नवीन लेखन...

वाहातं राहा..-

आपली हिन्दू संस्कृती सिंधू नदीच्या काठी रुजली, फुलली, बहरली..! सिंधू आजही वाहती आहे आणि हिन्दू संस्कृती आजही नांदती आहे..सिंधूचं वाहणं आपल्या रक्तात एवढं भिनलंय की आपण आयुष्याच्या वाहण्याला ‘जीवन प्रवाह’ असं नांवच देऊन टाकलंय. पण एकेकाळी मोकळी, वाहती असलेली आपली संस्कृती आता हळुहळू बंदीस्त होऊ लागलीय. हे माझं निरिक्षण आहे. आपलं असं बंदीस्त होणं कादाचित पाश्चात्यांच्या प्रभावामुळे असेल किंवा आणखी कशामुळे, ते माहित नाही, मात्र ते होणं जाणवतंय हे मात्र खरं..

वाहतं पाणी हा आपल्या संस्कृतीचा, मग ती कोणत्याही प्रांतातली असो, सर्वोच्च श्रद्धेचा भाग आहे. आपली जन्मदात्री असलेली सिंधू आज आपल्या देशात काहीशीच उरली असली, तरी तीच्या लहान-मोठ्या बहिणी असलेल्या गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, ब्रम्हहपुत्र (हा मात्र भाऊ), कृष्णा, कोयना आदी ‘मावश्या’नी आपल्या मायेची पाखर आपल्यावर सततची धरलेली आहे. या मावशांच्या स्तन्यावर आपण आपलं जीवन जगत इथवर आलोय..म्हणून वाहतं पाणी दिसलं की आपण आपोआप नतमस्तक होतो. नास्तिकातले नास्तिक कदाचित हात जाडत नसतील मात्र मनोमन तेही वाहत्या पाण्याला दंडवत घालत असतील याची मला खातरी आहे.

नदीसापखं वाहतं असणं हा नदीच्या कुशीत जन्मलेल्या आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. निरनिराळ्या प्रांतातले निरनिराळे ‘प्रवाह’ आपल्या उदरात घेऊन, काठावर समृद्धी देऊन व कचरा बाहेर टाकत संस्कृतीरुपी नदीचा प्रवाह अव्याहत वाहात आहे आणि वाहणार आहे. या अशा वाहतं असण्यानेच तीला व तीची लेकरं असलेल्या आपल्याला समृद्ध बनवलंय. हजारो वर्षांची धार्मिक व साम्राज्यिक आक्रमण पचवून हिन्दू संस्कृती आजही ताठ मानेने उभी आहे व तीच्या खानदानी समृद्धीपुढे जग झुकत चाललंय ते तिच्या अशा वाहत्या असण्यामुळेच..!!

नद्यांचा प्रवाह सतत बदलत असला तरी त्यांचं ‘वाहणं’ हा मुळ गुणधर्म शाश्वत असतो. नद्यांच्या सानिध्यात वाढलेल्या आपल्या संस्कृतीतही कालानुरूप अनेक बदल घडले, घडतायत तरी तीचं मुळ स्वरूप ‘सामावून घेणं’ हे मात्र तेच आहे. हिन्दू संस्कृती नद्यांप्रमाणेच वाहती आहे व म्हणून त्यामुळेच अजून टिकून आहे हे आपण विसरता कामा नये. निरनिराळे प्रवाह ती सहजपणे आपल्यात सामावून घेत, त्यांना आपलंस करत, त्यांना स्वत:चं रुपडं देत संस्कृतीच वाहणं सुरूच आहे. हिला बंदीस्त करण्याचे अनेक प्रयत्न अनेकांकडून झाले, परंतू त्या प्रयत्नांना व तसे प्रयत्न करणारानाच तीने आपल्यात सामावून घेतलं आहे.

या वाहण्याचा गुणधर्म आपल्यात एवढा भिनलाय, की आपण रोजच्या रोज हे तिचं अनुभवलेपण नकळत अंगीकारत असतो. ते एवढं सहज असतं की त्याची जाणिवही आपल्याला होत नाही. अगदी श्वासोश्नासाएवढं सहज.

