नवीन लेखन...

शब्द बापुडे केवळ वारा

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणून ओळखली जातात. पैकी पृथ्वीच्या आधारानेच सगळे जीवन चालते आणि आप म्हणजे पाणी हे तर मूर्तीमंत जीवनच. तेजोमय लोहगोल म्हणजे भगवान् सूर्यनारायण वायू आणि आकाश या दोन गोष्टींचा संदर्भ सहजासहजी लागत नाही. समर्थांनी दासबोधात एका समासात वायुची विविध रुपे सांगितली आहेत. आपण जे शब्द उच्चारतो, बोलतो ते वायुस्वरुपातच असतात. वारा हा वातावरणाचा मूलाधार आहे. शब्दांच्या निर्मितीसाठी, वहनासाठी वायू आवश्यक आहेच. शब्द हे माध्यम एकेकाळी फार महत्त्वाचे होते. ‘प्राण जाए पर वचन न जाए’ अशी रघुकुलाची ख्याती होती. लोक शब्दासाठी वाटेल तो त्याग करायला तयार असत. पण कधी शब्द फिरवत नसत.

आता जरा आजुबाजूला बघा, लहानमोठी माणसे बिनदिक्कत खोटे बोलतात. आपले राजकारणातले लोक तर अशी काही आश्वासने देतात की ती देत असतानाच आपण पूर्ण करु शकणार नाही. याची त्यांना जाणीव असते. पण असे असूनही पोकळ आश्र्वासनांचा खोटा व्यापार चालूच असतो. पूर्वी एखाद्या माणसाला शपथ घालून खरे बोल म्हणून सांगितले तर तो बहुतेकवेळा खरे बोलावयाचा. आता शपथ घेण्याचा जमाना संपला असला तरी कोणाचाही आणि कोणत्याही प्रकारे मुलाहिजा न बाळगता खोटे बोलताना खोट्या शपथा घेणे हेही सामान्य झाले आहे. त्यात आपले काही चुकते, असे कोणालाही वाटत नाही.

समर्थ रामदासांनी आपल्या थोरल्या बंधूच्या दोन मुलांना जो उपदेश केला त्यातली पहिली ओळ, ‘बरे सत्य बोला, यथातथ्य चाला’ अशी आहे. खरे बोला आणि खरे वागा. असे केल्याने काय होईल? ‘बहु मानिती लोक तेणे तुम्हाला’. समाजात मानसन्मान मिळवायचा असेल, आपली इज्जत राखावयाची असेल तर खरे बोला, खरे वागा. असा समर्थांचा सल्ला आहे. धर्मसंस्कृतीसुद्धा ‘सत्यं वद; धर्म चर’, असे सांगते. धर्मचरणापेक्षा सत्यवचनाला अधिक महत्त्व, अग्रस्थान दिले आहे. महर्षी मनुसुद्धा ‘सत्यं ब्रूयात्; प्रियं ब्रूयात्’ असे सांगतो. सगळी माणसे खोटे बोलू लागली तर मग ‘ असतो मा सद्गमय’ या प्रार्थनेला तरी काय अर्थ राहील? असत्याकडून मला सत्याकडे ने, ही प्रार्थना जी शतकानुशतके करतो ती सत्याचे महत्त्व जाणतो म्हणूनच करतो ना?

शब्द हे सत्यावर आरुढ झालेले असले पाहिजेत. शब्द म्हणजे नुसती हवा किंवा वारा नाही ते अस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे.

-ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..