जे होणार ते ते विधिलिखित आहे
म्हणुनी कां काही करायचेच नाही
देईल हरि मला माझ्या खटल्यावरी
हा साक्षात्कार अजुनी झाला नाही
श्वास हे जीवनी कायमचे विरणारे
हरविलेला क्षण कधी परत येत नाही
संदिग्ध वाटेवरी चालावेच लागते
रेखा भाळीची बदलता येत नाही
जीवन सुखदुःख वेदनांचेच सरोवर
सामर्थ्याने तरण्याविना पर्याय नाही
मन, भावनांच्या लाटांशी खेळणारे
प्रारब्धाच्या गतीविना झुलत नाही
मन:शांती सात्विकी सदविचारांची
विवेकी सत्कर्माविना मुक्तीच नाही
*********
–वि.ग.सातपुते.(भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३२४
7/12/2022


Leave a Reply