नवीन लेखन...

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग ३

पुनर्भेट : आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : (जागतिकीकरणाबद्दल एक चिंतन) : १९९३ 

भाग-३

प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या  ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट  प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.


सोल्यूशन, उपाय  :

आमचे नेते व बुद्धिवंत या नीतीचं समर्थनच करतात, हाच प्रगतीचा मार्ग आहे असं सांगत असतात.

मी सुद्धा तुम्‍हाला हेच सांगतो की, भारताला असंच परतंत्र होऊ दे ! विचित्र वाटलं ? धक्‍का बसला ?  पण खरोखरच सांगतो, आपल्‍या उन्नतीसाठी आपल्‍यापुढे हाच एकमात्र मार्ग आहे.

– ध्यानात घ्या, बुद्धिवंतांचे, नेत्‍यांचे शब्‍द व माझे शब्‍द एकच आहेत, सांगणे एकच आहे, कृतीही एकच आहे, पण उद्दिष्‍ट मात्र संपूर्णपणें भिन्न आहे. त्‍यांच्‍या व तुमच्‍या-माझ्या जाणिवेतला फरक, कारणमीमांसेतील फरक व उद्दिष्‍टातला फरक , हाच खरा त्‍यांच्या व आपल्‍यातला वेगळेपणा. ते ‘वैश्र्विक राष्‍ट्रवादा’च्‍या (सुपरनॅशनॅलिझम ) नांवाखाली या परावलंबित्‍वाचं समर्थन करीत आहेत , तर तुम्हांआम्हांला भारताच्‍या उत्‍थानासाठी या नीतीचा अवलंब करायचा आहे.

– जरा विचार करा, जे या परावलंबित्वाचं समर्थन करतात असे बुद्धिजीवी व असे नेते, या पारतंत्र्याचा विरोध कसा आणि कां करतील ? आणि समजा, तुम्‍ही-आम्‍ही या प्रक्रियेला विरोध करावयाचं ठरविलं तर हा जगन्नाथाचा अजस्र रथ थांबवण्‍यचं , उलट्या दिशेला वळविण्‍याचं सामर्थ्‍य तुमच्‍या-आमच्‍यात आहे कां ? आणि त्‍याहूनही महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे, हे बलशाली पाश्चिमात्त्य देश आम्‍हाला असं करू देतील का ? ह्या प्रक्रियेस विरोध करणें म्‍हणजे प्रत्‍यक्ष विकसित पाश्चिमात्त्य देशांनाच आव्‍हान देणं , आणि तसं करूं गेल्‍यास, आमचं विघटन, आमचं पतन, आमचा विनाश अटळ आहे.

  • तर मग आमच्‍या उन्नतीसाठी आमच्‍यापुढे काहीच उपाय नाही का? आहे ! उपाय आहे ! सुरक्षित व हमखास असा एक उपाय आहे. तो म्‍हणजे, या परावलंबित्‍वाच्‍या, पारतंत्र्याच्‍या प्रक्रियेला अधिकाधिक चालना देणं , गती देणं. आमची अवनतीच आम्‍हाला उन्नतीकडे घेऊन जाईल. अवनतीतून उन्नती कशी? तेच आतां पाहूं या.

 

