नवीन लेखन...

जलसंपत्ती दिन

महाराष्ट्राचे सरासरी पर्जन्यमान १००० मि.मी. म्हणजे ४० इंचापेक्षा थोडे अधिक याचा अर्थ महाराष्ट्राच्या ३०८ लक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्रावर सरासरी हेक्टरी १ कोटी लिटर पावसाचे पाणी असा होतो. अर्थात, स्थलकालनिहाय याची वाटणी व वितरण विषम आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. राज्यातील ३५५ तालुक्यांचा विचार करता सरासरी पर्जन्यमान ३०० मि.मी.पासून ५००० मि.मी.पर्यंत आहे. प्रामुख्याने लक्षात घेण्याची बाब म्हणजे राज्याचा जवळपास एकतृतीयांश भूभाग पर्जन्यछायेच्या टापूत येतो. स्थूलमानाने ३००-७०० मि.मी. पर्जन्यमान आहे व त्यात बरीच दोलायमानता आहे.
तथापि, ३०० मि.मी. एवढय़ा निम्न सरासरी पर्जन्यमानाचा आधार घेतल्यास तेथे हेक्टरी ३० लाख लिटर पाणी जमिनीवर बरसते. प्रश्न आहे अक्कलहुशारीने त्याचा नीट प्रत्यक्ष वापर, विनियोग करण्याचा, पडणाऱ्या पावसाचे पडेल तेथे पडेल तेव्हा ठायीठायी निसर्गसुलभ पद्धतीने जैवसंसाधनाच्या आधारे संवर्धन व संरक्षण करणे हे जलनियोजनाचे मर्म आहे. हे करण्याचा शास्त्रशुद्ध मार्ग आहे : ‘माथा ते पायथा’ (रिजूट व्हॅली) तत्त्वावर मृद-जलसंधारण-कुरणे-झाडझाडोरा याचे वनस्पती आच्छादन वाढवणे, वृद्धिंगत करणे, जेणेकरून लागवड जमिनीच्या हंगामी पिके, झाडझाडोरा, भूगर्भ व काही प्रमाणात छोटे भूपृष्ठीय साठे याद्वारे पडणाऱ्या पाण्याचा महत्तम वापर, विनियोग केला जाऊ शकतो. शेती, उद्योग व घरगुती वापरासाठी लागणाऱ्या पाण्याचे उपलब्धता व आवश्यकतेनुसार संकलन-साठवण-उपयोग करता येण्याच्या सर्व सोयीसुविधांचा एकत्रित विचार करून नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. पाणी या संसाधनाचे एक खास वैशिष्टय़ म्हणजे ते दरवर्षी मिळणारे व नवीनीकरण होणारे संसाधन आहे. अर्थात, त्याच्या नवीनीकरणाची क्षमता जमीन व वृक्षाच्छादन याच्याशी जैवपणे निगडित आहे. म्हणूनच जमिनीची भौतिक स्थिती, वनाची घनता व प्रमाण या जैवघटकांना जलसाठवणीच्या दृष्टीने महत्त्व आहे.

महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक जलसंपत्ती विकास व व्यवस्थापनाच्या दृष्टीने याची सुरुवात राज्यातील साठ हजार लघू पाणलोटाच्या एककापासून करावी लागेल. खरे तर मृद व जलसंधारणाची कामे सुटय़ा एकेरी पद्धतीने ५० वर्षांहून अधिक काळ दर कोस, दर मुक्काम चालली आहे. १९८३ पासून सर्वंकष पाणलोट क्षेत्र विकासाची (काऊडेप) संकल्पना स्वीकारली असली तरी अद्यापही कामे काटेकोरपणे व कटाक्षाने एकात्मिक धर्तीवर केली जात नाही हे ढळढळीत वास्तव आहे. नालाबांध, सिमेंट बंधारे, शेततळी यावरच भर आहे. वास्तविक पाहता सुनियोजित शास्त्रीय पद्धतीने ही कामे करण्यासाठी जलसंधारण खात्याची निर्मिती २० वर्षांपूर्वी केली गेली असली तरी २०१३ सालीदेखील निर्धारपूर्वक नियोजित पद्धतीने लघू पाणलोटाची कामे करण्यासाठी सामाजिक तयारी व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जाणवतो. साधन साक्षरतेचा अभाव व मोठय़ा सिंचन प्रकल्पातील कंत्राटदारी हितसंबंध याला मुख्यत: जबाबदार आहेत, हे नाकारण्यात काय हशील?

