नवीन लेखन...

मानसकोंड – पडझड

“– आयुष्यात पडझड केव्हा सुरू होते माहितेय ? ”
माशाने अचानक विचारले .
याची अनेक उत्तरे आहेत , पण तुला काय अभिप्रेत आहे , हे मला कसे कळणार ?
असं त्याला विचारावं , असं वाटलं .
पण काही बोललो नाही . एक म्हणजे उपयोग झाला नसता आणि दुसरे म्हणजे माझ्या मनातला विचार त्याला अगोदरच कळत होता .
तसा तो मनकवडाच होता .

“तुझ्या मनात चाललेलं ऐकतोय मी .”
मी हसलो .
” आता तू हसलास , त्यापाठी विनोद नव्हता . भीती होती . सगळंच जर याला कळायला लागलं तर पंचाईत होऊन जाईल . तुझ्या मनात येणारे लहानसहान विचार मला कळतील आणि तुझ्या आयुष्यात खाजगी असं काही राहणार नाही , कसलं गुपित राहणार नाही , हीच काळजी तुझ्या मनात होती . ती मला कळू नये म्हणून खोटं खोटं हसलास . खरं ना ? ”
माशानं विचारलं .
इतकं उघडं पडल्यावर खोटं बोलणं शक्यच नव्हतं . नाही म्हणणं चुकीचं होतं.
मी हो म्हटलं .
” काळजी करू नकोस . तुझ्या मनातले विचार मला कळले मी अन्य कुणाला सांगणार नाही . तू आणि मी समानधर्मा आहोत ना . निःशंक राहा . पडझड केव्हा सुरू होते असं मी विचारलं त्याला कारणही तसंच आहे .
कधीकधी पडझड होते तेव्हा कळतसुद्धा नाही , की पडझड झाली . नुकसान किंवा दुःख हे पडझडीचे परिणाम असतात . पडझड होणार आहे , हे फार थोड्या जणांना समजतं . पण परिस्थितीच्या रेट्यासमोर तेही हतबल होतात . ”

” आज तत्वज्ञान सांगण्याचा बेत आहे की काय ? ”
मनाशी बोलण्यापेक्षा मी त्याला विचारलं .

तो थोडा वेळ गप्प बसला .

” तत्वज्ञान असं काही नाही .”
खूप वेळाने तो म्हणाला .
” पण प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना किंवा प्रवाहाच्या विरुद्ध जाताना झालेल्या पडझडीचे दिवस आठवले .”

समोर झुळुझुळू वाहणाऱ्या झऱ्याच्या नितळ पाण्यात एक डुबकी मारून , पोहून, ओल्या अंगाने निथळत तो माझ्याकडे आला .
आणि रोखून बघू लागला .
” मी काय केलं हे नाही ना कळलं ? ”
” कळलं . पोहून आलास .”
” बस ? इतकंच ? म्हणजे तुझं लक्ष नव्हतं . मी पोहत होतो पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं . ते तुझ्या लक्षात आलं नाही . यात तुझी चूक काहीच नाही . आपला सगळा समाज असाच आहे . कुणीतरी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करतोय , त्याच्या मनात काहीतरी वेगळं आहे , त्याबद्दल त्यानं काहीतरी विचार केलेला आहे , हे कुणी लक्षात घेत नाही . असं पोहताना त्याची दमछाक होत आहे , पण तो जिद्द सोडत नाही , हेही कुणी लक्षात घेत नाही . फक्त हसण्याचं , नको ते सल्ला देण्याचं , खिल्ली उडवण्याचं आणि मुख्य म्हणजे वेड्यात काढण्याचं काम , समाज करत असतो . ”
“हे सगळ्या अनेक संशोधकांच्या , शास्त्रज्ञांच्या , समाज सुधारकांच्या , शिक्षकांच्या , लोकप्रतिनिधींच्या , कर्तृत्वावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या आणि तशा विचारांच्या अनेक जणांनी अनुभवलं आहे .” मी म्हटलं .
“खरं आहे . पण अनेक वेळेला सामान्य माणसं सुद्धा काहीतरी वेगळं करण्याची जिद्द बाळगतात , पण त्यांची नाव निशाणी देखील रहात नाही . ”