  • अवनतीतून उन्नती :
  • संस्‍कृतीची वाटचाल चक्राकार गतीने होते. उन्नती व पतन हाच जगातला चिरंतन नियम आहे. समाजाची प्रगती होत गेली, की नंतर एक काळ असा येतो ज्‍यावेळी ती प्रगती थांबते, खुंटते, बुद्धिची धार बोथट होते, समाज सुखासीन होतो, संकटाशी झगडायची त्‍याची इच्‍छा, त्‍याची शक्‍ती नाहींशी होऊन जाते. असा समाज साचलेल्‍या डबक्‍यासारखा बनतो. समाज हा गतिशील आहे, त्‍याला स्थिरत्‍व नाही ; त्‍यामुळें त्‍याची प्रगती थांबली की त्‍याच्‍या अधोगतीला सुरूवात होते. पण गंमत अशी आहे की अशी अवनती होत आहे हें जाणवतच नाहीं . आपली प्रगतीच होत आहे असंच तत्कालिनांना वाटत असतं. त्‍यांचं पतन दिसतं तें, नंतरच्‍या काळातील लोकांनी मागें वळून पाहिल्‍यानंतर .
  • याची उदाहरणं कांहीं थोडी नाहींत. इजिप्‍तची संस्‍कृती अतिप्राचीनकाळी उदयाला आली, वाढली, तिची पुढे अवनती झाली व अखेरीला विलयाला गेली. तेंच पुरातन ग्रीक संस्‍कृतीचें झालें, तेंच रोमनांचें झालें, असीरियन, बॅबीलोनियन, पर्शियन इत्‍यादी अनेक संस्‍कृत्‍यांचेंही तेंच झालें. मध्‍ययुगात डोकावल तर, इंका, मयॅ, एझ्टेक संस्‍कृतींचाही असाच अंत झाला. युरोपिअन देशांचेंही तेंच म्हणतां येईल. पंधराव्‍या शतकांत स्‍पेन व पोर्तुगाल इतके प्रबळ होते की १४९४ साली पोप अलेक्‍झांडर सहावा यानें, सगळं जग त्‍या दोन राष्‍ट्रांसाठी विभागून दिलं होतं. कुठे गेल्या त्या दोन जगज्‍जेत्या सत्ता ? इंग्‍लंडच्‍या साम्राज्‍यावर एके काळी सूर्य मावळत नसे. आतां त्‍याला जगात कितीसं महत्त्व आहे ? महाबली कम्‍युनिस्‍ट यू.एस.एस.आर.चं विघटन आपण हल्‍ली हल्‍लीच पाहलं आहे. लांब कशाला जा, भारताकडेच पहा ना. एके काळी भारतीय वैदिक संस्‍कृती व बौद्ध संस्‍कृती दूरदेशांमध्यें पसरली होती , भारताच्‍या संपन्नतेची ख्‍याती जगभर दुमदुमत असे. तो काळ गेला, आपली अवनती झाली, आपण परतंत्र झालो. उन्नतीनंतर अवनती ही व्‍हायचीच .
  • उन्नत समाज सुखासीन होतो व अशा साम्राज्‍याला दास्‍यत्‍व येतें. दास्‍यत्‍व येतें तें, दुसरा समाज, अन्‍य संस्‍कृती, ह्या-सुखासीन-समाजापेक्षा अधिक प्रगत असतात म्‍हणून नव्‍हे तर ते अधिक प्रबळ, अधिक आक्रमक, अधिक लढाऊ असतात म्‍हणून . सुखासीन समाजाची लढायची झगडायची जिद्द संपलेली असते म्‍हणून त्‍याला दास्‍यत्‍व येते. अशा जितांच्‍या समाजावर ज्‍येत्‍यांचा समाज सर्व क्षेत्रांमध्‍ये श्रेष्‍ठत्‍व प्रस्‍थापित करू पाहतो. त्‍यामुळे जेते जितांवर अनेक प्रकारें दडपशाहीचा वापर करतात .
  • या नंतरच्‍या शक्‍यता तीन.

पहिली म्‍हणजे जितांचा समाज हळूहळू जेत्‍यांच्‍या समाजात विलीन होऊन जातो, सामाऊन जातो.

दुसरी म्‍हणजे जित व जेते मिळून एक नवीन समाज तयार होतो.