पाणी नियोजन व व्यवस्थापनाबाबत आज आपण एका दुहेरी कोंडीत सापडलो आहोत. एकीकडे ८० हजार कोटींहून (आजच्या किमतीने तीन लाख कोटी) अधिक रक्कम खर्च करून आपण राज्यातील एकूण लागवड जमिनीच्या १० टक्केदेखील क्षेत्र प्रत्यक्षात पाटपाण्याने ओलित करू शकत नाही हे कटू सत्य आहे. तात्पर्य, सिंचननिर्मितीचे कागदी आकडे बोगस व निर्थक आहेत. एकंदरीत विचार केला तर राज्यातील बागायत क्षेत्र हे विहिरींवर म्हणजे मुख्यत: भूजल आधारित आहे. या बाबींचा सारासार विचार करून पाटबंधारे प्रकल्पांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करणे ही काळाची मुख्य गरज आहे. जेवढी सिंचनक्षमता (!) ‘निर्मित केली’ असे सांगितले जाते, तेवढी आधी प्रत्यक्षात कार्यरत म्हणजे तेवढे क्षेत्र पूर्णत: ओलित करून देण्याची जबाबदारी सिंचन खाते व नदीखोरे महामंडळावर असली पाहिजे. सिंचन प्रकल्पांचे बरेच पाणी सिंचनेतर (शहरे व उद्योगांना) वापरासाठी वळवले, पळवले जाते ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तरी पाटबंधारे खात्यातील अनागोंदी-अकार्यक्षमता व भ्रष्टाचार हे प्रमुख कारण आहे, हे विसरून चालणार नाही. राज्यातील यच्चयावत लघू पाणलोट क्षेत्राच्या (शेतजमिनी व वनक्षेत्राचे) एकत्र सद्यस्थितीचे नव्याने सर्वेक्षण करून येत्या तीन वर्षांत युद्धपातळीवर परिपूर्ण पाणलोट क्षेत्र विकासाचे आवश्यक ते सर्व उपचार करून घेण्यासाठी तात्काळ मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय पाणलोट क्षेत्र विकास प्राधिकरण कायम करून राज्यातील दुष्काळ व दारिद्रय़ निर्मूलन तसेच समन्यायी शाश्वत विकासाचा कार्यक्रम म्हणून त्याची अंमलबजावणी प्राधान्यक्रमाने केली पाहिजे. राज्यातील अडीच कोटी क्षेत्रावर ही कामे प्रतिहेक्टर वीस हजार या दराने एकूण ५० हजार कोटी रुपये लागतील. तेवढे सिंचन मोठय़ा व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांद्वारे ५ लाख कोटी खर्चूनही किमान १० वर्षे निर्माण होणार नाही. मग काय अडचण आहे हा ठोस उपाय-पर्याय स्वीकारायला?

सारांश रूपाने असे म्हणता येईल, की टंचाई, दुष्काळ व अनुशेषाच्या नावाने वर्षांनुवर्षे चालवलेल्या पाटपाण्याच्या (?) हजारो कोटी रुपयांच्या कंत्राटदारी खिसेभरू प्रकल्पांना आवर घालून कमी वेळात, कमी खर्चात, स्थानिक संसाधने व लोकसहभागावर आधारलेले विकेंद्रित जलसंसाधन विकास व व्यवस्थापन हीच राज्यातील टंचाई दुष्काळ निर्मूलनाची गुरुकिल्ली आहे. अर्थात, यासाठी गरज आहे राजकीय दृढ संकल्पाची.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..