नवीन लेखन...

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग १-ब

पुनर्भेट : आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : (जागतिकीकरणाबद्दल एक चिंतन) : १९९३ 

भाग-१-ब

प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या  ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट  प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.


  • आमच्या विद्वानांच्या शंका :

आमचे ज्ञानी विद्वान आजही शंका काढतात की आमची संस्‍कृती इतकी प्राचीन असती तर तसे अनेक पुरावे सापडायला हवे होते. खरं म्‍हणजे अशी शंका मांडण्‍यापूर्वी त्‍यांनीं कांहीं गोष्‍टी ध्‍यानांत घ्‍यायला हव्‍या. एक म्‍हणजे भारतातील हवामान. भारतातल्‍या मान्‍सूनच्‍या पावसामुळे व दमट हवेमुळे लाकडी बांधकाम व भूर्जपत्रांवरील लेखन हें नष्‍ट होणारच ; तें शतकानुशतके टिकणें अशक्‍यच आहे. भारतातील सर्वच महत्त्वाची शहरें हजारो वर्षांपासून ‘जिवंत शहरे’ (Living Cities) आहेत हे सर्वमान्‍य ऐतिहासिक सत्‍यही येथें लक्षात घ्‍यायला हवें. अविरत नूतनीकरणाच्‍या प्रक्रियेमुळे प्राचीन अवशेषांचा होणारा नाश तर आजही आपल्‍या डोळ्यांसमोर होतच आहे. आमचे पुरातत्‍वीय पुरावे या प्रक्रियेने अभावितपणे नष्‍ट केले. दुसरें म्‍हणजे, आमची तक्षशिला व नालंदा येथील प्रचंड ग्रंथालयें लुटारूंनी उद्ध्‍वस्‍त केली व त्‍यामुळें कितीतरी पुरातन ज्ञानाला आपण पारखे झालो. जुन्‍या ग्रंथ व पोथ्‍यांमध्‍ये त्‍याहूनही-प्राचीन अशा ग्रंथांचे उल्‍लेख सापडतात, पण ते ग्रंथ मात्र उपलब्‍ध नाहीत. तिबेटमध्यें व इतरत्रही जुने बौद्ध वाङ्मय उपलब्‍ध आहे पण त्‍याचा पद्धतशीररीत्‍या सखोल अभ्‍यास झालेला नाहीं. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा, ध्‍यानात घेण्यांजोगा मुद्दा पुरातत्वशास्‍त्राशी ( आर्कियॉलॉजी ) संबंधित आहे. खर्‍या अर्थानें या शास्‍त्राला चालना दिली नेपोलियननें . हे शास्‍त्र २०० वर्षेच जुनें आहे म्‍हणजे तसं नवीनच आहे. या क्षेत्रातलं बरंच भांडार अजून लुप्‍तच आहे. जसजसा काळ पुढे जात आहे तसतशा नवनवीन गोष्‍टी उजेडात येत आहेत आणि तसतसे आपल्‍याला जुने सिद्धान्‍त बदलावे लागत आहेत ; पुढेही बदलावे लागतील. विसाव्‍या शतकाच्‍या तिसर्‍या व चवथ्‍या शतकात मोहेनजादारो व हडप्‍पा येथील उत्‍खननानें भारतीय संस्‍कृतीचा काळ खूपच मागे नेला व पाश्चिमात्त्यांना जुने सिद्धान्‍त बदलणें भागच पडलें. पण त्‍यांनी सहजासहजी ते मान्‍य केलें नाहीं. सिंधू संस्‍कृतीला त्‍यांनी द्रविडियन तथा अनार्य म्‍हणून संबोधलं आणि तिचा सध्‍याच्‍या भारतीय संस्‍कृतिशी दुवा नाही असा प्रचार केला. पुढे भारताच्‍या विभाजनाच्‍या वेळी मोहेनजोदारो व हडप्पा ही दोन्‍ही स्‍थळें पाकिस्‍तानात गेली. त्‍यामुळे की काय, पण भारतीय शास्‍त्रज्ञांनी जिद्दीने या संस्‍कृतीशी संबंधित कालीबंगन, लोथल, दायमाबाद इत्‍यादी नवनवीन स्‍थळं उजेडात आणली. नव्‍यानें उजेडात आलेल्‍या धोलावीरादी हरप्‍पीय शहरांच्‍या उत्‍खननामुळे भारतीय इतिहासातील कित्‍येक सिद्धान्‍त बदलावे लागत आहेत, बदलावे लागतील.

