![P-104783-1](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2023/07/P-104783-1-678x381.jpg)
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ – सुधीर आंबवणे ह्यांनी लिहिलेला हा लेख)
देश-विदेशात लाखोंच्या संख्येने गणपतीची मंदिरे आहेत. प्राचीन गणपती मंदिरांची संख्याही खूप मोठी आहे. नव्यानेही अनेक ठिकाणी गणेश मंदिरे निर्माण होत आहेत. नाशिक मध्ये अगदी अलीकडेच म्हणजे ४ वर्षांपूर्वी निर्माण झालेलं गणपती मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून ‘महागणपती’ अशी या मूर्तीची किर्ती दूरवर पसरली आहे. गणेशमूर्ती ४२ फूट उंच असून भारतातील सर्वात उंच विराट मूर्ती म्हणून तिची ओळख आज प्रस्थापित झाली आहे.
गणपतीला चार मुखे असून सर्व बाजूंनी मूर्तीचे दर्शन सर्वांना सहजपणे होते. मुद्गल पुराणातील गणेशाचा ३२ प्रकारांमध्ये समाविष्ट असलेल्या या मूर्तीच्या रूपास शास्त्रीय आधार आहे. मूर्तीच्या परिसरात जाताच भक्ताला सकारात्मक उर्जा मिळत असल्याचा अनुभव येतो.
प.पू. श्री अण्णा गुरूजी यांना नाशिकरोड जवळील विहीत गावातील वाळदेवी नदीच्या किनारी भाद्रपद चतुर्थीस पहाटे ब्रह्ममुहूर्तावर प्रत्यक्ष श्री गणेशाचा चतुर्मुखी स्वरूपात साक्षात्कार झाला. त्यामुळे ही श्रीगणेशाची ४२ फूट उंच मूर्ती येथे उभारण्यात आली. “मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे!” अशी श्री आण्णा गुरूजींची ठाम श्रद्धा आहे. गेली २ तपाहून अधिक काळ त्यांची स्वतःला संपूर्णपणे ईश्वरसेवेत व सत्याचे शोधार्थ समर्पित केले आहे. आपले गुरू जुनागडचे जगद्गुरू श्री दिगंबर दत्तात्रय महाराज व कोइमतुरचे गुरुदेव श्री स्वामी पार्थसारथी मल्लनाबाबा यांच्या सान्निध्यात श्री अण्णा गुरूजींनी प्रदीर्घकाळ तपः साधना केली व संपूर्ण भारतीय उपखंडात भ्रमण करून अनेक साधना केल्या. वैदिक प्रयोग व अध्यात्मिक उपक्रमात भाग घेऊन त्यांनी ज्ञानोपासना केली. विहीत गाव येते श्री अण्णा गुरूजी न्यासाच्या माध्यमातून श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम संस्था स्थापन झाली असून त्या संस्थेतर्फे अनेक अध्यात्मिक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. ‘अण्णा गणपती’ या नावाने हा गणपती ओळखला जातो. संस्थेने त्या ठिकाणी नवग्रहाची स्वतंत्र ९ मंदिरे उभारली आहेत. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू या नवग्रहाची मंदिरे म्हणजे दाक्षिणात्त्य शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. नवग्रहाच्या मूर्ती काळ्या पाषाणाच्या आहेत. नवग्रह मंदिराच्या परिसरात श्रीगणेश, इंद्र, दुर्गा, वास्तू देवता आणि काळभैरव या पंचदेवांची निर्मिती करण्यात आली असून नवग्रहांचे क्षेत्रफळ वा सुरक्षा कवच या दृष्टीने ते पंचदेव काम करतात.
-सुधीर आंबवणे, ठाणे
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply