नवीन लेखन...

श्री गजानन महाराज पुण्यतिथी

८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली.

श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे. परंतु गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८००, २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे,

“कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥”

Shri Gajanan Maharaj Paduka Sansthan, Mundgaon - Photos | Facebookजसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, – “दंड गर्दन पिळदार। भव्य छाती दृष्टी स्थिर। भृकुटी ठायी झाली असे॥” जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिल कारण महाराज त्यावेळी तुर्या अवस्थेत होते . (तुर्या* अवस्था : जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणगे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले.

जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे,

“बंकटलालाचे घर। झाले असे पंढरपूर। लांबलांबूनीया दर्शनास येती। लोक ते पावती समाधान॥,”

बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले.

संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात. शेगांवात राहून महाराजांनी अनेक लीला करून लोकांचे कल्याण केले व त्यांना भक्तीमार्गाला लावले.

सद्‌गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्‌गुरू होते. या संदर्भात असे सांगितले जाते की ज्या दिवशी तरूण वयातील गजानन महाराज श्री स्वामींना भेटण्यास अक्कलकोटला येणार होते त्यादिवशी श्री स्वामी अतिशय आनंदात होते. तसेच दुरून गजानन महाराजांना (१७-१८ वर्षे वयाचे) येताना पाहून ते अतिशय आनंदाने उद्गारले, “गणपती आला रे!” त्यावर त्यांनी गजानन महाराजांना स्वतःच्या मांडीवर बसवून घेऊन त्यांचे प्रेमाने स्वागत केले. असे सांगितले जाते की केवळ एकच महिना गजानन महाराजांना स्वतःजवळ ठेऊन घेतल्यानंतर श्री स्वामींनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखविण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरूष देव मामलेदार यांच्याकडे पाठवले. देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्मविषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याची दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले . त्यांच्याच सूचनेनुसार महाराजांनी पुढे आपले कार्यक्षेत्र शेगांव येथे निश्चित केले .

जेव्हा श्री गजानन महाराजांनी आपल्या अवतारसमाप्तीची वेळ ठरवली, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु श्री विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला. Samadhi | ॐ Shree Gajanan Gunjan Vishwa Parivarसमाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, “आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||”

लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली.

त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणुकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.

त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला,

“जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||,”

आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून, त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्षमार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पहाताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात.

आज गजानन महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. म्हणूनच त्यांना “अनंतकोटी ब्रह्मांडनायाक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय!!!” असे प्रेमादराने संबोधले जाते.

ज्या भक्तांना त्यांचे पुनीत चरणकमल लाभले ते खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवननौका श्री महाराज भवसागराच्या पैलतीरी लावतील यात शंका नाही.

त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते. ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दु:खसागरात बुडाले.

देह त्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले,

“मी गेलो ऐसे मानू नका। भक्तित अंतर करू नका। कदा मजलागी विसरु नका। मी आहे येथेच॥”

“दु:ख न करावे यत्किंचित। आम्ही आहोत येथेच। तुम्हा सांभाळण्यापरी सत्य। तुमचा विसर पडणे नसे॥.”

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

 

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..