चहाला सोडा लागत नाही.. Tonic water लागत नाही.. प्रिंगल्स , खारवलेले काजू , शेजवान , चकल्या लागत नाहीत… साध्या चिनीमातीच्या कपात काम होतं ! crystal glass चे फालतु खर्च नाहीत.. गरमच प्यावा लागतो त्यामुळे सर्दी, घसादुखी होत नाही…आबालवृद्धांसमोर बसून आबालवृद्ध पिऊ शकतात..
देव्हाऱ्यासमोर / देवळासमोर / देवळामागे / मार्गशीर्षात / गुरुवारी / शनिवारी / तीर्थक्षेत्री / चतुर्थी कधीही , कुठेही पिऊ शकतो..कितीही महागाचा घेतलात तरी ६० ml चा जास्तीत जास्त खर्च ३०-४० रुपये सुद्धा होणार नाही.
” आत्ताच पिऊन आलो ” असं न घाबरता तोंड वर करून सांगता येतं. perfume मारावा लागत नाही. centre fresh खावा लागत नाही. १२० ml पिऊन सुद्धा कप खाली ठेवल्या ठेवल्या स्टिअरिंग हातात घेउन बेफाम गाडी चालवू शकता.Traffic police अडवत नाही. चार मित्र मिळून प्यायला बसलात तर मधेच उठून कुणी कुणाला मिठ्या मारत नाही किंवा एकाएकी इंग्लीशही बोलायला लागत नाही. चहामुळे कुणाला अद्याप जुन्या खटल्यांची आठवण येऊन, धाय मोकलून रडत, गजल आणि breakup songs लावल्याचं पहाण्यात नाही…
चहाचा कच्चा माल टेनेसी किंवा स्कॉटलंड किंवा रशियावरून यायची गरज नसते.. आसाम दार्जिलिंग केरळ वगैरे देशी ठिकाणी तयार होतो. म्हणजे देशसेवा सुद्धा होते. काळ्या पिशव्यांची गरज नसते. लाकूड तोडून त्याचे बॅरल्स करावे लागत नाहीत.. गॅसशेगडी, म्हशीचं ताजं दूध, चहाची पत्ती नि साखर एवढंच पुरतं.
असा हा निरागस पण तितकाच चैतन्यदायी चहा तुम्हाला आजन्म मिळत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
सोबत उत्तम गरम गरम चहा करून, हातात आणून देणारा/देणारी मिळाली तर चहात वेलची !!


Leave a Reply