नवीन लेखन...

नवरात्र

Navaratri

आजपासून सुरू झालेला नवरात्रोत्सव देवींच्या महापूजेचा असला तरी तो पृथ्वीतलावरच्या तमाम ‘स्त्री’ जातीच्या पूजेचा आहे..’स्त्री’च्या ‘प्रसव’क्षमतेची, ‘मातृत्वा’ची ही महापूजा आहे..आपण त्याची सांगड महालक्ष्मी, दुर्गा , काली आदी देवतांशी घातलीय इतकंच..!!

नवरात्रात ‘घट’ बसवतात हे आपण पाहातो, ऐकतो आणि बोलतो देखील. मुंबईसारख्या शहरात गुजरातकडच्या अनेक स्त्रीया नवरात्रात हातात ‘घट’ घेऊन फिरताना दिसतात. या हे घट मातीचे असतात व त्यात एक लहान दिवा तेवत असतो. हा मातीचा ‘घट’ म्हणजे स्त्रीचे ‘गर्भाशय’ आणि त्यात मंदपणे तेवत असलेला दिवा म्हणजे त्या ‘गर्भाशया’त फुंकला गेलेला ‘प्राण’..आपल्या संस्कृतीत दिवा हे प्रणाचं प्रतिक मानलं गेलं आहे..गुजरातेत (आता महाराष्ट्रातही) नवरात्रात मोठ्या भक्तीभावनेने खेळला जाणारा ‘गरबा’ या शब्दाचं ‘गर्भा’शी असलेलं साम्य आपल्याला हेच तर सांगतं..

नऊ दिवसांचा ‘नवरात्रोत्सव’ म्हणजे स्त्रीच्या नऊ महीन्यांच्या गर्भार अवस्थेचा सन्मान असून दहाव्या दिवशी साजरा होणारा दसरा नवजात बाळाचं गर्भाशयातून या जगात होणार ‘सिमोल्लंघनाचं प्रतिक आहे..

‘माती’ आणि ‘माता’ या दोघांमध्ये विलक्षण साम्य आहे. दसऱ्याच्या दिवशी शेतात तयार झालेलं पिक कापण्याची प्रथा आमच्या कोकणात आहे. मातीच्या गर्भातून उगवलेलं पिक हे मातीचं अपत्याच जणू..स्त्री आणि जमीन यांच्यातलं हे साम्य मनाला मोहवणारं आहे..नऊ महीन्यांचं गर्भारपण संपून बाळाचा होणारा जन्म मातीतून तरारून येणाऱ्या पिकापेक्षा वेगळा नाही..

दसऱ्याच्या दिवशी घराला, वाहनाला तोरण लावायची प्रथा आहे..आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या तोरणात आंब्याचा टाळ, गोंड्याची फुलं असं काही असलं तरी शेतात नुकत्याच तयार झालेल्या भाताची लोंबी मात्र आवर्जून लावली जाते..कोवळ्या भाताची लोंबी म्हणजे घरात नुकताच जन्म घेतलेल्या नवीन जीवाचं प्रतिक आहे..

नवरात्रात नऊ माळांमधल्या आठव्या माळेला म्हणजे ‘अष्टमी’ला खूप महत्व आहे..असं का याचा विचार करताना लाहनपणी माझी आई आणि इतर काही जुन्या बायका ‘आठव्या महीन्यात बाळंतपण म्हणजे कठीण’ असं म्हणायच्या ते आठवलं.. म्हणजे आठव्या महिन्यात जन्मलेल्या बाळाची जगण्याची शक्यता थोडी कमी असते..वैद्यकीय क्षेत्रात असं खरंच असतं की नाही ते माहीत नाही पण त्या बायकांचा अनुभव अगदीच खोटा नसावा हे खरं..सहाव्या-सातव्या महिन्यात जन्म घेतलेल्या Premature Babyची जगण्याची शक्यता आठव्या महिन्यात जन्म घेतलेल्या बाळा पेक्षा जास्त असते असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असायचा..आठव्या महिन्यात जन्म घेतलेल्या बाळाने जीव धरावा या साठी अष्टमीपूजनाला महत्व दिलेले असावे बहुतेक..

असा हा नवरात्रोत्सव मातृत्वाचा उत्सव आहे. सृजनाची महापूजा आहे..आपल्याला या जगात आणणाऱ्या ‘आई’चा सन्मान आहे..आणि म्हणून देव्हाऱ्यातून सार्वजनिक मंडळांच्या पेंडाॅल मध्ये येऊन बसलेल्या गणपतीचा त्या त्या विभागाचा ‘राजा’, ‘महाराज’, ‘सम्राट’ झाला असला तरी त्याच मांडवात बसलेल्या देवीची ‘राणी’, ‘महाराणी’, सम्राज्ञी झालेली नाही. ती ‘माता’च आहे आणि ‘माता’च राहाणार..!!

— गणेश साळुंखे
९३२१८११०९१

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..