नवीन लेखन...

श्रीमुद्गलपुराण – १

भगवान श्रीगणेशांना यथार्थरीत्या जाणून घेण्याचा सर्वोपरी श्रेष्ठ मार्ग म्हणजे श्रीमुद्गलपुराण.


या पुराणातील प्रत्येकच गोष्ट अद्वितीय आहे. अगदी पुराण आरंभ होण्याच्या कथेपासूनच.

नैमिषारण्यामध्ये शौनक इत्यादी महर्षी एकत्र आले. त्यांचे नावच किती गोड आहे! शौनक. अर्थात ज्यांना श्रवणाची आवड आहे असे. श्रोता शौनक असायला हवा.

या सगळ्या ऋषींच्या एकत्र येण्याचे कारणही तसेच होते. कलियुगाचा काळ सुरु होणार होता. शास्त्राने कलीचे वर्णन “सर्वसाधकबाधक” असेच केले आहे. अर्थात या कलियुगात ध्यानधारणा, योग साधना, तपश्चर्या, यज्ञयाग या सगळ्या साधनांची पूर्तता अत्यंत कष्टसाध्य होणार. त्यामुळे स्वाभाविकच सर्व ऋषींच्या समोर प्रश्न होता की आता करायचे काय?

या प्रश्नाने सचिंत बसलेल्या ऋषींच्या भाग्याने तेथे भगवान वेदव्यासांचे शिष्य असणाऱ्या महर्षी सूतांचे आगमन झाले.
हे नाव देखील तितकेच महत्त्वाचे. महर्षी सूत. सूत शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे मुलगा आणि दुसरा म्हणजे धागा. महर्षी सूत भगवान वेदव्यासांचे शिष्य आहेत. शिष्य हा वेगळ्या अर्थाने पुत्रच असतो. दुसरी गोष्ट शिष्य हा श्रीगुरूंच्या विचारांचा पुढे जाणारा धागा असतो. अशा स्वरूपातील भगवान वेदव्यासांचे दिव्य शिष्य महर्षी सूत आलेले पाहून स्वाभाविकच सर्व ऋषींना अत्यंत आनंद झाला.

महर्षी शौनकांसह सगळ्यांनी प्रार्थना केली, हे व्यासशिष्या ! आपले आगमन हाच आमच्या समस्येवरील सर्वोत्तम उपाय आहे. या कलियुगात भगवत् चिंतना इतका सुंदर दुसरा मार्ग नाही. त्यासाठी भगवान वेदव्यासांनी निर्माण केलेल्या पुराणांचे आपण अधिकारी आहात. कृपा करून आम्हास ती पुराणे ऐकवावीत.

महर्षी सूतांनी पुराण कथनाला आरंभ केला. एकेक करीत अनेक पुराणे ऐकवली. मात्र परिणाम नको तो झाला.
वास्तविक कोणत्याही श्रवणाचा परिणाम शंकामुक्त शांती असायला हवा. मात्र येथे विपरीत घडले.ही सगळी पुराणे ऐकली आणि ऋषी एका वेगळ्याच शंकेने ग्रस्त झाले.

त्यांनी आपली ती शंका महर्षी सूतांच्या समोर सादर केली. महर्षी शौनक म्हणतात हे महर्षी ! आपण प्रत्येक पुराण सांगत असताना त्यात या पुराणाच्या अधिष्ठान स्वरूप देवतेला सर्वोच्च रूपात वर्णन करता. या अनंत कोटी ब्रह्मांडांचे उत्पत्ती स्थिती लय कारण सांगता. अन्य सर्व ईश्वर महेश्वर देखील त्यांच्याच आश्रयाला असल्याचे वर्णन करता. उदाहरणार्थ भागवत पुराण सांगता त्यावेळी भगवान विष्णू सर्वश्रेष्ठ म्हणून वर्णन करता. अगदी भगवान शंकर देखील अडचणीत आल्यानंतर भगवान विष्णूंना शरण जातात असे म्हणता. पण शिवपुराण सांगता त्यावेळी भगवान श्रीशंकर सर्वोच्च सांगता आणि श्रीविष्णू अडचणीत आल्यावर शंकरांना शरण जातात असे म्हणता.

दुसरीकडे देवी भागवत सांगता त्यावेळी या दोघांनाही गौण दाखवता‌. देवी आदिशक्ती ला सर्वोच्च म्हणता. श्रीविष्णू आणि श्रीशंकर दोघेही तिला शरण जात आहेत असे दाखवता.

यापैकी नेमके सत्य काय?

आपल्या या विविध पुराणातील विविध वर्णनांनी आम्ही गोंधळून गेलो आहोत.

आम्हाला निश्चित असे एक काय ते सांगा. खऱ्या अर्थानी सर्वोच्च काय आहे? ते सांगा. परम सत्ता काय आहे? ते सांगा.

महर्षी शौनकांच्या या विनंतीनंतर महर्षी सूतांनी श्रीमुद्गलपुराण सांगायला सुरुवात केली.

अर्थात कोणतेही विवेचन करण्याच्या आधीच त्यांनी आपल्याला सांगितले आहे की अंतिम सत्य काय? तर श्रीमुद्गलपुराण. एक निश्चित सत्य काय? तर मुद्गल पुराण.

या पुराणाचा विषय आहेत भगवान श्री गणेश. पर्यायाने अंतिम सत्य काय तर श्री गणेश. सर्वोच्च सत्ता कोणती तर भगवान श्री गणेश.अनादी,अनंत, निर्गुण, निराकार, परब्रह्म काय तर भगवान श्री गणेश.

त्या भगवान श्रीगणेशांना जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे श्रीमुद्गलपुराण.

(क्रमश:)

— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 412 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..