नवीन लेखन...

मातृदिन

बऱ्याच लोकांना आज मातृदिन आहे हेच माहीत नसेल. ते सगळेजण भुवया वर चढवून विचार करतील की आज कुठून मातृदिन आला? मी अशा सर्वांसाठी सांगू इच्छितो की , ह्या मातृदिनाचा इतिहास , आपण मे महिन्यात साजरा करतो त्या मातृदिनाच्या इतिहासापेक्षा जुना आहे.

दरवर्षी श्रावण शुद्ध अमावास्येला मातृदिन साजरा करण्यात येतो. आई या शब्दातच पूर्ण विश्व सामावलेलं आहे. ह्या शब्दाची फोड जर केली तर ते तुमच्या लक्षात येईल. आ+ई ज्यामध्ये आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. देवाला सगळीकडे जाणं शक्य नसेल म्हणून त्याने आईला जन्म देऊन तिच्यामार्फत तो आपल्याला भेटतो , बोलतो , संस्कार घडवतो. सगळ्यांच्या आयुष्यातला पहिला गुरू जर कोण असेल तर ती आईच असते. आपल्याला चालायला , बोलायला , लिहायला , वाचायला तिच शिकवते. पण बऱ्याचदा तिने शिकवलेलं आपण मोठेपणी उलटवून दाखवतो. कामाकडे इतके आकर्षून जातो की तिच्या गरजांकडे दुर्लक्ष करू लागतो. आपल्या गरजेच्या वेळी ती उपस्थित असते पण तिच्यावेळी? तिच्यावेळी कोण हजर नसते. बरेचजण असेही आहेत जे इतका पैसा कमावतात की आभाळ ठेंगणं वाटू लागतं पण त्या आभाळात आईला कुठेच स्थान नसते. अशावेळी ती वृद्धाश्रमात असते , आपण पैसे अगदी वेळेत पोहोचवत असतो , थोडावेळ फोन वरही बोलत असतो पण प्रत्यक्षात आपण कधीच भेटत नाही. त्या ईश्वराला किती यातना होत असतील ? ती बिचारी आज ना उद्या आपल्या लेकरांची भेट होईल ह्या आशेवर जगत असते. पण ती वाट इतकी दूर गेलेली आहे ही तिची वेडी माया मानायला तयार नसते. आपल्याला जर तिने अनाथाश्रमात टाकलं असतं तर आपण ही जी प्रगती केली आहे ती करू शकलो असतो का?

सध्या सगळ्यांनी lockdown peroid अनुभवलाच असेल. कसा गेला वेळ? सुरुवातीला काहीच वाटलं नसेल पण नंतर कैदेत ठेवल्याचा अनुभव आला ना? मग जरा त्या आईचाही विचार करा. वर्षोनवर्ष एकाच ठिकाणी , तेच चेहरे पाहून तिला काय वाटत असेल? पुढे मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही समजलाच असाल. आपण एवढे नक्कीच सुज्ञ आहोत.

संस्कृत भाषेत एक सुभाषित आहे. ज्यात आईचा महिमा वर्णन केलेला आहे.

आयु: पुमान् यश: स्वर्ग कीर्ति पुण्यं बलं श्रियं ।

पशु सुखं धनं धान्यं प्राप्नुयान्मातृ वन्दनात् ।।

ह्या सुभाषिताचा अर्थ असा आहे की , जो कोणी आईची मन लावून सेवा करतो त्याला स्वर्ग, दीर्घायुष्य, धन , धान्य , सुख आणि यशाची प्राप्ती होते.

आईसाठी एक खास कविता आजच्या दिवशी ….

कोण म्हणते देव नसतो
आसपास डोळे उघडून पाहिल्यास तो उठून दिसतो.
पहावयास गेले तर तो प्रत्येक घरात असतो
तोच सगळ्या घराचे चक्र चालवत असतो.
त्याला काम करताना पाहून आपल्यालाही येतो चेव
आयुष्यभर पुरुन उरेल देतो अशी संस्कारांची ठेव
ह्या नात्याला नाव असते बालक अन् माता
आयुष्यभर असते सोबत बनून आपला दाता
आई असेल तरच जगायची मजा असते
वाटत असेल खोटे तर विचारा अनाथास ह्या जगात त्याची काय किंमत असते?
आई म्हणजेच आत्मा आणि ईश्वराचा संगम
आई नसल्यास आयुष्यात निर्माण होतो संभ्रम
कोण म्हणते देव नसतो…
कोण म्हणते देव नसतो…

– आदित्य दि. संभूस.

#श्रावण अमावस्या #मातृदिन

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..