभांव करणं माझा

जन्मसिद्ध अधिकार आहे

‘माल है क्या’ हीच जीवनाची इतिकर्तव्यता झाली आहे. समाजाचा ताल इतका बिघडला आहे की गांधीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

गांधीचा मृत्यू घडवून आणला,पण गांधीच्या मृत्यू ने इतिहास घडविला. गांधीच्या विचाराने पिढ्या घडवल्या. गांधीचा वैचारिक वारसा अजून जिवंत आहे. गांधीची साधी राहणी, उच्च विचारसरणी अजूनही रुचत नाही, म्हणून रुजत नाही.पैशांच्या मूल्ल्यां पुढे, नैतिक मूल्यें निष्क्रय झाली आहेत.

इन्सान की औलाद ने इन्सानियत कब की छोडी है.

I cannot breathe म्हणणाऱ्याला नऊ मिनिटात त्याचा श्वास जाईपर्यंत गुदमरून मारण्यात येतं. गर्भार हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अनंनस खायला दिलं जातं. अत्याचार सार्वत्रिक झाला की त्याचा वणवा होतो. अनेक अत्याचार घडतात पण ज्याची चर्चा होते तोच अत्याचार समजला जातो. भयानक क्रूर घटना समाजात  आधुनिक मोबाईल च्या टिप कागदाने  टिपता येतात व  व्हायरल करता येतात. जे व्हायरल होतं, त्याची चर्चा होते,त्याच्यावर बुद्धिवंत  चर्चा करतात,

सेमिनार, वेबीनार होतात, संशोधन पेपर सादर केले जातात,अनेकांना डॉक्टरेट पदवी मिळते. विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या  कपाटात धूळ खायला अजून एक ग्रंथ कपाटात जाऊन बसतो.

जे जे आज व्हायरल होतं,तेवढंच आयुष्य दिसतं. सगळ्यांना हिमनगाच टोकच पाहायचंय. कारण ते पाहायला सुखद असतं.

लोकांना सुखाची टुलिप  गार्डन पाहायला आवडते. डम्पिंग कचरा ग्राउंड कुणाला चआपल्या सभोवताली नको असतो.

इन्सान की औलाद यंत्रमानव बनत आहे,भावनाशून्य. मृत्यूचं लाईव्ह रेकॉर्डिंग करून ब्रेकिंग न्यूज पहिल्यांदाच, आपण कशी दिली याच श्रेय घेण्याची स्पर्धा लागली आहे.

प्रत्येक न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणून दिली जात आहे.

शरीर धडधाकट असताना मृत्यूने आपल्या उरावर बसून आपला प्राण घेणे क्लेशदायकच.

एक कृष्णवर्णीयओरडून ओरडून सांगत होता, श्वास घेऊ शकत नाही माझ्या मानेवर गुढगा काढा, मी मरत आहे, मला वाचवा अस असताना सुद्धा पाहणारे ओरडत, चित्रीकरण करत होते. परंतु त्याच चित्रीकरणामुळे जगाने याची देहा याची डोळा लाईव्ह मृत्यू पाहिला आणि सगळे तात्पुरते पेटून उठले.

रंग माणसाच्या जीवनात रंग भरतात माहीत होतं, पण माणसाला उद्ध्वस्त करतात, हे अनेक वर्षापासून पाहतोय.आपल्या आयुष्याचा शेवट कसा आणि कधी होईल हे कुणालाच सांगता येत नाही. ‘नरे ची केला हीन किती नर’ आमच्याकडे म्हणले जाते पण एखाद्याचा गुन्हा असेल तरी त्याच्यासाठी कोर्ट आहे. पाशवी अत्याचार होतो तेव्हा माणसे हतबल होतात.  माणसं मदत करत नाहीत, चित्रीकरण करतात. कृष्णवर्णीयाला वाचवता आलं असतं, त्यासाठीच पोलीस असतात पण पोलीस आणि जनसमुदाय  असतानाही मृत्यू होतो.

श्वापद सगळीकडेच आहेत. नवनवीन तंत्र शोधण्यात  माणसांचा हात कोणी धरणार नाही, विषाणूच्या प्रसारा पेक्षाही त्यांचा प्रसार झपाट्याने होतो.

अनेक हत्या, आत्महत्या यांची दखलच घेतली जात नाही. जे दिसतं तेच सत्य,जे viral होतं तेच आणि तेवढेच सत्य. जेजे व्हायरल होत आहे तेवढीच संस्कृती असा समज अनेकांचा होत आहे.  उपद्रव न करणाऱ्या ची हत्या केली की आपल्याला हळहळ वाटतेच.