– अलिकडील काळातल्‍या उत्‍खननांमुळे व अन्‍य संशोधनामुळेच द्वारकेत भूमीवर व समुद्राखाली संस्‍कृतीचे अवशेष सापडले. सरस्‍वती देवीचे लुप्‍त पात्र सापडलें व त्‍याभोवतीच्‍या अनेक वसाहतीही उजेडात आल्‍या. अगदी नुकतीच एक हडप्‍पीय वसाहत बिहारमध्‍येही सापडली आहे.

-वैदिक साहित्‍यातील सरस्‍वती संबंधीच्‍या उल्‍लेखांवरूनच शास्‍त्रज्ञांनी तिचं पात्र शोधून काढलं. तोपर्यंत सरस्‍वती नदी ही केवळ एक आख्‍यायिकाच समजली जात होती. सरस्‍वतीच्‍या पात्राभोवती उत्‍खननात सापडलेल्‍या वसाहतींचा वैदिक वाङ्मयात वर्णन केलेल्‍या संपन्न नगरांशी संबंध जोडता येत आहे. सिंधु-सरस्‍वती संस्‍कृतीची वैदिक संस्‍कृतीशी एकात्‍मता संस्‍थापित होत आहे. ते जें कांहीं असेल तें असो,  परंतु ६०-७० वर्षांपूर्वी पाश्चिमात्त्यांनी केलेल्‍या अपप्रचाराला कित्‍येक भारतीय , विशेषतः दाक्षिणात्‍य विद्वान, अजूनही बळी पडतात.

 

  • रिप व्‍हॅन विंकल वीस वर्षे झोपल्‍यावर जागा तरी झाला पण राजकीय स्‍वातंत्र्य मिळाल्‍यावर ( १९९३ पर्यंत ) ४६ वर्षें झाली तरी आमची झोप उडत नाही, आमच्‍या बुद्धीचं भ्रमपटल दूर होत नाहीं हे आमचं दुर्दैव ! भारतीय संस्‍कृतीचें प्राचीनत्‍व नाकारण्‍याच्‍या कसोशीच्‍या प्रयत्‍नांमागे पाश्चात्त्य विद्वानांचा एक विशिष्‍ट हेतू आहे. भारतीय संस्‍कृतीत स्‍वतःचं असं कांहींच नाहीं, तिनें पाश्चिमात्त्य संस्‍कृतीकडून सगळ्या चांगल्‍या गोष्‍टी उचलल्‍या आहेत, असें सिद्ध करण्‍याचा हा सगळा खटाटोप आहे. राम म्‍हणजे इजिप्शियन राजा रॅमसीस आहे व रामायण इजिप्शियन कथेवर आधारित आहे – हा असाच एक सिद्धांन्‍त मल्‍लादि वेंकटरत्‍नम् व भास्‍करराव जाधव यांनी मांडला. कालीदासाने ग्रीक नाटकांची नक्‍कल करून स्‍वतःची नाटके लिहिली असा एक तर्क मांडला गेला. रामायणातील हनुमानाने सीतेला दिलेल्‍या मुद्रिकेचा उल्‍लेख ग्रीक वाङ्मयातून घेतलेला आहे हा आणखी एक आक्षेप. ग्रीक व गांधार शैलीवर आमची शिल्‍पकला आधारित आहे ; हडप्‍पीय वसाहतींची आखणी मेसोपोटेमीयन वसाहतींवरून घेतलेली आहे; मनू व महापुराची कथा मेसेपोटेमियन महाकाव्‍यावर आधारित आहे; आमचं ज्‍योतिषशास्‍त्र ग्रीक ज्‍योतिषशास्‍त्राची नक्‍कल आहे, एक ना दोन किती उदाहरणं द्यायची ?
  • विविध संस्‍कृतींमध्‍ये देवाणघेवाण ही व्‍हावयाचीच, हे मान्‍य आहे, पण आमच्‍या संस्‍कृतीत सगळ्या चांगल्‍या गोष्‍टी दुसर्‍यांकडून घेतलेल्‍या आहेत असा दुराग्रह हे बुद्धिभ्रमाचंच लक्षण आहे. ब्रिटिश राजवटीत पाश्चिमात्त्यांकडे गहाण टाकलेली बुद्धि, चिकित्‍सक वृत्ती, जिज्ञासा, विचारशक्‍ती आम्‍ही खर्‍या अर्थाने मुक्‍त करू शकलेलो नाही ;  त्‍यांच्या गुलामगिरीतून अजूनही आम्‍ही सुटलेलो नाही. हा हन्त हन्त !

(पुढें चालूं )

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..