तिसरी शक्‍यता म्‍हणजे जितांवरील जेत्‍यांचे अत्‍याचार, त्‍यांची दडपशाही इतकी वाढत जाते की एक दिवस एक स्‍फुल्लिंग पडतो, एक ज्‍वाला उठते, झोपलेली मुर्दाड मनें जागी होऊन उठतात आणि ज्‍येत्‍यांचं जोखड झुगारून देऊन जितांचं पुनरुथ्‍थान होतं. लंबक दुसर्‍या बाजूला जाऊन झोका घेतो व अवनती थांबवून त्‍या संस्‍कृतीची, त्‍या समाजाची उन्नतीच्‍या पथावर पुन्हां नव्‍या जोमानें वाटचाल सुरू होते . मानसशास्‍त्रीय ‘अति-प्रतिपूरणा’च्‍या (ओव्‍हर-कंपेनसे) सिद्धान्‍ताप्रमाणें , अशी झोपेतून-जागी-झालेली मनें अधिकच जागृत होतात, त्‍यांच्‍यात तीव्र चेतना निर्माण होते व त्‍यामुळे ही संस्‍कृती वाढत्‍या वेगानें विकसित होते. मध्‍ययुगीन इंग्‍लंडनं फ्रेंचांचं वर्चस्‍व झुगारून देऊन अशीच उन्नती केली होती. शिवाजीनं ३०० वर्षांच्‍या परकीय सत्तेला आव्‍हान देऊन स्‍वराज्‍य निर्माण केल होतं.  आणि, १९४७ मध्‍ये भारताला राजकीय स्‍वातंत्र्य प्राप्‍त झालं होतं.

 

  • आपल्‍यावरचं परकियांचं आक्रमण असंच सुरू राहिलं , वाढत राहिलं , आपली गुलामगिरी अशीच चालूं राहिली व आपण आपल्‍या समाजाला अवनतीच्‍या मार्गावर पुढे पुढे नेत राहिलो तर, चक्रनेमिक्रमेण या न्‍यायानें आपलं त्‍यानंतर पुनरुथ्‍थान निश्र्चितच होईल ! म्‍हणून भारताला परतंत्रतेच्‍या मार्गावर नेणं हेंच अंतीं हितावह ठरणार आहे. पुढच्‍या पिढ्यांच्‍या प्रगतीसाठी आपण हा मार्ग जाणूनबुजून स्‍वीकारायलाच हवा, तेंच आपलं धोरण असायला हवं.
  • आपल्‍या विचारवंतांनी गुलामगिरी स्‍वीकारली आहे खरी, आपण आपलं बौद्धिक, औद्योगिक, आर्थिक व सांस्‍कृतिक स्‍वातंत्र्य घालवत आहोत हेंही खरं ; पण तुम्ही-आम्ही हें सारं निष्क्रियतेनं नुसतं बघत उभे नको राहूं या, आपण स्‍वतः होऊन या प्रक्रियेला चालना देऊ या. आपण जाणीवपूर्वक भारताला अधिकाधिक गुलामगिरीत लोटत गेलो तर नक्‍कीच आपण एक दिवस पुन्हां स्‍फुल्लिंग फुलवूं शकूं , पुन्‍हा नवचेतना जागवूं शककूं , भारताला पुन्हां उन्नतीपथावर अग्रेसर करूं शकूं , त्याचं  उज्‍ज्‍वल भविष्‍य घडवूं शकूं.
  • आपल्‍यापुढे आता फक्‍त एकच मार्ग आहे, आणि तो हा –

स्‍वावलंबनाचे आता थांबवूं पवाडे
उघडू परकीयांसाठी आपुली कवाडें
घालू या पायघड्या, करूं या सलामी
पुरोगामित्त्वाच्‍या नावें करूं या गुलामी .

उतरेलच एके दिवशीं गुलामीची झिंग
मनी पुन्‍हा स्‍वातंत्र्याचे फुलतिल स्‍फुल्लिंग
मिळेल पुनरुत्थानाचा त्‍यामधुनी संदेश
त्‍यातूनच राहील उभा पुन्हां उन्नत देश .

म्‍हणून आम्‍हा स्‍वीकराया आगळी नीती हवी
उन्नतीसाठीच  आतां  अवनती हवी
उज्‍ज्‍वल भवितव्‍यासाठी उरलें एकमात्र तंत्र –
आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र .

(समाप्त)

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

1 Comment on आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग ३

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..