नवीन लेखन...

परीक्षेची विश्वासार्हता

परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा ऑफलाईन घ्या विद्यार्थ्यांनी त्यात अनेक पळवाटा शोधून काढल्या आहेत. कॉपी करण्याची भ्रष्ट परंपरा वृद्धिंगत होत आहे. कॉपीची वाळवी हळूहळू सर्व जीवन पोखरेल याचीच भीती वाटत आहे. अनेक शैक्षणिक संस्था मध्ये परीक्षा योग्य पद्धतीने घेतल्या जातात म्हणून मूल्यमापन शब्द अजूनही अस्तित्वात आहे. सगळेच काही भ्रष्ट परीक्षेतून श्रेष्ठ झाले नाहीत.अभ्यासाने, परीक्षेने अनेक जण मोठे यश प्राप्त करू शकलें व यशस्वी जीवन जगलें.  कॉपी न  केलेले अनेक जण आपल्या ज्ञानाच्या आधारे जीवनातले अनेक प्रश्न सहजपणे सोडवतात. कॉपी, भ्रष्टाचार केलेल्यांचा शेवट आज जेल मध्ये झालेला आपण पाहतो. परीक्षेला बायपास करून एक मोठा कळप कॉपी करून मूळ कळपात सामील होतो आहे, याचे दुःख नक्कीच आहे. अध्ययन-अध्यापन यापेक्षाही गंभीर प्रश्न परीक्षा व मूल्यमापन यासंदर्भात निर्माण होत आहेत. निरीक्षणाने व अनुवंशिकतेने  विद्यार्थी जे शिकतात त्याची नोंद  कोठे होते? लहानपणापासून सायकल, लुना दुरुस्त करणाऱ्या मुलांची शिक्षणापासून वाताहत होते?

पैशाशिवाय शिकताच येत नाही अशी आज परिस्थिती झाली आहे. शिक्षणाच्या हक्कापासून कितीतरी जण तांत्रिक कारणामुळे वंचित आहेत, त्याचे उत्तरदायित्व कोणाचे?

मूल्यमापनाची विश्वासहार्यता कमी होत चालली आहे.मुल्यमापनाचाच  नवीन आराखडा तयार करावा लागणार आहे.फेर मूल्यांकनाची मागणी वाढतेच आहे. शिकविणारे व शिकणारे यामध्ये समायोजन  नाही, नुसते आयोजनच आहे. कागदावरच्या अध्यापनाची परीक्षा कागदावरच होत आहे.माणसाचे यश कागद ठरवत आहे,पण कौशल्यें कागदावर तग धरत नाहीत. लिहून दिलेल्या नोट्स नीट परीक्षेत लिहिल्या जात आहेत. फार थोडे शिकतात, बरेच पाहून लिहिण्याचे अनुकरण करतात. एखादी कृती केल्यानंतर त्या कृती आपण तपासतो, कोणत्याही शैक्षणिक किंवा इतर उपक्रमाचे मूल्यमापन केले जाते. मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचे संख्यात्मक प्रमाण ठरविणे होय. व्यक्तीच्या संदर्भात मूल्यनिर्धारण व प्रकल्प कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम याच्या संदर्भात मूल्यमापन या संज्ञा वापरल्या जातात.  निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्याचा समावेश होणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणात एखादा घटक शिकविला जातो या प्रश्नाचे उत्तर म्हणजे शिक्षणाचे ध्येय, त्यातून काय साध्य होईल याचे उत्तर म्हणजे उद्दिष्ट, सर्वच साध्य होईल असे नाही.

शिक्षण हे मानवाने संपादन केलेले एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणता येतात, हे बदल अपेक्षित दिशेने आणि किती झाले आहेत ते मूल्य निर्धारण मूळे कळते .मूल्यमापन किंवा मूल्यनिर्धारण हे साधन आहे साध्य नव्हे. मूल्यनिर्धारण हे केवळ संपादनाशी संबंधित नाही, तर सुधारणेशीही निगडित आहे. मूल्यनिर्धारणात निर्णयाची गुणात्मक चिकित्साही असते. मापनात केवळ मोजमाप येते. मूल्यनिर्धारणात प्रक्रियेचे परिणाम तपासले जातात पुरावा जमा करून त्याचा अर्थ लावणे म्हणजे मूल्यनिर्धारण.

सतत होणाऱ्या परीक्षा  व त्यांची संख्या ,त्यांचा निकाल लावणे ही व्यवस्थापनाच्यादृष्टीने समस्या बनली आहे. करोनाच्या दोन वर्षाच्या काळात शिक्षण, अध्यापन ,संवाद, कौशल्य प्रक्रिया याला एक प्रकारचा सेटबॅक मिळाला आहे. शारीरिक हालचालीही सीमित झाल्या, अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या, त्याला मूळ पदावर आणून पुन्हा विसरलेली कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात करून एका नवीन मूल्यमापनाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.

शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने विद्यार्थ्याच्या वेळोवेळी परीक्षा घेऊन त्यांचे निर्णय लावणे गरजेचे आहे पूर्वीपेक्षा अधिक परीक्षा घेण्याची प्रथा वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे परीक्षा समस्या बनली आहे. सत्र परीक्षा काही विद्यापीठात यशस्वी झाली नाही, किंवा वारंवार परीक्षेमुळे काही ठिकाणी ती योग्य हाताळता आली नाही.

आपली पारंपारिक परीक्षा पद्धतीही विषयाच्या माहितीवरच अधिक भर देते. विद्यार्थ्यांमध्ये योग्य प्रकारची अधिक रुची आणि आपल्या कल्पना इतरांपर्यंत पोचवण्याचे संप्रेषण कौशल्य निर्माण होणे आवश्यक आहे.

अध्यापन काही ठिकाणी झाले नसतांनाही विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. नेट व नेटानं प्रयत्न नसल्यामुळे अनेकांना कौशल्यांचे अपंगत्व आले आहे.

करोनामुळे अनेकांची जीवन प्रक्रिया खुंटली,जीवन शैली बदलली, अनेकांचे ज्ञान घेण्याची प्रक्रिया खुंटली.

अलीकडे प्रश्नपत्रिका वा तिच्यातील प्रश्न सदोष असतात, पाठ्यपुस्तके ही सदोष असतात. प्रश्नासाठी निवडलेल्या पाठ्यक्रमातील आशय अपुरा असतो, मर्यादित असतो याचाच अभ्यास करून विद्यार्थी उत्तीर्ण होतो. मूल्यमापन लेखी परीक्षा पुरतेच मर्यादित असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यमापन आजच्या आपल्या परीक्षा पद्धतीत होत नाही,परिणामी परीक्षा विश्वसनीय राहिलेल्या नाहीत. विद्यार्थ्याच्या उणिवांची चिकित्सा करून त्या दूर करण्याचे प्रयत्न वाढीला लावणे ही गोष्ट परीक्षा पद्धतीतून होऊ शकत नाही.शाळेत सुप्त गुण ओळखुन त्यांना विकसित करणारी यंत्रणाच  नाही. शाळेला फाटा देऊन अशा अनेकांनी आपले सुप्त गुण विकसित केले आहेत. शाळेत आम्हाला सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर ओळखताच येत नाहीत हा शिक्षण प्रक्रियेचा पराभवच नाही कां?अनेकांचे सूप्त गुण आयुष्याच्या उत्तरार्धात विकसित होत आहेत.

अजून एटीकेटीची मलमपट्टी वापरली जाते आहेच.परीक्षा डोळ्यापुढे ठेवून शिकविले जाते व परीक्षेचा पेपर ही त्यादृष्टीनें काढला जातो व परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी कसे उत्तीर्ण होतील व त्यांना ग्रेस मार्क देऊन उतीर्ण करणं हेच अंतिम उद्दिष्ट राहिल्यामुळे परीक्षेचा निकाल लागला आहे.

कॉपी करून उत्तर लिहिलेले आहे हे परीक्षकाला माहीत असूनही कोणताच पुरावा नसल्यामुळे परीक्षक त्याला भरमसाठ गुण देऊन मोकळे होतात. परिक्षेच्या काळात कॉपी पुरवणारी एक जमात सज्ज असतें. शाळेच्या कंपाउंड वॉल, खिडकी वर चढून ही टोळी युद्धपातळीवर काम करतें. भरारी पथक येते व पोत्यांनी कॉपी गोळा करते पण तरीही कॉपी विद्यार्थ्याकडे असतेच. शैक्षणिक संस्थांच्या मुतारी मध्ये एक पर्यवेक्षक नेमण्या इतपत विद्यार्थ्यांची कॉपी करण्याची प्रवृत्ती वाढली आहे.

अध्यापनंच झाले नाही, जिथे पेपरफुटी ने अनेक जण स्वतः शर्यतीत पुढे जातात, तिथे सामान्य विद्यार्थी हिरमुसला होऊन तोही त्या कळपात सामील होतो.