मासा चुळबूळ करीत होता . त्याला काहीतरी आणखी सांगायचे होतं .
नेहमीप्रमाणे तो योग्य शब्दांना शोधत होता …

“– तुला माहितेय कोकण रेल्वे आली आणि अनेकांचं भाग्य पालटलं . अनेकांच्या जमिनी गेल्या , त्यांना चांगला मोबदला मिळाला , अनेकांना नोकऱ्या मिळाल्या , अनेकांना व्यवसाय सुरू करता आले .सगळं चांगलं झालं . पण रेल्वेमार्ग जिथून गेला तिथून वाहणाऱ्या नद्यांच्या नशिबी उपेक्षा आली . कामाला सुरुवात होताच ,पहिल्याच पावसात नद्या गाळानं भरून गेल्या . हे असं होणार , हे , अशिक्षित असणारे पण अनुभवानं शहाणे असणारे , कानीकपाळी ओरडून सांगत होते . मी शिक्षक होतो . अशाच एका नदीशेजारच्या गावात राहत होतो . गाळ साचणार , नद्या उथळ होणार , महापूर येणार आणि नदीचं पात्र विस्तारून नदीकाठाजवळच्या शेतीचं ,शेतजमिनीचं नुकसान होणार, हे स्वच्छ दिसत होतं . मी सरकार दरबारी , लोकप्रतिनिधी अशा सर्वांकडे पत्रव्यवहार सुरू केला . वर्तमानपत्रातून लेख लिहिले . पण कुणीही दखल घेतली नाही . शेवटी मी शाळेतल्या मुलांना विचारलं . एखाद्या रविवारी चारपाच तास श्रमदान करून गाळ काढायचा का ? सगळ्या मुलांनी होकार दिला . मी शाळेच्या मुख्याध्यापकांना , गावच्या लोकप्रतिनिधींना सांगितलं . सर्वांनी खुळ्यात काढलं . शंभर सव्वाशे मुलं असा कितीसा गाळ काढणार ? त्यानं काय साध्य होणार ? महापूर येणं थांबणार आहे का ? हे शासनाचं काम आहे , आपण प्रवाहाविरुद्ध जाऊन काय साध्य होणार ? मुलांना राबवून घेतल्यावर पालकांच्या , शिक्षण खात्याच्या तक्रारींना कोण उत्तर देणार ? मुलांच्या अभ्यासाच्या नुकसानीला जबाबदार कोण ? गाळ काढताना मुलांना जखमा झाल्या , मुलं आजारी पडली तर तो खर्च कोण करणार ? …एक ना दोन असंख्य प्रश्न विचारून , अडथळे निर्माण करून सर्वांनी नामोहरम करण्याचा प्रयत्न केला . पण उत्साही मुलं , एकजुटीनं माझ्या पाठी उभी राहिली . रविवारी सगळी मुलं फावडी घमेली घेऊन आली आणि थकेपर्यंत गाळ उपसण्याचं काम केलं . सगळे दमलेले बघून मी काम थांबवलं . शाळेच्या मैदानात सर्वांना एकत्र केलं . एका शिपायाला उप्पीट तयार करायला सांगितलं होतं . तो शिपाई प्रामाणिक होता . मी त्याला सर्वांना उप्पीट द्यायला सांगितलं तर तो रडायला लागला . त्यानं जे सांगितलं ते ऐकून मी मटकन खाली बसलो . त्यानं तयार केलेल्या उप्पीटात , त्याच्या नकळत कुणीतरी भरपूर पाणी ओतून ठेवलं होतं .मला काय करावं ते कळेना .मी सगळ्या मुलांना एकत्र करून जे घडलं ते सांगितलं . मला रडू आवरत नव्हतं . मला, मुलांचे भुकेलेले चेहरे दिसत होते . प्रवाहाविरुद्ध पोहायला जाणाऱ्या मला , कुणीतरी नतद्रष्ट माणसाने धडा शिकवायचा चंगच बांधला होता . पण मुलं मनानं चांगली होती . त्यांच्यातल्या मॉनिटर ने मला सांगितले , ‘ सर आम्ही घरी सणावाराला रव्याची गोड खीर पितो , आज आम्ही रव्याची तिखट खीर घेऊ . मजा येईल . त्यानं सर्वांना रांगेत उभं केलं आणि शिपायानं आणून ठेवलेल्या वडाच्या पानांचे द्रोण करून तिखट खीर वाढायला सुरुवात केली . मुलांची समज बघून शिपाई खूप वेळ रडत होता . माझीही अवस्था वेगळी नव्हती . पण मुलांनी सांभाळून घेतलं . आम्ही थोडाच गाळ उपसला होता . पण ते काम तेवढ्यावरच थांबलं . आमच्या कामाची दखल कुणीच घेतली नाही , ती अपेक्षाही नव्हती . पण किमान शासन स्तरावर ते काम सुरू व्हायला हवं होतं . ते झालं नाही . परिणामी त्याचवर्षी महाभयंकर पूर आला , त्यात अनेकांचं नुकसान झालं . तेव्हासुद्धा ज्यांचं खरं आणि भरपूर नुकसान झालं होतं , त्यांना मदत मिळावी म्हणून मी , अशा लोकांची यादी तयार केली . तेही प्रवाहाविरुद्ध जाऊन . मदत वाटपाच्या वेळी मदतीचे ट्रक अडवून लुटण्याचा धंदा पद्धतशीरपणे सुरू झाला होता , त्यावेळी त्याला विरोध केला . परिणामी शाळा सुटल्यावर घरी येताना काही जणांनी अंधारात मला मारहाण केली . पण मी प्रवाहाविरुद्ध पोहायचे थांबवले नाही . शेवटी काही जणांनी पोलिसात तक्रार केली . साम दाम दंड भेद अशा सगळ्या प्रकारांनी मला त्रास दिला …आज आठवतंय सगळं .”