रोजच्या जगण्यातलं उदाहरण द्यायचं तर सकाळचं दात घासणं हा आपल्या दैनंदिन कार्यक्रमाचा अनिवार्व भाग. बेसीनपाशी उभं राहून टुथब्रशने दांत घालताना आपण नळ नकळत सुरू ठेवतो. खरं तर दांत घासून झाल्यावर नळाचं काम. पण नाही, दात घासण्याची क्रिया सुरू असतानाही नळ चालूच लागतो. दाढी करतानाही असंच होतं. साधी रोजची आंघोळही वाहत्या नळाखाली करायची सवय आता आता पर्यंत होती. ‘स्वच्छ भारत’ अभियानापूर्वी सकाळी व्हाळावर जाणं अगदी काॅमन होतं. आपल्या शुभाशूभपणाच्या सर्व कल्पना वाहत्या पाण्याशीच जोडल्या आहेत. गांवाकडे अजून हे सर्व बऱ्याच प्राणात शिल्लक असलं तरी शहरातं मात्र पर्यावरण, स्वच्छता, पाणी टंचाई व पाश्चात्य प्रभाव यामुळे सारं बदलत चाललंय. ग्रामिण जीवनातलं राहाणंही वाहतं असायचं. गांवातून शहरात आल्यावर सताड उघड्या दरवाजांच्या चाळ संस्कृतीच्या रुपाने ते वाहाणं सुरूच होतं आणि म्हणून तर तीला ‘चाल’ म्हणत. आपल्या आधुनिकतेच्या कल्पना बदलल्या आणि चाळीतून ब्लाॅक व नंतर फ्लॅटात आल्यावर आपण बंदीस्त होऊन गेलं आणि आपलं वाहाणं जवळ जवळ थांबलंच..

बंदीस्त होण्याचं एक उदाहरणं. हे पूर्णत: बंदीस्त होण्याला लागू नाही पण आपल्या संस्कृतीवर पाश्चात्यांचं आक्रमण कसं होतंय आणि ते मॅनर्स आणि एटीकेट्सच्या त्यांच्या संस्कृतीचं कसं खुळचट अंधानुकरण करतोय हे लक्षात येण्यासाठी आवश्यक आहे. आपण हाॅटेलात कधीतरी जेवायला जातो. काटे-चमच्यांनी जेवणं जमत नसलं तरी इतर काय म्हणतील म्हणून आपण (मी हातानेच जेवतो. बाकीचे बा xxx गेले. त्याशिवाय ते अन्न पूर्णब्रम्ह वाटतच नाही.) तसंच खातो. आता पाळी हात धुवायची येते व वेटर समोर पाव लिटर गरम पाणी भरलेला बाऊल आणून ठेवतो. नविन माणसांना आता काय करायचं हा प्रश्न पडतो तर माझ्यासारख्यांना हा मुर्खपणा वाटतो. वाहत्या नळाखाली हात धुवून, खळखळून चुळ भरल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासापखंच वाटत नाही. टिचभर टोपात हात धुणं, वाहत्या जिवंत सळसळत्या संस्कृतीत वाढलेल्या आपल्याला सहनच होत नाही..

असंच टबात आंघोळ करणं, बेसीनचं ड्रेन होल लाॅक करून त्यात दाढी करणं, खळाळत्या पाण्याच्या ऐवजी टाॅयलेट पेपरचा उपयोग ह्या गोष्टी माझ्या तरी गावंढळ कल्पनांच्या बाहेरच्या आहेत. पाण्याचा उपयोग सांभाळून वैगेरे करणं ठिक असलं तरी आपण तो किती व कसा करावा हे आपल्याच हातात आहे..

नको त्या आधुनिक कल्पनांच्या आहारी जाऊन आपल्याला आपले सण समारंभ साजरे करणं आपल्याला मागासलेपणाचं वाटू लागलंय, माणसं माणसांना लग्न, समारंभ, काही किंवा मयताव्यतिरिक्त भेटेणाशी झालीयत. प्रतिष्ठेच्या खोट्या खुळचट कल्पना आपण कवटाळून बसलोय. माणसं माणसांना भेटल्याशिवाय संस्कृतीचा हा प्रवाह पुढल्या पिढ्यांपर्यंत कसा वाहणार हा प्रश्न मला अस्वस्थ करतो. हा वाहता प्रवाह काहीसा थांबल्यासारखा वाटतोय पण मला वाटतं ह्या प्रवाहाचा अंडरकरंट सुरूच आहे व तो कधीना कधी वर आल्याशिवाय राहाणार नाही. पण त्त्या अंडरकरंटला वर आणण्यासाठी आणि संस्कृती पुढे घेऊन वाहून नेण्यासाठी प्रयत्न मात्र आपल्यालाच करायचाय..

– नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..