विद्यापीठ अनुदान आयोगाने १९७३ मध्ये पदवी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी कृती योजना प्रसिद्ध केली होती, त्यात विद्यार्थ्याला अभ्यासाच्या योग्य सवयी घडविण्यास उत्तेजना मिळण्यासाठी अंतर्गत मूल्य निर्धारण होते या पद्धतीमुळे अन्य कौशल्य व उद्दिष्टे यांची तपासणी करता येते. सांख्यिकी विश्लेषणातून असे आढळून आले की जेव्हा परीक्षक उत्तरपत्रिका तपासतो तेव्हा गुणदान करतांना पाच टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण देण्याची शक्यता ५० टक्के एवढी असते. विद्यार्थ्याला त्याची परीक्षा कशी घेतली जाणार आहे हे कळले पाहिजे, त्यासाठी प्रश्नपेढी आवश्यक आहे. प्रश्र्न  रचनेची समस्या व्यवस्थित विकसित केलेल्या प्रश्न पेढी मुळे सुटू शकेल. चांगली शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या ज्ञानात्मक, भावनात्मक व क्रियात्मक बाजूवर सारखेच भर देत असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक मूल्यमापनाची संकल्पना स्वीकारणे गरजेचे आहे. अभ्यासाबरोबरच जीवनाच्या अनेक क्षेत्रात सहभागी होण्यासाठीची काळजी सहशालेय कार्यक्रमातून घ्यायला हवी विशिष्ट ज्ञान क्षेत्रे व त्यातील ज्ञानाचा काही अंश केवळ पाठ्यपुस्तक या पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षणात विचारात घेतला जातो.

जे जे परीक्षेला येणार त्याचाच अभ्यास करण्याची वृत्ती सध्या दिसते आहे. प्रश्नपत्रिका, प्रश्र्न चुकीचे असतील तर ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील कशा? ५० टक्के प्रश्‍न उपयोजनावर हवेत, तसे प्रयत्न काही विद्यापीठाने सुरूही केले आहेत. केवळ अभ्यासक्रम सर्वसमावेशक असून चालणार नाही परीक्षेतील प्रश्न ही सर्वसमावेशक असावेत.  मागच्या प्रश्नांची पुनरावृत्ती किती दिवस करणार? परीक्षेतील त्रुटी या शिक्षण पद्धतीच्या त्रुटी आहेत. परीक्षा म्हणजे केवळ घोका व ओका यापुढे जाऊन पहा व लिहा या अवस्थेत आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा यंत्रणेला गुंडाळून ठेवले आहे. कॉपी नियंत्रणासाठी काही ठोस निर्णय दरवर्षी जाहीर होतात पण ते पुरेसे नाहीत.

कॉपी करताच नाही आली किंवा कॉपी करता येत नाही अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हाच विद्यार्थी अभ्यासाकडे वळतील.

विद्यार्थी व पालकांचे मेळावे, उदबोधन अजून व्हायला हवं. विद्यार्थी निवड, शिक्षक निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम व अमलबजावणी याचा संबंध कॉपी प्रकरणात कुठे तरी आहे याचा शोध घ्यायला हवा. कृती पत्रिकेचा वापर, स्वमत, अभिव्यक्ति, उपयोजनावर भर  देणारे प्रश्न असावेत. पेपर काढणारे व तपासणारे यांच्या क्षमतेचा व निकषाचा विचार व्हायला हवा.

विश्वास नसलेली व्यवस्था चालू ठेवणे एवढेच  आपल्या हातात आहे. ही अवस्था बदलणार कशी? परीक्षेचे आयोजन, नियोजन याबद्दल शंका नाही, त्या सुरळीत पार पाडल्या जातात ,शंका आहे ती उपयोजना बद्दल. मिळालेल्या ज्ञानाच्या उपयोजनयावर प्रश्न कमी असतात. प्राध्यापकांचे प्रश्‍न तयार करण्यासंबंधीचे प्रशिक्षण, प्रश्नात संदिग्धता नसणें, वैचारिक पणा नसणें ,विचारप्रवृत्त करणारे प्रश्र्न नसणे या बाबी महत्त्वाच्या आहेत ,या साऱ्यांचाच विचार करणे आवश्यक ठरणार आहे.

परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या  ज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी परीक्षा आव्हान न वाटण्याइतपत हास्यास्पद करीत आहेत.पेपर फुटीतून पास झालेले व बोगस नेमणूक झालेले शिक्षक कॉपी कशी रोखणार? हा ही गंभीर प्रश्न आहेच

परिक्षकांना मॅनेज करणे आता कमी झाले असले तरीही व्हिडिओ शूटिंग, शाळेची मान्यता रद्द करणे याही गोष्टी राबविल्या जात आहेत, तरीही कॉपीची समस्या राहणारच असली तर कुठेतरी  शिक्षणातलं सगळच मूल्यं  हरवले आहे याचा गांभीर्याने विचार करायला हवा. सगळच आहे, पण मूल्यशिक्षण नाही ही आजच्या समाजाची शोकांतिका आहे. काही लढें आपापल्यापरीनेच लढावें लागतात त्यापकीच शिक्षण हे आहे. सगळ्यांनाच  द्रोणाचार्य  कुठे मिळतात?

— डॉ.अनिल कुलकर्णी.

anilKulkarni666@gmail.com

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 28 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..