मासा काही क्षण थांबला .

” तुला माहितेय , वाहणे आणि वाहवत जाणे , यात खूप फरक असतो . पाणी सहजगत्या उताराकडे वाहत जात असतं . तो त्या पाण्याचा धर्म असतो . असं वाहणारं पाणी निरागस असतं . पण त्याच पाण्याचा , स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करण्यासाठी , त्याच पाण्यातून वाहवत जाणं , हे अनैतिक असतं . अर्थात अनैतिकतेची चाड कुणाला राहिलीय म्हणा . त्याचाच परिणाम पडझडीच्या रूपानं होत असतो , हे कधी कळणार आहे हे नियतीलाच ठाऊक . ”

तो म्हणाला आणि समोरच्या झुळुझुळू वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यात पोहायला गेला .
आता माझं नीट लक्ष होतं .

– तो आत्तासुद्धा प्रवाहाच्या विरुद्धच पोहत होता .

— आणि इतका वेळ माझ्या लक्षात न आलेली गोष्ट जाणवली .

मी सुद्धा नदीत पोहायला जाताना नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहत असे .

माशाच्या गोष्टीतला नवा अन्वयार्थ मला सापडला …
मी त्या माशाचं नीट निरीक्षण करू लागलो . प्रवाहाविरुद्ध पोहतांनाचं विलक्षण साम्य मला दिसू लागलं .

( क्रमशः)

–डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
———–
* सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !
* ही एक वेगळी कथामालिका आहे .
* रोज किंवा एक दिवसाआड ती आपल्याला वाचायला मिळेल .
* नावासह सर्वांना पाठवायला हरकत नाही .
* आपला अभिप्राय महत्वाचा आणि प्रेरणादायक आहे .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..