जगायचं कुणी  याचा न्यायनिवाडा माणसेंच करत आहेत. प्रत्येक व्यक्ती न्यायालय आहे  व स्वतः न्याय-निवाडा देत आहे.

समाधी पूर्वी स्वेच्छेने घेतली जायची आज ती जबरदस्तीने घ्यायला लावली जात आहे.

I cannot breathe म्हणून कुणाला समाधी घ्यावी लागते तर कुणाला पाण्यात तोंड बुडवून जलसमाधी घ्यावी लागते.

दवाखान्यातवास्तव इतकं भयानक आहे की मृत्यूच्या बाहुपाशात जावं लागतं किंवा जावं वाटतं. बेडवर निष्प्राण पडून सलाईन च्या नळ्याकडे पाहण्यापेक्षा घरी जीव सोडलेला अनेकांना आवडतो. आपला मृत्यू आपल्या अंगणातच व्हावा आपल्या आकाशातच व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाचा आंगण, आकाश अवकाश ठरलेलं असतं.  जेवढ्या वाटा तेवढया पळवाटा आधीच तयार असतात.दृष्टीआड सृष्टी प्रत्येकालाच आवडते.

संघर्ष जेव्हा दुबळा पडतो तेव्हा अमानवीय शक्तीचा विजय होतो.

ज्याचं त्याचं जीवन म्हणजे ज्याचा त्याचा संघर्षच असतो.

कुणी संघर्षावर स्वार होतो तर कुणाला संघर्षांपुढे हार मानावी लागते. Survival of the fittest हेच जगण्याचं सूत्र आहे. असहाय्य परिस्थितीत , नैराश्याच्या गर्तेत शरीराचा आणि मनाचा दुबळेपणा जेव्हा हातात हात घालून मृत्यूच्या स्वाधिन  होतो, तोच अखेरचा श्वास असतो. मनापुढे शेवटी शरीर लुळपांगळ होतं. निसर्गात वर्णद्वेष नाही पण मनात वर्णद्वेष आहे. मनाचा प्रत्येक सेकंद वेगळ्या रंगात रंगलेला असतो. एखाद्या सेकंदात तो आत्महत्या करतो, हत्या करतो, जीवदान देतो, मन दुखावतो, मन प्रसन्न करतो. हे सगळे अनाकलनीय आहे.

इन्सान की औलाद यंत्रमानव बनत आहे,भावनाशून्य. मृत्यूचं लाईव्ह रेकॉर्डिंग करून ब्रेकिंग न्यूज पहिल्यांदाच, आपण कशी दिली याच श्रेय घेण्याची स्पर्धा लागली आहे.

प्रत्येक न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणून दिली जात आहे.

शरीर धडधाकट असताना मृत्यूने आपल्या उरावर बसून आपला प्राण घेणे क्लेशदायकच. शरीर मरतं,विचार नाही.विचार अमर असतात.विचार हा एक प्रसाद आहे.प्रसादाने भक्ती वाढते,अनुयायीनिर्माणहोतात.अनुयायी पुन्हा विचार पेरतात.विचार हवा तो प्रसार करतात.

शरीरातून आनुवंशिकता वाहते ती विचाराचं वहन करते.विचाराचं कलम केलं की तेही अनेक पिढ्यांपासून चालत राहतं.

जगावर गांधीची छाप पडली आहे.जगभर गांधीचे पुतळे आहेत.गांधींना कोण ओळखत नाही?आमच्या कडे कुणी आवडलं की फोटोत बंदिस्त करतात व भिंतीला टांगतात. असं केलं की प्रेम ही दिसत व जवाबदारी ही झटकता येते.

गांधीच्या साक्षीने फारच भयांण चाललं आहे. गांधीची शिडी वापरून लोकांनी आपले मनसुबें पूर्ण केले आहेत.

गांधीच्या फोटोला हार व समाधीवर ओंझळभर फुले वाहीली की हवे ते करायला लोक मोकळे होतात.

गांधी नोटावरील चित्रांत आहेत, पण निवडणुकीतील नोटाच्या बाबतीत असाह्य आहेत. नोटा मध्ये या पैकी कोणीच नको म्हणलं तरी नको ते निवडून येतंच आहेत. नोटा म्हणजे एक वैधानिक इशारा झाला आहे. वैधानिक इशारा दिलं की सरकारचं कर्तव्य संपत.

ऑफिसमध्ये गांधीच्या फोटो समोर भ्रष्टाचार होतो, पैशाची देवाण-घेवाण होते.

लोकं इतकी धिट झाली आहेत की स्पर्धक ही आलिंगन, देण्याच्याबहाण्याने परीक्षकांचे चुंबन घ्यायला मागेपुढे पहात नाहीत,इतकी नीतिमत्ता ढासळली आहे.

गांधी है तो मुमकिन है,म्हणंत,  गांधींच्या फोटोला हार व समाधींवर फुले उधळतां यायला हवीत.खोट्या शपथा घेता यायला हव्यात.

भाषणात गांधीचे गोडवे गाता यायला हवेत.इतकं केलं की सात पिढ्यांची कमाई करण्याचं नवीन तंत्र माणसाने शोधून काढलंय.

भांडणारे गळ्यात पडत आहेत आणि गळ्यात पडलेले भांडत आहेत.

पूर्वी तत्वांसाठी काहीं पण होतं,आता तत्वांसाठी काहीहीं आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, संस्कृती, मानवी व्यवहार भावभावना, सगळेंच गढूळ झालें आहे. चांगल्या विचारांची तुरटी दुर्मिळ झालीआहे.

राजकरणात गांधी ही पहिली पायरी चढलीच पाहिजे. अनेका साठी,गांधी यशाची पहिली पायरी आहे.

यशोशिखराकडे जाताना पहिली पायरी विस्मरणात जाते. तरीही देशाला गांधीचे  विचारच  तारू शकतील हा विश्वास तिसरे युद्धहोण्याच्या पूर्वसंध्येला बळावत आहे.

शाळेतल्या प्रतिज्ञेच्या चिंधड्या उडत आहेत.वादामुळे सारे भारतीय माझे बांधव आहेत का? हा प्रश्न पडू लागला आहे. शाळेतील मुले निरागसपणे प्रार्थना व प्रतिज्ञा म्हणायचे. तरुण फ्री काश्मीर ची मागणीकरतात,पोलीसावर दगडफेक करतात, हिंसे मध्ये भाग घेतात. गांधीचा अहिंसेचा डोस, कोरोनाचा डोस अनेकांना नकोय.

मतासाठी गांधीच्या नावाचा वापर करून जोगवा मागणे आजही सुरू आहे.

नई तालीम शिक्षण पद्धती ही गांधीनी दिलेली अमूल्य भेट होती,पण ती गुंडाळून ठेवली गेली,कारण कुणालाच नको आहे मूल्य आणि श्रमप्रतिष्ठा.

नई तालीम हेच आजच्या शिक्षण पद्धती वर जालीम औषध आहे.पण  मस्तका पेक्षा पुस्तकाला महत्व आलंय. पुस्तकात आहे तेवढच वाचायचं, लक्षात ठेवायचं. मस्तकात जे आहे त्याचा विकास करणे अभिप्रेत आहे. शिक्षण म्हणजे स्वतः मधील उत्कृष्ट शोधणे,व त्याला बाहेर काढणे.

गांधी आज पुस्तकात व अभ्यासक्रमात रुतून बसले आहेत, त्यांना बाहेर पडून  त्यांच्यासारखें जगलं पाहिजे, तरच प्रश्न सुटतील. गांधीचं नाव वापरून अनेकांना  राजकारणात यायचंय. स्वतःचा जम बसवण्यासाठी दुसर्यांना फसवायचे आहे.

वैष्णव जन तो तेणे कहिये, जो पीड परायी जाने रे हे गांधी बरोबरच इतिहासजमा झाले आहे.नव्या पिढीसमोर गांधी नाही वेगळी आंधी आहे. गांधीचं तत्वज्ञान लोणचं म्हणून चवीपुरतं वापरलं जात आहे.दुसऱ्यांच्या अंगावर कपडे नाहीत म्हणून गांधीनी स्वतः कपड्यांचा त्याग केला. आता अस्तित्वासाठी कपड्यांचा त्याग केला जात आहे, व त्याकडे उत्कृष्ट न्यूड फोटोग्राफी म्हणून पाहिलं जातं. विचार  तोकडे असलें तरी कपडे तोकडे वापरून अस्तित्व सिद्ध करणारे प्रसिद्ध होत आहेत.

तरीही  चिरंतन मुल्याप्रमाणे गांधी राहणारच.एक वर्ग गांधी ला मानणारा आहे व मानणांरच. थोड्याफार चांगल्या लोकांमुळेच समाज आज अस्तित्वात आहे.

— डॉ. अनिल कुलकर्णी.

९४०३८०५१५३

A37 सहजानंद सोसायटी, कोथरूड,

पुणे – ४११०३८.

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 28 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..